शुक्रवार, ११ डिसेंबर, २०२०

निरोप©️

 




2020 ,अगदी तप्त लोखंडाचा डाग -डागल्यासारखा हे वर्ष!. कित्येकांचे आधारवड कोसळले ते याच वर्षात.मृत्यु सर्वसमभाव या भावनेने प्रेरित होऊन त्याची दांडगट आणि दणकट पावले टाकत येतो.त्या खाली कोण चिरडतय याचे सोयर सुतक न ठेवता! सर्वात जास्त वाईट वाटत ते कित्येंकांना आपल्या जिवलगांचा निरोपही घेता आला नाही.आयुष्यभरासाठी सहजीवनाचे दिलेले वचन हवेतच विरून गेले. अंतीम संस्कारही किंवा दर्शनही त्यांच्या नशिबी  नव्हते.विचार केला तरी मनावर मळभ येते.खोलवर ओरखडे उठतात.


             निरोप


वडिलांची बदलीची नोकरी त्यामुळे जरा कुठे रूजून फुलतोय तोच तिथून हलावे लागायचे. अगदी लहानपणी म्हणजे अगदी प्राथमीक शाळेपर्यंत त्याचे विशेष वाटत नसे कारण आई बाबा जिथं आहेत तिथेच आनंदाचा ठेवा असायचा. पुढे शाळा , मैत्रीणींना सोडून जायचं म्हणजे नकोस वाटू लागल.मग परत परत शाळेतल्या आवडत्या जागी जाऊन बसणे तो परिसर नजरेत साठवणे असले त्या वयाला साजेसे प्रकार केले जायचे.पण एक मात्र खरे मैत्रिणीचा हात घट्ट पकडून अश्रू पात झाला की निरोप घेणं झाल. शब्दांची गरजच नसायची. तरीही  हा निरोप घेणं पुढच्या मुक्कामापर्यत छानपैकी पुरायचा.

    शालेय अंतीम वर्षातही निरोप देणे घेणे म्हणजे मोठ्ठा सोहळाच. माझ्यावेळी अकरावी होती. सेंड ऑफच्या दिवशी आईची साडी तिचाच ब्लाऊज टाचून  चढवला,मनगटावर आईचे किंवा मोठ्या बहिणीचे घड्याळ लावले  की मग एकदम मोठ्ठं झाल्याची जाणीव व्हायची. पोटात घट्टघट्ट आवळल्यासारख काहीतरी व्हायचं. मग शाळेत सर आणि बाई छानस भाषण करीत. आशिर्वाद देत मग रडायलाच यायचं तेव्हा पण काॅलेजमधे जाईपर्यंत  शाळेचे उबदार वातावरण भोवती आहे असेच वाटायच ते केवळ असा छानसा निरोप घेतल्यामुळे.  

         लग्नात व्याकुळलेल्या आईबाबांनी   जेव्हा पाठीवर हात ठेऊन निरोप घेतला तेव्हा झपकन् जाणीव झाली एका मोठ्या स्थित्यंतराची. पण तो डोळ्यांनी घेतलेला निरोप , डोक्यावरून हात फिरवून घेतलेला निरोप सासरी रूळेपर्यंत छानपैकी आजूबाजूला होता.

       माझा थोरला शाळेत जायला तेव्हा लागला तेव्हा मजाच झाली . त्याचा निरोप घ्यायचा राहीला आणि स्वारीचे रडण थांबेना. लक्षात येताच त्याला सांगितल की तू वर्गातून बाहेर येशील तेव्हा या झाडाखाली मी नक्की असेन गंमत म्हणजे रडू गायब!

       रोज तो आदित्यनारायणही आपला निरोप घेतो. डौलदारपणे केसरीया खेळत दूर क्षितीजावर नीळ्यासागरात किंवा डोंगराच्या मागे हळूच जातो.जाताना सांगतो सकाळी भेटू या .नक्की! शब्दांचा एकदम पक्का बर!पहाटेच स्वारी हजर!

       शिशिर ॠतुंच्या थंड वा-यांच्या भडीमाराने चाफ्याचे एक एक पान गा-या गा-या भिंगो-या खेळत मातीला मिळते पण झाडाचा हळूवार निरोप घेऊनच !. झाड बिचारे एकदम भुंडे भुंडे दिसत असतानाच वसंतॠतूची तजेलदार , उबदार झुळूक येते आणि निरोप घेऊन पडलेली पाने चमकदार पांढ-या पिवळ्या काळ्यांच्या रूपाने चाफ्याचे रूप खुलवतात.

       प्रिय प्रिय रसिकजनहो आज मी निरोपाचे आख्यान लावलंय त्यामुळे  तुम्ही ओळखले असेलच हा पसारा आवरायचा शेवटचा शुक्रवार! गेले नऊ महिने हा आठवणींचा पसारा आवरते आहे.तुमच्या कडून कौतुकाची थाप घेतल्यावर नेहमीच जीव कसा पाणीदार मोती बनायचा मग तो आठवणीच्या मखमली पेटीत बंद व्हायचा.. तुमच्या मुळे असे अनेक सुंदर मोती जमा झालेत माझ्याकडे. ती एक झिंग होती. आठवणी ज्या इतस्थतः पसरल्या आहेत त्या अधिक विस्कटू न देता आवरायच्या, तुमच्यासह परत अनुभवायच्या. दुःखद आठवणी तुम्हाबरोबर चिमणीच्या दाताने तोडलेल्या घासासारख्या वाटून घेताना झाल्या गोड गोड खाऊ!   आणि सुखद आठवणीं तुमच्यासमवेत आवरताना तर मनमोर मचाये शोर अशी अवस्था झाली.पण आता थांबवते पसारा आवरणे.आपल्यासारख्या रसिकांना परत एक छानसा नमस्कार. 

      जर कधी जाताना 'मी जाते' अस म्हंटले तर आज्जी खूप रागवायची. जाताना 'येते' म्हणावं ही तिची शिकवण! येते म्हण म्हणजे आपोआप वास्तू बोलवून घेते ही तिची पक्की समजूत.त्यामुळे आज तुमचा निरोप घेताना मीही 'येते' असेच म्हणणार आहे.

       या आठवणींच्या पसा-यात  अजून थोड्या आठवणी मिसळून पुस्तक रुपाने आपल्याला भेटायला येईनच तोवर नमस्कार, धन्यवाद, फिर मिलेंगे!

.



       माझे इतर ब्लॉग्स वाचण्यासाठी खालील लिंक वापरावी

https://drkiranshrikant.pasaara.com

शुक्रवार, ४ डिसेंबर, २०२०

सर्कस ©️

 



           कधी कधी छान सुरळीत चालणा-या आयुष्यात सहज कोणी तरी येत, आणि अचानक मानबिंदू  डिवचून जातो.अशा वेळी डिवचली गेलेली व्यक्ती हातपाय तरी गाळते किंवा विजेच्या चपळाईने नागासारखा फणा काढून फुत्कारते.गंमत म्हणजे या अरे ला कारे म्हणताना ब-याचदा नकळत नवा इतिहास लिहिला जात असतो.

       आमच्या पिढीच्या आणि नंतरही अनेक वर्षे मुलांच्या भावविश्वाचा एक महत्वाचाचा भाग असलेल्या 'सर्कस'चा जन्म साधारण असाच आहे. दीडशे वर्षांपुर्वी  कुरूंदवाड नामक संस्थानातील  घोड्यांना ट्रेनिंग देणारे विष्णूपंत छत्रे त्यांच्या महाराजां सह इटालियन सर्कस बघायला  जातात काय आणि तिथल्या इटालियन सर्कस व्यवस्थापकाचे ,"भारतीय लोक हे कसरतीचे प्रकार कधीच शिकू शकणार नाही" ही दर्पोक्ती   ऐकतात काय आणि मग अक्षरशः तीन महिन्यात प्रयत्न  करून परिपूर्ण ग्रेट इंडियन सर्कसचा जन्म होतो काय!सगळेच अतर्क्य! सर्कशीच्या भारतातील जन्माची ही चित्तरकथा .आज एकेकाळी अतिप्रिय असलेल्या सर्कसच्या आठवणींचा पसारा आवरणार आहे.




                          सर्कस ©️


        मी प्राथमिक शाळेत असताना घरी कामासाठी आलेल्या पद्माबाईंनी आल्या आल्या माझ मन जिंकलं. सर्व  काम आटोपल्यावर हळूच माझ्याजवळ  येऊन म्हणाल्या "ताई गंमत दावू काय?" माझ्या प्रश्नार्थक  चेह-याकडे बघून म्हणाल्या. "जावा पटकन चार कांदे आणा मग दावते." मी टोपलीतले कांदे तिच्या  हातात ठेवले. एक दोन क्षण तिने अजमास घेतला आणि मस्तपैकी जगलींग सुरू केले. एकामागे एकेक कांदा पटापट वर जात होता आणि हातात येत होता. "अग सर्कस मधे बघितल ग मी" मग पद्माबाई सहजतेने म्हणाली "ताई इतके दिवस सर्कस मधेच होतो मी". ज्या सर्कस मधल्या त्या कलाकारांचे त्या काळी मला प्रचंड वेड होते, त्यातली एक आमच्याकडे काम करतेय?. व्वा ! आजघडीला  अमिताभ बच्चन घरी आल्यावर जेवढा आनंद होईल तेवढाच आनंद त्या वयात मला झाला. 

         लहानपणी सर्कस  बघून आल्यावर नेहमीच मला 'सर्कसबाधा' व्हायची. मग कुठे कसरत करत कमान घालायचा यत्न करा किंवा सायकल दोन्ही हात सोडून चालव हे प्रकार या वेडापोटी मी करायची आणि  कोपर आणि ढोपर सणसणीत फोडून घ्यायची. वर रागवण्याची झणझणीत फोडणी असायचीच.पण हे वेड काही कमी होईना.शाळेत बाईंना जेव्हा मोठेपणी मी सर्कशीत जाणार म्हणून सांगितले तेव्हा आमच्या बाई पण खुसखुस  हसल्या होत्या.

           त्या काळात सर्कशीची ऐटच एकदम भारी होती.आधी शहरभर लागायची पोस्टर्स. त्यावर लाल नाकाचा जोकर आणि रबरासारखी लवचिक मुलगी असायचीच. कधी भल्या मोठ्या जबड्याचा हिप्पो आsss वासून उभा असायचा . अधाशासारखे परत परत ते पोस्टर पाहिले जायचे. नंतर नदीवर पाणी प्यायला जाणारे हत्ती दिसायचे. त्यांना दूरून डोळाभर पाहिल्यावर घरी आईबाबांजवळ सर्कशीला नेण्यासाठी भुणभुण सुरू व्हायची. तोवर वर्गातल्या सर्कस बघून आलेल्या मुली करायच्या रंगभरीत आणि रसभरित  वर्णन. आता कधी एकदा सर्कसला जातोय असे व्हायचे.

           अखेर तो दिवस यायचा.मग तो सोहळा सुरू होई. हो सर्कस  बघायची म्हणजे एक सोहळा असे. बहुधा रविवारच असे.सकाळ पासून वेध लागायचे सर्कशीचे! छान कपडे घालून आम्ही त्या मोठ्याच्या मोठ्या सर्कसच्या तंबूपर्यत गेल्यावर आपसूक नजर जायची तेथे जाडजूड साखळ्यांनी बांधलेल्या सतत डुलत असलेल्या आणि सोंडेने समोरच्या गवतात उगाचच उचकापाचक करणा-या गजराजांवर.एवढूशी साखळी अन भला मोठा हत्ती एकदम चूकीची जोडी जुळल्यासारख वाटायच्या. पलीकडेच तरतरीत घोडे असत. मस्त, तगडे , काळे, पांढरे ,तपकीरी! एक विशिष्ट नकोसा वास तिथे असे. वाघोबाच्या पिंज-याजवळ तर तो अधिकच येई. तोवर तिकीट काढलेली असत. मग त्या जादूई नगरीत प्रवेश!

          आत असलेले मोठे वर्तुळ,त्याच्या कडेला अर्धवर्तुळाकर खुर्च्या,त्यामागे लाकडांच्या फळ्यांची ल.सा.वि काढल्यासारखी उतरत जाणारी बैठक.आम्ही बहुधा त्या लाकडी फळ्यांवर असायचो.माझ्या वयाच्याच  मुलामुलींनी बैठक भरून जायची. तिथ असायचा असीम आनंद ,उत्साह  आणि उत्सुकता! अखेर बँडचे सुर घुमू लागायचे आणि मग एकामागोमाग एक अद्भुत दुनिया की सफर सुरू व्हायची.चमकदार कपडे, लयबद्ध  हालचाली आणि बॅन्डची झकास सुरावट! प्राण्यांच्या कसरती. काय काय बघाव अस व्हायच. इतक छान वाटायच न तेव्हा.जोकर तर सगळ्यांचा लाडका.त्याची ती पिचलेली लाकडी बॅट आणि निसटणारा पायजमा बघून हसून हसून खाली पडायची वेळ यायची. तो भला मोठ्ठा लदडा हिप्पो आणि त्याबरोबर डौलात येणारी सुंदरी, तिन त्याला नुसतं डिवचलकी अनंत ब्रम्हांडाचे दर्शन तो आsss वासून देत असे आणि हे थोडके समजून ती सुंदरी त्या तोंडात डोके खुपसून त्या परमात्म्याचे दर्शन घेत असे. बापरे sssबाप! शेवटी झुल्यावरचे कसरतीचे प्रकार.ते मात्र मला आवडायचे नाहीत. खाली जाळी लावुन मी पण करेन कि हे सगळ! अशा अवास्तव कल्पनाच जास्त असत मनात. मग चालत्या घोड्यावर चढून आपण घोड्यावर उभे आहोत किंवा ती एक चाकी सायकल मी चालविते आहे ही दिवास्वप्न बघायला मी मोकळी.

      प्राथमिक शाळा संपली.हायस्कूल सुरू झाले. आवडी बदलल्या.ती निरागसता ,भाबडेपण इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून जमिन दिसावी तसे आता दूरवर दिसत होते. सर्कसपेक्षा इतर व्यवधान वाढले होते. सर्कस  आता सोहळा  न रहाता एक साधा कार्यक्रम झाला होता.आता मैत्रींणींबरोबर मजा म्हणून सर्कसला जातही होते पर उसमे'वो' बात नही थी! आता जोकरच्या विनोदाला गडबडला लोळण्यासारख हसणं नव्हत तर फक्त खुदुखुदू हसू येत होत.तरीही तो माहौल अजूनही खूप जवळचा, खूप ओळखीचा आणि आपलासा वाटत असे. सर्कस पाहिल्यावर होणारी सर्कसबाधा  या वाढत्या वयाच्या उता-याने आटोक्यात आली होती.

       काॅलेजमधे तर सर्कस  कधी आली आणि गेली हेच मुळी  कळायचं नाही.मेडिकलला गेल्यावर अकाॅनड्रोप्लेजीया या जन्मजात आजाराबद्दल शिकले आणि बहूतेक जोकर या आजाराने ग्रस्त असतात हे कळल्यावर तर खरोखर माझे ते हास्य आठवून अपराधी वाटू लागले. स्वाभिमानाने व्यंगावर मात करून सर्वांची करमणूक करणा-या जोकरबद्दल कौतूक,आदर वाटायला लागला.

         सर्कसशी फारकत झाली होती.  दिवस इतके चपळ झाले होते की सर्कस प्रेम मी विसरलेच होते. आई ही पदवी मिळाल्यावर मात्र माझ्या चार वर्षाच्या मुलाने जेव्हा  सर्कसचा तंबू बघून जायचा हट्ट सुरू केला तेव्हा जाणवले वर्तुळ आता पूर्ण झालय. परत माझ्या लहानपणीची झलक अनुभवायला मिळणार! मुलाबरोबर सर्कसला जायचा दिवस ठरला पण ठरल्याप्रमाणे आम्ही गेलोच नाही.म्हणजे त्याच अस झाल. सर्कसचा तंबू होता माझ्या घराच्या अगदी जवळ.!सर्कसमधे कसरतीचे काम करणा-या तीन मुली आजारी पडल्या आणि जवळचा बालरोगतज्ञ म्हणून माझ्याकडे तपासणीसाठी आणल्या.मग हळूहळू रोज एक दोन येतच राहिल्या.  हा ओघ चालूच राहिला.

         त्या मुलींबरोपर गप्पा पण होत आणि एक छानसा बंध पण तयार झाला. त्या गप्पात त्या मुलींच्या कष्टांची खरोखरच जाणीव झाली.सर्वजणी आर्थिकदृष्ट्या निम्नस्तरीय. ब-याचशा दाक्षिणात्य! त्या सर्वांची काळजीही खूप छान घेतली जायची. अगदी सर्कस मधे या छोट्या मुली पडू नये म्हणून घेतली जाते नं तशीच!. मुलींनीही सर्कसलाच आपले घर मानलेले.

      मग आम्हा सर्वांना खास आमंत्रण आले सर्कस बघायचे! तिथे पहिल्या रांगेत आमच्या खुर्च्या राखीव.खास सरबराई!आतापर्यंत सर्कसने मला जो भरभरुन आनंद दिला होता त्याची उतराई म्हणून त्यांना तिकीटांचे पैसे घ्यायलाच लावले. कार्यक्रम सुरू झाला पण माझे लक्ष होत आजूबाजूच्या नटून आलेल्या बालगोपांलाकडे. त्यांच्या हसण्यात परत एकदा आम्हीही आमच्या बालपणात मनसोक्त भ्रमण केल.मुले लहान होती तोवर नियमित त्यांना सर्कसला नेतच होतो आणि परत एकदा त्यांच्या नजरेतून सर्कस बघताना सानुकले होत होतो

          पुढेपुढे सरकारी नियम बदलू लागले. सर्कशीत प्राणी ठेवण्यावरच नियंत्रण आले. सर्कसचे एक महत्वाचे अंग जणू लूळे झाले होते. सर्कशीत सिनेमाच्या गाण्यावर नृत्य सुरू झाले.त्या कसरती योग्य कपड्यांना बघून कोणी छछोर शिट्टी मारू लागले. ती शिट्टी माझ्यासाठी शेवटची काडी होती. मुलांनाही सर्कस पेक्षा व्हिडिओ गेम अधिक आवडू लागले. सर्कसची कबर जवळजवळ पूर्ण होत आली होती. शेवटची माती पडली ती करोनाची. कलाकार देशोधडीला  लागले.

          युरोपमधे रोमन साम्राज्यात सर्कसचा उल्लेख आहे. नंतर अठराव्या शतकात ब्रिटनमधे सुरु झालेली सर्कस  एकोणीसाव्या  शतकात छत्रेंच्या अथक प्रयत्नांनी भारतात आली. एक सकस करमणूकीचे माध्यम म्हणून!. अनेक वर्षे तिने निर्भेळ आनंद दिला. त्यातील शिस्त, कसदार शरिरचापल्य या सर्वांचे खूप कौतूकही झाले पण नवनवीन करमणूकीची साधने येतच होती त्या रेट्यात सर्कस  मागे ढकलली जाऊ लागली.आज आपल्याकडे तरी ती नामषेश झाल्यात जमा आहे. सर्कसचे ते झळाळलेले दिवस आणि आजचे झाकोळलेले दिवस----विचार केला तरी घशात अडकल्यासारखे होते आणि डोळे चुरचुरतात.

     


माझे इतर लेख वाचायचे असल्यास खालील लिंक वापरावी 

https://drkiranshrikant.pasaara.com


शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २०२०

डाकिया डाक लाया-----©️

 


माझ्या पिढीतील सर्वांनाच 'पोष्टमन' या नावाभोवती असलेलं खास वलय अगदी छान माहीत  आहे. आपल्याभोवती अनेक सुखदुःखाचे प्रसंग गुंफण्यात तो निमित्त मात्र! स्वतः मात्र कमलपत्रा सारखा अलिप्त!  दिवाळीला एक दिवस दिवाळीचा फराळ आणि खुशी घेतल्यावर कळायचं की पोष्टमन काका  हसतो सुध्दा. त्या दीपावलीच्या  दिवशी आवर्जून  सर्वांची चौकशी ते करायचे .त्या दिवशी नेहमी एखाद्या  यंत्रमानवासारखे वाटणारे काका एकदम आपले जवळचे कोणीतरी वाटत.माझ्या लहानपणापासून त्यांना 'काका' ही उपाधी मिळाली आहे ती अजूनही तशीच!

        आज इतर अनेक सोयींमुळे पोस्टमन काकांना घरातल्या अडगळीतल्या वस्तूंची कळा आली असली तरी पोष्टमनचा सुवर्ण काळ ज्यांनी अनुभवला आहे,ज्या पोष्टमनची वाट प्रिय व्यक्तीपेक्षा कांकणभर जास्तच बघितली गेली, त्या पोष्टमन काकांच्या अनेक आठवणी अनेकजणांना  नक्कीच  असतील.काहींनी त्यांना नुसतं गृहीत धरले असेल आणि कालौघात त्यांच्या उरल्या सुरल्या आठवणी पुसून टाकल्या असतील.

  आजचा पसारा पोष्टमनच्या नावे आवरणार आहे.त्या आठवणी आवरता आवरता परत ताज्या करू या.


         डाकिया डाक लाया---------- ©️



          एखाद्या नोकरीत सर्वात जास्त बहूरूप्याच काम जर कोणी केल असेल तर त्यात बराच वरचा नंबर द्यावा लागेल  निरोप्याला, म्हणजे आधुनिक युगातील पोष्टमनला . अगदी अथर्ववेदांतही त्यांचा उल्लेख आहेच.निरोप देणारे मग कितीही दूर जाऊन तो देणे असो त्याला गौरविले आहे कित्येक वर्षांपूर्वीच्या अथर्व वेदांत!

    रामायणात तर पोष्टमन  असतो बलदंड ,रामभक्त हनुमानाच्या रूपात, म्हणजे आजच्या पोष्टमनचे शांत स्थितप्रज्ञ रूप मात्र या निरोप्याने मोडीत  काढले होते आणि लंकादहनाने रावणाला स्वसामर्थ्याची चुणूक दाखवली  होती.अर्थात  देवांना आपले मानवांचे नियम कुठे लावतात? 

           कधी पोष्टमनने पक्षीरूपातही निरोपाची देवाणघेवाण  केली आहे. डौलदार आणि वळणदार मानेचा राजहंस आपला मानसरोवरातील कमलांचा परागचारा  सोडून  दमयंतीकडे जाऊन नलराजाचा निरोप देत असेल तेव्हा इतका कमनीय आणि नितांत सुंदर  तो  राजहंसाच्या रूपातील आदि पोष्टमन  बघून दमयंती म्हणत असेल "हा निरोप्या इतका सुंदर तर याचा स्वामी किती सुंदर असेल?! नल-दमयंतीसाठी राजहंस ठीक आहेत हो पण इतर राजे, जमिनदार निरोप्या म्हणून कबुतरांचा भरपूर उपयोग करून घ्यायची. गुट् ssर गू करत या रूपातही या पोष्टमनचे काम चोख! मग ते प्रेमपत्र असो वा युध्दाची गोपनीय माहिती!

     चाणक्याने सुध्दा चाणक्यनीतीत त्यावेळच्या पोष्टमनकाकाची खास दखल घेतली आहे. पण नंतर मात्र अनेक राजांनी ज्याचे रनिंग सर्वात भारी त्याला पोष्टमनकाकाची नोकरी पक्की केली. हातात घुंघुरांची काठी, त्याला गाठोड्यात बांधलेल्या चिठ्ठ्या, खलिता, वस्तू आणि असला तर  दवंडी साठी दणदणीत आवाजाचे वाद्यं  घेतलेला सहकारी. मग निघाले हे पोष्टमनकाका पळत! उन्हाळा पावसाळा थंडी कशाचीही पर्वा  न करता. रोज शंभर मैलाचा पल्ला तोही घनदाट जंगलातून ! बापरे बाप!!! काही काळाने पोष्टमन काकांना मिळाली पदोन्नति आणि दोन पायांऐवजी मिळाला मस्तपैकी घोडा. पण परत टांगती तलवार आहेच. कुठल्याही राजाला खलिता दिला आणि त्याला मजकूर नाही आवडला तर काय होईल ते सांगणं अवघडच.मग कधी कैदेत सडावे लागायचे तर कधी एकदम शिरच्छेदाची भीती. राजा शहाणा असला तर हा बिच्चारा फक्त निरोप्या आहे म्हणून   सोडून द्यायचा. तेव्हा भारतातून निरोपे जायचे थेट पर्शियापर्यत!

     पोष्टमन काकांचे  अशा अनेक कष्टांच्या पाय-या चढणे चालूच होते. मोगलांनी, इंग्रजांनी आपापल्या परीनं याला थोडे सुकर बनवायचा यत्न केला. पण अनेक शतकं इतक्या कष्टाचे काम प्रामाणिकपणे केल्यामुळेच पोष्टमन काकांच्या स्वभावात एक स्थितप्रज्ञता, अलिप्तता आली असावी. एकाच निर्विकार वृत्तीने पुत्रप्राप्तीचे पत्र आणि म्हातारीच्या मृत्यूचे पत्र, दोन्हीचे वाटप ते करू शकतात.

         खाकी कपड्यातील पोष्टमन अगदी ठराविक  वेळेला सायकलवर आमच्या गल्लीच्या  टोकावर येत असे.कानावर अडकवलेले पेन. डोळ्यावर गोल चष्मा ,बारीक लाल कडा असलेली खाकी टोपी आणि तसाच खाकी ड्रेस. एखाद्या माणसाचे दर्शनही किती आनंददायी  असते हे गल्लीतल्या रहिवाशांच्या  हालचालीवरून लक्षात यायचे. शेजारी शिक्षणासाठी रहाणारे विद्यार्थी घरच्या पत्तुराची वाट बघतच असायचे, तर काही  येणा-या पैशांची !. नाना आपल्या सैन्यातील मुलाच्या खुशालीची, पलीकडच्या काकी गावाला गेलेल्या काकांच्या पत्राची.कुणी कुठे नोकरीचा अर्ज केलाय त्याच्या उत्तराची आतुरतेने वाट पहात असत. आमच्या घरी तर बहिणीचे नुकतेच लग्न ठरलेले त्यामुळे पोष्टमन यायच्या सुमारास तिच्या सारख्या दारापर्यंत फे-या आणि आमचं खुदुखुदू हसणे सुरू असे. पोष्टमनच्या हातात ते निळसर पाकिट पाहिल की आनंद, उत्सुकता , किंचित लाजणं याचं एक झकास मिश्रण तिच्या चेह-यावर व्हायचे. मग काय आमचं चिडवणे सुरूच!  

              पोष्टाची 'तार' या प्रकाराबद्दल मात्र सार्वत्रिक  भीतिच असायची. तार म्हणजे वाईट बातमी. तार आली एवढी बातमी आली की घरभर अक्षरशः सन्नाटाच  पसरे. लहानपणी माझ्या घरीही सहा महिन्याच्या अंतरांनी आलेल्या दोन्ही 'तारा ' अतिप्रिय व्यक्तींच्या  मृत्यूच्या होत्या.त्यानंतर घरात उसळलेला कल्लोळ म्हणजेच तार असे समीकरण माझ्याही डोक्यात फिक्स झालेले. 

          अगदी ठरवून   मुद्दाम पोस्ट  ऑफिसमध्ये  जाऊन तार कशी पाठवतात ते पाहिले आणि ते कडाsssड कट् कड करणारे छोटेसे मशिन  म्हणजे बशालकृष्ण मुखातील ब्रम्हांडासारखे वाटले. अनेक निरोप एकवटले होते त्या कssड् sकट्ट मधे. तार जितकी गंभीर त्याहून जब-या आहे तिचा विनोदी स्वभाव हे तेव्हाच लक्षात आले!  प्रत्येक मजकूरासाठी एक कोड नंबर होता पण कधी कधी  तारयंत्र वापरणा-या पोष्टमन कडून भलताच नंबर टाकला जायचा.त्यामुळे व्हायचं काय वधूवर लग्नमंडपात असताना आणि भटजी तार स्वरात शुभमंगल सावधान म्हणून सावध करत असताना लग्नाला येऊ न शकलेल्या काकांची तार यायची रमेश यास पुत्रप्राप्ती झाली. अभिनंदन. बिचारा रमेश मनात म्हणे मी अजून वधूच्या गळ्यात माळही घातली नाही तोच मी पिता कसा झालो ?अचंबित!

       कधी कधी तार येताच न वाचताच रडण्याचा धुमाकूळ  उठायचा, मग पोष्टमन हळूच तार वाचून दाखवायचा त्यात दुसरीच आनंददायी बातमी असे.अशा गमती पण घडत. 

       पोष्टमन काका खेड्यात पत्र देखिल वाचून दाखवतात.स्वतः न गुंतता सुखदुःख वाटत जायचं म्हणजे खरच कष्टाचे काम! कोणाचे अश्रू पुसायला न थांबता किंवा आनंदात सामील न होता हा महाभाग पत्र वाचले की पुढच्या गल्लीत सटकतो. श्रीमद्भगवदगीतेतील " कर्मण्येवाधिकारस्ते------ ह्या वर्णनात  तंतोतंत बसतात पोष्टमन. ऊन वारा पाऊस, पूर ,आग दुष्काळ  हे सारे इतर जनांसाठी पण हे अस्तित्वातच नाही अशा आसोशीन काम चालते पोष्टमनकाकांच. त्यात बारीक गल्लीबोळात जिथे एकाच आडनावांचे अनेक आडनावबंधू एकवटले आहे तिथे कोणी ठराविक नारायण कुलकर्णी  शोधून त्याचे पत्र त्याला देणारा  हा माणूस खरतर धनंजय कथांमधील डिटेक्टीव्ह पेक्षा ही चतुर आणि चाणाक्ष!

       पोष्टमनचे पोष्टखाते हा एक वेगळाच महाविषय आहे. इंग्रजांच्या काळात नेटकेपणी तिकीट  आकारणी करून सर्वसामान्यांसाठी सुरू झालेली डाक सेवा अजूनही आपले स्वप्न वाटण्याचे काम नियमित  करते आहे. आता तर स्त्रीयांनीही ही निरोप्याची भूमिका स्विकारली आहे 

        तार सेवेने मात्र काही वर्षांपूर्वी आपले कड्कट्ट थांबवले आहे. आता इतर अनेक साधने उपलब्ध  आहेतच म्हणा. ज्या आपल्या परदेशस्थ प्रियाला पत्र पोहोचायला महिनेन महिने लागत तेथे शब्दशः क्षणात निरोप जाण्याची किमया सुरू झाली आहे. पण तरीही प्रियजनांना पाठवलेली पत्रे, ती लिहीताना मनात उठलेले तरंग, पत्र टाकल्यावर अरेच्चा असे उगाच लिहीले म्हणून हळहळणे हे सर्वच भूतकाळात जादूई यक्ष बनून थांबले आहेत. म्हणून जुने पत्र आज वाचताना खूप छान आनंदाची पखरण करते.

           आज जरी पोष्टमन काकां बरोबर पत्रांची देवाणघेवाण नसली तरी अजूनही पोष्टमनला पहाताच तीच उत्सुकता, तीच प्रियजनांचे पत्र मिळण्याची हुरहूर नेहमीच वाटते. आज हाडामासांच्या जीवंत माणसाची बरोबरी किंवा वरचढपणा नवीन तंत्रज्ञान  करते आहे. ते जलद आहे, सोईचे आहे कबूल. पण अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत  आयुष्याचा न जाणवणारा पण महत्वाचा भाग होता पोष्टमनकाका! नवयुगाच्या रेट्यात ज्या वेगाने तो  बाहेर फेकला आहे तो वेग बघूनच खरच भीती वाटते. आज जात्यात पोष्टमन काका आहेत पण उद्या? कदाचित उद्या आपणही सुपातून जात्यात जाऊ. कालाय तस्मै नमः!

        

 माझे इतर ब्लॉग्स वाचण्यासाठी खालील लिंक वापरावी. 

https://drkiranshrikant.pasaara.com 

शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०२०

आकाशवाणी ©️

 




             आठवणींचा पसारा आवरताना आठवतो रेडिओ. एखाद्या मित्रासारखी त्याची साथ होती. 'होती 'अस भूतकाळात कसं बोलू? बोलायलाच नको कारण हा मित्र अजूनही आवडता आहेच.पण वेगळ्या रुपात तो भेटतो .आता त्याच्याबरोबर टि.व्ही सारखे नवे मित्रही मिळाले आहेत.पण नवे मित्र मिळाले तरी हा जुना मित्र तेवढाच प्रिय आहे.

.              काही  दशकांपूर्वी घराघरात मोक्याची जागा अडवून बसलेला हा पाहुणा ,पाहुणा न रहाता आपल्या घरातील लाडका सदस्य सहजतेने झाला . अगदी आजी ते बाळापर्यंत सर्वांचाच 'नारायण' आणि नारायणकाका झाला. माझ्या पिढीतील आणि आधीच्या पिढ्यांच्या मर्मबंधातला रेडिओ. आज त्याच्या आठवणींचा पसारा आवरणार आहे.


                           आकाशवाणी. ©️


                           शाळेत असताना आणि आधी सक्काळी सक्काळी  जाग यायची ते रेडिओच्या टीडीडीs sssडीडीडी---- या खास आकाशवाणीच्या सिग्नेचर सुरावटींने.  आता उबदार पांघरूणाशी फारकत होणार याचा अंदाज आलेला असायचा. भल्या सक्काळचे सहा वाजायला काटे धावत असताना रेडिओ जणू बजावायचा ,'उठा आता'. पाठोपाठ भक्तीगीत सुरू व्हायची.रामाला, कृष्णाला उठवताना कौसल्या माऊली आणि यशोदा मैया कसल्या प्रेमाने ओथंबलेल्या स्वरात आर्जवी गीत आळवायची. कौसल्या  माऊली तर ' उभी घेऊनी कलश   दुधाचा" अशी प्रेमाने उभी! पण आमच्या मातोश्री मात्र कमरेवर हात ठेवून उभ्या. आधी प्रेमाने उठाss व्हायचं, नंतर धमक्या सुरू व्हायच्या. "आता उठता की पाणी टाकू"? भक्तिगीत संपत आल्यावर अखेर अंथरुणाला अलविदा करून आम्ही उठायचो.आन्हिक आटपेपर्यंत उदबत्तीचा वास घरभर दरवळत असायचा.  पुराने फिल्मी गीत सुरू झाले असायचे. आई बाबांचे सर्वात आवडतं गाणं म्हणजे कुंदनलाल सैगल. बरोबर आठ वाजता.त्या वयात त्या स्वरांची जादू फार कळायची नाही.कारण आम्ही गुंतलो असायचो "चाहे कोई मुझे जंगली कहे" या गाण्यात.

          आकाशवाणी  हे नावच असल भारी वाटायचे नं! कृष्ण जन्मानंतर कंसाने ऐकलेली आकाशवाणी किवा कोणा पृथ्वीतलावरील मानवाला चांगली -वाईट बातमी द्यायला आकाशातून दिलेली घनगंभीर सूचना म्हणजे आकाशवाणी. त्या तेहतीस कोटी देवांपैकी ही सूचना देण्याच काम कोण करत असेल कुणास ठाऊक.? त्या देवाचा आवाज  एवठा मोठ्ठा आहे का तो जादूचा माईक वापरतो हे प्रश्न  लहानपणी नेहमीच सतावायचे.

          मग रेडिओ म्हणजे लहानपणी जादूचा पेटारा वाटे आणि या जादूच्या पेटा-याची ऐट पण भारी असायची. त्याला आत बसायला मस्त पैकी कव्हर तेही भरभक्कम  लाकडाचे.त्याची फळी बंद केली की आत रेडिओ झोपायला मोकळा.रेडिओचा काळा तपकिरी  रंग आणि त्याची ती मोठ्ठी काळी बटणे. एक बटण फिरवताना आतली लालबुंद उभी रेषाही पळू लागायची आणि बातम्या सांगता सांगता आधी खर्रss खर्रssss करत एकदमच भलत्याच भाषेत गाणे सुरू व्हायचे, मग आम्ही हसून हसून लोळपोळ.!मग तोच खेळ सारखा.शेवटी कोणाकडून तरी हरकाटून घेतले की चिडीचूप! कित्येक वर्ष, शेजारच्या काकांनी सांगितलेले ,रेडिओच्या पोटातील दडलेले रहस्य खरेच वाटायच.ते म्हणायचे "रेडिओच्या पोटात दडली आहेत छोटी छोटी माणसं! ती माणसं गाणी म्हणतात, बातम्या सांगतात , आजी साठी कीर्तन करतात , तुमच्या सारख्या मुलांसाठी 'छान छान छान मनीमाऊच बाळ कस' हे बालगीत म्हणतात.ती माणस आतमधेच जेवण सुध्दा बनवतात." हे सगळ ऐकल की असलं मस्त वाटायचे नं! ती माणस बघण्यासाठी जीव पाखडायची मी!. एकदा काकांच्या रेडिओ दुरूस्तीच्या दुकानात मागची पाठ काढलेले रेडिओ  बघितले.आत लिलिपुटीयन ऐवजी नुसते वायरचे भेंडोळं बघून मला रडायलाच आले.

             रेडिओ  माजघर ते दिवाणखाना आणि आजी ते नातू या सगळ्यांना आवडीचे कार्यक्रम ऐकवायचा. आई साठी वनिता मंडळ, आपली आवड, आणि श्रुतिका किंवा नभोनाट्ये. दिदीसाठी विविध भारती  , बाबांसाठी बातम्या, नाट्यगीते, आजी भक्तीगीत आणि किर्तनावर  खूष! मी बालोद्यान साठी रविवारची वाट बघायची. स्वच्छ आणि स्पष्ट  उच्चार, बोलण्यातील लय माधुर्य  असलेली निवेदने त्या वयातही खूप आवडायची. रात्री नभोनाट्य ऐकताना त्यात काही वर्णनं आली की आमची कल्पनाशक्ती  सुसाट फिरायची. म्हणजे निवेदक वर्णन करायचा कोकणातील घराचं. मग आम्ही मनातल्या मनांत वाडीत फिरायला मोकळे. ती नारळी पोफळीची झाडे.मधुनच फुललेली नाजुक केशरी अबोली.  जांभ्या दगडाचे तुळशीवृंदावन ,ते सुरंगीचे वळेसर.मातीचा ओलसर वास आणि सुरंगीचा मंद वासही जाणवायचा.तिथला शितू , बापू डोळ्यासमोर उभारायचा. टि. व्ही ने मात्र सगळ्या गोष्टी रेडीमेडच दाखविल्यामुळे कल्पनाशक्तीला भरपूर आराम मिळतो. सगळ दिसतच आहे की समोर.कल्पनाशक्ती  कशाला वापरा?

          बुधवार संध्याकाळी तर अभ्यास,जेवणे लवकर उरकून सर्वजण रेडिओ भोवती जमत. रेडिओ सिलोनवर 'बिनाका' गीतमालेचा  बिगुल वाजला की जणू सर्व इंद्रिये व्हायची कान! मग ते खणखणीत नाण्यासारखे शब्द यायचे:भाईयो और बहेनो किंवा आवाजकी दुनिया के दोस्तो. त्या दाणेदार, लाटांची लयबध्दता असलेल्या अमिन सयानींच्या आवाजात होता दिलासा. त्यात उपदेशाचे डोस नव्हते. पण होता वडिलकीचा प्रेमळ अधिकार.पाठीवर आश्वासक स्पर्श  व्हावा असा तो आवाज!. अगदी कानातून ह्रदयापर्यंत  झिरपायचा. या कार्यक्रमात 'और आखरी पादानपर है..' म्हणून परत एकदा बिगुल वाजत असे आणि सरताज गाण लावलं जात असे. त्यावेळी आम्ही सर्व उत्सुकता, निराशा, आनंद अशा संमिश्र  भावनांनी ते ऐकत असू. हॅss हे गाण सरताज होण्याच्या लायकीचे नाही म्हणून ज्ञान पाजळत असू .वाद सुध्दा  व्हायचे. परत पुढच्या वेळेस कुठले गाणे येणार हे पैजेवार सांगितलं जायचे. 

         रेडिओची एक गंमत होती. महावितरणची वीज गुल झाली की रेडिओ  पडायचा धारातिर्थी! आमच्या शाळेचा रेडिओवर कार्यक्रम  होता.माझ्या वर्गातील एक मुलगी 'जीवलगा  राहिले रे दूर घर माझे' हे गाणे फारच छान म्हणायची. तिचे रेडिओवर गाणे होते. आजूबाजूला सगळ्यांना मी ऐकण्यासाठी सांगितले होते. कार्यक्रमाची सुरवात होताच वीज गेली आणि कार्यक्रम  संपल्याक्षणी आली.एवढ वाईट वाटल नं तेव्हा! ब-याचदा या छोट्या मोठ्या सुखदुःखाच्या गोष्टी रेडिओच्या आसपासच घडायच्या.नंतर नंतर तर नाट्यगीतांनी एवढ पछाडलं होत नं मला! नऊपर्यंत चालणारी नाट्यगीते ऐकल्याखेरीज मी शाळेची तयारी करायची नाही आणि रोज या नादिष्टपणाचा उद्धार ठरलेला.

         चीन भारत युध्दाच्या थोड्या आठवणी म्हणजे रेडिओवर प्रसारित होणारी देशभक्तीपर गीते. भारत पाक युध्दावेळीसुध्दा कान सतत चिकटले असत रेडिओला.शत्रूचे विमान पडले की जणू आम्हीच लढून ते पाडले आहे असा जल्लोष व्हायचा. 

                क्रिकेट मॅचही नुसती धमाल करायची. समालोचन इंग्लिश मधे असले तर सगळच कळायच नाही मग आई किंवा बाबांना भंडाऊन  सोडायच काय सांगितलं म्हणून! मग त्यावर पैजा!

रेडिओवर आपली आवड ऐकताना अनपेक्षितपणे आवडत गाण जे खूप दिवस मनात रुंजी घालतय ते ऐकायला मिळाल की दस्तुरखुद्द लता मंगेशकर भेटल्याचाआनंद व्हायचा .आज हवे ते गाणे सहजतेने ऐकायला मिळते त्यामुळे अचानक झालेला तो आनंद आताच्या पिढीला कळणे अवघडच!  

आमचं वय पुढे सरकत होते आणि रेडिओच्या लोकप्रियतेला ओहोटी लागून मध्यमवर्गीय घरातून तो गायब होऊ लागला होता. त्याची जागा कानामागून येऊन तिखटजाळ झालेल्या ट्रान्झिस्टरने घ्यायला सुरवात केली होती. बत्ती गुल झाली किंवा बाहेर बागेत कार्यक्रम ऐकायचा असला की ट्रान्झिस्टर चार बॅटरींच्या खुराकावर तय्यार. उचला हातात धरा आणि कुठेही जाऊन गाण्याचा रतीब घाला इतकं काम सोप्प. पण माझ्यासारखीला ज्याने रेडीओचे मखर पाहिले आहे ,ज्याने आजी ते नातवाला घरातल्या घरात आवडीचे कार्यक्रम ऐकताना बघितले आहे, घरात एखाद्या  माननीय सदस्यांचा दर्जा  मिरवला आहे त्या रेडिओला भंगारमधे जाताना बघून अक्षरशः अंतकरणात वेदना होत.

            आपल्याला मनापासून  आवडणारे कार्यक्रम आता ट्रान्झीस्टर ते कारॅवान पर्यंत सारेच ऐकवतात पण ते ऐकणे ब-याचदा एकट्याचेच काम. रेडीओसमोर भाजी निवडत बसलेली आई, वाती वळणारी आजी  त्यांच्या आजूबाजूला काहीतरी चॅवमॅव खात बसलेल्या आम्ही दोघी , दूरवर पुस्तक  डोळ्यासमोर घेऊन कान रेडिओकडे ठेवलेले वडिल या दृष्याला मात्र मी मिस करतेय हे नक्की!.

  पण एक खरे बदल हाच निसर्गाचा  स्थायीभाव आहे आणि तोच नियम,निसर्गाचाच एक अंश असलेल्या मानवाला आणि त्याने निर्मित यंत्रालाही आहे. तसे नसते तर आज टेचात असलेलं यंत्र  नवीन ,अधिक कार्यशील यंत्र येताच सहजतेने मोडीत निघाले नसते.त्यामुळे  रेडिओच्या  जाण्याबद्दल दुःख करण्यापेक्षा नव्याचेच मनःपूर्वक स्वागत करूया!

         

माझे इतर ब्लॉग्स वाचण्यासाठी खालील लिंक वापरावी 

https://drkiranshrikant.pasaara.com 



               

शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०२०

लालपरी----भटकभवानी भाग5©️

 


          

          


           लहानपणीच्या जडणघडणीच्या वयात सर्वात जास्त प्रवास केला तो रेल्वे आणि यष्टीने! होय माझ्या लहानपणची यष्टी अजून कोणी लालपरी वगैरे झाली नव्हती. ती होती सर्वसामान्यांची यष्टी किंवा जरा शहरी मंडळींची एस.टी. - स्टेट ट्रान्स्पोर्ट. माझ्या प्रवासाच्या अनुभवांच्या  पसा-यात या लाल डब्ब्याचे  स्थान मोठे आहे. मोठ्या मोठ्या तत्वज्ञानाचे डोस मी प्यायले आहे याच बसमधे. समोरचा पॅसेंजर खिडकीतून डोके काढून ऑssssक करायला लागला तर त्या धारेत चिंब व्हायचे चपळाईने कसे टाळायचे हे शिकवले आहे याच यष्टीने! कुठलाही मोठ्ठा आव न आणता माणुसकी,चांगुलपणा ,स्थितप्रज्ञता शिकवली आहे या बसने.आणि शेजारचा पॅसेंजर जर डुलक्या काढताना आपला खांदा ही त्याची उशी आहे असे समजू लागला तर भिडस्तपणा न करता या त्याच्या ठाम समजूतीला मोडून काढणे केवळ  यष्टीमुळेच मला जमले.  .

             आज ठरवले पसारा आवरायचे तो एस.टी च्या आठवणींचा.काॅलेज ते घर असे अनेक प्रवास  तिच्याच पोटातून तर झाले आहेत. तिने मला वेळोवेळी इप्सित ठिकाणी पोहोचवले आणि म्हणूनच जिचे कौतुक हल्ली 'लालपरी म्हणून केले  जाते त्या आमच्या वेळच्या  एस टी.बस  बद्दल लिहीत आहे.



                      लालपरी-----भटकभवानी भाग 5©️


       बसच्या बाबतीत बोलायचे झाले तर वयाच्या आठव्या वर्षी एस. टी.बस मधन पहिल्यांदाच  प्रवास केल्यावर माझी काही  ठाम मते तयार झाली होती. ती म्हणजे महाराष्ट्र परिवहनचे चौकोनी मोठे वाहन, जिचा रंग लाल असतो आणि मधेच त्यावर पिवळा पट्टा असतो त्याला एस टी बस असे नाव आहे. या वाहनामधे तिच्या क्षमतेपेक्षा खूपच अधिक माणसे कोंबून बसवलेली  असतात. तिळमात्र जागा जरी रिकामी राहिली तर ड्रायव्हरकाका आणि कंडक्टरकाकांना रौरव नरकाची शिक्षा बहुधा असावी किंवा पापणीने डब्यात मिठ भरायला लावत असावेत. त्या भितीखातरच ते जितके जास्त प्रवासी शक्य आहेत तितके कोंबत असावेत. वरील सर्व विचार वयाच्या आठव्या वर्षी  बस मधे बसल्यावरचे आहेत(.शब्द आजचे)

    बसशी  माझी पहिली वहिली भेट तरीही  फारच छान होती. अगदी लक्षात राहण्यासारखी.आमची बदली झाली होती पुण्याहून कोल्हापूरला.मी साधारण सात आठ वर्षांची. मग एका सुट्टीत नुसतं कोल्हापूर  बघायला जायचं ठरलं. तोवर आजोळी जाताना रेल्वे प्रवास बराच झाला होता पण लालपरीबरोबर किंवा,लालपरीतून नव्हता. बस स्टॅन्डवर आम्ही पोहचलो.अबब केव्हड्या तरी  पिवळा कमरपट्टा लावलेल्या लाल बस! काही एकदम चकाचक नटलेल्या तर काही बस मला आजीसारख्या थकल्याभागलेल्या वाटल्या. थोडा रंग उडालेला. चेह-यावर गंभीरपणा.सगळ्या बसच  समोरून तोंड सपाट.चप्पट. काचेचे भव्य कपाळ आणि ब-याच खाली गोलमगोल काचेचे डोळे.पावसात त्या मोठ्या काचेच्या कपाळावरचे जलबिंदू गरागरा निपटणारे दोन हात! हंsssss त्याला' 'वायपर' म्हणतात तर. त्या आठ वर्षाच्या वयात कळलेला नवा शब्द. ज्ञानात नवी भर!त्यानंतर 'वायपरच्या' त्या लयबद्ध  हालचालींचे वेडच लागले. सुटूकन पाणी साफ करून परत नवीन येणा-या  पाण्याच्या थेंबांना हटविणारे वायपर. बस मधनच आsss च्छू करून दणदणीत शिंक द्यायची.त्याची वाट बघत मी बसायची खूप गंमत वाटायची. त्या पहिल्या प्रवासात काही सुखद आठवणी आहेत.वाटेत आंब्याने लदलेली झाडे. म्हणजे कै-याच होत्या त्या .त्याखाली मुद्दाम  लालपरी थांबली. मग टपावर चढून कै-या काढल्या. असा पहिला प्रवास तरी महाराष्ट्र राज्य परिवहनच्या बसमधून मस्त झाला.त्या वयात गर्दी, गैरसोय हे मुद्दे  माझ्या दृष्टीने नगण्य होते.  त्यामुळे त्यांचा त्रास झालाच नाही उलट सगळी मज्जाच वाटत होती.

         त्यानंतर या बस बरोबर झाली गट्टी. पण ते नुसते प्रेम नव्हते  ती होती 'लव्ह हेट रिलेशनशीप'! चुकून माकून ही लालगाडी अंघोळबिंघोळ करून वेळेवर आली आणि मधेच हट्टी म्हशी सारखी पंक्चरच्या नावाने बसकण न मारता वेळेवर पोहोचली की समजावे आकाशस्थ ग्रह उच्चकोटीचे आहेत.मग मात्र तिच्याबद्दलच्या प्रेमाला उधाण यायचे नाहीतर मनातली खदखद तिच्यावर काढली जायची.

           मेडिकलला शिकत असताना मात्र लालगाडीला पर्यायच नव्हता.सोलापूरला मेडिकलला अॅडमिशन घ्यायला लाल डब्ब्यातून निघालेले. बरोबर आई. बहात्तरचा तो मोठा दुष्काळ आणि वैराण शेतात पडलेली जनावरांची कलेवर! विसरणे अशक्यच! आधीच घरापासून दूर जायचे म्हणून मनावर दाटलेले मळभ त्यात हे दृश्य.

त्या वेळी  होत्या ठरावीक गाड्या. काही मस्तपैकी फिरत फिरत जाणा-या तर काही जरा  सरळमार्गी! .फिरत लांबचे वळण घेऊन जाणा-या गाड्यांचा आवडता स्टाॅप म्हणजे कवठे महांकाळ! एक तासाचा चुराडा ठरलेला. या गाडीचा कोल्हापूर  ते सोलापूर प्रवास तब्बल साडेसात ते आठ तास खायचा. गंमत म्हणजे काॅलेज युवकयुवती एकत्र प्रवास करत असले तर अंतिम स्थानी पोहोचेपर्यंत प्रेमात पडून त्यांच्या लग्नाच्या आणाभाकासुध्दा व्हायच्या! त्यामुळे  लांबून जाणा-या गाड्या वेड्या बेंद्र्या असल्या तरी त्या एकदम रोमॅन्टीक!

       या प्रवासात पावसाळ्याच्या दिवसांत दोन ठिकाणी बसला आडव यायचं पाणी! एकीकडे हातीदचा ओढा  आणि पुढे चंद्रभागा नदी. हातिदच्या  ओढ्याला पाणी आले की लाल डबा थांबायची एका तीरावर आणि दुसरी बस येत असे दुस-या तीरावर. ती येईपर्यंन्त जीव टांगणीला. मग ते एखादे तरी जडशीळ मेडिकलचे   पुस्तक असलेली बॅग ( घरी ते पुस्तक नेऊन थोड भापायला बर वाटायचे) घेऊन बैलगाडीत बसायचं आणि सावकाश ओढा ओलांडायचा.एकदा तर पाण्याची पातळी अचानक वाढली आणि बैल लागले पोहायला. बापरे!  पण असल्या प्रसंगात सहप्रवाशांची खूपच मदत व्हायची.

      पंढरपूरला चंद्रभागाबाईंनी बस अडवली की मदतीला यायची नाव !.छोटी वल्हवायची होडी.निसरड्या उतारावरून बॅग संभाळत त्या नावेत बसायचे. पैलतीरावर कसरत अधिकच! कारण आता निसरडा चढ चढायचा असे.मग परत दुस-या बसची वाट बघणे आलेच. अर्थात इथेही सहकाराचे महत्व कळायचे.

         एकदा मी सांगलीला बसमधे चढले आणि मिरजेला मैत्रीण. गप्पांच्या नादात तिकीट राहिले काढायचं आणि बस पुढे गेली तेव्हा तासाभराने लक्षात आले.कंडक्टरला तिकीट फाडायला सांगितले. बिचारा दोन तिकीटांचा हिशेब न लागल्याने आधीच कातावला होता. त्याने बस थांबवली आणि आम्हा दोघींना उतरायला सांगितले. आडरान आणि तटून बसलेला कंडक्टर! आधी समजुतीने सांगितले "हे चुकले असले तरी मुद्दाम केलेले नाही." पण तो काही हट्ट सोडेना. मग मात्र काली रूप घ्यावे लागले.गंमत म्हणजे पंढरपूरला विठ्ठलाने काय जादू केली कोणास ठाऊक? " ताई मला क्षमा करा म्हणत  नंतर त्या कंडक्टरने माफी मागितली.

आमच्या लग्नात मात्र लालपरी आमच्यावर रुसलीच होती. सोलापूरहून व-हाड येणार होत सायंकाळी पाच वाजता.घड्याळाचे काटे पळत दहावर गेले  तरी नव-या मुलाकडच्या मंडळींचा पत्ता नाही. माझे आई वडील हवालदील झालेले.अखेर एकदाची लालपरी आली रात्री अकरा वाजता. जुनोनी आणि नागजच्या मधे रूसल्या होत्या बाई. मग दुरुस्तीने खाल्ले तीन तास. जवळ कुठेही फोनची सोय नाही. रागच आला मला तिचा.    

  पुढे एकदा थोरल्याला घेऊन सांगलीहून येताना असाच प्रसंग आला. थोरला होता दोन वर्षांचा. मोहोळच्या पुढे बस पडली बंद.सर्व  प्रवासी पटापट बॅगा घेऊन चालू लागले. बॅग आणि झोपलेला थोरला यांना घेऊन जाणे अशक्यच.अंधार पडायला लागलेला. हा काळ पस्तीस वर्षापूर्वीचा.फोन ही नव्हते. सोलापूरला कळवताही येईना. मागून येणारी बसही भरभरून आलेली .अखेर सहप्रवाशच्या मदतीने एका मिनी ट्रकमधे बसून सोलापूरला आले.अशा त-हेने बसने मला धाडशीही बनवले.

         अशा अनेक आठवणी! भल्या आठवणी खूप जास्त. पण लालपरीची जेव्हा रातराणी व्हायची तेव्हा सहप्रवाशाच्या  वागणुकीत  झालेला असभ्य बदलही लक्षात यायचा.  हे  थोडे नकोसे अनुभव .

     माझ्या प्रवासात सहप्रवाशी असायचे मुख्यत्वे विठूरायाच्या दर्शनाला जाणारे. ,काही वाटेतल्या दुष्काळी गावातले सदाचिंतित शेतकरी , टवटवीत माहेर वाशिणी  , आणि थोडे फुटकळ माझ्या सारखे विद्यार्थी. असे अनेक प्रकारचे सहप्रवाशी भेटायचे.अंग चोरून बसलेले खेडूत, उगाचच ऐसपैस बसणारे शहरी. दोन खेडूत बायकांच्या डोईवरला पदर सावरत चाललेल्या सुखदुःखाच्या गप्पा,  त्यांची ती गठुडी. लेकुरवाळीची तारांबळ. रडणा-या बाळाला आजीबाईच्या बटव्यातील औषध सांगणारी कोणी आत्तीबाय,अशीअनेक माणसे बघायला मिळत.पीक पाण्याच्या गप्पा डोईच मुंडास काढत आणि पान लावत रंगायच्या. खडखडणा-या बसमधे पुस्तक वाचन जमत नसलं तरी विविध माणसं वाचायला मिळायची.

          आता या लालडब्याला एकदम परीकथेतील  परी बनविले आहे. तिचे बाह्य रूपही अधिकच रंगतदार केलय.    आज कित्येक वर्षे  मी या लाल परीच्या सहवासाला मुकले आहे. तो स्टँड वरचा कोलाहल. ती धावपळ करणारी मंडळी.तो सर्वत्र भरलेला विचित्र वास आणि किन-या आवाजात कंडक्टरचे ओरडणे ,त्याला भेदून येणारा तो न कळणा-या सूचनांचा आवाज. जेव्हा आता सांगलीला कारने तीन साडे तीन तासात पोहचते तेव्हा बस मधे काढलेले सहा आठ तास आठवतात. या लालपरीचा आत्मा तसाच निर्मळ आणि भोळाभाबडा आहे का तेही माहित नाही. पण इतक्या वर्षांनी तसा असण्याची शक्यता कमीच!

         कित्येकदा आयुष्यात ठरलेले ठिकाण गाठण्यासाठी  लागतो कोणी वाहक. तो कुठल्याही रूपात येतो  आपल्याला आपल्या ध्येयापाशी पोहचवतो. तसेच मला शब्दशः या लालपरीने काॅलेज आणि घरी सुखरूप नेले.

    असे अनेक प्रवास.  काही अचानक केलेले तर काही पूर्णपणे आखीव रेखीव .पण तो आयुष्याच्या अखेरचा प्रवास मात्र त्या खूप खूप ओळखीच्या पण तरी पूर्ण अनभिज्ञा  बरोबर.   आपला हा शेवटचा प्रवास मात्र अगदी सुटसुटीत.कुठलेच ओझे नाही. ना बॅगेचे ओझे ना आईने दिलेला खाऊ. फक्त एका श्वासांचे अंतर मग ओलांडून जायचे नव्या अज्ञात प्रदेशात. पूर्णतः अनोळखी!काळोखात कां उजेडात तेही माहीत  नाही.

        

माझे  इतर ब्लॉग्स वाचण्यासाठी खालील लिंक वापरावी 

https://drkiranshrikant.pasaara.com 

शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०२०

ये मोह मोहके धागे---------

 


 माझ्या घरी "प्राण्यांशी मैत्री"चा वारसा अगदी सहजपणे पुढच्या पिढीकडे गेला आहे. लहानपणी मी माझ्या आईच्या जिवावर घरात कुत्रा आणला . कुत्रा माझा. उस्तवार आईची. म्हणजे आयजीच्या जीवावर बायजी उधार!ही परंपरा माझ्या दोन्ही मुलांनी चालविली.शाळेत जाताना त्यांना एखादा जखमी पक्षी मिळाला की त्याची रवानगी थेट माझ्याकडे होई. कधी तो पक्षी सौ. कोकीळ असे तर कधी पोपट तर कधी घारबाई. मग सुरू आमच्या फे-या, पशू वैद्यकीय   दवाखान्यात!. दुर्दैवाने जर तो पक्षी मृत्यू पावला तर नंतर घर वाहून जाण्यासारखा अश्रूंचा पूर तय्यारच ! बर हे फक्त पक्षीप्रेमापर्यत सीमित  नव्हतं तर कुत्रा, मांजर अगदी गाय सुध्दा त्यांच्या भूतदयेत हिरिरीने  सामील  व्हायचे. हा मुलांचा प्राणीप्रेमाच्या आठवणींचा पसारा आवरणे या जन्मी तरी अ--श--क्य! जमेल तशी थोडीफार त्या पसा-याची उलथा पालथ करते.

              

          ये मोह मोहके  धागे-------


    "आई  मी मुंबई वरून येताना मांजरीचे पिल्लू आणणार आहे" धाकट्याने एका दमात  जाहीर केले. मला काहीही बोलण्याची संधी न देता त्याने फोन बंद केला. खरतर मी आणि माझ्या पतींने  पक्क ठरविले होते, नवीन जबाबदारी  नको. आणि आता घरात पाळीव प्राणीही नको. ते आपोआप होतात घरातले सदस्य  आणि त्यांचा मृत्यू मनाला असा चटका लावतो की बस!.आता त्या दुःखातून परत एकदा जायचीही दोघांची तयारी नव्हती. आता पर्यंत तीन कुत्री, दोन मांजरी घरात होती.पण सध्या कोणताच पाळीव प्राणी नव्हता.अर्थातच त्यातील दोन कुत्र्यांनी आणि दोन्ही मांजरींनी स्वतः होऊन स्वतःला पाळवून घेतले होते. असे  असले तरीही त्यांनी आम्हाला आनंद दिलाच पण त्यांच्या भावना, त्यांचे निस्वार्थ प्रेमही आम्ही अनुभवलं. मांजरी फार थोडा काळ होत्या पण मनाला अतिशय चुट्पुट लाऊन गेल्या.  त्यांचा  अंत बघणे अतिशय  दुःखदाई.पण आता मुलगाच मांजर घेऊन येतोय मग काय इलाजच नाही.त्यामुळे दोघेही  चरफडलो.  परत परत धाकट्याला फोन लावला. त्याने सांगितलेले कारण सयुक्तिक होते.

       ती मांजरीची पिल्ल  वाढत होती धाकट्याच्या हॉस्टेलवर. माझा धाकटा त्यांची देखभाल करीत होता. पण पिल्लं कुठेही घाण करायला लागल्यावर संघर्षाची पहिली ठिणगी उडाली. इतर मुलांनी विष घालण्याची धमकी देताच धाकट्याने पिल्लू घरी आणायचे पक्के केले. येताना वाटेतनच परत एक फोन,"आई पिल्लू एक नाही तर दोन आहेत." झाल! इथे एक मुद्दलच मला जड होते तिथे एकदम भरभक्कम , घसघशीत व्याजही नको असताना मला मिळत होते. शेवटी काय मुलाच्या बाबतीत "ये मोह मोहके धागे-"----.चिवट, मृदू आणि ओढून घेणारे". मी मनात पक्कं ठरवलं मुलगा परत हॉस्टेलवर गेला की ज्याला कुणाला पाळायला हवी असतील त्याला पिल्लं द्यायची.

         आखिर  वो लम्हा  आ गया. एक छानसा स्टीलचा पिंजरा आत मऊ चादर अन् दोन बारकुंडे वळवळणारे पांढरे ,काळे जीव. लक्षात राहिले ते त्यांचे गरगरीत वाटोळे हिरवे काळे डोळे,भेदरलेले.! खरच सांगते ह्रदयात बारीक कळ उठली. त्या अदृश्य कोळ्याने माझ्यात आणि त्या मार्जार कन्यकांत तेच ते "मोह मोहके धागे" विणायला कधीच सुरवात केली होती आणि मी  मात्र ते तोडायच्या प्रयत्नात ! मग दोन दिवस आपण त्या गावचेच नाही असा आव आणायचा यत्न केला खरा, पण नजर वारंवार त्या गोलमटोल डोळ्यांकडे जात होती. पांढरे शुभ्र, अंगावर कबरे नारंगी रंगाचे मोठे छप्पे.एकीचे नाक रसरशीत  गुलाबी तर दुसरीचे काळसर. त्यामुळे  नामकरण झालं होतं 'गुलाबो-सिताबो.' एका हातात सहज मावतील एवढाच आकार! दोन दिवस मुलाने त्यांची काळजी घेतली. मला सूचना दिल्या आणि तो गेला परत हॉस्टेलवर. आता माझी कसोटी सुरू.

         गंमत म्हणजे मुलाची पाठ वळल्या वळल्या त्या दोन्ही मार्जारपिल्लांनी मलाच आई म्हणून मान्यता दिली. मॅssव मॅsव करत माझ्या भोवती , अंगावर खेळू लागली. त्यांना दुसरीकडे पाळायला द्यायचा आमचा निश्चय एकदमच ज्वलंत ज्वालामुखीचा निद्रिस्त  ज्वालामुखी होतो तसा झाला. थोडक्यात परत तेच ते . त्या पिल्लांमधे नाही नाही म्हणत आम्ही गुंतलो होतो.

             आता गच्ची, घर , अंगण दोघींच्या धुडगुशीला लहान पडू लागली. गच्चीभर पळत सुटणे, एकमेकींशी लुटूपुटीची लढाई  करणे. पळत पळत अशोकाच्या झाडावर चढणे. भूक लागली की माझ्या भोवती भोवती घुटमळणे,  नुसत्या बाललीला बघताना वेळ कुठे पळत होता कोण जाणे.त्यांना दुसरीकडे द्यायचा विचारही आता मनात येईना .आता तर बाहेरून आल्यावर पहिला प्रश्न असे "गुलाबो-सिताबो कुठेत?" 

       दोघींच्या स्वभावातील फरक आता छानपैकी कळायला लागला होता. गुलाबो अती चलाख वर्चस्व गाजवणारी तर सिताबो शांत! फक्त गुलाबोला  फाॅलो करणारी! गुलाबो झाडावर वर पर्यंत चढली तरी सिताबो चार फुट कशीबशी चढलेली. सिताबोला इंजेक्शन देताना गुलाबोच जास्त कावरीबावरी व्हायची . सिताबो मला खाण्यापूरते मातृत्व देणारी तर गुलाबो हक्काने लाड पुरवून घेणारी. एक मात्र खर! त्या दोघींच्या मस्तीत, खेळात घराला एकदम जिवंतपणा आला होता. हा 'मोह' आम्हाला मनापासून आवडायला लागला.

       धाकटा परीक्षेच्या आधी अभ्यासाठी आला होता तेव्हा त्याच्या स्टडी टेबलाचा ताबा दोघींनी घेतला आणि त्या झाल्या त्याच्या स्टडी  पार्टनर्स . 

           एके दिवशी सिताबोच्या काय मनात आले कोण जाणे मी बसले होते.रात्रीची वेळ! सिताबो आपणहून जवळ आली. मांडीवर डोके ठेवले. माझा हात चाटू लागली.सारे शरीर पर्र करत थरारत होते. कृतज्ञता, प्रेम दाखवायची ही मांजरींची पध्दत. पण तिच्याकडून एवढा प्रेमवर्षाव अनपेक्षित! नंतर उठून ती गेली समोर अंगणात. अर्थात बाहेरच दार बंद असल्याने मी होते निर्धास्त. इतक्यात मांजराच्या ओरडण्याचा आवाज आला म्हणून बाहेर गेले तर रस्त्यावरच्या एका कुत्र्याने बांधावरून  यशस्वीपणे उडी मारली होती आणि त्याच्या तोंडात लोंबत होती सिताबो.हे दृश्य मेंदूवर अखेरपर्यंत  तसेच सुस्पष्ट कोरलेले रहाणार आहे. बाहेर चार पाच कुत्री शिकारीची वाट पहात होते. सिताबोचा मृत्यू एखाद्या निखा-यासारखा मनाला चरचरीत डाग देऊन गेला. परत परत "मोह मोहके धागे" आपले काम करत होते.मन या प्रेमाच्या, वात्सल्याच्या धाग्यातून मुक्त होत नव्हते.

       गुलाबोलाही तिच्या बहिणीच्या,मैत्रीणीच्या मृत्यूचा भयंकर धक्का बसला. एक मिनिटही ती आम्हाला सोडून रहायला तयार नव्हती. पूर्वपदावर यायला जवळजवळ  महिना जावा लागला. त्या काळात  ती सतत घाबरटपणे वागत होती.

     साधारण महिन्याभराने गुलाबोचे नाचकाम पूर्ववत सुरू झाले, परत तेच त झूsssम करत गच्चीभर पळणे. भूक लागल्यावर लाडीगोडी करणे. जवळ बसून हात चाटणे इत्यादी प्रेमसंकेत ती सतत देत असते.आत्ता पर्यंत इमानदारी ही कुत्र्यांची मिरासदारी होती आणि आता गुलाबो म्हणजे मांजराच्या वेषातील  कुत्र्याचा आत्मा वाटते. मला सांगा नाहीतर प्रत्येक ठिकाणी  माझ्याबरोबरच रहायचा अट्टाहास कसा कायअसतो तिचा?. माझे पेशंट संपेपर्यंत बाहेर दाराला चिकटून बसलेली असते ती !  आता ती असणं हेच आमच्यासाठी  आनंददायी  आहे.   ती मोठी झालीय .एका बोक्याबरोबर तिची मैत्रीही झाली आहे. पण अजून तरी घराची सीमा ओलांडून  कुठेच गेली नाही. पुढे काय याचा विचार आम्ही  सोडून दिलाय कारण आजच्या क्षणाला तिच्याकडून मिळणारा आनंदच खरा.

          असे हे मोहाचे, प्रेमाचे चिवट,अती मजबूत धागे एकदा हातात घेतले की फरफट होणारच पण म्हणून ते टाळायचे आणि 

सरळसोप्प आयुष्य  जगायचे यात काय मजा? .गुलाबो प्रत्येक  दिवसाचं, क्षणाच महत्व नकळत शिकवते आहे. आणि कोणाचे आयुष्य किती आहे अशी वेडगळ  गणितं न मांडता आम्हीही तिच्या सहवासाचा पुरेपुर आनंद घेतो आहोत.      

    

माझ्या इतर लेखांची लिंक 

https://drkiranshrikant.pasaara.com 

शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०२०

त्या दोघी©️

 


           


               मध्यंतरी टर्की देशात तेथिल एका कुटुंबा बरोबर राहण्याचा योग आला. पती पत्नी आणि त्यांची दोन मुले. एक मुलगा आणि एक मुलगी. चौकोनी आदर्श कुटुंब!. पती पत्नी साधारण तीशीचे! उंचेपुरे. देखणे.दोन्ही मुलेही अती लाघवी आणि हुशार .आता एवढे सगळे  छान छान अगदी तोंडाला मिठ्ठी  बसण्यासारखे गोड गोड तरी पण ------  हा 'पण' फार वाईट! ह्या कुटुंबातील मुख्य  स्त्रीला सासूबद्दल प्रचंड राग!   टर्कीशमधे सासू म्हणजे 'खाईनाना'. तर या 'खाईनाना' प्रकाराबद्दल अत्यंत कडवटपणे ती बोलत होती. बर स्वतः सासूजवळ रहात होती असेही नाही. उलट अडचणीला किंवा मुलांना संभाळायला सासूलाच बोलवत होती. पण नवरा आपल्या "ममाज बाॅय" असल्यासारखा वागतो या बद्दल  असूया! कमी जास्त प्रमाणात हीच भावना परदेशातही अनेक ठिकाणी  दिसली. कातडीचा रंग भलेही गोरा, काळा, तपकीरी, पिवळा असो सासूसुन या नात्याचा पीळ तस्साच!  अर्थात या नियमांना अपवाद असणारच! आज या अपवादाचा पसाराच आवरणार आहे.



                त्या दोघी©️



       साधारण पंधरा  वीस वर्षांपूर्वी  वृत्तपत्र उघडले की  'सुनेला राॅकेल ओतून जाळले. नणंद आणि सासूला अटक' अशी एक तरी बातमी असायची. आता सुदैवाने  या बातम्या कमी झाल्या आहेत आणि दुर्दैवाने सुनेने वृध्द सासूला घराबाहेर  काढले अशा बातम्या वाढल्या आहेत. चक्र आता एकशे ऐंशी अंश कोनातून फिरले आहे. असो. जेव्हा जेव्हा सासू सुनेच्या संघर्षाच्या बातम्या ऐकते तेव्हा तेव्हा नजरेसमोर उभ्या रहातात 'त्या दोघी'. दोघींचे स्वभाव पूर्णतः भिन्न! विचारसरणी वेगळी, पार्श्वभूमी वेगळी पण तरीही  दोघीजणींना एकमेकींबद्दल विलक्षण आत्मीयता!  यातील एक होती माझी आई आणि दुसरी वडिलांकडची माझी आजी म्हणजे दोघी नात्याने सासू सुना. होय तेच ते कायम बदनाम असलेलं नातं. फक्त आपल्या भारतातच नाही तर जगभर तिरस्कारलेल! मग तो भारत असो वा परदेश! अर्थात या नियमांना  सुदैवाने तसे अपवादही खूप आहेत पण तरीही  ते अपवादच!

          असाच एक अपवाद  माझ्या लहानपणापासून डोळ्यासमोर होता पण त्याचे महत्व कळण्याएवढी प्रगल्भता माझ्याकडे नव्हती पाचपोचही नव्हता.  आज मात्र त्या नात्याचा रेशमीपोत आणि त्यातील उब जाणवते आहे.

         माझ्या वडिलांची आई म्हणजे तिला आम्ही काकी म्हणत असू, आमच्याकडे रहायला आली ते आजोबांच्या मृत्यूनंतर!.काही काळ काकाजवळ रहायचे तर काही आमच्याजवळ असच ठरवून आली होती ती. त्याआधीही ती येत असे आणि ती परत जायची तेव्हा माझी अफाट रडारडी व्हायची.ती कधीच जाऊच नये असे वाटायचे. ती होतीच प्रचंड प्रेमळ!

           सावळी, छोटीशी,तोंडाचे मस्त बोळक, डोळ्यावर गोल चष्मा आणि त्या चष्माच्या जाड काचेमागे मोठ्ठे दिसणारे डोळे , हातात सतत जपाची माळ!  आणि ओठात खडीसाखरेसारखे विठ्ठलाचे नाव.आजोबा गेल्यावर गुलाबी, हिरवे असे रंग तिने वर्ज  केले होते त्यामुळे तपकिरी किंवा राखाडी नऊवारी साडी!. थोडक्यात आजी या नावात जे जे मटेरीयल आपण म्हणजे माझ्या पिढीतील  कल्पतात ते ते तिच्यात ठासून भरले होते. 

          आल्या आल्या आजीने जाहिर केले आजपासून जर घरात कुठलाही वाद झाला तर तिचा पाठींबा फक्त सुनेला असणार आहे कारण सून गृहलक्ष्मी आहे. झालं ! पहिली लढाई तर आजीच्या पारड्यात पडली !.

काकी बोलयची कमी. सतत हातात जपमाळ. आणि मुखात नामस्मरण! काही काळाने लाडालाडात भोचकपणे मी आजीला विचारले "आजी सारखी कां ग विठोबाचे नाव घेतेस? आजीचे उत्तर फारच छान होते "अग माझ्या मुलाच्या आणि सुनेच्या संसारात लुडबुड करण्यापेक्षा हे नामस्मरणच बरे "

बर हे तिने मनापासून स्विकारले होते. पण हीच आजी,माझी आई बी.एड करताना पूर्ण घराची जबाबदारी सहज पेलत होती.वडील नोकरीनिमित्त फिरतीवर आणि आई काॅलेजमधे आणि आम्ही दोघी लहान. अशावेळी जेवण करण्यापासून ते आमचे डबे भरण्यापर्यंत कामे आजी आनंदाने करत असे आणि नंतर तिच्याजवळच्या गोष्टींच्या समुद्रात आम्ही मनसोक्त पोहत असू.

          आजीच्या लहानपणीच्या, आणि माझ्या आजोंबासोबत तिने अनेक प्रांतात केलेल्या प्रवासाचे अनुभव अरेबियन नाईट्सपेक्षा सुरस आणि चमत्कारिक होते. आजोबा इंजीनियर! त्या काळात क्वेट्याला(आज जे पाकिस्तानात आहे)झालेल्या भूकंपानंतर सिव्हील इंजिनिअर म्हणून बराच काळ दोघांचे वास्तव्य तेथे होते. तिथे कडाक्याच्या थंडीत नळ चालू केल्यावर पडणारी पाण्याची धार लगेच बर्फ बनायची आणि आजी जेवताना ताट स्टोव्ह वर ठेऊन कशी जेवायची या आमच्या आवडत्या गोष्टी. त्यात आजी कोकणातील ! भुतांच्या गोष्टी ऐकाव्यात तर तिच्याकडून.त्यात तिच्या वडिलांच्या कथा सांगताना तिचा आवाज अधिकच कापरा व्हायचा.

         हे झाल आजी म्हणून! पण तिच्या दोन्ही सुनांचा आजीला विलक्षण अभिमान.माझी आई कुठल्याही धार्मिक कर्मकांडाच्या विरोधातली. शिकलेली आणि पुरोगामी विचारांची. धाडसी, उत्कृष्ट बॅडमिंटन खेळणारी. या सर्व गुणांना काकीचा भरगच्च पाठींबा. काही काळ तर नोकरी करताना आईला शाळेत रहावे लागले कारण शाळा होती गुरुकुल धर्तीवर आधारलेली. शाळेतील नोकरी स्विकारताना आईलाच नको नको होत होते कारण घराची जबाबदारी पडणार होती काकींवर ! काकींनी ती जबाबदारी स्विकारली आणि वर्षभर पारही पाडली.त्या काळात ती माझ्या काकाकडे पण गेली नाही.

         आईला   काकीच्या या सर्व कष्टांची जाणीव होती त्यामुळे आई घरी असताना तिने कधीच त्यांना कुठलेच काम करू दिले नाही.त्यांच्याशिवाय ती एक घासही खात नसे. कधीं कधीं  काकीचे नामस्मरणच इतके लांबायचे पण आई तशीच थांबे आणि त्यांच्या आवडीप्रमाणे गरम जेवण त्यांच्या पानात वाढे मगच दोघी जेवत .असे म्हणातात दोन स्त्रिया एकत्र आल्या की भांड्याला भांडे वाजणारच, पण ही दोन भांडी कुठल्या मटेरीयलची होती त्याच जाणे. बहुधा दवभिजल्या गुलाबपाकळ्यांना लोण्यात चुरून एकमेकींचा एकमेकांसाठी तो खास कोपरा बनला होता.  पण  हीच आई आमच्यासाठी कधिकधी  महारणचंडी असे .

         काकीला वाचनाचे वेड ! पण मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यावर वाचन अवघड होऊ लागले . काकीला   जेव्हा डोळ्याच्या अगदी जवळ पुस्तक धरुन वाचताना आईने पाहिले तेव्हा तिने आम्हा दोघी बहिणींना कामाला लावले.काकीला रोज आळीपाळीने पुस्तक वाचून दाखवायचे.मग लहानपणीच ह.ना. आपटे, ना.ह.आपटे ,विरधवल, कालीकामूर्ती इत्यादी पुस्तके आम्ही वाळवीसारखी फस्त केली. आम्ही खूष आणि काकी डब्बल खूष.

       खरतर आई आणि मुलींचेही मतभेद होतात. कधीं कधीं पराकोटीला जातात पण सासूसुनेचे नात असूनही या दोघींच्या  आवाजाची पट्टी कधीच चढली  नाही. काकी अत्यंत धार्मिक पण आपली कर्मकांडे तिने 'घरच्या परंपरा' या गोंडस नावाने आईवर लादण्याचा प्रयत्नही केला नाही. काकीला कथाकिर्तनाला नेण्याची जबाबदारी आईने आमच्यावर सोपवली होती. हयगयीला क्षमा नव्हती. मला आठवते काकीसाठी म्हणून आईने सत्यनारायणाची पूजा देखिल केली होती. एकत्र राहूनही एकमेकांना  पुरेशी 'स्पेस'  त्या देत होत्या.

     एखाद्याला वाटेल हे कसलं सगळ गोड गोड. या नात्याचा आत्मा म्हणजे त्यातील 'तू तू मै मै 'चा खमंगपणा. तोच या नात्यात नाही.पण ब-याचदा या खमंगपणात  तोंड होरपळून निघते.मग फक्त पश्चात्ताप!

         माझ्या   त्या वयात त्या नात्याची खोली, महत्व मला कळलेच नाही. हे असच असत,पुढेही असणार आहे असेच वाटायच.'पण लक्षात कोण घेतो?'वाचताना सासूरवासाच्या कथा तेव्हा दूस-या ग्रहावरच्या वाटायच्या. पण आता लक्षात येतंय एकमेकींबद्दल आदर, त्यांच्या विचार स्वातंत्र्याची आस्था, एकमेकींच्या कष्टांची जाणीव या पायावर त्यांचे नाजूक नाते कणखर उभे होते. अर्थात हे माझ्या अल्पमतीला दिसलेले! पण या पलिकडे या नाजूक नातेसंबंधात रेशीमधाग्यांचा गुंताडा न करण्याची जबाबदारी दोघींनी पुरेपूर  निभावली.नुसती निभावली नाही तर पुढच्या पिढ्यांना हा वारसा त्यांच्या नकळत सोपवला.

आज दुर्गेचा नवरात्रीचा , नवरुपांचा , स्त्रीशक्तीचा उद् घोष  चालला आहे. घरात शांती आणि समाधान नांदण्यासाठी झटणा-या या दोघी मला दुर्गेचीच विविध रूपे वाटतात.



        माझ्या इतर लेखांची लिंक 

https://drkiranshrikant.pasaara.com 



शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २०२०

आई©️

 



आई या जादूई शब्दात खर तर गंमत आहे ,कितीही भावंड असोत प्रत्येक मुलाला ती फक्त आपली स्वतःचीच आपल्यापूरती आई आहे असेच वाटते.या नात्यात हीच तर जादू आहे. लहानपणी तर शाळेतून आल्यावर पहिले झूट आई पाहिजेच.मग फक्त आपलंच टुमणे सुरू. आता वाटत आईला कधीही तुझा दिवस कसा गेला एवढ सुध्दा  विचारावं वाटल नाही मला!मी मोठी झाले.आईने सुध्दा तिचा रोल बदलला. ती मैत्रीण कम आई या रोलमधे फिट्ट  बसली. तरी माझा स्वार्थीपणा सुरूच. 

        यथावकाश मी आई झाले. पहिला त्याग मी केला झोपेचा. आधी माझ्या आईच्या जीवावर घनघोर झोपणारी मी बाळाच्या नुसत्या अ sअंsअsअं ने टक्क जागी होऊ लागले.कुणीही न उठवता. बहुधा हेच ते महान मातृत्व का?. त्यानंतर आई या नात्याबद्दल निर्माण झाले विलक्षण कुतूहल.  मग मला छंदच लागला 'आई' वाचायचा.बालरोगतज्ञ असल्याने या आई आणि मूल यांच्यात निसर्गाने निर्माण केलेल्या अनोख्या बंधाला भरपूर प्रमाणात बघता आले. शिकता आले.एकीकडे त्यागमूर्ती , धैर्यवान तर दुसरीकडे आपल्या हटवादीपणाने मुलाचे वाटोळ करणारी आई. मुलीचा दुस्वास करणारी अन् अती काळजीने मुलांना पांगळ करणारी. अती लाडाने कान चावणारा मुलगा घडविणारी ही पण आईची अनेक प्रिय अप्रिय रुपे बघायला मिळाली. मग जाणविले  अरेच्चा आई एक माणूसच!! त्यामुळे  अशा विविध करड्या काळ्या  छटा तिच्यातही असणारच! ती चुकाही करणारच. लोलकातून दिसणा-या सप्तरंगासारखी आई! जाऊ दे! शब्दात न पकडता येणारी म्हणजे आई. 



    आई©️



साधारण साठ वर्षांपूर्वीचा काळ.एक  मध्यमवर्गीय घर. घरात अक्षरशः चार महिने बिछान्याला आजाराने खिळलेली पाच सहा वर्षांची मुलगी आणि सतत  तिची शुश्रुषा करणारी तिची आई. मुलीला  मुदतीचा ताप म्हणजे टायफाॅईड झालेला, तोही उलटणारा.सतत तापाने फणफणलेली ती मुलगी! रोज डाॅक्टरांच्या भेटी सुरू.त्या काळात टायफाॅईड वर उपयुक्त औषंधांचे प्रमाण नगण्य. क्लोरोमायसेटिन हे औषध भारतीय बाजारात  नुकतेच आलेले.त्याची उपलब्धता अपुरी. त्यात त्या मुलीची तब्येत अति गंभीर झालेली.यमराज जणू शोधताहेत "चला कुठे गेली ती मुलगी?वेळ झालीय तिची. पण त्यांच्या दिव्य नजरेला जणू ती मुलगी दिसतच नाही. कारण ती मुलगी आणि यमराज यांच्यामध्ये खंबीरपणे, निश्चयाने उभी आहे एक किरकोळ तरूण स्त्री!त्या मुलीची 'आई' जणू यमराजाला ती आव्हान देते आहे "अरे असेल हिंमत तर माझ्यापलीकडे नजर टाक तिच्यावर." ती तरूण स्त्री  जागरणाने, काळजीने खंगलेली आहे.सतत मुली जवळ बसून डोक्यावर बर्फाची पिशवी ठेव, पथ्याचे खायला दे, ताप बघ, औषध दे यातच गुंतली आहे. जणू तिच्या त्या अशक्त कुडीने ती कालचक्र थांबवायचा प्रयत्न करत  आहे.

    सतत गुंगीत असलेल्या त्या मुलीला एकच आठवते. आईचा तो कपाळावरचा थंड मृदू स्पर्श. कधी ग्लानीतून डोळे उघडले की दिसणारा आईचा चेहरा , तिच्या धुवट सुती साडीचा किंचित ओशट वास आणि त्याबरोबर  खोली पुसल्यावर येणारा फिनेलचा उग्र वास. मृत्युने आ वासलाच होता. डाॅक्टरांनीही आशा सोडली होती. पण मृत्यूच्या तोंडातून नव्हे तर घशातून त्या आईने डाॅक्टरांच्या मदतीने मुलीला ओढून काढले. त्यावेळेस तरी त्या मुलीची जीवनरेखा होती तिची आई!   ही कथा माझी स्वतःची म्हणूनच मला खूप जवळची. जिव्हाळ्याची.


--   ------    ------ ------------------------   ----    --- 


ब-याच वर्षांपूर्वीची गोष्ट. रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली होती.  त्या गर्दीत फतकल मारून ती बसली होती. जवळच साधारण वर्षंभराचा मुलगा.कडेला उभी, मधुनच तिला ओठंगणारी,मधुनच खेळणारी तिची छोटी मुलगी.'तिच्या' अंगावर किंचित भडक कपडे. डोक्यावरून पुढेपर्यंत घेतलेला पदर. उभट चेहरा. डोळ्यात भकासपणा. मुलगा तेथेच बिस्किट चघळत बसलेला. आजूबाजूला  आपल्याच तंद्रीत खेळणारी साधारण चार वर्षांची तिची ती मुलगी!. खेळाच्या झिंगेत कुठलं तरी गाण म्हणणारी. मधनच बारक्या भावाशी लाडेलाडे बोलणारी.लहर आली की 'तिच्या' गळ्यात पडणारी. त्या घामट , पळणा-या गर्दीमधली एकमेव, झुलणा-या कळीसारखीच इकडेतिकडे डोलणारी!  .त्या गर्दीपासून दूर जणू स्वतःच्या छानशा बागेत खेळत असल्यासारखी ती मुलगी आपल्याच विश्वात रंगलेली. विलक्षण बोलका निरागस चेहरा.केसांच्या झिप-या. हसरे टपोरे डोळे.मुलीच्या आणि 'तिच्या' चेह-यात खूप साम्य. इतक्यात एक उंच माणूस तेथे आला. थोडया अधिकारवाणीने तो त्या बाईशी बोलू लागला. ती अजीजीने बोलत होती.परत परत मुलीकडे बघत होती. डोळे पुसत होती. मला भाषा कळत नव्हती. इकडे मुलगी खेळात मग्न. त्या स्त्रीने स्टाॅलवरून जाऊन कागदात वडे आणले आणि मुलीच्या हातात कोंबले. मुलीने खाली फतकल मारली. छोट्याच्या समोर एक घास धरला.तो अजूनही बिस्किटात मग्न आहे हे बघितल्यानंतर चवीने ती वडा खाऊ लागली. इतक्यात गाडीची शिट्टी वाजली. त्यांची गाडी बहूधा हीच होती.गर्दी अधिकच दाटली. मुलगी पटकन उठली .उरलेला वडा एका हातात धरून पटकन 'तिचा' पदर पकडला.तिने बाळाला काखोटीला मारले .एका हाताने मुलीला पकडले गर्दीने वहाणा-या डब्याजवळ ती गेली .ती बाई मुलासहीत आत शिरली. शिरता शिरता तिने मुलीचा हात सोडून दिला. क्षणभर काय होते हे मला रजिस्टर झालेच नाही. उसळलेल्या गर्दीत ती मुलगी क्षणभर दिसली तोच गाडी सुटली.इतक्यात तो उंच माणूस  कुठूनसा परत आला. रडणा-या मुलीचा हात धरून चालू लागला.मुलगी हमसून हमसून रडत होती.

               ------   -----  ---   ------ ------- --------


आठ दहा मुलांचा घोळका ओरडत चालला होता. आवाज टिपेला पोहोचलेला.मुलांची वयही साधारण पाच ते बारा. बारकी पोर मोठ्या पोरांकडे बघून डिट्टो काॅपी करणारे. ए वेडाsss वेडाsss तारस्वरात  मुले ओरडत होती. त्यांच्या पुढे एक कळकट   कपड्यातील पुरुष चालत होता. साधारण तिशीतला तो. आजूबाजूचं कसलाच भान नाही. मुले ओरडायला लागल्यावर वळून त्यांच्या अंगावर धाऊन आल्यासारखे करत तो पुढे जात होता. काही मुलांनी तर मारण्यासाठी  हातात दगड घेतले. देवाघरची फुले म्हणून ज्यांना कायम गौरविले जाते तीच ही मुलं. त्यांचे  निरागस बाल्य जणू आता विरून गेले होते. खिडक्या गॅलरीतून काही जण हा फुकटचा तमाशा बघत बघत हसत होते.इतक्यात विजेच्या वेगाने ती बाहेर आली. मुलांच्या घोळक्यांतील एका आठ वर्षाच्या मुलाला बकोटीला घट्ट धरले. इतर मुलांना जरबेच्या आवाजात तिथेच थांबवले. तिच्या आवाजात एवढा अधिकार होता की सर्व मुले तिथेच उभी राहिली. गम्मत हुकल्याचा राग काहींच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होता. तिने  मुलांना डोळे बंद करून त्या कळकट कपड्यातील पुरूषांच्या   जागी स्वतःला किंवा आपली  प्रिय व्यक्ती आहे अशी कल्पना करायला सांगितली. तिचा बकोट धरलेला मुलगा तर आता रडकुंडीला आला होता. "आता तुमच्यातील एकजण पुढे चालेल आणि बाकी सर्व त्याच्या मागे ओरडत जातील. दगडही मारतिल" तिने जोरदार आवाजात सांगितलं. मुले आता चुळबुळू लागली. कोणीच पुढे येईना. "आता यापुढे कोणाचीही चेष्टा करताना प्रथम आपल्यालाच तिथं कल्पनेत उभ करायच" मुले कुजबुजत तेथून गेली. तिने हात पकडलेला मुलगा मात्र हुंदके देऊन रडत होता. आईची माफी मागण्यासाठी शब्द शोधत होता.

 --------    -------- -    ------- ----- -- ---------


माझे इतर लेख वाचायचे असल्यास खालील लिंक वापरावी 
https://drkiranshrikant.pasaara.com