रविवार, २६ एप्रिल, २०२०

स्पर्श

      परवा नातीशी भरपूर गप्पा झाल्या. ती कॅनडास्थित अन् मी भारतात.      साडेतीन वर्षांची माझी नात तिची नवीन खेळणी दाखवत होती आणि ते किती, किती 'साॅफ्ट' आहे हे परत परत सांगत होती.आपल्या आजी आजोबांनी खेळण्यांना हात लाऊन बघावं ही तिची ईच्छा. पण तिलाच काय मलासुध्दा   वाटत होते,नातीला जवळ घ्यावे,तिच्या गबदुल गालांवरून हात फिरवावा.   चला आभासी तर आभासी पण दिसली तर होती न मला.मग तेव्हाच ठरविले या शुक्रवारी पसा-यात आजवर हरवलेले स्पर्श शोधायचे. तशा हृदयस्पर्शी, मनस्पर्शी घटना ही असतात पण ठरविले त्या नंतर कधीतरी हुडकायच्या पसा-यातून.! आता फक्त   'स्पर्श'.  स्पर्श म्हणजे पूर्णतः वैयक्तीक अनुभव.त्यामुळेच पसा-यातून हुडकणे सोप्पे गेले.


स्पर्श


टॅssहॅ टॅssssहॅ बाळाचा आवाज घरात घुमतो अन् घरदार त्याच्या तालावर नाचू लागते .कोणाच्याही मांडीचे राजसिंहासन आणि हातांचा झुला बाळाला शांत करू शकत नाही .इतक्यात लगबिगीने आई कुठून तरी येते बाळाला जवळ घेते.बाळ हसू लागते. इतकावेळ तारेवरची कसरत करणारे घरही त्याच्याबरोबर डोलू लागते. पटकन कोणीतरी कौतुकाने बोलते" पाहिलंत का,s इवलासा नाही गुलाम तोच आईचा हात ओळखू लागलाय लब्बाड" खरच अशी आहे स्पर्शाची जादू! पण म्हणतात ना 'अतिपरिचयात अवज्ञा' तसेच काहीसे या स्पर्शाचे आहे. सतत होत असलेले असंख्य स्पर्श या स्पर्शाची जादू थोडी बोथट करतात नाहीतरी प्रत्येक क्षणी घेतलेल्या श्वासाची तरी कुठे जाणीव असते आपल्याला? .आयुष्यातले सोनेरी स्पर्शकण मात्रआपल्याला सर्वांर्थांनी उजळवून टाकतात, तर नकोशा वाटणाऱ्या ओंगळ स्पर्शांची आठवण कोळ्याच्या चिवट धाग्यांत अडकवून तडफडवतात.  त्यातुन कितीही बाहेर पडायचे ठरवले तरी शक्यच नाही. एखादा विशेष स्पर्श परत मनाचे झरोके किलकिले करतो आणि मग कितीतरी चांगले वाईट स्पर्शांचे अनुभव सर्वांगांना लपेटतात. .खर तर बहुतेक सर्व स्पर्श हे अनंतात हरवणा-या माणसांसारखेच कालांतराने हरवून जातात.पण त्या अनुषंगाने फुललेल्या किंवा कोमेजलेल्या भावना मेंदूच्या स्मरणीकेत पक्या बसलेल्या असतात.

   लहानपणी बक्षीस मिळवताच धावत येऊन ते आजी-आजोबांना दाखवायची माझी सवय. आई आणि बाबा दोघेही नोकरी करणारे . आजी आजोबांना नमस्कार करताच पाठीवरून फिरणारा त्यांचा खरबरीत हात मनाला लोणी लोणी करायचा.घशात काहीतरी अडकल्यासारखे वाटू लागायचे. डोळे उगीचंच चुरचुरायला लागायचे. असे का होते हे कळायचेच नाही.. तो थकलेला, सावकाश पाठीवर, तोंडावर होणारा स्पर्श  जळजळणाऱ्या डोळ्यांवर थंडगार पाण्याची पट्टी ठेवताच अंगभर झिरपणारा गारव्यासारखा . मनाला शांत शांत करायचा.
  घरातली मी धाकटी ! लाडोबाच!  रात्री आईने गोष्ट सांगायचीच आणि तिला बिलगून ती गोष्ट ऐकायची हा माझा हट्ट.  आईच्या कुशीत गोष्टी ऐकताना तिच्या त्या धुवट किंचीत ओशट वासाच्या साडीचा तो मऊमऊ स्पर्श आणि तो थोपटणारा मखमली आश्वासक हात. निद्रेच्या साम्राज्यातही  तो स्पर्श केवढा आधारवड व्हायचा. मग काय बिशाद आहे राक्षसांची आणि भुतांची माझ्या जवळपास फिरकायची? आई बरोबर बागेत फिरताना ती मुद्दाम कोवळ्या पानांचा स्पर्श अनुभवायला लावायची तेव्हा प्रश्न पडायचा आईचे हात अधिक मखमली आहे का ही बालपालवी?
       वाढत्या वयात स्पर्शाचे संदर्भही बदलू लागले. बालवयात बसमधून शाळेला जाताना बसमधल्या गर्दीत सर्वांगाला असंख्य स्पर्श होत असत. टोचणारा बाक,  गारेगार स्टीलच्या दांडा ,हाताला रग लागेपर्यंत कसेबसे धरलेले कडक हॅडल, खांद्यात कचकचून रूतलेले ते जडशीळ दप्तर, आजूबाजूला माणसे माणसे, परंतु हे सर्वच स्पर्श संदर्भ शून्य असायचे.त्यांना ना कुठल्या शब्दांचा आधार ना कुठला अर्थ. वाढत्या वयाबरोबर मात्र कधी कधी सहप्रवाशांच्या लालसेला स्पर्शरूप मिळाले. हेतुपुरस्सर केलेला स्पर्श ! मग नकोनकोसे वाटणारे स्पर्श आपसुकच चुकवता यायला लागले.

            त्या कैरीसारख्या करकरीत वयात सर्वच गोष्टींची अपूर्वाई असायची. मैत्रिणीला सोडून दुसऱ्या गावी जाताना डोळे पुसत पुसत तिने घट्ट पकडलेला हात कित्येक गोष्टी क्षणात बोलायच्या "कधी भेटणार ग आपण?" हा प्रश्न त्या हाताच्या स्पर्शातून सहजतेने उमटायचा .आज माझा करंगळी एवाढा नातू 'हाय फाईव्ह'  करतो तेव्हा त्याच्या स्पर्शात जाणवते की या क्षणी तो स्वतःला खूप मोठा अगदी त्याच्या बाबासारखा समजतो आहे. साधे हस्तांदोलन शब्दा वाचून कितीतरी गोष्टी सहजच बोलतात.सहज औपचारिक ओझरते हस्तांदोलन केवळ उपचार!.तेच खूप दिवसांनी भेटलेल्या प्रियजनांनी घट्ट पकडलेला हात खुशाली पासून, 'काय काय घडले' हे आपसुकच  सांगतात.अगदी तो स्पर्श सतत म्हणत असतो 'खूप आठवण आली तुझी.'

          दुर्दैवाने माझ्या सासूबाईंचे निधन झाले तेव्हा माझे पती काॅन्फरन्सला  मुंबईला गेले होते. घरात बारा तेरा वर्षे या अडनीड्या वयाचा माझा मुलगा, आजारी  सासरे आणि माझी वृध्द आई.सारे इतके अनपेक्षीत ..अशा वेळी मित्रमैत्रिणींचे सात्वंनपर स्पर्श धीराच्या,प्रेमाच्या अगणित शब्दांचे काम करीत होते.आजारी सास-यांना आणि आईला कसेबसे मी समजावत होते. ऑगस्टचा भर पावसाचा महिना,कधी नव्हे तो पाऊस बेभान झालेला.आता मुंबईहून कारने निघालेल्या पतीची, दिराची ,जावेची आणि मोठ्या मुलाची प्रचंड काळजी    वाटू लागली. बरोबर कोणी चालकही नाही त्यामुळे जास्तच. माझ्या धाकट्याने बहुधा हे ताडले असावे.त्याने माझा हात हातात घेतला मला जवळ घेतले आणि खरच सांगते त्या स्पर्शात माझी आई, हितचिंतक,माझे आजोबा ,शिक्षक सारे सारे एकवटले होते." मी आहे तू नको न काळजी करूस" असे ढळढळीत स्पष्ट शब्द त्या स्पर्शातून मला समजावत होते.माझ इटूकल्या रोपट्याचा खरच मोठा ,'अश्वथ' वृक्ष झाला होता. आधार, सावली देणारा.
   अशीच एकदा शाळेतून येताना वाटेत एका गोठ्यात कुत्री व्यायली होती. तिच्या त्या लूचणा-या गोंडस पिल्लातील  एक पिल्लू मी हळूच उचलले. त्याचा तो उबदार ,रवरवीत, जीवनाभिमुख स्पर्श, आणि त्याच्या काळ्याभोर ओल्या नाकाचा गार स्पर्श आमच्या दोघांच्या मधे एक खास अनोखा प्रेमाबंध निर्माण करून गेला. नंतर आमच्या घरातला तो एक लाडका सदस्य झाला. 
          वैद्यकीय महाविद्यालयात प्रथमच शरीरशास्त्र विभागात मृतदेहाचा तो टणक ताठरलेला, निर्विकार स्पर्श अंगावर सरसरून शहारा येऊन गेला. पण तेव्हाच त्वचा या सर्वात मोठ्या ज्ञानेंद्रिया बद्दल विलक्षण आत्मीयता  निर्माण झाली. कधी कधी काही आजारांचा घाला पडतो या स्पर्शावरच.! मग बघावे लागतात स्पर्शा शिवाय हतबल झालेले ते अवयव!
           काही काही स्पर्शांची कल्पनेतही एवढे धास्ती असते की विचारायलाच नको. सकल प्राणीमित्रांची माफी मागून लिहीते आहे.अनेक व्यक्तींना असते त्याप्रमाणेच पालीची मलाही  विलक्षण भीती. . तिचे ते फत्ताडे तरातरा पळणे,काळ्याकुट्ट ते पांढ-या फट्ट रंग छटांच शरीर ,ते दबा धरून बसणे आणि ते भक्ष मटकावणे त्यामुळे पाल जर एका खोलीत तर ती जाईपर्यंत मी घराबाहेर!.त्यात तिच्या विषाबद्दलच्या अनेक चित्तरकथा लहानपणापासून ऐकलेल्या .पुढे वाचन वाढल्यावर भारतीय पालीं भोवती असलेलं विषाचे वलय नष्ट झाले पण भीती मात्र कायम. आणि एकदा भिंतीवरून थेट मांडीवर उडी मारून आलेल्या या पाहुणीला दोन-तीन क्षण  (जे युगान्ता पर्यंत वाटले) अंगाखांद्यावर नकळत खेळवली,मानेवरून हातावर आणि तेथून जमिनीवर असा अफाट , अनपेक्षित प्रवास तिने केला. तिचा तो रबरी पण गिळगीळीत स्पर्श एक दुःखद स्वप्न म्हणून विसरायचा आजतागायत प्रयत्न करते आहे. मला लक्षात आले आहे, ही बया वाटते त्याहूनही किळसवाणी आहे.. इतकच नाही तर मी तिला जीतकी घाबरते त्यापेक्षा हजारपट तिला माझा तिटकारा,भय वाटतय.चला फिट्टम फाट झाली.अर्थात अजुन तरी पालीशी मैत्री करण्याचा माझा कुठलाही इरादा नाही.आणि तिचा तो गिळगीळीत  स्पर्श विसरणेही अशक्यच.
         मध्यंतरी पचमढी या थंड हवेच्या ठिकाणी गेले होते. झुळझुळणारा नितळ पाण्याचा झरा  संगीतमय स्वागत करत होता. छोटासा धबधबा अन् त्याला साजेसा इवलासा डोह. तीन चार दिवसांनी नळाला थोडेसे पाणी बघणारे आम्ही जर या आरस्पानी  सौदर्याने वेडावलो नसतो तरच नवल! डोहामधे पाय सोडून बसल्यावर अचानक काळे कबरे इवलाले मासे झुंडीने आले आणि सर्व बाजूनी पायाला लूचू लागले.फुलपाखरांनी  फुलावर ज्या नजाकतीने बसावे तितक्या अलवारपणे .! पायाला अतीसुखद संवेदना होत होत्या.त्या शब्दात पकडणे म्हणजे ढगांच्या आकाराबद्दल प्रत्येकानी अधिकार वाणीने सांगणे.हा अनुभव फक्त ज्याचा त्याने  अनुभवायचा!  
      स्पर्श नुसते बोलघेवडे नसतात तर रंगीत संगीतही असतात. हव्याहव्याशा माणसाचा प्रथम स्पर्श होताच स्पर्श रंगांधळा नाही तर तो गुलाबी, तर कधी सप्तरंगी कधी सुगंधी,सुरेल आहे याची जाणीव होते .
    काही स्पर्श केवळ नजरेने, शब्दांनी केले जातात.  लग्नमंडपात आई-वडिलांनी नजरेनी घेतलेला निरोपाने माझ्या वहात्या डोळ्यांना बांध घातला. ती प्रेमळ नजर मनाला, गोंजारत स्पर्श करत होतीआणि सासरी देखील कित्येक दिवस कवचासारखी  ती नजर सतत जाणवत राहिली .

वेदनेच्या प्रचंड डोहातून इवलेसे बाळ येते .त्या आपल्या अंशाला आपल्या छोटूकल्याला जवळ घेताना  मृदू ,मुलायम ,रेशमी या शब्दांनीही लाजावे असा तो स्पर्श अनुभवताना सर्व ज्ञानेंद्रिये जणु स्पर्शेंद्रीयेच बनतात. आई आणि बाळाच्या मधे जो खास बंध असतो त्यात स्पर्शाने आपला सिंहाचा वाटा उचलला असतो.अपू-या दिवसांच्या कोमेजलेल्या बाळाला सुध्दा ही स्पर्श संजीवनी  टवटवीत करते. 

       आजारपणात ममताळू परिचारिकेचा आश्वासक स्पर्श केवढा तरी दिलासा देतो .ब-याचदा बालरोग विभागातील परिचारिका  आणि तिथल्या बच्चूंमधे एक खास दुवा असतो.ती असते स्पर्शाची जादूई झप्पी .
        आज करोनाने  परत एकदा या असीम सुखावर घालाच घातला आहे.करोना केवळ  क्रूर नाही तर प्रिय जनांना दुरावण्याचे कामही करतो आहे.
ठिक आहे. प्रियजनांचा स्पर्श नाही तर बाकी अनेक स्पर्श आपली वाट बघत आहेत. वाळूचा रवरवीत आणि गवताचा थंड ओलसर, भुरभुरत्या पावसाचा गुदगुल्या करणारा,कडाडत्या उन्हाचा भाजून काढणारा असे असंख्य स्पर्श.फक्त ते अनुभवायला थोडा वेळ नक्कीच द्यायला हवा.
.        अशा अनेक स्पर्शांचे गाठोडे घेऊन आपली मार्गक्रमणा चालू असते. काही मोहवणारे काही फुलवणारे काही ओंगळ काही उदास असे हे असंख्य स्पर्श! 
        अखेरचा स्पर्श होतो तो मृत्यूचा. हा स्पर्श चूकवू म्हटले तरी शक्यच नाही.   मृत्यूचा स्पर्श होतो तो आपल्या माणसांना असह्य दुखःद! ..स्पर्शाच्या या वाटचालीचा अखेरचा टप्पा येतो तोच मुळी अग्निदेवतेची उबदार दुलई घेऊन किंवा धरती मातेच्या मृदूमुलायम कुशीत! पण तोवर आपण दूर दूर गेलेले असतो सर्व भावनांच्या नव्हे तर स्पर्शाच्या पलीकडे कधीच न परतीच्या वाटेवर.
           

आइस्क्रीमचे दिवस

आइस्क्रीमचे दिवस©️


                    आईस्क्रीमच् दिवस म्हटलं की मन  चाळीस पंचेचाळीस वर्षे मागे जाते आणि आठवतं ते घरात बनवलेले आईस्क्रीम. तो  असायचा एक मोठा सोहळाच! 
                आजच्या मुलांना  हा सोहळा म्हणजे बाबा आदमच्या जमान्यातल्या कथा वाटतील .पण आज वयाची साठी पार केलेल्यांना तो काळ नक्कीच  आठवत असेल. आज रस्त्यावरच्या कोपऱ्यावर कुठल्याही प्रकारचे आईस्क्रीम सहजतेने मिळते. आणि आईसक्रीमचे अनेक प्रकारही असतात पण त्याकाळात एखाद दुसरे आईस्क्रीमचे  दुकान सोडलं तर सगळा आनंदच! आज घराघरात सतत घूsssकरीत घुमत बसलेला फ्रिज असतो त्यामुळे आईस्क्रीम काय किंवा बर्फ काय कशाचीच अपूर्वाई नाही.त्याकाळी मात्र , जर पोटभर आईसक्रीम खायचे असेल तर घरी आइस्क्रीम करणे हा एकच उपाय. नव्हे तो एक साग्रसंगीत कार्यक्रम असायचा, नव्हे सोहळाच होता तो.
                वार्षिक परीक्षा संपल्यावर एखाद-दुसरी आते-मामे बहीण घरी डेरेदाखल झालेली असे. जेवताना डोळाभर गुंगी आणणारा आमरस, दुपारी डाळपन्हे , भेळ,संध्याकाळची भटकंती ,आणि रात्री रंगलेला पत्त्याचा डाव हा आनंद खुद्द आकाशातला तो भगभगता सूर्य आमच्या बरोबरीने घेतोय याची खात्रीच असायची. उन्हाचा काव आता टिपेला पोहोचलेला असे.आणि गप्पा गप्पात विषय निघायचा आइस्क्रीमचा! मागच्या वर्षी कित्ती  छान झालं होतं यावर मात्र सा-यांचे एकमत होत असे .पार्थाच्या लक्ष वेधासारखे आता आमच्या डोळ्यासमोर असे आईस्क्रीम ,त्यामुळे आश्चर्य चकित व्हायची पाळी यायची आईची! दिवस-रात्र काम न करणाऱ्या ,धांगडधींगा घालणा-या या पोरी जीमी कुत्र्यासारख्या आज्ञाधारक झालेल्या बघून तिला आमच्या मागणीचा अंदाज आलेला असेच. आडवळणाने का होईना पण तिचा होकार येताच मनाला गारेगार करू लागे. आईस्क्रीमच्या दिवसाचा नुसता विचार! ते वैशाखातील कातावून टाकणारे ऊन कधीच  हद्दपार होई आणि समोर भासमान होई आईस्क्रीमचा दिवस! डोळ्यासमोर भूगोलात भेटलेल्या एस्किमो सारखा छानस चमकदार, ईटूकल, लोलकासारखे सप्तरंग टाकणारे, ठिबठिब पाण्यात निथळणारे बर्फाचे घर येई आणि घर भरून असणारे आईस्क्रीम. जिभेवर केव्हाच रवाळ गोड गोड पोटात आत पर्यंत गारवा पसरवणाऱ्या आइस्क्रीमची चव दाटू लागे.तसे पुन्हा ऊन्हाबोबरीने आइस्क्रीमचा दिवस आता तापू लागे. यावर्षी दूध किती घ्यायचं यापासून ते कुठल्या प्रकारचे आईस्क्रीम बनवायचं असले अनेक विषय अनेक मुद्द्यांसहीत  अहमहमिकेने मांडले जात. अखेर तडजोड होऊन सर्वाधिकार आईला दिले जायचे. बजेट आणि माणसं यांचा मेळ घालून अखेर दूधवाल्या भैय्याला किती शेर जास्तीचं दूध घालायचं हे सांगितलं जायचं मिशीतल्या मिशीत हसत तोही आमच्या आइस्क्रीमच्या आनंदात चिंब होई.
           एव्हाना माळ्यावरून धुळकटलेले जडशीळ आईस्क्रीमचे  भांडं आणि बादली खाली उतरवली जायची. उतरवलेले भांड  साफ करायची जबाबदारी आम्ही बहीणींनी आनंदाने स्वीकारली असे.दिवसभर पाण्यात भिजवून नंतर खसखसून ते साफ केलं जायचं लाकडी भलीथोरली बादली त्यात मधोमध बसणारे पंखा असलेल्या घट्ट झाकणाचे उभट भांड आता भलतच देखणे दिसू लागे.
                      मग सकाळी सकाळीच चुलीवर तापणाऱ्या दुधाचा खमंग वास त्याबरोबरच केशर वेलचीचा गोड सुवास घेऊन आला की डोळ्यातल्या झोपेची ऐशी की तैशी होई. पांघरुण  आवरायचं भानही राहायचं नाही. स्वयंपाकघरात चुलीवर मोठ्या पातेल्यात दूध रटरटत असे त्यात सढळ हाताने साखर केशर वेलदोडा पडलेला असेल ते अवीट चवीचं  दूध प्रत्येकाला एक एक कप मिळे. ती नुसती झलक असे पण त्यावरून आईस्क्रीम कसे होणार याच चवीचा अंदाज आम्ही चतुर आणि चाणाक्ष बहिणींना अर्थातच आलेला असे. दुपारची जेवणं पटापट आवरून पत्त्याचा डाव मांडला तरी डोळे असत घड्याळाकडे. चार वाजता वडील बर्फ  आणणार तोवर जाडजाड पोत्यावर आईस्क्रीमची बादली एखाद्या राणीसारखी ऐटीत बसलेली असे जवळच मोठ्या पितळी पातील्यात दळदार, मळकट खडे मीठ लाचार गुलामासारखे निपचित पडलेले असे.
                     वडिलांनी सायकलला बांधून आणलेल्या बर्फाच्या शीळेला आम्ही केव्हाच ताब्यात घेतलेले असे. ती नितळ ,पारदर्शक ,ओलीकच्च, थंडगार बर्फाची शीळ घरात आली की मन कसं हिमगौरी सारखे आरस्पानी होई. प्रत्यक्षात एवढा बर्फ आपल्या घरी असल्याची कल्पना पण तेव्हा सुखावह !कारण घरात तेव्हा फ्रिज नव्हते. इथं तर खरोखरीचा बर्फ  नव्हे भली मोठ्ठी बर्फाची शिळा आमच्या दिमतीला हजर असे . तो विलक्षण देखणा बर्फाचा तुकडा खाली पोत्यावर ठेवताच,फतकल मारून बसलेल्या बहिणी सरसावून त्यावर कचाकच हातोडी चालवायला सुरुवात करत. बघताबघता पोतं चमकदार ,ओल्या ,धारदार ,पांढऱ्या लोलकांनी भरून जायचे. त्या चमकदार खड्यांचे साजीर रिंगण मग छानपैकी सजायचे लाकडी बादलीत ठेवलेल्या भांड्याभोवती.!आदबशीरपणे त्यावर काळपट जाडेभरडे मीठ आपला फेर धरायचा. बर्फ- मिठाचे गुंफलेले थर बदलीच्या गळ्यापर्यंत आले की आई श्री गजाननाच्या स्मरणाने पिवळसर सुगंधित दुधाची एकसंध धार त्या पंखावाल्या भांड्यात ओतू लागायची. भांड गळवट भरलं   की झाकण घट्ट बंद केल जायचे. एक बहीण भांड्याचे हॅन्डल फिरवायला सुरवात करायची तर एकजण बादलीमधे बर्फ आणि मिठ ईमाने इतबारे टाकू लागे बर्फ टाकण्यात या दोघी बहिणी गुंतल्या की इतरांच्या वात्रटपणाला भरती येई. अचानक पाठीवर थंडगार शिरशिरी उठली म्हणजे कोणीतरी हळूच बर्फाचा तुकडा पाठीवर सोडला आहे.जीच्या पाठीवर तो आहे ती खिदळत तो काढायचा प्रयत्न करतकरत दुसरीच्या फ्राॅक मधे बर्फाचा तुकडा सोडी. फ्राॅकमधे शिरलेला तो हिमखडा काढता काढता पुरेवाट होई. परत हास्याच्या सरीवर सरी कोसळू लागत. हिमावर्षात आमची छोटीशी खोली ही थेट काश्मिरी शिकारा बने आणि आम्ही हिमप-या! मला खात्री आहे या छोट्याशा हिमावर्षावात खळाळणा-या आम्हा मुलींसाठी आणि त्यात न्हाऊन निघणार्‍या हिमगौरींसाठीच  बाबा एवढा भला मोठ्ठा बर्फाचा तुकडा आणत असावे.
                 तोवर हॅन्डल   फिरवणारी बहीण जरा दमली आहे अस वाटताच बाबा आपली  भक्कम मांडी घालून बसायचे.बाबांना हॅन्डल फिरवताना बघताच आई पटापट चमचे, बशा वाट्या आणून ठेवत असे. बाबांनी दमदार हातांनी हॅन्डल फिरवताच  जणू जादूची कांडी फिरायची. आईस्क्रीम तय्यार पुकारा व्हायचा.  हळुवारपणे भांड्याचे झाकणं उघडले जाई. सर्वांची नजर असे पाॅटमधल्या पिवळसर ,लुसलूसत्या राजस आईस्क्रीमकडे.  पहिला चमचा देवाला. मग सगळ्यांना वाटला जायचा .आजीचे डोळे लुकलुकू लागत. .रखमाबाई लाजत आपली बशी घेऊन दारामागे जाई. जीमी जीभल्या चाटत बैठक जमवी. हॅडल फिरवणारी बहीण आता  डब्यतला पंखा चाटून पुसून साफ करण्यात मग्न असे. ते गोडमिट्ट ,रवाळ थंडगार आईस्क्रीम जीभेवर सोडताना अतीव आनंदाने डोळे झाकले जात. त्याच वेळी लक्षात येई थंडगार आइस्क्रीम विरघळल्यावर  तयार झालेले दूध कसं मस्त लागतय.त्या रात्रीची स्वप्ने देखील रंगबिरंगी वैविध्यपूर्ण आइस्क्रीमचीच असायची आणि पुढच्या वर्षी मात्र मॅंगो आईस्क्रीम किंवा चॉकलेट आईस्क्रीम असे ठरवूनच या सोहळ्याचा समारोप व्हायचा. असा हा सोहळा अजूनही आमच्या  पिढीच्या कित्येक जणांची मर्मबंधातील ठेव आहे.
मनात आल्यावर तिन्ही-त्रीकाळ आईस्क्रीम चोपणा-या पिढीला हे कपोल कल्पित वाटू शकेल. पण त्या सामानाच्या जमवाजमवी पासून आईस्क्रीमच्या जन्मापर्यंतचा सोहळा ज्यांनी अनुभवला आहे त्यांना ह्या सोहळ्याचे महत्व नक्कीच कळेल.

शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०

रूची-गंध

करोनाची नकोनकोशी जवळीक वाढत आहे. "तो काय दूर चीन मधे आहे" म्हणेपर्यंत जवळजवळ सर्व देशांभोवती त्याचा विळखा आवळला जातोय.आयुष्याला वेगळच वळण लागत आहे. पण शुक्रवारी स्वतःला दिलेले पसारा आवरायचे वचन तर पाळायलाच हवे. या पार्श्वभूमीवर परवाच अमेरिकेतून पुतण्याचा निरोप आला की त्याच्या साठी पाठवलेली शेंगाचटणी त्याला एका बॅगेत आत्ता सापडली. जवळजवळ दोन महिन्यांनी . शंभर कोटीची लाॅटरी लागल्यासारखी स्वारी खुषीत होती. तेव्हाच ठरविले या वेळी पसा-यात "रुची आणि गंध" यांचा शोध घ्यायचा.




रूची-गंध©️

'रुची आणि गंध' म्हणजेच बोली भाषेतील 'चव आणि वास' ही जुळी भावंडेच.  त्यातील वास म्हणजे गंध , हा भाऊराया रुची ताईला एकदम पूरक! दोघांची गट्टी  पण अतूट ! पण नेहमीप्रमाणेच इथेही गंध 'तो' असल्यामुळे त्याला झुकते माप मिळालेच आहे. जिभेवर रेंगाळणाऱ्या रुचीला मात्र गंधा शिवाय पर्यायच नाही. पण गंध म्हणजे,' तो'.सर्वत्र एकटा उनाडतो त्यामुळे त्याचे खास स्वतःचे अस्तित्व असते. 
       असं म्हणतात की पूर्वीच्या नवाबी राज्यात मेजवानी नंतर हाताला पाक्वांनांचा गंध जितक्या दिवस राहील तितका त्या जेवणाचा दर्जा चांगला असं समजलास जायचा . सात सात दिवस त्या मसाल्याचा  वास हाताला बिलगून बसलेला असे..स्वतःच्या हाताचा वास घेत घेत रंगतदार मेजवानीच्या आठवणीं तृप्त जिभेवर घोळवत घोळवत नवा' खास' खाना 'कधी आहे याची वाट पहाणारे त्यावेळचे ते सरदार दरकदार! असे मेजवानीचा कल्पनेत आनंद घेणारेआणि आपल्या हाताचा पुन:पुन: गंध घेणारे सरदार आणि मानकरी नजरेसमोर आणले तरी हसायला येतं.
             माझ्यासारख्या एका सर्वसामान्य स्त्रीला मात्र भाजलेल्या पापडाचा खमंग गंध सुद्धा आठवणींनी कासावीस करतो. लहानपणी दर रविवारी रात्री तांदूळमुगाच्या डाळीची खिचडी, कढी आणि भाजका  पापड असा बेत ठरलेला ! रविवारी सकाळी तुडूंब झालेले जेवण, दिवसभर हुंदडल्यावर डोळ्यावर आलेली पेंग,अशावेळी वाफाळणारी पिवळी खिचडी, खोबरे आणि कोथिंबीरीचे हिरवे आणि पांढरधोप पांघरूण घेऊन समोर यायची .दळदार  तुपाचा गोळा त्या खिचडीवर मस्तीत बसलेला असे. वाफाळलेल्या खिचडीत क्षणात तुपाची ऐट ऐसी की तैसी होत असे. खिचडीत तो पूर्णपणे नाहीसा होई. गरमागरम कढी वाटीत गुपचूप वाफा टाकत बसलेली असे .लोणच्याचा लालेलाल रंग आपसूक नजर आणि जिव्हेला उत्तेजित करी,आणि या जोडीला येणारा भाजलेल्या पापडाचा , नाकातून शिरून जीभेला पाणीदार करणारा वास उरल्यासुरल्या झोपेला हद्दपार करी. रविवार संपल्याचे दुःखही ताटातून पोटोबात गायब होणा-या खिचडी सारखेच गायब होत असे. आजही तो पापड भाजल्याचा वास आला ना की त्या आठवणी पुनर् प्रत्यय देतात .उद्या शाळा आहे या कल्पनेने पोटात बेडूकउड्या सुरू होतात.मग जीभेवर  रेंगाळते तीच ती गरमागरम खिचडीची चव.
                     पण कधीकधी रुची गंधाची होते गट्टीsफूsss. मग तोंड चाळवणारी पावभाजी सुध्दा सर्दी झाल्यावर टीपकागदासारखी लागते. तेव्हा लक्षात येते चव आणि वासाची जुळ्याची गट्टी. सध्या भूमंडळाला त्राही भगवान करणारा करोना किंवा कोव्हीड19 याचाही घाला पडतो तो या रुचीगंधाच्या दुकलीवर..आजाराची सुरवातच होते तीच एका अवीट सुखाला पारखे होऊन.
           ..
      रुची जरी गंधा वाचून शरणागतीचे सफेद निशाण  फडकवत असली तरी गंध मात्र मधूनच आपल स्वतंत्र व्यक्तिमत्त्व मिरवतो. आठवणींच्या पायघड्यांवर आपली दणकट पाऊले दरवळत.! या गंधाची, सुवासाची, ,अनेक रूपं सामोरी येतात. कधी कोऱ्या पुस्तकाच्या वासाच्या रूपात तो शाळेच्या अनेक आठवणी उलगडतो.  भल्यामोठ्या उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आलेला शाळेचा पहिला दिवस, मृगाच्या पावसाने ओले झालेले रस्ते, तो हिरवट ओला वास,अंगावरच्या रेनकोट खाली दडलेले भलेमोठे दप्तर,रेनकोटच्या प्लॅस्टीकचा किंचीत उग्र वास, कोरा गणवेश. शाळेत जायच्या उत्सुकतेने पोटात दंगा करणारी फुलपाखरे ,त्याने पोटात होत असलेली पाकपुक आणि या सर्व संमीश्र  संवेदनांना वेढून राहिलेला करकरीत कोऱ्या पुस्तकांचा डोक्यात गेलेला वास.
       अशा अनेक कुप्या मेंदूने जपून ठेवलेल्या असतात.गंध बहुरूपी बनून आपली गंमत करू लागतो. वाळ्याचा मंद सुवास मनाला सहजतेने उन्हाळ्यात घामेघूम झाल्यावर ढोसलेल्या पाण्याचा थंडावा देतो. तर रातराणीचा गंध प्रियजनांच्या आठवणीने कासावीस करतो. पारिजातकाचा सुवास थेट मंगळागौर किंवा श्रावणी सोमवारच्या पूजेची शुचिता जागवतो. .रती मदनाचे दूत असलेले जाई जुई मोगरा तर आपल्याबरोबर अनेक मधुर आठवणींची गुंफण आणतात. माझे वडील शेतकी अधिकारी त्यामुळे घरही शेताजवळच. तांदळाच्या शेतातून येणारा तो दैवी सुगंध म्हणजे तर नास्तिकाला आस्तिक करणारा दूतच!
                    काही गंध? मात्र त्रासदायक असतात.वैद्यकीय शिक्षण घेताना प्रथम वर्षातील पहिल्या काही दिवसात ते लाकडासारखे पसरलेले मृत देह आणि तो फाॅरमॅलीनचा सर्वत्र भरून ,एप्रनला चिकटलेला वास. हॉस्टेलवर जाऊन खसखसून अंघोळ केली  तरी त्यातून सुटका नसे. कालांतराने, जाणा-या दिवसांबरोबरच 'काळ हेच औषध' हे पटायला लागले आणि आपसूक त्या नकोश्या वासाचा त्रास होणे कमी झाले. आजही तो फाॅरमॅलीनचा वास आला की आठवतात शरीर शास्त्रातील ते डिसेक्शनचे दिवस.
.         अनादी काळापासून गंधाने आपले खास स्थान निर्माण केले आहे. धूपबत्ती, सुवासिक फुलं याशिवाय देवांची पुजा अगदीच निर्जीव वाटते .मानिनी  शामल द्रौपदी अवर्णनीय सुगंधाची कुपी! तिचं काय किंवा पराशर ॠषींनी दिलेली सुगंधी देह कुडी मिरवणारी सत्यवती काय, ,गंधाने आपले खास स्थान तिथेही राखले आहेच. गुलाब अत्तराची अमोल देणगी देणारी नूरजहाँ  खरोखरच रसिक पण या रसिकतेला रंगेलपणा ची साथ मिळते तेव्हा मात्र गंध थोडासा आक्रमक बनतो..
          खरंतर प्रत्येक ऋतूलाही  स्वतःचा खास गंध आहे .आपल्या महानगरात तो येत नसेलही  पण कुठेही शांत गावात हा गंध तुमचा पाठपुरावा करतोच. 'ऋतुचक्र' या दुर्गाबाईंच्या रसरशीत अनुभवांत हिवाळ्यात आकाशी तेवणाऱ्या सूर्याला जाईच्या झेल्याची उपमा दिलेली आहे . दरवेळी ते वाचताना थंड थंड शिरशिरी बरोबर जाईचा मादक गंध मनात दरवळतो. असा हा गंध रुची बरोबर बंधू म्हणून मिरवता मिरवता स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व जपणारा!
                 रुची म्हणजे चव जरी गंधा बरोबर सतत रहायचा प्रयत्न  करीत असली तरी तिचा स्वतःचा संग्रह अफाट आहे.आता आमच्या सोलापूरच्या शेंगा चटणीची जर 'लत' लग गई ,तर त्या तावडीतून सुटका होणे अवघडच. प्रत्येकाची चवढव वेगळी.कुठलाही एक मापदंड तिथे लावणे अवघडच.काहींच्या हाताला असली भन्नाट चव असते की साध्या साध्या पदार्थांना एकदम चविष्ट बनवतात. तसच बनवायचा आपण प्रयत्न केला की तो पदार्थ गुपचूप , हळूच लपवून टाकून द्यायची वेळ येते.
 गंध आणि रुची यांची मनभावन प्रचिती जाणवते 'वाईन' पिताना. खर तर 'पिणे'हा शब्द अपमानास्पद वाटावा असा नजाकतदार तो सोहळा असतो. पेय पानाचे चषकही खास. ते टवटवीत गुलाबासारखे लालसर आणि चमकदार पेय आधी नजरेनेच प्यायचे. नंतर हळूच चषक गोलाकार फिरवत मनमुराद गंध घ्यायचा, मग अंदाज, कशापासून बनवली आहे याचा! आणि मग हळूच एकच इटूकला घोट जिभेवर स्वैर खेळू द्यायचा! अहाssssहा! आपल्याकडे गंध आणि रूची एकवटतात नैवेद्याच्या ताटात.दिवसभर विविध पदार्थांच्या संमिश्र गंधांची दिवाळीच सुरू असते.नजरेवरही त्यांची खास जादूई करामत होते. भाताच्या सुवासिक मुदीवर वरण पिवळ्या शेवंतीसारखे देखणे दिसत असते. नैवेद्याच्या ताटातील पदार्थ देवाला स्वर्ग सोडून भूतलावर आणायचे आवताणच.

                चवी बद्दलचा विचारच करायचा तर  कुणाला सौम्य सात्विक जेवण प्रिय ,तर कोणी असल्या  पचपचीत जेवणाकडे ढुंकूनही न पाहता तिखटजाळ जेवणच 'गोड' मानणारे .कडूशार कार्ल्याला  व्वा म्हणत ओरपणारे जसे आहेत तसेच गोड खाल्ल्याशिवाय जेवण होतच नाही असे मधुर महाजनही आहेतच.कचकचीत कांदा आणि घमघमता लसूण असल्याखेरीज काही जण जेवणाची कल्पनाही करू शकत नाही. या उलट ईsssकांदा म्हणत नाकाला पदर लावून नाक मुरडणारेही आहेतच. विष्णूच्या मत्सावतारावर अपरंपार प्रेम करणा-या आणि त्यांना उदरात प्रेमाने आश्रय देणार्या कविवर्य बोरकरांसारखेे आहेत तसेच 'मासे' हे नाव काढताच कपाळावर आठी चढवून उदरातील सर्व अन्न बाहेर काढणारे  महाभाग काही कमी नाहीत.भाजीला गाई गुरांचे अन्न समजून संबोधून सामीष आहारावर ताव मारणारे जसे आहेत तसे मांसाहार वर्ज्य करणारेही आहेत.'आमच्या पध्दतीचा स्वयंपाक 'म्हणजे नव्या सुनेला खिजवण्याचा खास 'परवलीचा' 'शब्द! खर तर प्रत्येक घरातला स्वयंपाक वेगळा. आजीच्या मुरलेल्या हातांची चव आईच्या हाताला नाही आणि नव्या सुनेला मात्र सर्वांची त्याच साच्यात बसवायची घाई.अशी ही 'रुची' कौटुंबिक कलहाला आमंत्रण देणारी, एवढेच काय, जगाच्या इतिहासालाही कलाटणी देणारी. अहो, त्या मसाल्याच्या मोहाने तरआंग्लांना भारतभू वर आणल ना.
               वासाची म्हणजे गंधाची आवड बदलणे अवघडच! पण वेगळ्या चवीची आवड मात्र कधीही निर्माण होऊ शकते .लहानपणी एखाद्या भाजीला हातही न लावणारा लाडका लेक लग्न झाल्यावर पत्नीच्या हातची तीच भाजी ओरपायला लागतो तेव्हा आईच्या नाकाला आपोआपच मिरच्या झोंबत नसतील तरच नवल! म्हणूनच वाटते  रुची म्हणजे अर्थात चव जर खरोखरच स्त्री म्हणून उभी राहिली तर एकूणएक स्त्री गुणविशेष आणि यच्चयावत दोषही तिच्यात ठासून भरलेले असतील.
              मला नेहमी आठवतं ट्रेकिंग करताना पंधरा दिवसांत घरच्या जेवणाच्या नुसत्या आठवणींनी पाझरणारी जिव्हा! तेव्हा जाणवलं की रुची गंधाने आपल्याला त्यांचा पूर्णतः गुलाम केले आहे .आणि हे गुलामगिरीत राहणेही तेवढेच सुखकारक!.
        

शनिवार, ११ एप्रिल, २०२०

आमचा अशोक

शुक्रवार,हा दिवस आठवणींचा पसारा आवरायचा दिवस!. आज अनेक आठवणी सतावत होत्या 'मी मी 'म्हणत होत्या इतक्यात माझी नजर खिडकीकडे गेली. .बाहेरच धटिंगण ,तगडा,अशोक उभाच होता आपल्या पानांच्या टाळ्या वाजवत! माझे लक्ष वेधूनघेत. तीस  वर्ष तो आमच्या घरातलाच एक सदस्य आहे.आमच्या आयुष्यातला एक महत्वाचा घटक. म्हणूनच आमच्या या अशोकाची आमच्या या झाडाची आठवण या पसा-यातून बाहेर काढते आहे .


आमचा अशोक ©️

झाडाला कधी गोलरक्षकाच्या भूमिकेत तुम्ही पाहिलंय? नाही ना! मग जरूर आमच्या घरातील  अशोकाला भेट द्या. काही वर्षांपूर्वी म्हणजे साधारण पंचवीस वर्षांपूर्वी छातीवर अनेक पदके चमकवणाऱ्या सेनानीचा थाटात हा अशोक घरातील भांडीकुंडी, ,चमचे, चिमटे तपेल्या  आपल्या भरगच्च पानापानात मिरवत असे. त्याला ही सारी बक्षीसे प्रदान करणारा असे माझा धाकटा.! दिड दोन वर्षाचा माझा धाकटा जेव्हा गॅलरीत लावलेले अडथळे पार करून ,एssक,दोन ,तीsssन असे म्हणत वस्तू  भिरकावत असे तेव्हा गोलकिपरच्या तत्परतेने आपल्या भरगच्च पानांनी त्यांना अडवायचे काम अशोक करीत असे. एकेदिनी तर नवलच घडले. सकाळी सकाळी डोळे चोळत अशोकाकडे पाहते तर काय चक्क लंगडा बाळकृष्ण आणि दत्त दिगंबरा ची मूर्ती अशोका वर झुला खेळत आहे. दैवी चमत्कार म्हणून मी हात जोडते ना जोडते तोच आजींची करूण किंकाळी सर्व उलगडा करून गेली. एक-दोन सादे मादे तीssssन करत धाकट्याने चेंडूसारखा भिरकावलेला  लंगडा बाळकृष्ण आणि दत्त दिगंबरा च्या मूर्ती अशोकाने तत्परतेने आणि चपळाईने आडवल्या होत्या . एकदा तर बादल्या, खुर्च्या भांडी, लटकलेले अशोकाचे वेडेविद्रे रूप बघून माझ्या एक दूरच्या नातेवाईक आपल्या खास अनुनासिक स्वरात म्हणाल्या "अगोबाई आत्तापर्यंत झाडांना फक्त फुले आणि फळे येतात असे ऐकले होते पण तुमच्या झाडाची तर त-हा वेगळीच हो. कै बै तरी विचीत्र झाड" आणि आज विचार केला की जाणवतं की धाकट्यांनी भिरकवलेली भांडी जर खरोखर रस्त्यावर पडली असती तर एखाद्या सज्जनाचा संसार सहज उभा राहिला असता. अर्थात हे व्हायचं नव्हतं. आणि त्याचा दोष द्यायचा आहे तर तो त्या अशोकालाच द्यायला हवा.
                      अर्थात हा अशोक म्हणजे हे अशोकाचं झाड माझ्या घरात आलं तेच मुळी अनपेक्षितपणे! छोटस रोपट. ते उपटून कोणीतरी रस्त्यात फेकून दिलेलं ,आणि "आईला की नाही झाडं खूप आवडतात" 'म्हणून माझ्या थोरल्याने मला ते मलूल रोप  निरागसपणे आणून दिले. "आईग बघ हे झाड, लाव कुठेतरी".इति थोरला "आपल्याकडे जागा नाहीये "त्याला सांगायचा प्रयत्न केला पण तो ऐकायला तयार नाही, मुळात घर भरवस्तीत!.जागा इंच इंच लढवू अशी अवस्था.कुंपणाशेजारी इटूकली  जागा होती, अगडबंब वाढणारा हा वृक्ष या छोट्याश्या जागेत लावायचं म्हणजे सर्कशीतल्या हत्तीने अगतीक होऊन छोट्या स्टूलावर बसण्यासारखं होतं. अर्थात ते जगण्याची शक्यता शून्य. शेवटी बालहट्टापुढे आम्ही सपशेल माघार घेतली. अखेर ब-याच चर्चेनंतर कुंपणाजवळची ही छोटीशी जागा निश्चित  झाली. कुपोषित, रोगग्रस्त बाळासारखा अशोक दिसत होता. एक इवलीशी फांदी. त्यावर दोन पिवळी आणि चार हिरवी पाने. ति हिरवी पानेही पिवळ्या रंगबदलाच्या तय्यारीत. अखेर ती पानेही पिवळी पडली .उरली फक्त वाळकुंडी काटकी. हे झाड काही जगत नाही हे माझ्या मनाने निश्चित केले,, पण तरीही इमानेइतबारे त्याला मी पाणी घालण्याचे काम करत होते. रोज बघत होते त्याला एखाद तरी पान फुटते का. अशोक अधिकाधिक  खंगत होता . तोच अशोकावर जणू कोणी हिरवीकंच मूठ मारली.अशोकाच्या सुकलेल्या अंगागातून लालट कोंब लसलसू लागले, मरगळलेल्या निष्प्राण अशोकाने सुरेखशी तान घेतली.त्याने नंतर कधीच खाली म्हणून बघितले नाही. सर सर सर सर तो वर झेपावू लागला. गुढीपाडव्याला तोरण करताना  हाताला येणारी त्याची पाने आता गॅलरी शिवाय हाताला लागेनात आणि मग लक्षात आलं आपला अशोक आता तरणाबांड झाला आहे.त्या एवढ्याशा काटकीचा पिळदार सब्बल बुंध्याचा वृक्ष आता सळसळतोय .आडव्या-तिडव्या पसरलेल्या फांद्याचे हात सsssळ सssssळ करीत मुलांच्या खोलीत डोकावू लागले. अशोकाचे मग झाले भटजीबुवा.ओसरीतून घरात ठाण मांडणा-या भटजीबुवांसारखी त्याने हाsहा म्हणताम्हणता मुलांच्या गॅलरीत बैठक जमवली.  
            एके दिवशी गंमत झाली अशोकाला न्याहाळताना  त्याच्यात काहीतरी बदल जाणवला एका पानाच्या बेचक्यात लांबलचक देठावर लगडलेला हिरव्या कळ्यांचा घोस ! मग काय सुरू झाली माझी हेरगिरी.हळूहळू अनेक कळ्यांचे घोस पानांशी लपाछपी खेळू लागले. .आणि एका भल्या सकाळी  जाऊन पाहते तो काय, कायम गडद हिरव्या सद-यात वावरणा-या अशोकाने चक्क पांढ-या कशीद्याचा सुरेख झब्बा अंगात चढवला आहे अगदी नवरदेवाच्या थाटात!.गर्द हिरव्या छब्ब्यावर पांढ-याधोप फुलांची वेलबुट्टी मोठी खुलून दिसत होती.. आपल्या आडमाप वाढलेल्या तगड्या भिमाला नवरदेवाच्या वेषात पहाताना कुंतीमातेला जसे भरून आले  असेल ना अगदी तस्सेच माझे मन हळवे हळवे झाले.
..सगळ्या कळ्या एकदमच फुलल्या होत्या. पांढरा फुलांनी नटलेला अशोक मोठा साजिरा गोजिरा दिसत होता. अशोकाचे हे साजिरे गोजिरे रूपडे  पंधरवड्यापर्यंत कसेबसे टिकते ना टिकते तोच अशोक अचानक लेकुरवाळा दिसू लागला. त्याची पाने अधिकाधिक गर्द होऊ लागली सावळ्या विठुरायाने  समस्त संत मंडळींना अंगाखांद्यावर खेळवावे तसा तो भासू लागला .आमचा हिरव्या पोपटी फळांनी लगडलेला अशोक ! त्याच्या निब्बर पानापानातून मायेची सावली पाझरू लागली. .

           हिरव्या फळांच्या बदलत्या रंगा बरोबरच नवनवीन पाहुणे मंडळींची झाडावर हजेरी सुरू झाली आणि मग सकाळी सकाळी तांबट पक्षी शेंड्यावर बसून आपली पिठाची गिरणी सुरू करायला लागला .दुपारी कोकिळेचा सेन्साॅरपासून मुक्त प्रेमालाप पानापानातल्या 'फॅमिली' रूम मध्ये रंगू  लागला. संध्याकाळी वटवाघूळ बुवांनी एका फांदीवर आपला मालकी हक्क जमवला आणि शिर्षासन करीत ते रात्रभर लटकू लागले.मैना जातायेता घटका दोन घटका गप्पा मारायला फांदीवर हजेरी लाऊ लागल्या.जाताना हळूच काळी जांभळी फळे चिमणीच्या दाताने उष्टावू लागल्या. शर्यत लावत खारी बुंध्यापासून ते शेंड्या पर्यंत सुसाट पळू लागल्या. काव काव करत कावळेही येणा-या अभ्यागताची वर्दी देवू लागले. 
              आकाशातून सावळे काळे मेघ कोसळू लागले आणि तिकडे अशोकाची काळी जांभळी झालेली बाळे जमिनीवर टणाटण उड्या  मारून केर काढणा-या बाईचे कंबरडे मोडून लागली.
   आमचा अशोक! त्याच्या सावलीत एखादी गती गर्विता मोटार फाsस फुssस   करत विश्रांती घेते .जालीम जमान्याला कंटाळलेल्या प्रेमीयुगुलांना त्याची सावली थंडावा देते. आणि बच्चेकंपनीचा गोट्यांचा डावही त्याच्या गर्द सावलीत अधिकच रंगतदार होतो.
 असा आमचा अशोक  थोडा लाडोबा, थोडा शहाणासुरता, पण आमच्या घरातलाच एक सदस्य ! त्याला वाढीला पुरेशी जागा मिळावी म्हणून त्याच्या जवळची विटांची भिंत काढून तेथे लोखंडी जाळी बसवण्यात आली .अशोका मुळे गाडीला घरात न घेता 'मुक्काम पोस्ट रस्ता 'येथे मुक्कामाला धाडली. अशोकाच्या फांद्या विजेच्या तारांची गुफ्तगू करू लागताच विद्युत मंडळांचा कु-हाडीचा बडगा त्याला शिक्षाही  करतो, पण तरीही शहरातल्या भर वस्तीमध्ये प्रत्येक दिनी प्रत्येक वर्षी आमचा अशोक फळतोय फुलतोय.
                 त्याला जर भेटायच असेल तर काही ओळखीच्या खुणा सांगून ठेवते.जरूर आमच्या घरातील  अशोकाला भेट द्या. आता हा अशोक कुठे आहे तर ,कुंपणाला चिकटून माझ्या घरात .  त्याला ओळखणंही सोप्प आहे .सरत्या वसंतात पोपटी,भगवा आणि हिरव्याकंच छटांचे चित्रविचित्र भडक कपडे घालून तो थेट हवाई बेटातील जाॅन किंवा जोसेफ सारखं हवाई नृत्य करतो. आणि हिवाळ्याची चाहूल लागताच मातकट पिवळा वेष घालून बैरागी बुवाचा आव आणतो.पावसाळ्यात तर त्याच्या हिरव्यागार कफनी खाली त्याची काळी जांभळी बाळे लपवून फकीरबुवाचे सोंग घेतो.जांभळे समजून पटकन तोंडात टाकणा-या पोरांची त्या कडूशार चवीने होणारी फजिती बघून खिदळतो सुध्दा.  आता एवढं वर्णन त्याला ओळखण्यास पुरेसं आहे नं?
 आमच्या अशोकाने असेच वाढावे आणि आपले गोल रक्षकाचे काम माझ्या पुढच्या सात पिढ्यांसाठी करत राहावे त्याची ती जगण्याची तीव्र लालसा, प्रतीकूल परिस्थितीतही असलेली विजीगीषू वृत्ती पुढील पिढ्यांना मार्गदर्शक ठरावी.
                    

शुक्रवार, ३ एप्रिल, २०२०

प्रौढत्वी निज शैशवास जपणे

--आज शुक्रवार. नेहमीप्रमाणे आठवणींचा पसारा आवरते आहे. आज आठवण आली शाळेच्या दिवसांची. त्यावेळचे ते निबंध. कधी कधी त्या ऩिबंधांचा अर्थच कळायचा ऩाही ,तो कळायला इतकी वर्षे कां लागतात? काही प्रश्न सोडवता येत नाहीहेच खरे.
----

       प्रौढत्वी निज शैशवास जपणे----------     ©️
                   
जूनमधे शाळा सुरू होताच नेहमीच 'पावसाळ्यातील पहिला दिवस' किंवा 'मला आवडणारा पावसाळा 'या विषयावर निबंध लेखन सांगितले जाई. अशावेळी आम्ही समस्त  विद्यार्थिनी तत्परतेने कल्पनेतल्या कल्पनेत कपड्यांच्या बाजारपेठा धुंडाळून सृष्टी देवीला हिरवागार शालू नेसवून हुश्शss करीत असू. त्याकाळी जसे तिन्हीसांजेच्या आत घरी येणे आवश्यक होते तसे किंबहुना त्याहूनही आवश्यक होते पहिल्या पावसानंतर सृष्टी देवीला हिरवा शालू ल्यायला लावणे.निबंधात कोणीच सृष्टीदेवीने शालू नेसला असे लिहीत नसत.जणू हे पाचवी ते अकरावीतील तमाम विद्यार्थिनींचे आद्यकर्तव्य म्हणजे,  सृष्टी देवीला शालू 'ल्यायला' लावण्याचे असे.पावसाची सर येऊन जाताच सृष्टीदेवी जणू हिरवा गार शालू ल्यायलीआहे हे वाक्य घातल्याखेरीज जणू आपला निबंध पूर्ण होणार नाही अशी जणू खात्रीच असायची. . आता माझी नात इंग्रजी माध्यमातून शिकते आहे त्यामुळे Goddess earth wears green shyalu असं वर्णन तीच्या मीनी कपड्यांच्या कल्पनेतच बसत नाही त्यामुळे पहिल्या पावसात हिरवागार शालू नेसण्याची नव्हे ल्यायची सृष्टी देवी ची जबाबदारी सध्या कमी झाली आहे.
                  
              हा निबंधाबद्दल लिहायचा प्रपंच करण्याचे कारण म्हणजे    सृष्टी देवीचा हिरवा शालू एकवेळ परवडला पण काही काहीअसे रथी महारथी विषय त्यावेळी निबंधासाठी असत .त्यातलाच यच्यावत विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकणारा विषय असे "प्रौढत्वी निज शैशवास जपणे "अर्थात नक्की याचा अर्थ काय याची शंका आमच्या सर्वांच्या चेहर्‍यावर कायमची ठसठशीतपणे उमटलेली असे .घरीदारी आईचे दणके पाठीत बसता बसता घोडी झालीस, अजून अक्कल नाही हे ऐकताना आपण मोठ्या झाल्याची खात्री व्हायची. आता आपण मोठ्या झालो म्हणून आई आणि मावशींच्या गप्पात कान खूपसतोय तोच, जा बघू इथून मोठ्यांच्यात तुझे काय काम असे हरकाटले जायचे. कधी छान पैकी आईची साडी नेसून प्रौढपणे बोंगा सावरत आणि पदर फलकारत जरा कुठे मिरवावे तोच कुणी काकू, आत्या ओरडायची, "नेसायच्याच आहेत ना नंतर साड्या कशाला नाही तो सोस? तळ्यात की मळ्यात या खेळासासखे शैशवआणि प्रौढत्व यात मोठ्यांच्या इच्छेप्रमाणे आम्ही सतत उड्या मारायचो .परिणामी आमचे सर्वच मुलींचे चेहरे सदैव कावरेबावरे आणि गोंधळलेच दिसत.निबंधाचाही पूर्ण बो-या वाजायचा हे वेगळ सांगायला नकोच.
                             
            लग्नानंतर मात्र सृष्टी देवीच्या हिरव्यागार शालूने घातलेल्या मोहिनी वर रंगबिरंगी दुपट्यांनी कधी बाजी मारली आणि घरात बागडणाऱ्या शैशवाचे हट्ट भागवता भागवता खरेखुरे प्रौढत्व कधी डेरेदाखल झालं हेच मुळी कळलं नाही.  घरासमोर भरणाऱ्या जत्रेतील मौजमजेपेक्षा त्यातील आवाजाचा त्रास अधिकच जाणवायला लागला,आकाशात मल्हार मेघुडे दाटल्यावर , लिंबोण्यांच्या टपटपणा-या सोन पखरणीपेक्षा रस्त्यातला चिखल जास्त सतावू लागला तेव्हा लक्षात आले की प्रौढत्व आले आहे आणि त्याने नुसतीच ओसरी बळकावलेली नाही तर त्याने संपूर्ण घरच व्यापले आहे .ऑक्टोपस सारखे त्यांनी आपल्याला पूर्णपणे जखडले आहे. पण हेही लक्षात आले की आपण कॉलेजच्या मैत्रिणी जेव्हा वर्षा-दोन वर्षात भेटतो तेव्हा कुठे हा प्रौढत्वाचा बागुल बुवा दरडावतोय? उलट आपल्याहूनही सान होऊन  तो दंगामस्ती करतोय .आमच्या वयाची पुटे एकमेकींच्या सान्निध्यात धुक्यासारखी तरल होतात आम्ही परत होतो 18 वर्षीय !तोच हास्याचा वर्षाव हस्ताच्या पावसासारखा कोसळू लागतो कधी कधी वाटतं घरीदारी अनेक खोट्या मुखवट्याआड आपला मूळ चेहराच आपण विसरून जातो. मग कुठले शैशव जपणे आणि कुठले काय!
                   शैशवास जपण्याचा  इतका आटापिटा का,  आणि कशासाठी ते जपायचे? शैशव म्हणजे काय  गुलबकावलीचे फुल आहे की साता समुद्रापलीकडे पर्वता मागे  दडवलेला राजकुमाराचा प्राण आहे?शैशव असे हळुवार झुळकीसारखे प्रौढत्वात मिसळून जातंय तेच छान आहे. नाहीतर घनघोर जंगलात चार वृक्ष अधिक लावले  म्हणून आनंदाने कोणी थुईथुई करत नाचत नाही ,पण वाळवंटात चार पाच झाडे दिसली तर त्याच कोण कौतुक होत. तसंच आहे ना या बाल्याचं! प्रौढत्वाचा बाज राखत वाळ्याच्या  मंद झुळकी सारखे शैशवाने यावे अवतीभवती फेर धरून प्रौढत्वाला खुलवून फुलवावे आणि थोडीशी चुटपुट लावत विरून जावं हव्याहव्याश्या पाहुण्यासारखा!!
                    
                  मध्यंतरी माझ्या नातीला बरे नव्हते तेव्हाची गोष्ट.तिच्या आजाराने घरावर जणू मळभ दाटले होते.त्यावेळी तिला भेटायला आलेल्या काकांनी तिच्यासाठी काचेचे रंगीबेरंगी स्ट्राॅ आणले होते. नातीच्या अगदी आवडीचे. नातीच्या  हातात आकाशीचे इंद्रधनु जणू आले होतं. बराच वेळ सर्वेंन्द्रीयांनी तिने ते गोंजारले.त्यांचा नितळ स्पर्श, ते आपटल्यावर होणारा किणकिणाट, डोळ्यासमोर धरताच त्यातून दिसणारी मोरपिशी दुनिया हे सारे अनुभवताना तिचा विलक्षण भावविभोर समाधिस्थ चेहरा आम्ही आसोशीने बघत होतो, नातीने मग सम्राज्ञीच्या अविर्भावात त्या मौल्यवान खजिन्याची वाटणी केली रसरसता लालबुंद   स्ट्राॅ स्वतःसाठी, गर्द जांभळा दादासाठी, या क्रमाने आई-बाबा ,आजी-आजोबा ,घरातली कामवाली एवढेच नाही तर आमचा कुत्रा पॅची पण सुटला नाही. आमच्या या छोट्या सम्राज्ञीची आज्ञा शिरसावंद्य मानून आमचे दल हलू लागले. काॅफीपानाचा कार्यक्रम ह्या रंगीत नळ्यांनी अधिकच रंगतदार केला . नातीने मग दिवसभर या नळ्यांनी दुध, ताक, सूप सर्व फस्त करण्याचा सपाटा लावला .कधी हातातल्या नळ्यांची अदलाबदल  केली तर कधी चिमुकल्या बालमुठीत सगळ्या धरून टाकायचा प्रयत्न केला .आजारपणाची घरावर पसरलेली मरगळ केव्हाच विरून गेली .छोट्या-मोठ्या काळज्या वादविवाद, जणू दूर भूतकाळात गेले होते . मी त्या लुटुपुटुच्या खेळात आपले गुडघे दुखतात हेच विसरले, आजोबांनाही पेपर मधे डोके खुपसण्यापेक्षा नातीचे सेनापती होणे अधिकच मानमरातब देणारे वाटू लागले. दादा चा अभ्यास पुढे गेला .सूनेची रोजची कामाची धांदल थांबली. त्या क्षणी आम्ही सर्वजण होतो लुटूपुटूची भांडणे करणारे भोकाड पसरणारे,भातूकली खेळणारे  माझ्या नातीचे जिवाभावाचे सवंगडी! रात्री ते सगळे स्ट्राॅ इवल्याशा मुठीत घट्ट धरून ती झोपली तिच्या त्या निरागस हस-या चेह-याकडे पहाता पहाता लक्षात आले आज अचानक अनेक आनंदाच्या कुप्या नकळत उघडल्या होत्या. सगळे हिणकस जळून गेले होते.उरला होता तो निखळ आनंद. त्या क्षणी मनाला जणू साक्षात्कार झाला वाटले आपले' 'स्वत्व' विसरणे म्हणजेच प्रौढत्वी नीज शैशवास जपणे!