शुक्रवार, २९ मे, २०२०

सुट्टीतील घर©️

लोकांचे जथ्थे चालले होते. तळतळत्या उन्हात, अनवाणी,उपाशी पोटी!  बकोटीला बारकी पोर, पाठूंगळीवर एखादे!.थकले भागले पाय ओढत.! अर्जुनाच्या मत्सवेधा प्रमाणे त्या कोट्यावधी लोकांचे एकच लक्ष !ते आहे , त्यांचे आपलं 'घर'. हे घर नुसते दगडामातीचे नाही, ते सिमेंट- विटांचेही नाही ते आहे श्वासांनी उभारलेले. त्या छताला,भिंतींना हात लागलेत आजोबा पणजोबांचे. मातेने इथेच अर्धपोटी राहून आपल्याला खाऊ घातले आहे.बालपणातील मान ,अपमान या घराच्या भिंतींनी बघितले आहेत.नव्या दुल्हनचे कुंकुमात रंगलेले हात याच घराच्या भिंतीवर आहेत. तेथून दूर जाताना घरांनी कढ आवरत शुभस्तः पंथानु  असे हळूच कुजबुजले आहे ते ' घर!



                सुट्टीतील घर©️

कधीतरी एखाद्या लखलखत्या सकाळी सुट्टीच्या दिवशी आपल्या घराला न्याहाळावे आणि  जणू जादूच्या पोतडीतून बाहेर पडता पडता घराने आपल्याकडे बघत डोळे  मिचकावेत असा अनुभव अचानक येतो. आपण घरात असल्यामुळे सुखावलेले  घर बघताना खूप छान वाटत. आपलंच घर  सुट्टीच्या दिवशी एवढे वेगळं दिसत यावर विश्वासच बसत नाही. 
          कामाच्या निमित्ताने सतत घराबाहेर म्हणजे अगदी रामप्रहरी सुध्दा घर सोडणाऱ्या माझ्यासारख्या अनेकांना हा अनुभव वेडावून टाकतो. रोज भल्या सकाळी मी घर सोडताना  पुन्हा-पुन्हा पांघरूण ओढून घेणारे ,भांड्याच्या पसा-याकडे त्रयस्थ नजरेने पाहणारे माझे घर माझ्या चांगले परिचयाचे आहे.  
    तेच एखाद्या   पावसाळ्यातल्या सकाळी आळसटलेल्या सुट्टीच्या दिवशी जरासे दुलईच्या ऊबेतून बाहेर पडून घराकडे पहावे तर घर क्षणभर अनोळखी वाटते. ओलसर हिरवी वस्त्रे घालून चमकदार थेंबांच्या मौतीक माळा तारांवर, पानांवर,फांद्यावर घेऊन ते चमचमत असते.धुळ भरली पाने रात्रीतनच कोणीतरी खसखसून धुवून काढलेली असतात.खरतर पहाट आणि सकाळ यांच्या मधे जी छोटीशी कालकुपी असते ती फारच रसिली !. सूर्याच्या किरणांनी अजून कुबेराच्या कोठारातून  पिवळेधम्मक सोने  लूटून आणलेले नसते.अंधार असतो पण तोही कासाविस करणारा नाही तर अंधुकसा, हवाहवासा. गव्हल्या गव्हल्यांनी कमी, कमी होणारा अंधार आणि तिळा, तिळाने वाढणारी पावसाळी ढगाळ पण सोनेरी सकाळ ! ती मिरवत पावसाळ्यातले सकाळचे घर सामोरे येते.किंचित सर्दावलेले,अंधारलेले. मला स्वतःला ही अद्भूत  वेळ फार फार आवडते. कित्येकदा एखादा अद्भूत खजिना या वेळेत अचानक गवसतो. बागेतल्या मोठ्या मोठ्या अळूच्या  पानांवर हि-यांना  ,मोत्यांना चुरून पसरलेले असते आणि ते भलमोठ्ठ काळसर अळूचे पान या पळपुट्या संपत्तीला आपल्या पानावर मनोभावे राखत  असते. हे आपलंच घर आहे यावर विश्वासच बसत नाही. घराचे हे रूप मला पूर्णपणे नवीन असले तरीही अतिशय लोभसवाणे वाटते. सोनेरी उन्हे दारा खिडक्यातून आता हक्काने आत येतात. आपली नितळ नजर माझ्यावर फिरवीत कुजबुजतात अगं आमचा रोजचा खेळ असाच रंगतो.पण तूच नसते न आमच्यासमवेत. घराचा कोपरान् कोपरा खुदखुदतो. किरणातून पसरणारे सुवर्णकण पांघरून पलंगा खालील कोळ्याचे जाळे अलंकृत होते आणि इवलासा कोळी लाजून स्वतःला अधिकाधिक त्यात गुरफटवून घेतो. घरातून रेडिओवर भक्तीगीते ऐकू येऊ लागतात त्यातच मिसळला असतो कपबशांचा नाजुक किणकिणाट.गॅसवर तापणा-या दुधाचा आणि चहाचा विशिष्ट  वास! आज मी घरात त्यामुळे माझ्यासाठी खास चहा किंचित वेलची आणि आले घालून केलेला.! माझा रोजच्या घाईतला रोजचा चहा सुध्दा पटकन डिप डिपवाला !बाहेर बागेत हिरव्याच्या अनेक छटा मुक्तपणे उनसावल्याचा खेळ खेळत असतात.बागेतली सानुली फुलपाखरे आणि  सोनसावळ्या पक्ष्यांची लगबग माझे लक्ष वेधून घेते. घराचे हे भाबडे रूप बघत रहावेसे वाटते .आपल्याच चौकटीतून बाहेर पडून घर मोकळेढाकळे होत असते. नेहमी कामासाठी मी घर सोडून जाताना घर माझ्याकडे त्रयस्थपणे दुराव्याने बघत असते.आज झपाटल्यासारखी मी त्याला न्याहाळत बसते. सकाळ  हळूहळू  चढत जाते. बाहेर ढगांची झिम्माड आणि रेडिओच्या आवाजात मिसळून गेलेला पावसाचा एकसुरी  आवाज. मुलांचे खेळण्याचे आवाज.स्वयंपाक घरातील चुरचुरत्या फोडण्यांचे वास,मुलांच्या कोवळ्या आवाजात ऐकू येणा-या कविता, मधूनच भांडण घेऊन माझ्याकडे येणं. सगळ दुस-या त्रिमितीत घडत आहे अस वाटू लागते. रोज एवढ्या घडामोडी मी 'मिस'करते? दुपारी अधिकच अंधारून येते.एकसुरी पाऊस बदादा कोसळू लागतो.कोसळणा-या पागोळ्या घराभोवती मस्त डबकं  तयार करतात. मुलांची होड्या सोडण्याची धांदल उडते.घरात जायफळाच्या काॅफीचा वास दरवळतो आणि त्याजोडीला कांदाभज्यांचा जीभ चाळवणारा घमघमाट . घर वात्रटपणे एक टपटपणारी पागोळी नव्हे पाणमाळ माझ्यावर भिरकावले, जणू मौतिक माळ! अगदी राजाधिराजाच्या आविर्भावात! पावसाळी सांज मात्र अधिकच ओलसर आणि उदास! मुलांच्या किणकिण आवाजात शुभंकरोती ऐकू येत असते.मग खूपच छान वाटत.उद्या पासून परत सक्काळी सक्काळी घर सोडून कामावर जायचे?अजून या सुट्टीतल्या घराला नीट बघितलेच नाही!
        उन्हाळ्यात  रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी डोळाभर आळस पांघरून मी  लोळत असताना मधूनच घर मला शुक शुक  करून बोलवतोय हे लक्षात येऊनही ही मी  त्याच्याकडे कानाडोळा करते. हो! होयच मुळी त्याची मिजास मी कशाला चालवू? आणि कधीतरी भर दुपारी तळपत्या वेळी कामावरून घरी येण्याचा योग येतो तेव्हा त्या तप्त उन्हातलं ते शांत सन्यस्त घर पाहून मीच स्तब्ध होते. इकडे सूर्याची पेटलेली होळी आणि तिकडे स्वः चिंतनात मग्न अंतर्मुख घर! बागेतली झाडेही बोक्या सारखी डोळे मिटून पहुडलेली असतात .सरत्या वैशाखात कासावीस  झालेले घर रात्री चांदण्यांची उटी सर्वांगाला माखत बसते .अखेर कंटाळून त्या तेजोनिधी ला शरण जाते मग इवलासा ढग समस्त पाहुणेमंडळी बरोबर आकाशभर धुमाकूळ घालत फिरतो . धुळीचे लोट घराला भिडतात. विजेचा चमचमाट पाहून घरही क्षणभर डोळे मिटून घेते. घराची समाधी भंगावी म्हणून मी वेड्यासारखी वाट पाहते. त्याला परत कुटुंबवत्सल बनवण्यासाठी कोण प्रयास करते. इतक्यात संध्याकाळी आकाशात रंगपंचमीची झिम्माड उडते आणि घर माणसात येते. दुपारच्या सन्यस्त योग्याला मनोमन वंदन करत मी सुटकेचा निश्वास  सोडते.
            हिवाळ्यात धुक्याच्या गुलगुलीत  दुलईत घरही मस्त डुलक्या काढते..त्यावेळी तिट्टी मिटी लावलेल्या,दुपट्यात गुंडाळलेल्या बाळा सारखे ते दिसते. छतातून कवडसे घरात जमिनीवर उतरतात.त्यामधे नाचणा-या इवल्या धूलिकणांना पकडण्याची  नातवंडांची धडपड  आणि खिदळणे! घर त्यांच्या सारखेच बालक होते. वाढत्या थंडीत घराभोवती वाळक्या पानांचा ढीग साठायला लागतो आणि घर दिवसेन्दिवस वयोवृध्द दिसू लागते.
    वसंत ॠतूच्या आगमना नंतर घर परत कात टाकते .परत नव्याने बाळ होऊन दंगा करू लागते.प्रत्येक ॠतूत,प्रत्येक सणाला,रंगरोगण झाल्यावर मायावी पण चांगल्या राक्षसा सारखे घर रूप बदलते. दसरा दिवाळीला तर विचारायला नको.अंगभर रसरशीत  केशरी,पिवळ्या झेंडूंच्या माळा घालून आपली नटण्यामुरडण्याची हौस मागवून घेते. रात्री हळूच त्याची दृष्ट काढाविशी वाटते.
           माझ स्वतःचे घर. दिवस, दिवस मी इथे रहातेय. त्याला गृहीत धरते. घराभोवती फिरणा-या वास्तुपुरुषाच्या बद्दल आजीने सांगितलेल्या कथा आठवते आहे. काहीही बोलले तरी तथास्तु  म्हणणारा वास्तूपुरूष! कदाचित  यामुळे घर नुसते सिमेंट वीटांचे वाटताच नाही तर वाटते एक जीवंत ,सळसळता सखा! माझ्या सुखदुःखाचा साक्षीदार. प्रत्येक  प्रहरी बदलत्या ऋतूत प्रत्येक क्षणाला घराचे नवीन नखरे मला मोहवतात. कधी वाटतं नोकरी सोडावी आणि दिवसभर त्याच्याशी हितगुज करत बसावे पण कधीतरी दिसणारे आणि म्हणूनच विलोभनीय  वाटणारे त्याचे नखरे जर रोज पाहिले तर अतिपरिचयात अवज्ञा होणार नाही का?

सांताक्लाॅज

कोकणातील प्रवासात रात्री एका सपाटीवर गाडी थांबवली होती.आकाशाचा काळाकरंद घुमट आणि तो कोसळू नये म्हणून त्याला लावलेले चांदण्यांचे असंख लखलखते खिळे.सारच अफाट. विश्वातील असंख्य आकाशगंगा, त्यातील अगणित तारे, त्या भोवती फिरणारे ग्रह.! त्यातील एक इटुकला भाग म्हणजे आपली आकाशगंगा, आपल्या आकाशगंगेतही लाखो तारे,त्यातील एक आपला तेजोनिधि सूर्य. त्याभोवती फिरणा-या पृथ्वीवरील 'मी' म्हणजे धुलीकणा इतकी नगण्य. क्षणात माझा 'मी ,मला, माझे" 'हा कोष गळून पडला.दुस-या क्षणी वाटले असेन मी नगण्य पणआज नात्यांनी,मित्रमैत्रिणींनी तर मला समृध्द केले आहे.

                     सांताक्लाॅज©️

मला आठवतंय साधारण दुसरी-तिसरीत असताना बाबांनी सांताक्लॉजचा एक चित्रपट दाखवला होता त्यात सांताक्लॉजचा तो लाल पांढरा पेहराव आणि टोपी ,ऐटीत भुरभूरणारी चंदेरी दाढी ,भुई चक्रा सारखे ओठातून होssहोs होsकरत उडणारे  हसू ,जादूच्या पोतडीतून त्याने आणलेल्या भेटवस्तू वाssssइतकं छान होतं न ते! त्या राजवर्खी कोवळ्या निरागस वयात कितीतरी दिवस सांताक्लाॅज खूपशा भेटवस्तू  घेऊन स्वप्नात यायचा.  त्याला भेटावं या एकाच इच्छेने मला पछाडलं होतं.  
          सांताक्लॉज ही अति रम्य कल्पना वाढत्या वयाबरोबर धुसर होत होत गेली.त्या काल्पनिक पण रंजक परीकथां मधे रमून जाणे पूर्णतः संपले. परंतू लहानपणी बहुदा सांताक्लॉजला भेटायची इच्छा कुठल्यातरी शुभक्षणी कल्पवृक्षाखाली बसून मी केली असावी, म्हणूनच प्रत्यक्षात त्याला भेटण्याचा मला नुकताच योग आला. नुसता योगच आला नाही तर मनसोक्त गप्पा झाल्या.मैत्री झाली , आणि ते सुद्धा त्याची भाषा कणभर सुद्धा कळत नसूनही! तरीही या गप्पा इतक्या रंगल्या की जीवाच्या जिवलग मित्रालाही न्यूनगंड यावा. मैत्रीला धर्म, देश भाषा यांच्याशी देणं-घेणं नाही हे परत परत जाणवलं.
      हे सर्व शक्य झाले मेसूद  आणि सेव्हील या तुर्की दांपत्यामुळे. मेसूद आणि सेव्हील ना आपल्या नात्याचे,ना धर्माचे, ना आपल्या देशाचे पण आज आमच्या मनात त्यांनी नुसते घरच नाही अख्खा राजवाडाच बांधला आहे. परी कथेतला सांताक्लॉज ही कपोल कल्पना नसून त्रिवार सत्य आहे हे मेसूद सारख्या देवमाणसाला भेटल्यानंतर तंतोतंत पटले. मेसूतचा एककलमी कार्यक्रम   म्हणजे आनंदाची पखरण करणे अगदी सांताक्लॉज प्रमाणे!
        पौर्णिमेच्या चांदोबा सारखा गोलम् गोल गोलमटोल,तुंदीलतनू, गोरा गोरा पान , विरळ केस चापून चोपून बसविलेला, इवल्याशा काळ्यापांढ-या दाढीचा , अति मिश्किल नीळसर डोळ्यांचा मेसूद! भेटला तेव्हा साठीच्या आसपास! अगदी करंगळीच्या पेरा एवढ्या बाळापासून थेट  पैलतीर एक पाय ठेवलेल्या वृध्दांपर्यंत मेसूद सर्वांनाच अतिप्रिय. याच्या गोबर्‍या गोर्‍या चेहऱ्यावर लुकलुकणारे हसरे डोळे, नाकावर घसरलेला चष्मा  ,ओठातून सतत सांडत असलेले बाल हास्य असा मेसूद भेटता क्षणी सर्वांचाच ताबा घेतो.जणू सकलजना  आनंदी ठेवण्याचा मक्ताच  याला मिळाला आहे.
              व्यवसायाने तो बाल शल्यविशारद आहे. इंग्रजी भाषेचा गंधही त्याला नाही. तुर्कस्तान मधिल अदाना येथे वैद्यकीय  व्यवसाय करणारा मेसूत! इस्लाम धर्मिय पण अतातुर्क कमाल पाशा  यांचा खंदा पाईक.त्यांच्या राष्ट्र पित्याच्या आदेशाप्रमाणे  युरोपियन संस्कृतीचा अधिक पगडा असलेला उदारमतवादी .  काही काळापूर्वी डिसेंबर मध्ये रोटरी  एक्सेंज प्रोग्रॅम मध्ये आलेला.  तुर्कस्ताननामे देशातला मेसूद ! आंग्ल भाषेत एकदम ढढम्. 'थँक्यू च्या' पुढे काहीही माहित नाही. प्रेमळपणा व्यतिरिक्त त्याला एकच भाषा यायची ती म्हणजे टर्कीश! जी आम्हाला समजणे अशक्य. पण गंमत म्हणजे  साहेबाची भाषा बोलणाऱ्या काही टर्कीवासियांना पेक्षा आम्ही कित्येक पटीने जास्त मेसूदशी गप्पा मारल्या आहेत अगदी भाषेची अडचण न येता.
 म्हणजे इथल्या वास्तव्यात मेसुद हाच मुळी सर्वांसाठीच परवलीचा शब्द झाला होता. इथं भेटलेल्या सर्वांच्या मनात त्याने नुसता कोपराच अडवला नाही तर सगळं मनच काबीज केलं आहे.
        एक्सचेंजमध्ये सेव्हील आणि  मेसूद हे तुर्की दांपत्य पाहुणे म्हणून माझ्या घरी उतरले होते.त्यांना भेटायला मुंबईत स्टेशनवर गेलेल्या माझ्या पुतण्याला पहिला धक्का बसला. स्टेशनवर प्रतीक्षालयात तुफान गर्दी आणि हे महाशय एक मोठ्ठा घोळका घेऊन हास्याचे मजले उभारत बसलेले, तिथल्या जमिनीवर! झकास फतकल घालून केन्द्रस्थानी बसलेले मेसूद महाशय आणि भोवती इतर प्रवासी! कल्याsण रे बाबा कल्याण! 
           मेसूद,सेव्हीलचा पाहुणे ते घरातलेच 'एक' हा प्रवास कसा झाला,  कधी झाला हे आमच्या लक्षात यायच्या आत ते आमच्यातीलच एक कधी झाले याचा आजतागायत आम्ही शोध घेतोय. पहिल्या दिवशी स्टेशनवरून त्यांना घरी घेऊन आलो. आगतस्वागत झाले. जेवणाची वेळ झाली.परदेशी पाहुणे त्यात पहिलाच दिवस  म्हणून युरोपियन आणि भारतीय पदार्थ मी निगुतीने केले होते.माझ्या आवडीप्रमाणे भरपूर कोथिंबीर घालून!  मेसूद जेवेना,सेव्हील त्याची धर्मपत्नी त्याला समजावते आहे तर हा आपला हुप्प!  नंतर हळूच सांगितले कोथींबीर नकोच नको,.स्वयंपाकात कोथिंबीर घातल्यावर रुसून बसणा-या मेसूदला बघून, राग यायच्या ऐवजी हसायला येत होत. त्याचा रूसवा लहान बाळासारखा नितळ,पारदर्शी होता.आणि नंतर आवडलेल्या पदार्थांचे नुसते कौतुक न करता पटापट फोटो काढून त्याची चव घेऊन त्यात काय काय पदार्थ आहेत याची चौकशी करणारा मेसुद  पाहुणा न वाटता घरातला भाऊ,दिर किंवा रूसणारा माझा धाकला आहे असेच वाटले.आवडलेल्या पदार्थाचं कौतुक करावं ते फक्त मेसूदने.  जरा छानपैकी सजवून पदार्थ  त्याच्या समोर आला की लगेच फोटो थेट तुर्कस्तानला मुलाकडे रवाना होई. मात्र आदानाचा कबाब हा सोलापूरी शीक कबाबा पेक्षा भारी आहे हा हट्ट  त्याने शेवटपर्यंत सोडला नाही.त्याच्या लहानबाळा सारख्या कुतूहलाचे आम्हा सर्वांनाच अती कौतुक वाटे. बालकांवरील शल्यक्रिया ज्या उत्साहाने, उत्सुकतेने तो बघायचा तीच उत्सुकता पोळी कशी बनवतात हे बघताना असे. 
              छान पैकी तयार होऊन मिटींगला आम्ही निघालो की मेसूदची धावपळ विचारूच नका ! तुर्कस्तानात 'नजर' लागणे याला प्रचंड महत्व! एक डोळा असलेले पिन जी नजर लागू नये म्हणून वापरतात ती आमच्या कपड्यांना तात्काळ लावली जायची.  का तर आम्हाला कोणाची नजर लागू नये म्हणून!वयाच्या साठीच्या आसपास त्यावेळी असलेले आम्ही आणि आम्हाला दृष्ट?आमच्या दृष्टीने  तो 'जोक ऑफ धी इयर' होता. लहान मुलाचीही दृष्ट न काढणारे आम्ही पण इथे त्याच्या समोर आमचे सगळे लॉजिक, आमचा शास्त्रीय दृष्टीकोन एकदम बाद.!
माझ्या वृध्द आईजवळही मेसूद ,सेव्हील बसत असत. शब्दांची गरजच नसायची.सेव्हील  आंग्ल भाषा छान बोलायची पण न बोलताही मेसूदने भरपूर गप्पा मारलेल्या असत. माझ्या आईला  तो नेहमी सांगे की पुढच्या वेळी एकदम फर्डा  इंग्लीश शिकून तो येणार आहे.मेसूदची स्वतःची आई पारंपारीक  विचारांची,तुर्कस्तानमधिल खेड्यात रहाते.आईवर त्याची विलक्षण भक्ती.तिच्या परंपरा आणि मेसूदचे पुरोगामित्व यांचा वाद अटळ होता.आई त्याच्याकडे कधिच येत नाही.हा श्रावणबाळ मात्र आठवण येताच आईकडे खेड्यात जाऊन,लाड पुरवून ,करवून पुन्हा रिचार्ज होऊन येतो .सेव्हील  यावरून मेसूदबाळाच्या भरपूर फिरक्या ताणत असे.
 बाहेरून घरी आल्यावर सेव्हीलचे पहिले शब्द असत 'होम ,स्वीट होम'.  मेसूद लगेच अंगठा वर करून अनुमोदन द्यायचा. आपल्याकडे झालेली  मेसूदची शब्दसंपत्तीतील नवी जमावट म्हणजे 'नमस्ते'. जायचे दिवस जसजसे जवळ येत गेले मेसूद रडवेला होऊ लागला.जाताना हा अगडबंब रडायलाच लागला.       
          त्यानंर साधारण सात महिन्यांनी आम्ही दहा जण तुर्कस्थान ला गेलो होतो त्यावेळी परत आमचा ताबा सेव्हील  मेसूदने घेतला. मेसूदने  चक्क चार-पाच आंग्ल शब्दांची संपत्ती गोळा केली होती .एखाद्या नवश्रीमंत सारखे या शब्द संपत्तीचे आमच्यासमोर प्रदर्शन करताना त्या शब्दांचा अर्थ आमच्यापर्यंत पोहोचावा म्हणून त्याबरोबर असे त्याचा भन्नाट अभिनय! अगदी नटसम्राटाला लाजवेल असा! त्यावेळी त्याचा अभिनय आणि चेहऱ्यावरून उतू जाणारे तें नितळ हास्य! बस भाषेची गरज लागतेच कुठे?
        नेमकी इस्तंबूलच्या बाजारपेठेतून हिंडताना माझ्या पर्स मधील छोटी पर्स चोराने पळविली. त्यात ब-या पैकी पैसे.मेसूद सेव्हीलने तात्काळ मदतीचा हात पुढे केला. आग्रहच सुरू केला. जेव्हा मदत घेण्यास मी नकार दिला तेव्हा त्यांच्या चेह-यावरची वेदना मला कासाविस करून गेली.
     आमच्या सगळ्या ग्रुप मध्ये मेसुद आणि त्याची पत्नी सेव्हील एकदमच प्रिय.  त्यांचे रसायनच अद्भुत! बहुतेक वेळा पतीदेवांची नजर एकीकडे तर पत्नीची नजर विरूध्द बाजूस अशी अवस्था असते. हे दोघे मात्र बेमालूमपणे एकमेकात मिसळूनही  पूर्णपणे स्वतंत्र असलेले.एकमेकां बद्दल नितांत आदर असलेले.
          या पती-पत्नींच्या आवडीही वेगळ्या. मेसुद अतिशय भावनाशील. मदतीला सदैव तत्पर! पाहुण्यांना आग्रहाने खाऊ घालणारा आणि जर पाहुण्यांना खाऊ घातले नाही तर ते भुकबळीचे शिकार होतील या मतावर त्याचा नक्कीच विश्वास असणार,  नाहीतर तुर्कस्तानमध्ये बस मधून स्थळदर्शनास जाताना दर दहा मिनिटांनी नवनवीन पदार्थ आमच्यासमोर आलेच नसते .आणि तेही मेसूदच्या भन्नाट  अभिनयासह.  अशावेळी हसून हसून लोळण घेणे बाकी असे.तो पदार्थ पोटात स्थिरावतोय तोच  नवा खाद्यपदार्थ घेऊन   स्वारी हजर! हसत हसत डोळ्यातले पाणी पुसत त्या खाण्यावर ताव मारला जायचा. हे वेगळे सांगायला नकोच. या सर्व खाण्यामुळे  आम्ही मात्र दोन-तीन किलोंची जमावट आमच्या वजनात करून स्वदेशी आलो.      इस्तंबूल मध्ये तर बेली डान्स बघताना मेसूदच्या व्यक्तिमत्वाने भारावून बेली डान्सर आमच्याकडे वळून वळून आम्हीच एकमेव दर्दी आहोत अशा पद्धतीने नाच करू लागल्या.  जसे आम्हीच त्यांचे खास प्रेक्षक होतो.
. सेव्हीलचा  म्हणजे मेसुदच्या धर्मपत्नीचा कामाचा आवाका आणि उरक म्हणजे जणू जगातले आठवे आश्चर्य. अतिशय उत्साही सेव्हीलला दमणे थकणे हे शब्द मुळी माहीतच नसायचे. स्त्रियांवरचे अत्याचार निवारणासाठी दिवस-रात्र झटणारी सेव्हील तितक्याच उत्साहाने आमच्या दहा जणांच्या गटाला घेऊन इस्तंबुलच्या गल्लीबोळात फिरली आहे. आमच्या बरोबरच आमच्या चेंगट खरेदीत तीदेखील सामील झाली आहे. अगदी त्याच फसफसणाऱ्या उत्साहानीशी. तिचे वेळ पाळणे म्हणजे आकाशवाणीच्या घड्याळालाही लाज वाटेल इतके तंतोतंत. इस्तंबूल मध्ये आम्हाला रात्री आमच्या हॉटेलवर सोडून ती मुलाकडे राहायला जायची. मुलगा दोरूकचंद याचे घर  शहराच्या दुसऱ्या टोकाला. भलतेच लांब.पण तरीही सकाळी सकाळी बरोबर ठरलेल्या वेळी हॉटेलच्या लॉबीमध्ये सेव्हीलचा हसरा चांदोबा हजर असायचा .अगदी ट्राफिक जामचा अडथळा ओलांडून.
        मेसूदला सर्वांना खाऊ घालण्याची हौस अशी दांडगी की कधी कधी सेव्हीलला घरी पाहुणे येणार हे सांगायलाही तो विसरून जाई.एके दिनी सेव्हील आमचे लटांबर घेऊन दुस-या गावाला निघालेली आणि अचानक मेसूदने तिला रात्री घरी जेवणासाठी आणि आम्हाला भेटायला पाहुणे येणार आहेत असे  सांगितले.  आता तुर्की पती पत्नींच्या भांडणाची आतषबाजी बघायला मिळणार असे वाटले.आणि आम्हीच कानकोंडे झालो. पण सेव्हीलच ती! हे नेहमीचेच आहे या अविर्भावात आपल्या मैत्रीणींना फोन करून ती मोकळी.!रात्री पार्टीत तर मेसूदने पारंपारीक वेषात त्यांचे राष्ट्रीय  नृत्य केले. सेव्हील होतीच साथ द्यायला. आम्हालाही त्यात सामील  करून घेतले.दोन  डावेच पाय असलेले आम्ही, मनसोक्त त्या नाचात झोकून दिले.
           तुर्कस्तानमध्ये सेव्हील  आणि  मेसूदच्या छत्राखाली कुठलीच अडचण आसपास सुद्धा यायची नाही. मेसूद बद्दल बोलताना आमच्या ग्रुपमधील एकाची कॉमेंट फारच छान होती ,मेसूदमधे देव दिसतो आणि यात कणभर सुद्धा अतिशयोक्ती  नव्हती. 
 आम्हाला सोडून तुर्कस्तानला जाताना रडवेल्या झालेल्या मेसूदच्या आठवणीने आजही  डोळे भरतात.आम्ही तुर्कस्तान सोडतानाही अश्रुपाता बरोबरच परत भेटण्याचे वायदे झाले. त्यांचा मुलगा दोरूकचंद  आणि माझा धाकटा वयाने सारखेच!त्या दोघांच्या विवाहप्रसंगी जायचे बेतही ठरले आहेत.आजही फोनवरून किंवा संदेशाद्वारे आम्ही संपर्कात आहोत.
         अनेकदा असं वाटतं आयुष्याच्या या प्रवासात नवनवीन प्रवासी सहवासात येतात. काही मध्येच उतरतात. थोडी मनाला चुटपूट लागते पण लगेच नवीन प्रवास येतात. जुने सरकून बसतात. नव्या जुन्याची मोट कधी कुरकुरत कधी सुरळीत प्रवास करते .कधीकधी या प्रवासात अचानक आपल्या नशीबातील  सर्व ग्रह मंडळी गुपचूप आपापले उच्च स्थान पकडून बसतात. जणू काही  आपल्याला लॉटरी लागते. आणि कोण कुठल्या तुर्कस्थान मधल्या सेव्हील मेसूदच्या मैत्रीचे दान आपल्या पदरात पडते. आपल्याला खूप खूप श्रीमंत करून जाते.



शुक्रवार, १५ मे, २०२०

शब्दांचा ठेवा©️



इंदोरची आज्जी तिथल्या कामगारांशी हिन्दी मधे बोलायला लागली की आमचे खुसुखूसु हसणं सुरू व्हायच. आज्जी मुळ कोकणातील. इंदोरला वर्षानुवर्ष राहूनही तिचे राष्ट्रभाषा बोलणे म्हणजे आनंदी आनंद!,"आजी तू इथल्या लोकांची हिन्दी बिघडवतेस बघ" ही आम्हा नातवंडांची कायमची तक्रार!. आजीचे उत्तर एकच"अग, कोणाच्या मनाचं दार उघडायचं असेल तर त्याच्याच भाषेत बोलायला हवे."आजीची कोणाशीतरी कोकणीत गप्पा मारायची इच्छा मात्र कधीच पूर्ण झाली नाही. आजोबांना कोकणीचा गंध नव्हता.आज आठवणींचा पसारा आवरताना हे सगळच फार फार आठवत होत.वाईटही वाटत होत.


              शब्दांचा ठेवा©️

               खरं तर परवा गंमत झाली .घरी पाहुण्या आलेल्या वहिनींनी आपल्या दोन वर्षीय बाळाला कौतुकाने सांगितलं "सोनू गोष्ट सांग बघू" आणि मला पूर्णतः अनोळखी भाषेत  सोनुने गोष्ट सुरु केली. गोंधळलेल्या आणि कौतुकाच्या नजरेने हे काय चाललय म्हणून पाहीपर्यंत, वहिनी  आपल्या  सोन्याकडे  प्रेमाने बघत म्हणाल्या "किती छान सांगितली न गोष्ट,तहानलेल्या कावळ्याची "छान मराठी बोलतो हो सोनू"!इतक्या वेळ मी  मूढा सारखी विचार करत होते एवढे छोटे पिल्लू मल्याळी ,स्पॅनिश अशी कोणती तरी अगम्य भाषा कुठे शिकला असेल ? मी आपली विचारमग्न!  अरेच्चा! सोनूने आपल्या  बोबड्या  न कळणा-या शब्दांनी जगप्रवास करून आणला आहे की!  तो देखील आपल्या  मायमराठीतून . मला भले न कळो पण वहिनींना त्या गोष्टीतला शब्द न शब्द व्यवस्थित कळला होता. मनात विचार आला आईला  समजतात  ते बोल म्हणजेच   'मातृभाषा'.
                खर तर मातृभाषेची व्याख्याच करायची तर  जन्माला आल्यापासून  जी भाषा शिकतो आणि नंतर आपल्या विचारांना, भावनांना जी भाषा योग्य आकार देते ती 'मातृभाषा'. बिरबलाच्या प्रसिद्ध गोष्टीतील व्यापारी जेव्हा दरबारात येऊन अनेक भाषा सहजतेने बोलतो आणि याची मातृभाषा कोणती असं बादशहा बिरबलाला विचारतो ,तेव्हा बिरबल एक युक्ती करतो. रात्री व्यापारी झोपला असताना त्याच्यावर पाणी ओतून उठवतो आणि उठताना व्यापारी त्याच्या मातृभाषेत ओरडत उठतो. मातृभाषा फक्त आपली असते आपल्या माणसांसाठी बोललेली,आपल्या माणसांकडून  शिकलेली .ना तिला कुठल्या बदलाचे वावडे ना नवनवीन लकबी आत्मसात करण्याचे दु:ख! .
              भाषेच्या संदर्भात  लहानपणची आठवण म्हणजे इंदोरचा आजोळचा प्रवास! भला लांबलचक प्रवास होता तो! जवळजवळ दोन दिवस लागायचे. आजोळी जायचं म्हणून पौर्णिमेच्या चंदामामा सारखा दुधाळ  उत्साह मनावर फेसाळत असायचा पण माय मराठीशी काही काळ फारकत या कल्पनेने मनावर थोडी काजळीही  धरलेली असे. इंदोरहून परत येताना भुसावळ येताच लाल डगले वाले 'कुली' जेव्हा 'हमाल' व्हायचे तेव्हा  मराठी भाषिक प्रांतात शिरण्याची पहिली खूण लक्षात यायची.  मनाच्या चांदोबाचा सोनेरी सोनेरी लखलखता सूर्य व्हायचा.
        प्रत्येकालाच आपली मातृभाषा अतिप्रिय! अशावेळी मनात सहज विचार येतो त्या 'आदी' शब्दाचा! लाखो  वर्षापूर्वीचे चंद्र- सूर्याच्या किरणांना ही प्रवेश नाही असे काजळलेले महाकाय अरण्य! मोठे भयावह प्राणी! या प्रतिकूल परिस्थितीतही अपार जीवन लालसेने संकटांना शह देणारा तो आदी पुरुष आणि ती आदी स्त्री .वणव्याने जळणाऱ्या  जंगलाकडे आपल्या निरुंद केसाळ कपाळाच्या खोबणीत लपलेले डोळे रोखून पहात असताना त्यांच्या मनात कोणते शब्द उमटत असतील? त्यांनी अखेर दगडावर दगड घासून पहिली ठिणगी  पेटवली असेल ती लपापताच झालेला आनंद त्या आदी स्त्री-पुरुषांनी कसा व्यक्त केला असेल? भूभूत्कार  करून? छाती ठोकून ?आपल्या स्त्रीला कवेत घेऊन? आपले अजानुबाहू पसरून नाचत ओरडून? भाषेशिवाय शब्दांशिवाय त्यांनी आपला विजय कसा व्यक्त केला असेल या उत्सुकतेपोटी 'गुगल 'गुरूजींना मी शरण गेले. गुगल गुरूजी म्हणाले 'तथास्तु ' गुरुजींनी उच्चारले 'खुलं जा सिम सिम' मग फटाफट अनेक पर्याय समोर ठेवले. त्यातील एक म्हणजे 'आssह ' हा तो प्रथम उच्चारलेला शब्द. शब्दातून ध्वनीत होते संकटाची सुचना.या शब्दानंतर भाषा अनेक रूपांत समृद्ध होत गेली.
                 विकसनशील आदिमानवाने कोणता शब्द उच्चारला होता याचं तर उत्तर मिळालं पण ती आदी स्त्री  आपल्या बाळाला जिवापाड जपताना केवळ स्पर्शाने, नजरेने प्रेमाचा  नैसर्गिक बंध बळकट करत असेल?.आदिमानवाला भय, प्रणय ,वात्सल्य ,मत्सर या भावना शारीरिक पातळीवरच जाणवत होत्या,त्यांना शब्दरूप नव्हते. आणि हळूहळू त्यांना शब्दरूप दिले गेले. विचारांचे शब्द आणि त्यातून भाषा असा हा भाषेचा प्रवास.
       . निसर्गाचे ऋतुचक्र जसे अव्याहत फिरते तसेच प्रत्येक पिढीत बदललेली भाषा देखील .संस्कृती प्रमाणेच भाषा प्रवाही आणि सर्व समावेशक असते.म्हणूनच मध्ययुगीन 'ओवी' कितीही गोड वाटली तरी आपली बोलीभाषा' ती 'नसते. शिवकालीन काळ आपल्या अस्मितेचा, जिव्हाळ्याचा पण आपण भाषा बोलतो तर ती शिवकालीन नाही तर सध्याची संकरित आणि नव संस्कारित. आज नवऱ्याला अरे म्हणण्याच्या काळात दिव्य प्रतिभेच्या गडकऱ्यांच्या सिंधू सारखे' इकडून' येण झालं हे बोलण सलज्ज, मान मर्यादा ठेवणारे न वाटता हास्यास्पद वाटते. आमच्याशी बोलताना मध्यमवर्गीय सुशिक्षित कुटुंबात रुळलेले शब्द उच्चारणारा, माझा मुलगा मित्रांमध्ये मात्र वेगळीच भाषा केव्हा वापरू लागतो तेच कळत नाही. पण भाषेतला हा बदल अपरिहार्य आहे एवढे मात्र नक्की.
      गम्मत म्हणजे इंदोरला आजोळी  गेल्यावर मामा आणि आई एकमेकांशी बोलायचे खास खुमारीने.खास इंदोरी मराठी. अगदी तुझं आहे तुझं पाशी या नाटकातील  काकांजी सारख. "अरे यार करून तर राहिले न. कशाला  बकबक करून राहिलास?" आई असं बोलायला लागली की आम्हा बहीणींची मात्र मस्त करमणूक व्हायची.मग मी आणि बहिण आमचा हुकमाचा एक्का म्हणजे आमच्या दोघींचीच खास 'पट' ची भाषा  सुरू करायचो .खास आमची दोघींची,दोघींनी तयार केलेली 'पट'ची भाषा!. सगळ्या भावंडांची एकदम भंबेरी  उडायची.'च' च्या भाषेपलीकडे कोणाचीच झेप नसायची.लहान भावंड तर बिटबीट नजरेने नुसतं बघतच रहायची.
              एक गोष्ट मात्र निश्चित प्रत्येक भाषेला स्वतःची खास खुमारी आहे. सीमाभागातील भाषेमध्ये म्हणूनच  भाषांच्या मिश्रणातील गोडीमुळे विलक्षण मिठ्ठास आलेली आहे. माय मराठीला कानडी झुल्यात बसवून हेलकावे घेणारी बेळगावी मराठी पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते. तर कानडी मराठीच्या जोडीला खुमासदार उर्दू आली की किंचित उग्र  अबे काबेची  सोलापुरी कानावर येते."अबे तिन केलतन् काम. कशाला बे उगा बोंबलतो" हे खाssस सोलापूरी! खमंग सोलापुरी चटणी आणि भाषा सारखीच. कोल्हापुरी भाषा तेथील' 'पावण्यासारखीच'  शिस्तीत येते. सांगली वरील पुणेरी भाषेची छाप लपता लपत नाही. मुंबईकर बोलायला लागला की काssssय रे! असाच लांबलचक हेल काढतो .  व-हाडी भाषा तेथील दिलदार लोकां सारखी. पुणेरी मराठी मात्र अनुनासिक आणि टोकदार रोखठोक. आपली मराठी भाषाच जर एवढ्या इंद्रधनू स्वरुपात येत असेल तर इतर भाषांचे ही असेच फुलोरे असणार. भाषेचे कंगोरे,सौदर्य, कोलांट्याउड्या  शिकणं त्यात चिंब होणे म्हणजे आनंदोत्सवच! जणू आईच्या मांडीवर बसून केलेला धुडगुस!
            एकदा  आमची मात्र गंमत झाली. आता मायबोली मराठी, राष्ट्रभाषा हिंदी, वाघिणीचे दूध इंग्रजी, यावर पुरेसे प्रभुत्व असल्याने आपल्याला आपल्या देशात कधीच काही अडचण येणार  नाही या ब्रह्म कल्पनेला दक्षिणेकडील प्रवासात पूर्णपणे सुरुंग लागला. बेंगलोरहून उटीला जाताना रानातील तो सुनसान लांबलचक रस्ता.चंदनचोर वीरप्पन ची भीती आणि आम्हाला अगम्य असलेल्या भाषेत असलेल्या मार्गदर्शक पाट्या. आपल्या उच्च शिक्षणा बद्दलचा आमचा अभिमान कधीच गळून पडला. येथे तर आम्ही पूर्णपणे निरक्षर ठरलो होतो .अखेर आमच्या बरोबर असलेल्या एकाने त्या भाषेतील नवसाक्षराने अंकलपीच्या तालावर त्या पाट्या कशाबशा वाचल्या आणि आमचा प्रवास सुरू झाला.
          अशा अनेकांच्या अनेक मातृभाषा, त्यांनी जोडलेली मनाची बेटे. भटकंती करताना सहजच कुठल्यातरी दूरस्थ परक्या जागी मराठी शब्द कानी पडावेत त्यावेळी खरोखर स्वर्गस्थ आई भेटल्यासारखा आनंद होतो.प्राणी आणि पक्षी, अगदी डाॅलफीन सारखा जलचर यांची वेगळीच भाषा असते. लहानपणी वाचलेल्या गोष्टीत पक्षांची भाषा जाणणारा एक चतूर शहाणा असेच .मला त्याचा नेहमीच हेवा वाटे.
       भाषा म्हणजे परस्परांशी संपर्काचा मार्ग.अक्षरांचे शब्द शब्दांची वाक्य आणि वाक्यांची भाषा त्यातील अर्थांची ओझी वाहतात शब्द .ते शब्द फुंकर घालणारे ,लाजवणारे ,प्रेमळ ,दुखावणारे , आपलेसे वाटणारे कधी दूरस्थ. कालप्रवाहात ते उत्क्रांत होत गेले तरी या शब्दात भावनांची मुळे त्या आदिमानवाने घट्ट रुजवली आली आहेत. त्या प्रथम 'अssहा'शब्दापासून ते आजच्या भाषे पर्यंत .
      भाषेच्या श्रेष्ठत्वा बद्दल एकमेकांचे वाभाडे काढणाऱ्या सर्वांनाच हे सांगायची वेळ आली आहे,  हा शब्दांचा ठेवा जपायचा आहे वाढवायचा आहे. त्याच्या छायेत राहायचं आहे. समृध्द व्हायचे आहे.त्या आदीमानवाने भाषेचे बीज दिले.त्याचा झालेला वटवृक्ष आपणच संभाळणार आहोत.

शुक्रवार, ८ मे, २०२०

कानोकानी©️

 बालरोग विभागातील पहिले सत्र!! आत्तापर्यंत  डॉक्टर होताना बच्चेकंपनी पेक्षा मोठ्या रुग्णांना जास्त तपासलेले. इथे पहिलाच बालरूग्ण, ह्रदयाच्या झडपा निकामी झालेला. तपासायला सुरवात केली. इवलीशी छाती. त्यात दम लागलेला त्यात हळू हळू थांबत थांबत हुंदके. स्टेथोस्कोप छातीवर टेकला. लsब डsब या ह्रदयांच्या ठोक्यात मधेच खर्रखर्र आवाज.आता मात्र सर्व ज्ञानेंद्रिये जणू कान झाले.कानात प्राण आणून ऐकणे म्हणजे काय हे झटकन कळले. त्यावेळी इकोकार्डीओग्रामची उपलब्धताही नव्हती. फक्त कान आणि आवाज ,त्याचे विश्लेषण. बस! शब्दशः त्याच्या ह्रदयीचे बोल ऐकत होते.आज पसारा आवरताना ते दिवस आठवले. चला ह्या आठवणींचा  पसाराही आवरायलाच हवा.                      



               कानोकानी©️


           योग योगेश्वर श्रीकृष्ण चक्रव्यूहाचा 'भेद ' कसा करायचा हे भगिनी सुभद्रेला  समजावून सांगत होता. गंमत म्हणजे गर्भ जलाच्या अतीव ऊबेत पहुडलेल्या अभिमन्यूने हुंकार देत देत श्रीकृष्णाचा'' 'मामा 'केला. त्या गोष्टीचे मला नेहमीच कुतूहल  वाटते. कदाचित प्रवासाच्या शीणाने गर्भवती सुभद्रा अंमळ पेंगुळली होती. रथाच्या झुल्यात हातातील वेग सांभाळत तो यदुनाथ चक्रव्यूहाचा भेद करण्याचे तंत्र आपल्या बहिणाबाईला तिच्या हट्टापाई समजावत होता., तेव्हा आपले   इवलाले सुबक करंजीसारखे कान टवकारून मातेच्या गर्भात उबदार काळोखात पहूडलेला अभिमन्यू ते ऐकत ऐकत हुंकारत होता. त्या गर्भाचे पुसटते हुंकार तो कृष्णमुरारी ऐकत पुढे बोलत होता. इकडे सुभद्रा मात्र थकव्याने निद्रिस्त झाली ..   हे पाहताच बंधू -राजांनी चक्रव्यूह भेद आणि घोड्यांचे वेग दोन्हीही आखडते घेतले . अर्धवट राहिलेल्या रहस्यकथे सारखा चक्रव्युहाचा अर्धामुर्धा भेद गर्भावस्थेतील अभिमन्यूस चुटपुट लावून गेला.
आपल्याभोवती सतत नादब्रह्म उसळत असते. कधी विलक्षण कोलाहल तर कधी असीम शांतता. पण या सर्व आवाजांच्या भोवऱ्यात स्थिर असतात ते मात्र कानच. मात्र ते काम करतात चाळणीचे! अर्जुनाने वेध घेतलेल्या पोपटाच्या डोळ्या सारखा हवा तोच आवाज या चाळणीतून मनापर्यंत पोहोचत असतो . आठवा बर ते शाळेतले दिवस.वर्गात दंगा टिपेला पोहचला असतो. बाॅम्ब फुटला तरी ऐकू येणार नाही अशी अवस्था! ! तोच शाळेतील घंटा वाजते . हुश्शार कान तो आवाज  बरोबर टिपतात आणि आपण सुसाट निघतो. किंवा बाळाला बडबड गीत गाऊन भरवता भरवता कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्याचे जेव्हा मी बाईंना सांगितले तेव्हा आई आणि गृहीणी होण्याची एक पायरी मी यशस्वी पणे पार केली आहे याची मलाच खात्री झाली. आई झाल्यावर हे सगळे आवाज आणि त्याचे बारकावे कान ग्रहण करू लागले .बाळाच्या रडण्याच्या पोतावरून जेव्हा त्या रडण्याचे कारणही समजू लागले तेव्हा तर मी नक्कीच मनकवडी आहे असे मला ठामपणे  वाटले. 
         तसं पाहिलं तर आधुनिक स्वयंपाकघर म्हणजे अनेक आवाजांची सहकारी संस्थाच! फ्रिजचे सतत घुमणे . त्यात मिक्सरचा खडखडाट, कूकरच्या चावट शिट्ट्या आणि हे कमी वाटते म्हणून की काय प्रत्येक भांड्यांनी आपला सूर त्यात लावलेला असतोच. या जोडीला माझे घर मध्यवर्ती! सुसाट गाड्या, धर्मस्थळे, प्रार्थनास्थळे  येथून येणारे आवाज, समोरच्या शाळेतील मुलींचा कोवळा आवाज, घरा समोरची जत्रा आणि तिथून ऐकू येणारी विविध भाषेतील गाणी अशा भरगच्च आवाजाच्या दुनियेत मी रहाते. हिमालयात ट्रेकींग करताना लक्षात आली तिथली विलक्षण शांतता. उंच सरळसोट देवदार वृक्षांच्या पानांची सळसळ नाही, ना पक्षांचा आवाज. ही शांतता बॅगेत भरून ,गाठोड्यात बांधून घरी घेऊन जावेसे वाटू लागले.ती शांतता ऐकताना, तंद्रीत चालताना पायवाट चुकले.खोल जंगलात शिरले.शांतता म्हणजे कोलाहालाचा परमोच्च बिंदू! क्षणापूर्वी आवेगाने पकडलेली कवेतील शांतता, इतकी प्रखर वाटू लागली की आता 'आवाज' ऐकण्याची तहान लागली. आता कुठलाही 'आवाज 'हवा होता. सातभाई पक्षांचा कचकचाट, कुत्र्याचे भुंकणे, अगदी माणसांची भांडणेही चालली असती. सहप्रवाशाचा किंवा गाईडचा आवाज ऐकण्यासाठी शरीरातील प्रत्येक अवयव, प्रत्येक पेशी न् पेशी जणू 'कान' झाले होते.
              आपण भारतीय अती नाद प्रिय. जन्माच्या आनंदसोहळ्या पासून त्या अखेरच्या प्रवासापर्यंत साक्षीला आवाज हे हवेच. बाल जन्माची वार्ता ताशे नगारे देतात तर बाळाच्या कानात कुsssर्र करे पर्यंत बारशाची सांगता होत नाही. आपल्या लाडक्याला खेळणी हवी तीदेखील नादमय!कानांना,आत्म्याला कुरवाळणारे लताजी, मखमली तलतचे सूर, माणसांचे,वाहनांचे नाही तर गेला बाजार कुत्रा -कावळ्यंच्या आवाजांच्या सवयी असलेल्या माझ्या कानांना जपान मधे मात्र धक्काच बसला.कुठलाच आवाज नाही. कोणी कोणाशी बोलत नाही की एकमेकांकडे बघतही नाही. कुत्री शांतपणे मालकाबरोबर फिरताहेत. एक जण भू s चा सुर लावेल तर शपथ! लहान बाळ सुध्दा शहाण्यासारखी(?) आळी मिळी गुपचिळी! बुलेट ट्रेन साठी आम्ही थांबलो असताना सोळा सतरा वयाची  पन्नास मुले मुली आली. बहुधा सहलीसाठी! अशा वेळी आपल्याकडे जो कोलाहल उसळला असता तो आठवून मलाच कानकोंडे वाटू लागले. इथे मात्र मुलींचा चिवचिवाट नाही की तिरक्या नजरेने मुलींकडे बघत मारलेले शेरेही नाहीत. 
     काही आवाजांच्या प्रेमात आपण कधी पडतो हेच कळत नाही. कोल्हापूरचा रंकाळा तलाव म्हणजेच समूद्र या  माझ्या वेडगळ कल्पनेतून मला बाहेर काढण्यासाठी वडील मला घेऊन गेले थेट रत्नागिरीला! साधारण सात, आठ वर्षाची मी!  भरतीची वेळ होती आणि ते होते समुद्राचे प्रथम दर्शन.पहाताक्षणी प्रेमात पडण्याची पहिली अनुभूति. तो निळा हिरवा अथांग समुद्र ,त्या एकापाठी एक येणा-या  फेसाळ लाटा पण सर्वात जास्त आवडली ती त्याची खर्जातील गाज. मृद्गंध जसा मनात भरून घेतो तशीच ती सागराची गाज कानात भरून घेतली. नंतर काही वर्षांपूर्वी समुद्रकिनारी सह कुटुंब गेलो होतो.पावसाळा तोंडावर आलेला. रहायची व्यवस्था यथातथाच! रात्र झालेली.वीज गेलेली. तिथे रहाणारे फक्त आम्हीच.आकाशातील एखाददुसरा फुटकळ ढग आता मात्र सर्व मित्रांना घेऊन आकाशात धिंगाणा घालू लागला. इतक्यात तेथील व्यवस्थापक मिणमिण कंदील घेऊन आले.आम्ही उतरलो होतो तेथवर समुद्राचे पाणी येते. गाडीही काढणेही शक्य नाही अशा भयप्रद गोष्टी सांगून ते गेले.कुठलाही आवाज नाही,फक्त समुद्राची एकसुरी गाज. बरोबर वयस्कर सासूसासरे आणि दोन लहान मुले!आज तो नेहमी प्रिय असलेला सागर आता पा-यासारखा मनातून निसटू लागला .समुद्र त्याचे तोंड बंद करेल तर बर! , लाटाचा आवाज नकोच नको असे वाटू लागले.अशा या कानोकानच्या आठवणी.
    या कानांच्या आधारे निसर्गातील  स्वरगंगेचे दैवी शिंतोडे अगणित वेळा मनावर,आत्म्यावर शिंपले गेले आहे. काही साक्षात्कारी  क्षण अनुभवलेले आहेत.माझ्यासारख्या सामान्य स्त्रीला आस्तिकतेच्या अंगणात  , दैवी स्वरांनी फिरवून आणले आहे .तर कधी मनाचा चक्काचूर करणारे आर्त रूदनही याच ज्ञानेंद्रिये ऐकले आहे.
     ब-याचदा वृध्दावस्थेत कर्णबधिरता आली तरी मान्य करायची तयारी नसते. घरातल्या टि.व्ही.चा आवाज जोरात यायला लागला किंवा सहा आणि दहा या दोन आकड्यांत अदलाबदल होऊ लागली की आपण
ओळखाव की घरातील थोरांचे कान रूसू  लागले आहेत.. माझ्या वडिलांचा कर्ण यंत्र घालण्यास दांडगा विरोध! वडिलांची  ठाम समजूत होती की आम्ही तोंडातल्या तोंडात बोलतो त्यामुळे त्यांना आम्ही बोललेले कळत नाही.अखेरपर्यंत त्यांनी कर्ण यंत्र घेतले नाही आणि कर्ण बधिरता कबुलही केली नाही..
      प्राण्यांची आणि वेगळीच त-हा.  दोन कुत्रे एकमेकांशी संवाद साधतात तो ऐकणे आणि बघणे एखाद्या नाटुकली सारखे असते. एकमेकांना बघून झालेली खुषी पुच्छाची चवरी ढाळत ढाळत अ अं उ sssऊं च्या बाराखडीने सुरू होते. समोरचे श्वान आवडले नाही तर मात्र भ भा भी××××ची शिवी गाळ सुरूच! सोबतीला अणकुचीदार दात विचकणे आहेच.रामपारी येणारे काऊ तर त्यांना खाऊ द्यायला जरा उशीर झाला तर जास्तीतजास्त कर्कश्श स्वरात माझी निर्भत्सना करायला मोकळे.! तोच खाऊ खायला जातभाईंना बोलवायचे असेल तर त्यांचा आवाज लगेच सौम्य!
           या ज्ञानेंद्रियाचा एक भाग म्हणजे आपला बहीर कर्ण! महाचावट!.   या चावट कानाने आपला मोठा दादा नेत्र यापासून तर चार आंगुळांची फारकत कायमची घेतली आहे. म्हणायला चार बोटांचे अंतर असले तरी डोळ्यांनी देखिले आणि कानानी ऐकलेले यात कित्येक योजनांचे अंतर असते. असा हा हलका कानफाट्या  कान, नटण्या मुरडण्यात मात्र सर्व अवयवांच्या चार पावले पुढेच असतो .इटूकला आहे पण त्याच्या नटण्याच्या त-हा किती म्हणून सांगू? कधीकाळी कानावर ऐटीत विराजमान झालेली भिकबाळी कोणाच्या स्वभिमानाला डिवचते .त्यातूनच रामशास्त्री प्रभुणे अंगावरील गरिबीची राख झटकुन झेप घेतात. .कधी कधी याच कानांवर अत्तराचा फाया नेटकेपणे बसतो आणि बसवणा-याचा रगेल ,रंगेल पणा षटकर्णी करतो.
       समस्त स्त्री वर्गाने मात्र स्वतःच्या  कानांना अनेक कर्णभूषणंनी मढवून आम्ही मुळीच 'हलक्या' कानाच्या नाही हे सिध्द केले आहे. मग ती फुलांनी कान सजवणारी ॠषिकन्या असो किंवा मला बाई फक्त हिऱ्याचे दागिने आवडतात असे म्हणणारी उच्चभ्रू महिला असो , बुगडी माझी सांडली ग म्हणत लडीवाळ तक्रार करणारी मराठमोळी तरुणी असो कर्णभूषणांचा मोह कोणीही टाळू शकत नाही .आणि हा  कानही असा नटवा की वरपासून खालपर्यंत चमचमते खडे, गोल गोल वळ्यांनी तो सतत सजत असतो. . कर्णभूषण सर्वांचेच लाडके.
           . आज-काल स्त्रियांची कर्णभूषणांची  मिरासदारी मुलांनी मोडीत काढली आहे कधी एका  कानात तर कधी दोन्ही कानातले डूल 'हम भी कुछ कम नही' म्हणत मुले मिरवत असतात.
              असे म्हणतात बाह्य कर्णाचा काहीच उपयोग नसल्याने पुढील काही पिढ्यांनी आपला लाडका नटवा कान नष्ट होणार आहे. कदाचित त्या भावी काळातील  आपले वंशज कौतुकाने आजच्या मानवाचे फोटो म्हणजे आपले फोटो एकमेकांना दाखवून सांगतील डोक्याच्या कडेला आपल्या पूर्वजांना जो अवयव फुटला आहे त्याला पूर्वी 'कान' असे म्हणत. अर्थात हा काळ फाsssर दूरचा असल्यामुळे आतातरी कानाला नटवायचे आपले काम सुरळीत चालू राहील
            एकदा बागेतील पुतळ्याकडे एकटक बघता बघता माझी छोटुकली नात पटकन म्हणाली ,"आजी ग बाहेरचे सर्व आवाज बंद करायचे आणि मनाचे कान उघडायचे, म्हणजे समोरचा तो पुतळा  बंद ओठांनी 'अssssगुल्या' म्हणतो ते ऐकू येते बघ! तो मनाचा आवाज". पुतळ्या मागे दडलेली आवाज करणारी कबुतरे तिने पाहिली नव्हती. पण तिचा तो 'मनाचा आवाज' आणि 'मनाचे कान' मला फार फार भावले .बघूया 'मनाचा आवाज' ऐकायला माझ्या मनाला कधी 'कान' फुटतात ते.


शुक्रवार, १ मे, २०२०

पाणवठा भाग2--बांधावरचा कावळा

माझ लग्न ठरल्यावर माझ्या भावी पतीला मी   सांगितले,' रहात घर लहान असले तरी चालेल पण घराभोवती मोकळी जागा हवी, ज्यातून आकाश आपल्या घरात उतरून मस्त गप्पा मारेल.सूर्य किरणे सैरावैरा घरभर हुंदडतील. पहिल्या पावसाला इच्छा  झाली तर थेट खिडकीतून आत येऊन गरम भजी खाईल." क्षणभर हे असले बोलणे ऐकून तो गडबडला. नंतर हसला .तथास्तु वदला. आज माझ्या घराभोवती मोकळी जागा नाही पण घराला झकास गच्च्या आहेत.त्यात पक्षांचा पाणवठा आहे. , ती जागा कायम happening असते.आज पसारा आवरताना या पाणवठ्यावर घडलेले  एक शोक नाट्य आठवले!
(पाणवठा भाग 1 पसारा आवरताना नीट आवरून ठेऊन दिला आहे. त्याचीही लिंक पाठवत आहे . https://drkiranshrikant.pasaara.com/2020/03/blog-post_26.html )




              ©️पाणवठा भाग 2--बांधावरचा कावळा


माझ्या घराच्या दोन गच्च्यां पैकी मोठी गच्ची मुळातच राजस! अगदी देखणी म्हणण्यासारखी सुंदर. त्यातच अनेकविध झाडाझुडपांनी पाना फुलांनी सजल्यामुळे स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाच्या अलंकृत ललने सारखी भासते. पश्चिमेकडे असलेला कठडा आणि पूर्वेकडे शयनगृह त्यामुळे सूर्य वर येईपर्यंतही गच्चीत सावल्या पसरलेल्या असतात. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुले ह्या सावल्या पांघरून निद्रेचा आनंद सूर्य माथ्यावर येईपर्यंत घेतात. दुपारी मलूल  झालेल्या झाडांना कुरवाळत गच्ची गरम सुस्कारे टाकते. सूर्य कलायला लागताच गच्ची खरोखरच खास कार्यक्रमा साठी सजलेल्या ताई सारखी वाटते. दुधाळ चांदणं आता गच्चीचा ताबा घेते. मादक रातराणी आणि जाई जुई मोगरा यांच्या गंधाने असा रसरशीतपणा तिच्या अंगांगावर दिसतो की आलेला पाहुणा म्हणतो व्वाsss. मुलांचे वाढदिवस साजरे होतात ते याच गच्चीत. त्यानंतरचे त्यांचे खेळही रंगतात इथेच. घरातील वाळवणही इथंच सुस्तावते. वाळवणाबरोबरच उन्हाने अंग शेकणाऱ्या आजीबाई गच्चीत येणारी फुलपाखरं, सूर्यपक्षी ,बुलबुल आपल्या लुकलुक नजरेत साठवतात. एकदा तर चक्क ससाण्यासारख्या दिग्गजांनी लावलेली हजेरी आम्ही कित्येक दिवस मनात चघळत होतो. पण एवढं सगळं असूनही खरा भाव खाऊन जाते ती छोटी गच्चीच! धाकट्याच्या खोलीला जोडून 'छोट्या गच्चीने 'आपला सवतासुभा केला आहे. खरोखर छोटीशी दहा बाय दहाची गच्ची. या गच्चीत झाड झाडोरा नाही .झोपाळाही नाही. पण विलक्षण आत्मीयता आहे .रसिले पण पुरेपूर भरलेला आहे., ,आणि म्हणूनच या गच्चीत बांधाला पाठ टेकवून, पाय लांबवून बसायचं की गप्पांचा फड रंगलाच पाहिजे. खास मंडळींच्या ओल्या मेजवान्यांना या गच्चीखेरीज पर्यायच नाही .घरी पाहुण्या म्हणून आलेल्या नवविवाहितांच्या पाहुणचारात राहिलेली कसर ही छोटी गच्ची सहजतेने भरून काढते. या गच्चीत चंद्र चांदण्यात रात्रभर विसावून उठणारे युगुल सकाळी टवटवीत कळी सारखे दिसते. अशा या आमच्या घराच्या दोन गच्च्या मध्ये त्यांना विभागणारा फक्त एक बांध. मात्र दोघींच्या मनोवृत्तीत अनेक कठड्यांचे अंतर.मोठी कुटुंब वत्सल राजश्री प्राॅडक्शन,तर दुसरी छोटी रंगरसिली!
                 दोन्ही गच्चीतील मधल्या बांधावर पक्षीगणांसाठी काऊचा घास आणि पाण्याचं भांडं मी नेहमीच भरून ठेवते सकाळी सकाळीच हा चिमणचारा खायला कावळ्याची झुंबड उडते. पोट भरताच बांधावर शितांचा पसारा टाकून आपलं शेणाचा घर बांधायला त्यांची पांगापांग होते ती थेट उन्ह् तापल्यावर.  चिमण्या मात्र आपले मेणाच घर बांधून त्याची सजावट करून सावकाशीने येत असाव्यात. मला तरी कधी दिसल्या नाहीत.मध्यानीचा सूर्य झाडाच्या सावल्या त्याच्या पायाखाली दडपेपर्यंत ही सर्व पक्षी मंडळी गायब झालेली असतात एवढे मात्र खरे. 
           एकदा लखलख उन्हात तो कावळा मला दिसला. बांधावर शरीर आक्रसून तो बसला होता .करवतीने मधोमध आडवी कापल्यासारखी चोच आणि त्यातून लपणारी काळीकुट्ट जीभ! निस्तेज फिसकारलेला  तुटका पंख सावरणेही त्याला अवघड जात होते. मोडका पाय आणि फाटका पंख घेऊन हा कावळा इथे कसा आला हेच मुळी मोठं आश्चर्य होतं. त्याचे सारे भाईबंद नित्य कर्मासाठी केव्हाच गेले होते .वरती सूर्याची होळी ढणाणा पेटलेली आणि पायाखाली निखा-यासारखा तापलेला बांध . तो कावळा आज शगून  न सांगताच नुसताच थिजून बसला होता. भांड्यातल्या पाण्यात तुटकी चोच त्याने बुडवली पण नाकातोंडात शिरणाऱ्या पाण्यामुळे ते देखील त्याला अशक्यप्राय होते.आता थोडीशी चोच बुडवून ती ओली करण्याचा त्याचा अविरत प्रयत्न चालू झाला. आजूबाजूला पसरलेल्या खाऊकडे मात्र तो ढुंकूनही बघत नव्हता. 
     मावळतीला सूर्य झुकताच एकुलत्या एका धडक्या  पायावर उड्या मारत बांधाच्या टोकापर्यंत गेला ,आणि तेथून त्यांनी कसबसं जवळचे झाड गाठले. दुसऱ्या दिवशीही त्यांने हजेरी लावली .त्याच्या भाईबंदा पासून दूर बांधाच्या एका बाजूला तो बसून राहिला .इतर कावळ्यानी त्याची दखलही घेतली नाही. कावळे उडून जाताच परत एकदा पाण्यात जीभ बुडवायची ,चोच बुडवायची त्यांचा आटापिटा सुरू झाला. कोणी दुजा कावळा त्याला काऊचा घास भरवेल म्हणून आशेने त्याच्या आसपास मी घोटाळू लागले. पण एकही जातभाई फिरकेल  तर शपथ! मग मी भाताचे मोठे मोठे गोळे बनवले बांधावर पसरट भांड्यात ठेवले. त्याची अर्धतुटकी चोच त्यात शिरली पण चोची भोवती फक्त शिते चिकटली .समोर अन्नाचा ढिग असूनही कावळा आपला उपाशी. नंतर कापूसकोंड्याच्या गोष्टीप्रमाणे तो काही दिवस नियमित येत राहिला, पण आम्हाला जवळ येऊ देत नव्हता. .त्यासाठी बांधावर कापड बांधून आडोसा केला त्याखाली मात्र तो बसू लागला .आम्ही जवळ जाताच एक धडका पंख केविलवाणा फडफडे. अशक्तपणा ने त्याला आता उठणेही अशक्य झालं होतं गर्कन फिरणारी काकदृष्टी पूर्णपणे मंदावली होती. तुटक्या पायामुळे शरीर अधिकाधिक खुजे झालेलं. संध्याकाळी झाड गाठण्याची आतुरता आता पूर्ण संपली होती. .त्या दोन गच्चांना  विभागणा-या बांधाचा तो जणू अविभाज्य भाग झाला होता. कणाकणाने तो आमच्या नजरे समोर झिजत होता. त्याच्या इतकेच आम्ही हतबल होतो. पुढचे पाच-सहा दिवस त्या आडोशाखालून हलायलाही तयार नव्हता. एक दिवस लोबत्या तुटक्या पंखातले त्राण जाऊन तो पूर्णतः बांधावर पडला. खुजी मान कशीबशी छातीवर टेकलेली ,आणि एकुलता एक धडका पाय मात्र कसरत करत करत उभा!
            अचानक एके सकाळी तो जणू हवेत विरून गेला. त्याचे प्राणहीन शरीरही कुठेही मिळाले नाही. अगदी घराचा परिसर आणि दोन्ही गच्च्या  धुंडाळूनही तो कधीच मिळाला नाही .
          तो बांधावर असताना सुट्टीवर गेलेले कावळे आठ दिवसात परत गच्चीत हजेरी लावू लागले . गच्चीपण मोकळेपणाने फुलू लागली .
        पण माझे काही प्रश्न कायमच अनुत्तरित राहिले. जिथे दोन फुटाचे अंतर ओलांडणै त्या कावळ्याला समुद्र लंघनापेक्षाही  अवघड होतं, तरी प्राण जाताना तो तेथून कुठे गेला? यासाठी लागणारे बळ त्याला मिळाले कुठून ?कोणाकडे आणि कोणासाठी त्यांनी  झेप घेतली? ही सारी अजुनही मला न सुटलेली कोडी आहेत. पण तो कावळा प्रसंगावशात माझ्या गच्चीत आला, , अनिच्छेने का होईना तो तिथे राहिला आणि अखेरीस निघून गेला हेच सत्य .त्याचा 'शेवटचा दिस  गोड 'व्हावा म्हणून मनापासुन मी यत्न केले हे पण तेवढेच सत्य. कदाचित त्याचा आणि आमचा तेवढाच ॠणानुबंध होता.