गुरुवार, १८ जून, २०२०

भटकभवानी भाग 1




"बहुतेक तुझ्या पायावर चक्र असावे",अर्थातच आज्जीने माझ्याबद्दल काढलेले उद्गार आहेत. कारण जितके भटकणं शक्य आहे तितकं  मी करतच असते. सुदैवाने  माझा नवरा या बाबतीत माझ्याच जातकुळीतला. तो ही भटकाच. भटकायची माझी आवड पाहून आजीने मला लहानपणीच नाव दिले भटकभवानी. दर्यावर्दी  सिंदबाद हा माझा लहानपणचा हिरो. ओळीने काही महिने घरात काढल्यावर मोकळे आकाश, वेगवेगळ्या ठिकाणच्या खास पदार्थांचे वास, तिथली झाडं, तिथले प्राणी, तिथली भाषा सगळं खुणावू लागतात पाठीवर रक्सॅक पडते आणि मग लगेच सुरू होतं रेडी स्टेडी गो .  या' 'प्रवासाच्या युनिव्हर्सिटीत' अनेक गोष्टी  शिकायला  मिळाल्या  आहेत. या 'प्रवासाने' फार मोठ्ठा आठवणींचा पसारा मांडलाय. चला आज थोडुसा  तरी आवरावा.
शक्य झाले तर नुसते आठवणीत न रमता नीट आवरून ठेवावा.

                     भटकभवानी भाग 1



         साधारण पंचावन्न वर्षापूर्वी  शाळेत असताना लक्षात राहिलेला प्रवास म्हणजे आजोळी जायचा, इंदोरचा प्रवास. खर तर वार्षिक  परीक्षा सुरू व्हायच्या आधीच घरात आईला वेध लागायचे माहेरचेच आणि  आम्हाला  आजोळचे. अभ्यास करताना आई बाबांचे काय ठरते इकडेच कान असायचे. इंदोरला जायचे ठरल्यावर कधी एकदा परीक्षा  होतेय असे व्हायचे. हा प्रवास कधी पुण्याहून कधी कोल्हापूरहून कधी सांगलीहून जिथे आम्ही राहत असू तिथंन केलाय. अगदी मालगाडीच्या डब्यांसारखा लांबलचक प्रवास. तीन-तीन वेळा रेल्वे बदलावी लागायची. दोन दिवस लागायचे. आई खरच शूर वीर! दोन मुलींना घेऊन इतका अडनीडा प्रवास करायलाही तय्यार!.स्वतः शिक्षिका असल्याने तिची कधीच कोणाच्याच सोबतीची अपेक्षा नसायची.आणि कसली भीतीही नसायची. कधीकधी रिझर्वेशनचा डब्बाच नसायचा.किंवा रद्द व्हायचा.  मग त्या उतू जाणा-या रेल्वेच्या गर्दीत आम्हाला सुखरूप  नेणारी आमची बहादूर आई! आणि आम्ही दोघी चतुर आणि चाणाक्ष  लहान मुली. 
          हमाल जेव्हा आपल्याला प्लॅटफॉर्म वरून उचलून खिडकीतून रेल्वेच्या डब्यात टाकतो किंवा फेकतो त्याला' मच्छी गोता' म्हणतात हे ज्ञान  या प्रवासातच मला प्राप्त झाले. त्यावेळेच्या पद्धतीप्रमाणे एक होल्डाॅल, भलीमोठी पत्र्याची ट्रंक. .ट्रंक कुठली  पेटारेश्वरच तो.! आग्र्याहून सुटका वगैरे ऐतिहासिक नाटकात सहज खपेल असा. काही नाही तर गेला बाजार जादूचा पेटारा म्हणून वापरायला जादूगारांसाठीही परफेक्ट! ही आईची खास लाडकी ट्रंक! बाकी छोटे-मोठे सामान, खाऊचे डबे वगैरे  असा भरगच्च प्रवास असायचा. रेल्वे डब्याच्या खिडकीतून आमच्या पाठोपाठ ती भली मोठी ट्रंक आत कशीबशी सरकवली जायची. त्या ट्रंकचे कचकोर कोपर  जर कोणाला लागलं तर शंभर टक्के भांडणाला सुरुवात झालीच म्हणून समजा. लाकडी बाक त्यावर  दाटीवाटीने बसलेली मंडळी. खाली पण बसलेली मंडळी त्यात  कोणालाही न लागता ती ट्रंक उतरवणं हे ऑलिम्पिक मेडल मिळवल्या सारखं होतं. या ट्रंकेचा दुसरा फायदा म्हणजे त्यावर आरामात बसता यायचं अशी एकदम दणकट. आधी जास्तीत जास्त पसरून जागा अडवून बसलेली माणसं गाडी सुरू होताच चिवडा जसा डब्यात हलवून बसतो, तशी नेटकेपणाने बसायची आणि आम्हालाही बसायला कधी कधी जागा मिळायची. हळुच एखादी आज्जी  मग आईला विचारायची "कयो दोनो छोरी  लेकर   अकेले जा रहे हो?कोई मरद  नही साथमें ?  दोनो छोरी? छोरा नही?" मग लांबलचक सुस्कारा, सुरकन नाक ओढून नंतर आकाशाकडे बघून डोळे टिपणे,अरेरे करणं, हे कुठल्याही आज्यांचे  कार्यक्रम ठरलेले. आई फक्त हसायची , पण त्या क्षणी आपल्या धाडसी आई बद्दल अतिशय  अभिमान वाटायचा. आणि छोरा ,छोरा करणा-या आजीचा राग राग यायचा.  छोरा नाही या कणवे पोटी आम्हाला कधी अगदी जवळ बसवून घेतले जायचे.  ब-याचदा भर उन्हाळ्यात लाल जर्द  जरीची साडी  नेसलेली पोटापर्यंत  घुंघट काढलेली  दुल्हन  आणि दर स्टेशनवर तिला भेटायला येणारा तिचा 'मिया' बघताना मज्जा येई . कधी पान, कधी चहा, कधी डबा द्यायच्या  निमित्ताने सुरवार  झब्बा,  डोळाभर सुरमा  घातलेला मियाॅ त्याच्या डब्यातून धावत आमच्या डब्याकडे येत असे.  दुल्हनची मान लाजून  लाजून गुडघ्यात गेली असे. त्याला अखेरपर्यंत आपला मुखचंद्रमा ती दाखवत नसे. तिच्या मुख चंद्राचे दर्शन आम्ही पामराने घेण्यात मात्र पहिला नंबर पटकवला असे.
               भर उन्हाळ्यात कोमेजलेले,  उलट्या दिशेने  पळत सुटलेले वृक्ष, मळकटलेला करडा पिवळा प्रदेश, त्यात आमचा डबा  इंजीनाजवळ असला तर कल्याणच !कोळशाच्या इंजिन मधून उडणारा काळा धूर आणि कोळशाची भुकटी तोंडावर चिकटलेली आमची ध्यानं ! त्यामुळे स्टेशनवर उतरेपर्यंत आम्ही नक्की कोणत्या खंडातून आलो हा प्रश्न आम्हाला पडतच असे.  दोन पायावर चालणाऱ्या गोरिलाचे आपण वंशज आहोत याची पूर्ण खात्री पटायची.डोळ्यात कोळशाचे कण गेल्यामुळे सारखे चोळून' 'गुलाबी आॅखे' अशी आमची अवस्था व्हायची. रेल्वेचा प्रवास आणि  'गुलाबी आॅखे' या दोन गोष्टींचे  समीकरण इतकं  डोक्यात फिट्ट बसले होतं की  मी जेव्हा पहिल्यांदा' गुलाबी आॅखे जो तेरी देखी' हे गाणं ऐकल ,खर तर अतिशय रोमॅन्टीक गाणं, पण रेल्वे प्रवासाने त्यातला शृंगाराचा धूर उडविला होता. त्यामुळे  तेव्हा पटकन बहिणीला मी म्हणाले या हिराॅईनने नक्कीच  रेल्वेचा प्रवास केलेला दिसतोय.  कर्मधर्मसंयोगाने त्या सिनेमाचे नावही होते 'धी ट्रेन'! म्हणजे शिक्कामोर्तबच!
                 मध्यप्रदेशाकडे जसजसे जाऊ तसे मराठी ऐवजी हिंदी शब्द कानावर पडू लागत. बाहेर गव्हाची शेती, बसक्या आणि समोर वळलेली टोकदार  शिंगे असलेल्या गायी,  कलाकंद पुडी भा ssजी सारखे पदार्थ आले की आपण आजोळच्या  जवळ आलो ते जाणवायचे. 
              एकदा स्टेशनवर वाॅटरबॅगेत पाणी भरायला आई गेलेली, शेजारी बसलेल्या  बाईला आमच्याकडे बघायला सांगून, ती पटकन आलीच नाही. गाडीचे शंटिंग सुरू झाले त्या वेळी पोटात भितीने उठलेला गोळा आठवतो.  तशी भिती  नंतर गणिताच्या पेपरलाही कधी वाटली नाही. 
              या प्रवासातला शेवटचा प्रवास म्हणजे खांडवा ते इंदोर रात्रीचा प्रवास.या प्रवासात  रात्री 11 ते पहाटे चार पर्यंत आई खरोखर  रात्रभर झोपायचीच नाही पहारा करत बसायची. आम्ही दोघी बहिणींनाही अती उत्सुकतेने  झोपच येत नसे. स्टेशनवर हमालाने डोक्यावर ती पत्र्याची बॅग घेतली की आई आम्हाला छोट्या छोट्या वस्तू हातात घ्यायला लावायची.  तो हमाल त्या वस्तू घेण्यासही तयार असायचा,तो मागेही लागायचा पण आई त्याला कधीच एवढे जास्त ओझे द्यायची नाही. कधीही हमाला बरोबर तिने मजुरीसाठीही घासाघीस केली नाही. तो मागेल तितके पैसे द्यायची. या छोट्या छोट्या गोष्टीतून आम्ही खूप काही शिकत होतो ,घडत होतो.
      जून मधे  आजोळहून परतताना एखादा वळीव पाऊस झालेला असायचा .त्यामुळे चमचमणारे समांतर रूळ आणि ओली झाल्याने काळपट दिसणारी खडी , कडेच्या रुक्ष वातावरणात किंचित ओलसरपणा आणि कळकट पिवळे कपडे काढून कायाकल्प करून पोपटी झालेले कडेचे गवत ,राजबिंडे दिसणारे वृक्ष,मग हा वेगळाच मार्ग  आहे असे वाटायचे.खरोखर आजी-आजोबांना सोडून येताना घशात काहीतरी अडकल्यासारखे वाटायचे .  पण शाळा आणि वडील हे दोन मोठ्ठे लोहचुंबक, त्यामुळे परतीचा प्रवास जास्त वेगाने होई. मराठी भाषिक राज्य सुरू झाले की वाटायचे चला आता आपले गाव आले. स्टेशनवर उतरवून घ्यायला वडील आलेले असायचे. कसलं मस्त वाटायचं त्यांना बघून!" काय ग सगळ ठीक ना?" एवढेच विचारायचे  मग आम्हा दोघींना काय सांगू आणि किती सांगू असं व्हायचं.
       त्यानंतर मी मेडिकलला असताना आई आणि मी परत दोघीच इंदोरला गेलो होतो.आता दोघींच्या भूमिका बदलल्या होत्या. आई प्रौढ तर मी तरूण त्यामुळे त्यामुळे दोघींचे रोल्स थोडेसे बदलले होते. आता आईला  संभाळून नेत होते मी. रात्री एका गावाला ओलांडून मधेच रेल्वे थांबली. बाहेर कुळकुळीत काळा काळोख! अचानक  डब्यात आठ दहा माणसं कुर्‍हाडी , बंदुकी घेऊन शिरले. उघडेबंब,धोतर, खांद्यावर कांबळ्, अंगांवर जखमांचे व्रण. हिंदी सिनेमात बघितलेले डाकूच जणू. आता झोपेचे सोंग घ्यावे का  उठावे हेच कळेना.गब्बर पासून सगळे डाकू डोळ्यासमोर  आले. आज पहिल्यांदा  आई माझ्या जीवावर निर्धास्त झोपली होती.    त्या क्षणी माझी अवस्था पूर्णतः बधिर  झाली होती. बहूधा जाग्या झालेल्या सह प्रवाशांची  तीच अवस्था  असावी. पण नंतर त्यांच्यामागे उभे असलेले दोन  पोलीस पाहिले. भानावर आल्यावर हळूच चौकशी केली तेव्हा ते आत्मसमर्पण करण्यासाठी  जाणारे डाकू होते. त्यावेळी जयप्रकाशजींच्या  आवाहनाला या  डाकूंनी  प्रतिसाद दिला होता.
       आत्ता पर्यंत आलेल्या अनुभवांवर कडी झाली काही वर्षांपूर्वी  . परत तोच प्रवास पण आता सोलापूरहून. आता मी माझ्या पाच वर्षाच्या मुलाला घेऊन आणि  वृध्द आई-वडिलांना घेऊन इंदोरला जाताना!.सुरवातीचा सोलापूर ते दौंड प्रवास तर छान झाला. दौंडला गेल्यावर कळले  गाडी चोवीस तास लेट. एक दिवस प्रतिक्षालयात काढला . अखेर रेल्वे आली.गाडीत आरक्षण असूनही मस्तपैकी पथारी पसरून कोणीतरी झोपलेले. लांबचा प्रवास, त्यात थकलेले आईवडील आणि  लहान मुलगा . आता तलवार,  दांडपट्टा, गनिमी कावा सगळ चालवावं लागणार होत.'जय भवानी जय शिवाजी ''हर हर महादेव ' चला आग्र्याहून सुटके पेक्षा रोमहर्षक  पध्दतीने अखेर जागा मिळवली.
          इंदोरहून परत येताना आणि वेगळीच त-हा. येताना पुण्यापर्यंत बसने यायचे ठरलं होत. बस रात्रीची! पहाटे पुण्याला पोहचणारी. महूच्या पुढे जंगलात गाडी आली अन् गाडीवर धडाधड दगड पडू लागले. लुटेरे-----डाsssकू असे कंडक्टर ओरडू लागला.त्याने हे नेहमीचेच असल्यासारखं पटापट बसमधिल तरूणांना  दांडकी  दिली. बायकांना डोकी खाली गुडघ्यात घालायला सांगितले. ड्रायव्हरने प्रसंगावधान राखत बस तशीच रिव्हर्स  मधे न्यायला सुरवात केली. दगड अधिकच  वेगाने आपटू लागले. इतक्यात सुदैवाने मागून येणा-या चार बसेस आल्या तोवर दरोडेखोर पळाले होते. भरपूर अॅडरिनलीन रक्तात धमन्यातून  सैरावैरा पळत होते. पण शेवटी 'All is well that ends well'.
          अजूनही प्रवासातला' 'प्र' जरी ऐकला तरी आमचे कान टवकारले जातात. लगेच आम्ही गूगल गरूजींची मदत घेतो.प्रवासाचे बेत सुरू  करतो. ते करतानाही मस्त मजा येते. 
 प्रवास मग तो दोन पायांनी असो वा विमानाचा ,आम्हाला कुठलाच निषिध्द नाही .आम्ही दरवेळी तो तेवढाच रोमहर्षक  करतो.  आमच्या प्रवासाच्या वेडाची लागण आमच्या दोन्ही  मुलांनाही झाली आहे.  असेच उत्तरोत्तर  प्रवास घडू दे आणि या अप्रतिम ,सुंदर  धरती मातेला वेगवेगळ्या ठिकाणी आधिकाधिक भेटायची संधी मिळो.नवनवीन अनुभव घेऊन  अधिकच संपन्न, अनुभव श्रीमंत  आम्ही होवो. आमेन.

गुरुवार, ११ जून, २०२०

मुरलेले लोणचे

पूर्वी हिन्दी सिनेमात  हिरो एकमेकाद्वितीय ध्येयाने पेटलेले असायचे. ते असे हिराॅईनला पटविणे आणि थोडे तोंडी लावण्यासाठी  दुष्टांचा  नायनाट. मोठ्या हिकमतीने  हा  आपला हिरो अखेर हिराॅईनला पटवायचाच  . मग आनंददायी संगीत वाजू लागायचे . 'धी एंड' या सोबत एक वाक्य यायचे "  नयी  शुरुवात"  खर तर 'सिनेमा अभी बाकी है दोस्तो'. कारण  आत्तापर्यंत आपण बघितलेला असतो तो असतो ट्रेलर.  लग्नानंतर दोन अगदी वेगळ्या घरातले, वेगळ्या पध्दतीने जगणारे , अगम्य स्वभावाचे दोघे एकत्र येतात आता मात्र ख-या अर्थाने सिनेमाला सुरवात होते. नंतरची कथा अधिक रोमांचक! सर्व नवरस ठासून भरलेले. कोणी सांगत नाही पण थोड्याफार फरकांनी सर्वांची सारखीच, तितकीच वेगळीही! आज पसारा नीट लावताना आसपास  घडणा-या घटना, थोडा तुम्हारा थोडा हमारा मांडणार आहे.करकरत्या आणि आंबटचिंबट हिरव्यागार  कैरीच्या फोडीसारखे हिरो हिराॅईन एकत्र येतात.प्रेमाचे स्निग्ध तेल पडते आणि लोणचे मुरायला ठेवले जाते.

                           मुरलेले लोणचे

          सनईचे सुर घुमतात.' शुभमंगल सावधान! 'सावधान'' 'सावधान''सावधान'  भटजी महाशय आपल्या कमावलेल्या आवाजात परतपरत बजावतात. पण तिकडे लक्ष द्यायला नवरा,नवरी रामदास स्वामींसारखे द्रष्टे मुळीच नसतात. त्यामुळे एकमेकांच्या गळयात  वरमाला घालून ते  मोकळे होतात.जेवणावळी संपतात. नावासहित ती बदलते. नवे घर, नवी माणसं आणि सगळ्यात महत्वाचं ज्याच्यासाठी सगळं सोडलं तो आपला माणूस. दोघंही  करकरीत कैरीच्या फोडीसारखे.रेखीव   आणि एकसारखे .   तो एकुलता एक. थोडासा लाडावलेला पण साधा. तीही तिच्या  माहेरच्या घरातली  परीराणी. लाडूबाई.
                 त्याला मनापासून वाटत असतं  जगातली सर्वात सुंदर, हुशार ,गृहकृत्यदक्ष पत्नी आपल्यालाच मिळाली आहे.पाच ऐश्वर्या  आणि सहा माधुरी दिक्षित  एकत्र केल्या तरी हिची बरोबरी ?छे छे शक्यच नाही.  तो  या विचारात मश्गुल! तिच्या स्वप्नाळू डोळ्यात तो कर्तबगार ,अति हुशार, दहा ऋतिक रोशन ओवाळून टाकावं असा हँडसम. दोघे एकमेकांवर एकदम खूश.  थोडे दिवस जातात .कैरीला  तिखट-मीठ ,मसाला छान छान लागलेला असतो.
           तिच्या मग हळूहळू लक्षात येतं, 'छे बाई हा फारच आई आई करतोय. प्रत्येक गोष्टीत आईला कशाला  विचारले पाहिजे?" मनात नोंद घेतली जाते .त्या नव्या दिवसात त्याच्यावर रागवणे शक्य नाही म्हणून त्याच्या आईवरच थोडा राग निघायला लागतो.स्वयंपाक घरांत भांडी थोडी जोरांत वाजू लागतात. त्यालाही वाटतं ही उठसूठ  सारखी माहेरीच काय जाते? मग  तोही थोडा वैतागायला लागतो. तिच्या लक्षात येतं हा जरी आपल्या भोवती, भोवती करत असला तरी आपल्याला अनेक सवती आहेत.नंबर एकची सवत म्हणजे त्याचे मित्र त्यांचा पत्त्यांचा ग्रुप, त्याचं तिला सोडून ट्रेकिंगला जाणं! .अजून घरात लहान बाळ नसल्याने  त्याच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवण्याची तिची इच्छा. त्याच्यावर कोणी अधिकार दाखवला की तिचा तडफडाट. तिच्या अजून लक्षात येऊ लागते आपल्याला वाटला तेवढा काही हुशार नाहीये.  डॅशिंग तर अजिबात नाहीये . किती तरी अव्यवस्थित!  कंजूस क्रमांक एक! तो देखिल विचार करत असतो ,कसली आळशी आहे ही बया, सकाळी कधी म्हणून वेळेवर उठत नाही. जरा मित्रांबरोबर गेलं तर हिची आदळ आपट सुरू!  तिखट मिठ मसाला लावलेल्या कैरीच्या फोडी आता घुसमटत असतात.त्यांच्या कडा सारख्या एकमेकांवर घासत असतात.
               एकदा कधीतरी स्फोट होतोच. तू तू मी मी चा खेळ रिंगण धरतो. जणू गोल गोल राणी,इथे इथे पाणी
 तो.--समजतेस कोण स्वतःला. तुझ्या पेक्षा सरस  छप्पन मिळाल्या असत्या------------
ती - मग करायचे होते त्या छप्पन जणींशी लग्न आणि बसायचं होत आपल्या जनानखान्यात हुक्का पित! तुझ्या अव्यवस्थित पणा पासून माझी सुटका झाली असती.
तो------
ती------'
धडाsssम. धुsssडूम जोरदार लक्ष्मी तोट्यांची आतिशबाजी 
  सुरु!. आता खबरदारी घ्यायची असते पाणी डोक्यावरून  न जाण्याची!मग नशिबाला दोष देणे ,अश्रुपात इत्यादी कार्यक्रम सर्व ठरल्याप्रमाणे होतो.रागावून तो घरातून जातो मग मात्र ही काळजीत पडते रात्री उशिरा  तो परत येतो पण अजून घर धुमसतच असते. दोन दिवसाने आठवणीने तो तिच्यासाठी भेटवस्तू आणतो, आणि ती खास त्याच्या आवडीचा पदार्थ करते.त्याच्या किंवा तिच्या  विरोधात जर कोणी ब्र काढला की मात्र दोघेही 'हातोमे हात' लेकर सज्ज! .लढाईचा पवित्रा घेऊन.मग विरोधकांची होते पळता भुई थोडी. आता कैरीच्या फोडींवर स्निग्ध तेलाचा तवंग चमकू लागतो.कैरीच्या फोडी शांत होतात. कधी कधी मात्र तिचा मित्र किंवा त्याची मैत्रीण  उगाचच संशय पिशाच्च  निर्माण करतात.कधी इतर 'षड्रिपू ' डोके वर काढतात. अशा अवघड परिस्थितीमध्ये आठवायचे भटजींनी बजावून सांगितलेले  'सावधान'.वेळ कसोटीची असते. 'सावधान'चा भटजींनी दिलेला इशारा आठवून सावध व्हायची हीच वेळ.नाहीतर लोणच्याला बुरशी येणारच.मग टाकण्या शिवाय इलाज नाही.असेच कधी तरी दोघांच्या इगोच्या टक्करीत होते.कुणीच मध्यम मार्ग शोधत नाही आणि लोणचे पूर्णतः नासते.
               बाळाची चाहूल लागते घरकाम नोकरी आणि आता बाळाची जबाबदारी वाढते. अपेक्षा एकच याने थोडीशी मदत करावी. तो शहाणा  असला तर मदतीचा हात पुढे करतो. बाळाला सांभाळतो. रात्री जागतो सुध्दा. ती मात्र कामाला एवढं जुंपून घेते की आपला दिवस चोवीसच्या ऐवजी छत्तीस तासांचा का नाही हे कोडं तिला पडतं.त्याच्यापेक्षा बाळात ती जास्त गुंतत जाते. सर्व आघाड्यांवर लढता लढता ती पूर्णपणे थकते. जर तो खुशालचेंडू असला तर एक छोटासा व्रण  त्याच्याबद्दल तिच्या मनात निर्माण होतोच.कधी कधी संसारात अडचणी येतातच. कधी आर्थिक टंचाई , कधी अकाली मृत्यूची सुनामी . त्याला मात्र दोघेही  एकमेकांच्या साथीने तोंड देतात.
 मधुनच मतभेदाचे लवंगी फटाके फुटत असतातच. पण त्यात पूर्वीच्या लक्ष्मी छाप बाँबचा धमाका नसतो. थोडा  रूसवा फुगवा पण असतो पण तेवढ्या पुरतेच.  लोणच्यातील कैरीच्या फोडी धड करकरीत नाही अन् धड मऊ नाही अशा.
           मुले मोठी होतात दोघांच्यात संवाद जरा कमी झाला असतो. पण इतक्या दिवसात एकमेकांची इतकी सवय झाली असते की तरुणपणी डाचणारे त्याचे मित्र, अव्यवस्थितपणा याचा इतका त्रास होत नाही. त्याच्या आईचा  पण आता राग येत नाही. दोघींच्यामधे वेगळाच बंध तयार होऊ लागतो.  तो मुलांचा अभ्यास तर घेतोय, मुलीला क्लासला सोडतोय याचं कौतुकच वाटतं. अधुन मधुन  शब्दांचे फटाके उडतात पण बरेचसे फटाके फुसकेच असतात .त्यात पूर्वीचा दम नसतो.कोणीच फारस मनावर घेत नाही.  कैरीच्या फोडी आता थोड्या मऊ. वर लालेलाल खार! तोंडाला पाणी सुटेल असा.
            मुलं आपापल्या घरट्यात जातात.घरातले वडिलधारेही एक एक करून न परतीच्या प्रवासाला जातात. जिथून सुरु झाले तिथेच वर्तुळ पूर्ण होतं सिनेमा संपत आला असतो. आणि नव्याने सुरू होतं नव आयुष्य! ते दोघंच आता. एकमेकांच्या कुठल्याच गोष्टीचा त्रास होईनासा  होतो. आणि उरते एकमेकाबद्दल  प्रचंड काळजी आणि आत्मियता . मैत्रिणींनी किंवा मित्राने बोलवले तरी एकमेकांना सोडून जायला नको नको वाटू लागतं. औषध घेतलं की नाही, ते रात्री झोप का नाही लागली तिथपर्यंत नुसती काळजी! अर्थात भांडण हे जन्मसिद्ध हक्क असल्याने आता फक्त फुलबाजा तडतडतात पण तेवढ्याच! आता तुझं माहेर, तुमचे आई-वडील, या विषयातला रस पूर्णपणे संपला असतो. आता त्याच्या  नुसत्या 'हू' मधला  सर्व अर्थ तिला कळतो तर तिच्या आईsग या उच्चारातल्या तिच्या वेदना त्याला समजतात. 
       लोणच्याची बरणी उघडली तर मस्त खमंग वास सुटलेला असतो हिंग, मेथ्या, मोहरी घमघमत असतात.वर लालेलाल तेलाचा खार!   खाली मऊ आतपर्यंत तिखट-मीठ मसाला मुरलेल्या फोडी एकमेकांना खेटून बसलेल्या असतात आणि सर्वजण म्हणतात वाssss लोणचं छान मुरले हो!

शुक्रवार, ५ जून, २०२०

(वि)स्मरण

माझी आई शिक्षिका.अगदी हाडाची! कधीही  मी माहेरपणाला गेले की ती असायची विद्यार्थ्यांच्या घोळक्यात. मला थोडा हेवाच वाटायचा.वयाच्या नव्वदीपर्यंत ती  गणिताचे रायडर्स सोडवत बसे. पण एवढी हुषार आई , कुठेही निघाली की रस्ता मात्र चुकणार म्हणजे चुकणारच. कित्येक वेळा रस्ता चुकून भलत्याच भागात आमची वरात जाई. आईच्या या गुणाने(?)एकच फायदा झाला सारे गाव अगदी कोपरा न कोपरा आम्हाला माहीत झाले. त्या उलट वडिलांचे. सा-या रस्त्याचा नकाशा नव्हे, महाराष्ट्रातील सर्व रस्ते गल्ली बोळांसहीत त्यांच्या डोक्याच्या काॅम्यूटरमधे फिट बसले होते. वडिलांचे रस्ता लक्षात ठेवण्याचा गुण   किंवा आईचे गणिती डोके न घेता तिच्यासारखे ठरावीक  गोष्टींचे विस्मरणच वारसाहक्काने मला मिळाले आहे.चला या (वि)स्मरणाच्या 'आठवणींचा(?)' पसारा आवरुन नीट ठेऊ या.



(वि)स्मरण©️

सिनेमा थेटर खचाखच भरलेलं.  गाजलेला सिनेमा होता तो. वीस वर्षांपूर्वी कुंभमेळ्याच्या जत्रेत 'बिछडलेले' भाऊ एकमेकांसमोर येतात. सुरुवातीला त्यांच्यात गैरसमजातून माफक मारामारी  ढिश्शुम ढिश्शुम वगैरे होते. पण नंतर एकमेकांचं रक्तबंबाळ शरीर बघितल्यावर दोघांनाही एकदम साक्षात्कार होतो आणि 'ये तो अपनाच खून है'!  झालं! मग जोरजोरात देवळात घंटानाद होऊ लागतो.शंख ध्वनी त्याला साथ देतो. झाडे , पर्वत मनसोक्त डोलू लागतात.जणू ब्रह्मांड ता था थै करतंय.  लगेच भाsssई,छोsssटू असा पुकारा करत या दोघां बिछडलेल्या बछड्यांचा मिठ्या मारण्याचा कार्यक्रम पुढील दहा मिनटे चालतो. आणि इकडे थिएटर मध्ये शिट्या आणि टाळ्यांचा पाऊस!.ताई माई अक्का  हुंदके देत देत अश्रूंनी ओलाकच्च झालेला पदर परत परत पिळतात. माझ्या दृष्टीने मात्र ते दोघेही नायक ,बंधूराज आता मर्त्य मानव ते देवता असे पदोन्नत होतात . आता असे बघा अंगभर एवढ्या जखमा असूनही, भले त्यातून ऑरेंज कलरचे रक्त( हिन्दी सिनेमांनी ज्ञानात घातलेली भर म्हणजे रक्त शेंदरी ते गुलाल यातील कुठल्याही रंग छटांचे असू शकते.)  वहात असूनही एकमेकांना केवळ रक्ताचा थेंब बघून पटकन  ओळखणारे हे, सामान्य माणसं असतीलच कसे?त्यांचे हे असामान्यत्व  बघून मीही एकदम गहिवरते. वा काय भन्नाट स्मरणशक्ती  आहे त्यांच्या रक्तबिंदूची.त्यां बंधूद्वयांचे अफाट कौतुक  वाटायच कारण माझा विसराळू पणा.
.           विसराळू माणसं,वस्तू विसरतात. या पुढच पाऊल म्हणजे गप्पांच्या वा शाॅपिंगच्या  नादात आपल बाळ सुध्दा विसरतात. पण मी अख्खा माणूस विसरते. अहो दिवसेंदिवस पाहिलेला माणूस जर त्याची जागा आणि गणवेश बदलून आला तर हा कोण आहे 'वह कौन है' ?हे भले मोठ्ठे प्रश्न चिन्ह माझ्या डोक्यात इकडे तिकडे हुंदडू लागतं. माणसात झालेला थोडासाही बदल अगदी पेहराव ते मिशी कशातही असो पण माझ्या इटुकल्या मेदूला पेलवत नाही .
        काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा  कुरियर पेक्षा पोस्टमनची खूप चलती होती. आमचे रोजचे पोष्टमन काका  'डॉक्टर' म्हणून हाक मारायचे आणि पत्राचा गठ्ठा हसत हसत देऊन सायकलवर टांग मारायचे. त्यांचा तो खाकी ड्रेस आणि आणि लाल पट्टी लावलेली खाकी टोपी.  एकदम  प्रेमळ .मुलांचा वार्षिक  रिझल्ट त्यावेळी पोष्टाने  यायचा. हातात रिझल्ट देऊन पोष्टमन काका तिथेच घुटमळायाचे. माझ्या खुललेल्या चेहऱ्यावरून माझ्या मुलांचे घोडे गंगेत न्हायले  हे  लक्षात आल्यावर  आशीर्वाद देत 'पास झाली का' अस म्हणत सायकलवर  टांग टाकित.  एकदा दौंड स्टेशन वर ते मला भेटले. अर्थातच नेहमीचा गणवेश अंगात नव्हता,जागाही सोलापूर चे माझे घर नव्हती तर दौंड स्टेशन होती. त्यांच्या अंगात सदरा आणि पायजमा होता ."काय डॉक्टर इकडे कुठे?" आता आली का पंचाईत. एवढ्या भिन्न  वातावरणात त्यांना ओळखणार तरी कसे?चेहरा तर ओळखीचा वाटतोय पण हा गृहस्थ कोण हे काही केल्या लक्षात येईना.मेंदू उभा ,आडवा , तिरका खाजवला पण मेंदू मद्दच! " मी ना गावाला चाललेय" इति मी. काहीतरी बोलायचं म्हणून मी वाक्य टाकले ."छान छान,मी बहिणीला सोडायला आलतो . यदुळा लेकरांचा रिझल्ट कोण घेणार? म्हणजे रिझल्ट घ्यायला तुम्ही नाय तर"  त्या क्षणी युरेका युरेका युरेका! परवलीचा शब्द, 21 तोफांची मानवंदना हे सगळ सगळ कोणीतरी मला देत आहे अस वाटू लागले.  डोक्यातलं सर्किट पूर्ण झालं आणि पोस्टमन काकांची प्रतिमा डोक्यात उमटली . अहाs हा मी व्यक्ती ओळखली. सारे ब्रम्हांड टाळ्या वाजवत आहे असे वाटू लागले. 
             पेशंट, त्यांच्या तब्येतीच्या कुंडल्या , जन्म इतिहासा सहित  मला तोंडपाठ असतात. पण त्यांचे आई-वडील चुकून सुद्धा माझ्या डोक्यात इवलासा सुद्धा ठसा उमटवत नाहीत.नवे जुने लेख,पुस्तकातील उतारे कित्येक  वर्षे डोक्यात ठाण मांडून  बसतात. पेशंटचे  रिपोर्ट एक महिन्यानंतर सुद्धा आठवत असतात पण माणसे आणि रस्ते याबाबतीत पूर्ण बल्ल्या. माझा नवरा आमचं लग्न ताजं ताजं असताना, कोणी भेटला तर उत्साहाने मला विचारायचा "काय गं ओळखलस की नाहीस यांना?" पण जेव्हा मी आत्मविश्वासाने  कुलकर्णींना शहा, शहांना कांबळे,आणि कांबळेंना खान बनवून विश्वात्मकता साधायचा सपाटा लावला तेव्हा पुढचा धोका ओळखून त्याने असली कोडी घालणे पूर्णतः  बंद केले.  आता तर तो इतका तयार झाला आहे की  एखादा माणूस  त्यांच्या नावासहित मी बदलून टाकला तरी नवरा मला ओरडत नाही. "तुझ्या डोक्यातल्या वायरिंग मधला फ्युज उडाला आहे . तू तरी काय करणार "असा एक   दीर्घ सुस्कारा सोडून आकाशाकडे बघत तो म्हणतो. मला माणसाचा चेहरा लक्षात  रहात नाही हे शरणागतीचे पांढरे निशाण मी केव्हाच त्याच्यासमोर फडकावले आहे.
             काही हिंदी सिनेमात फक्त नायक सोडून समस्त जन, म्हणजे नायिका,  खलनायिका, उपनायिका, सहनायिका, सह नायक आणि समस्त मंडळी  माझ्यासारखेच माणसं लक्षात ठेवण्याच्या बाबतीत बाबतीत 'मठ्ठ 'असतात .नायकाने नुसता गालावर काळा तीळ लावला  किंवा मिशी लावून तो आला  तर गंमत म्हणजे त्याला ओळखणे तर सोडाच पण खलनायक  आणि त्यांच्या पिल्लावळींना तो एकदम 'अपनाच आदमी' वाटू लागतो.या उलट नायिका आणि सख्या केवळ मिशी आहे या कारणास्तव नायकाला ओळखायला ठाम नकार देतात. स्वतःची ओळख हिराॅईनला करून देतादेता हिरोची मग भंबेरी उडते. नायिकाही  सारखं  नायकाला हाडतूड करत असते.अखेर आपला नायक आपली मिशी काढून किंवा तिळ काढून 'वो मैच हूॅ '  अशी तिची खात्री पटवतो आणि मग ती गोड गोड हसते . चला म्हणजे माझ्या डोक्यातल्या वायरींग पेक्षाही त्या सिनेमाच्या डायरेक्टरच्या डोक्यातील वायरिंग, नायिका, सहनायक, उपनायिका आणि समस्त काम करणाऱ्या लोकांचे वायरिंग हे 'एकदम डबडा' आहे याचाच आनंद मला जास्त होतो. 'भला उनका डोका मुझसे भी जादा विसराळू'! मग माणसं लक्षात न रहायचे दुःख मी सहन करते.
          आमच्या घरी मुलांनी माझ्या विसराळूपणाचे ग्रेड्स केले आहेत. कधी कधी फारच मोठे घोटाळे  उडतात .घरी फ्रिज दुरुस्त करायला आलेल्या मेकॅनिकला ,माझ्या थोरल्या मुलाचा मित्र समजून जेवायचा आग्रह मी करू लागले . तो बिचारा आलेला मेकॅनिक कुठून पळून जावे हा मार्ग शोधायला लागला . आणि हे माझ्या मुलाच्या लक्षात येताच चपळाईची कमाल करत त्याने ही 'केस' हातात घेतली आणि मी यशस्वी माघार! थेट माझ्या खोलीत.
   सर्वात जास्त मी घाबरते ' काय ओळखलं का मला' या प्रश्नाला.  एक तर चक्क नाही म्हणणे किंवा मेंदू शिणवणे एवढेच पर्याय  समोर असतात. पण एकटी फिरायला निघाले की मी     भूमातेच्या एवढी प्रेमात पडते की नजर वर करतच नाही.परत ओळखलं  का? हा प्रश्न कानावर यायला नको.यावर उतारा म्हणून काही खुणा लक्षात ठेवायचा यत्न करतेय जसे शर्ट,टक्कल पण दुर्दैवाने मी लक्षात ठेवलेला शर्ट सगळ्यांच्याच  अंगात  दिसू लागतो. सारी कायनात  मेरे खिलाफ हो जाती है!
               अर्थात  या ठरावीक  विस्मरणाच फार दुःख करायला नको. जिथे दुष्यंत राजा आपल्या प्राणप्रिय प्रियेला शकुंतलेलाही विसरला आणि अखेर एका इटूकल्या अंगठीने किमया करून दोघांचे मिलन घडवून आणले तिथे माझ्या सारख्या सामान्याचे काय?. मला पण परवलीचा शब्द किंवा क्लू लागतोच.या विसराळूपणावर उत्तमोत्तम विनोद निर्मिती  झाली आहे आणि पुढेही होत रहाणार आहे. त्यातील खारीचा वाटा मी उचलते आहे एवढेच.
           माझी इटालियन  मैत्रीण  जेव्हा मला म्हणाली ,"अग सगळे इंडियन  सारखेच दिसतात,फरकच कळत नाही. " व्वा माझीच समानधर्मी!.फरक एवढाच, मी, गोरे काय, काळे काय किंवा पिवळे काय मला ते क्लोन्सच वाटतात त्यामुळे सगळ्यात तेवढाच घोळ  मी घालते.त्यामुळेच आपली मेंढरे किंवा म्हैस कळपातून ओळखणारे धनगर वा गुराखी मला आईनस्टाईन पेक्षा जास्त हुश्शार वाटतात.
            आता फक्त एकच  विनंती श्री. इंद्र देव, चित्रगुप्त आणि यमराजाचे फोटो कुणाकडे असल्यास त्यांनी मला जरूर द्यावेत.
. मी ते डोळाभरून पहाणार आहे. एवढच नाही तर डोळापाठ  करणार आहे म्हणजे स्वर्गात  वा नरकात गेल्यावर इंद्राला चुकून 'हॅलो यमराज' आणि यमाला हाय ऋतिक! अशी हाक मारायला नको, आणि रागावून त्यांनी  पुढच्या जन्मी परत 'विस्मरणाचा' 'डब्बल शाप'   द्यायला नको.