मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०२१

रंग©️

                      निसर्ग  नुसताच चितारी नाही तर  बेलाग जादूगारच आहे. क्षणाक्षणाला त्याचे हे जादूई प्रयोग सुरूच असतात. सतत आपले आश्चर्याचे धक्के देणं चालूच असत बेट्याच !  स्वच्छ , दुधी, चमकदार प्रकाशकिरण एका रेषेत पळत ऐटीत पाण्याच्या थेंबात शिरतो काय अन् दुस-या बाजूने वाकडा होऊन बाहेर पडतो  तेव्हा त्यात लपवलेले सप्त रंगाचे भांडार पसरलय याचं वेड्याला भान कुठे असते? आपण मात्र हा सप्तरंगी पिसारा बघून विभोर होतो. रंग म्हणजे निसर्गाचे रत्न भांडारचं! या सात रंगातील ते तीन मुख्य रंग! एकमेकांत मिसळले की नवा रंग तय्यारच. प्रमाण थोड कमी जास्त केल्यावर द्रौपदीला मधूसुधनाने पुरवलेल्या अनेकरंगी वस्त्रांसारखेच रंग तय्यार.

       लालचुटूक रंग तसा रूधिराचा रंग त्यामुळे हे लालसाहेब थोडे उग्र चिडलेले . कायम युध्द ,बळी असल्या मंडळींशी यांची जवळीक.भडकपणा यांचा स्थाईभाव.कधी कधी हा रंग रक्तस्राव रूपात समोर येतो तेव्हा भल्याभल्यांचे होश उडतात.या रंगाच्या गडद छटेवर डाॅक्टर मात्र खूष! गो-या, काळ्या,पिवळ्या तपकिरी या कुठल्याही रंगाची कातडी असो त्या खाली वहाणारे रंक्त लाल.आपल्या नीलरक्ताचे कौतूक करणारेही याला अपवाद नाहीत.

       गजाननाच्या लंबोदरावर बसलेला लालेलाल जास्वंद मात्र त्या गौरीपुत्राच्या देहावर बसून आपला भडकपणा सोडून एकदम मवाळ  होतो. देखण्या गणरायाचे सर्व अनिष्टांना उदरात नष्ट केल्याने झालेले गरगरीत उदर आणि त्यावर विराजमान टचटचीत लालभडक जास्वंद.अहाsssइतके राजस दिसतात नं बाप्पा!

       या रंगाच्या उग्र स्वभावाला न शोभणारी कोवळी, सुखद छटा आहेच. रमणीच्या मृदू , कमानदार ओठांवर ,गालावर जेव्हा स्वारी विराजमान होते तेव्हा भल्याभल्यांचा विश्वामित्र होतो. अशा सुंदरीला फुल द्यायच ते पण लाल भडक कळीदार गुलाबाचेच. 

   खर तर प्रेमाचा रंग आहे गुलाबी पण प्रेमभेटीला दिलेला लालबुंद रंगाचा गुलाब भाव खाऊन जातो. आपल्याला मिळणा-या प्रत्येक लाल गुलाबाबरोबर ती रमणी मात्र आपल्या कटाक्षाने सर्वांची ह्रदय रक्तबंबाळ करत असते. लाल रंगाला आपण कितीही भडक म्हणून दूर्लक्षले तरी बालकांचा तो सर्वात लाडका रंग आहे. अनेक रंगाची खेळणी पलटण म्हणून समोर उभी केली तरी बिटबीट डोळ्यानी त्याकडे बघत बाळ निवडतो फक्त लाल खेळण.तस पाहिले   तर हा लालेलाल लालबाबा तांबारलेल्या रंगेल आणि तापट डोळ्यात मुक्काम करून खूष असतो म्हणा..

  कलींगडासारख्या फळाच्या ताबा या लालसाहेबांनी घेतल्याखेरीज त्यात गोडी कुठली यायला? असा शौर्य,  क्रौर्य, रंगेल पणा , लज्जा, संताप आणि गोडी दर्शविणारा लाल रंग. याचे सारेच विरोधाभास.

  लाल रंगात किंचित पिवळा मिसळत नेला की तय्यार  केशरी रंग. कुणी याला नारिंगीही म्हणतात.स्वाभिमानाने , शौर्याने तळपत आत्मसमर्पण करणारे 'केसरीया' आणि आगीच्या उफाळणा-या लाल केशरी ज्वाळेत जोहार करणा-या कुलवंत याच रंगाला लपेटतात .यांत कोण कोणाचा मानमरातब वाढवतो हे ठरविणे अवघडच. जरीपटक्याचा भगवा आपल्या इतिहासाचा मानबिंदू. आकाशाच्या निलिम्यावर लखलख भगवा जरी पटका क्या बात है! मनामनात शिवरायांच्या शौर्यगाथेची आनंददायी उजळणी होते.अभिमान रोमरोमातुन ऊतू जातो.

           रसदार संत्री याच नारिंगी रंगाची.रंगापासून चवीपर्यत मोहकच मोहक पण हिरव्यागार मध्यम उंचीच्या झाडावर जेव्हा ही केशरी वाटोळी संत्री बहरतात तेव्हा ते झाड या मर्त्य जगतातील न रहाता एकदम स्वर्गीय झाड होते. नारिंगी रंगातील देखणी झाड आणि मधनच चमकणारी हिरवी पाने.मैनू तो मर जावा!

                    पिवळा मैत्रीचा रंग. सुखद , लख्ख,उबदार, आश्वासक!उगवतीची आणि मावळतीची सोनकिरणे. कुबेराचे भांडार लुटून पृथ्वीवर पसरलेला सोनसडा.केवड्याचा पिवळा धम्म. सोन्याने त्याच्या लखलखत्या पिवळेपणाचे घातलेले गारूड  मिटताच मिटत नाही. मनावर चेटूक करणारी रसरशीत पिवळी धामण. ती सळसळायला लागली की नजरबंदी झालीच म्हणून समजा. कांचनमृगही अस्साच सोनसळी  असावा . निश्कांचन अवस्थेत वनवासाला गेलेल्या सितामय्यालाही या पिवळ्या मोहापासून सुटका नव्हती.नाहीतर सीतामय्याला त्या कांचनमृगाचा मोह  कां पडावा? लग्नात तर हळदीने अधिकच लखलखणारी नववधू मामा ने दिलेली अष्टपुत्री नेसून अंतरपाटा पलीकडे उभी रहाते तेव्हातर तिच्याभोवती समई सारखाच इवलासा पिवळा प्रकाश पसरला आहे असे वाटू लागते.

         नीळा आणि पिवळा रंग झिम्मा फुगडी खेळून  गळ्यात गळे घालून बसले की दिमाखदार प्रवेश होतो हिरव्या रंगाचा. कधी पिवळा शिरजोर तर कधी निळा! मग काय हिरव्याच्या छटाच छटा तय्यार. इतक्या छटा असलेल्या या सम हाच !हिरव्याच्या छटा तरी किती! पश्चिम घाटातील एका झाडाचा रंग दुस-यासारखा असेल तर शपथ.! किंवा वसंतात कुतूहलाने डोकावणारे बालपालवीच्या छटा बघाव्यात.सगळ्याच भिन्न आणि भन्नाट. पाचूचा  रंग हिरवा. सर्वव्यापक हिरवा.शांत. डोळ्यांनाच नव्हे तर तनामनाला सुखावणारा. थंड करणारा.कुठल्याही रंगाची किंवा वास्तुची शोभा वाढवायची असेल तर हिरव्या या समृद्ध रंगाला तिथे स्थान द्यायचे.ती वास्तू कितीही साधी असो त्या हिरव्या रंगाची जादू होताच प्रासादतुल्य होते.ह्या हिरव्याची आस ही वेगळीच  त्या भल्या थोरल्या वाळवंटाला विचारा हिरवी तहान काय असते ते! कधी कधी मात्र पिकल्या पानाचा हिरवा देठ त्याची आणि इतरांचीही फजिती करतो.

        या उलट देवतांची प्रचिती देणारा रंग आहे निळा. चमचमता अफाट दर्या असो नाहीतर निळ्या अभाळाचा घुमट , त्या रंगाकडे नजरेत न मावणा-या व्याप्तीकडे बघताना विश्वरूप दर्शनच होते. मंत्रोच्चारासारखी खर्जातली, निळ्या समुद्राची गाज देवत्वाची प्रचिती देते. निळ्या रंगाला देवत्व देतात ते अंगभर त्या रंगात रंगलेले आपले देव. हसरा खोडकर  घननीळ बाळकृष्ण, एकवचनी नीलवर्णी पुरुषोत्तम श्रीराम, नीळकंठ शंकर आणि गळ्यात धवल पार्वतीचा कोमल हात, निळा सावळा विठूराया,निळ्या रंगातील सर्वसंहारक कालीमाता या निळ्याचे प्रतिनिधीच जणू.कधी कधी हा नीलबावरा डोळ्यात स्वार होतो.तर कधी फुले पक्षी फुलपाखरांतून परत शिव सुंदरतेची प्रचिती देतो. 

        निळा आणि लाल यांनी संधान साधले की पारवा आणि जांभळा आलेच. निळ्याला आणि लाल रंगाला थोडी कसरत करावी लागतेच म्हणा नाहीतर एकदम गडद जांभळा हजर. छान तोल साधला तर पारवा रंग आहेच. दोन्ही रंग सुखद. त्यातून पारवा रंग हा मला कायम कुठल्यातरी शापित राजकन्येचा रंग वाटतो. अती देखणा पण दुर्लक्षित.जांभूळ आणि रसरशीत भरताची वांगी यात चमकदार जांभळा रंग खुदखुदतो.कधी कधी गो-यापान देहावर कद म्हणूनही तो साजिरे दिसते.

                   .

           असे अनेक रंग !अगदी तानापिहीनीपाजा पर्यंत. परत त्यांची सरमिसळ आणि तयार होणारा नवाच रंग. आनंददायी उत्फुल्ल मनावर चेटूक करणारे पण----- सर्वात सुंदर म्हणजे यांचा निर्माता सर्व समावेशक श्वेत   रंग. शांत,विचारी, प्रत्येकाला खास व्यक्तिमत्व बहाल करणारा पांढरा! सात्विक, वैरागी! मात्र केसात हे पांढरेराव पहिल्यांदा मुक्कामाला आले की  भल्याभल्यांची भंबेरी उडते. वाराणशीला मात्र तेथिल कृष्णभक्त परित्यक्ता  त्या सफेद वेषात बघून मनावर जे मळभ आले ते अजूनही ओसरले नाही. तसेच रोहिणी नक्षत्रापासून जर आकाश पांढूरक्या ढगांनी भरू लागले की बळीराजाचा चेहरा पांढरा फटक पडतो.

       काळा रंग म्हणजे सगळ्या रंगाची गिचमिड.नुसते तीन प्राथमीक रंग गप्पा मारायला एकत्र आले की  गुढतेच भल मोठ्ठा वलय असलेला काळा रंग तयारच!. या रंगाची जादू  बदनाम आणि भयकारी !  काळी जादू नकोशी, अंगावर सरसरून काटा आणणारी.!!   विचारही कासाविशी  वाढवणारा.पण मग आठवते विष्णूदास नामांची रचना ' रात्र काळी , घागर काळी' हे काळ्यातील सौदर्य दर्शविणारे . रमणीच्या गौर मुखावरील काळा तीळ भल्या भल्याभल्यांची झोप उडवतो. बाळाला दृष्ट लागू नये म्हणून काळीच तिट्टी मिट्टी हवी नं? काळी शांत रात्र म्हणजे विश्रांतीची नांदी आणि नक्षत्रांची झुंबर  अधिकच लखलखतात अवसेच्या काळ्या रातीच !  काळे ओथंबलेला ढग म्हणजे अमृतकुंभच.

      अजंठ्यामधे एक फार सुंदर भीत्ती चित्र आहे. लवाजम्यासह राणी निघाली आहे.सा-या गो-या सेविका आणि त्यात उठून दिसणारी काळी अप्रतिम सुंदर राणी! अगदी द्रौपदीची आठवण यावी अशीच! काळ्या रंगाबद्दल आपल्या मनात असलेला दुजाभाव केवळ त्या दिडशे वर्षाच्या गुलामगिरीचे प्रतिक तर नाही ना?

     रंगाची खरच फार मोठी गंमत म्हणजे शुभ्र पांढ-याच्या पोटात सात रंग दाटीवाटीनी बसले असतात पण हेच सात रंग स्वतंत्रपणे एकत्र येतात तेव्हा ते धवल नसतात तर तयार होतो कुळकुळीत काळा रंग..पांढरा आणि काळा एकाच नाण्याच्या दोन बाजू. दोन्हीही समतोल  राखणारे एक दिवसासारखा उत्साही तर दुजा रात्रीसारखा गुढ!

    एक मात्र खरे. रंग जगाला सौदर्य बहाल करत असले तरी वास्तवदर्शी आहेत काळा आणि पांढरा रंगच,आणि त्यामधे पसरलेल्या कब-या छटा अगदी मानवी स्वभावासारख्या. जर पांढरा ते काळा हा प्रवास या राखाडी प्रदेशातून केला की आयुष्य ख-या अर्थाने जगलोय. काळा पांढरा आणि त्यांनी निर्माण केलेल्या अनेक राखाडी कब-या छटा आपले पाय जमिनीवरच ठेवतात एवढे मात्र खरे आता. आता इथे इतर रंगांचे महत्व संपते


सोमवार, ८ नोव्हेंबर, २०२१

जर तर©️

           एखाद्या  निखा-याने सर्रकन झटका बसावा आणि अंगावर कायमचा डाग पडावा तशा काही काही आठवणी असतात. विसरावे म्हटलं तरी शक्य नाही,नकळत लक्ष जातेच त्या डागाकडे.  अखेर सरकणारे दिवस,महिने,वर्षे त्यातील वेदना कमी करतात.  असं  जरी  वाटतं  असल तरी पुन्हा मनात सुरू होतो जर -तरचा गोफ! जर असं केलं असतं तर------ पण नंतर लक्षात येतं या जर तरला खरंच काही अर्थ नाही .झालेली गोष्ट होऊन जाते आणि आपला ठसा सोडून जाते .आज अशीच एकआठवण .

               

                         जर- - तर

©️

          जवळ जवळ चाळीस वर्षांपूर्वीची गोष्ट.मी नुकतीच बालरोगतज्ञ झालेली होते आणि छोटेसे हाॅस्पिटलही सुरू केले होते.  सुदैवाने प्रॅक्टीस  बाळस घेऊ लागली होती. प्रॅक्टिस करत होते ते गावही नेमस्त.  पुण्या-मुंबईच्या मानाने ब-याचदा अत्याधुनिक  सोई कमीच! पण पेशंटला पुरेसा वेळ देणे, त्याच्या आजाराचा सविस्तर इतिहास घेणे, त्याची व्यवस्थित तपासणी करूनच निर्णयाप्रत जाणे  त्यामुळे अंतिम निकाल बहुतेक वेळा चांगलाच येत असे. त्यावेळचे पेशंट  मुख्यत्वे पोलिओ, उलटी जुलाब, टायफाईड आणि क्षयरोग या प्रकाराचे असायचे.

      असाच एक दिवस! दुपारची वेळ. एक पोरसवदा स्त्री, जणू कालपरवा पर्यंत परकरात वावरणारी .जास्तीत जास्त सोळा सतरा वयाची. चेंबटलेली, फिकुटलेली ,अशक्त.त्या वयातील रसरशीत पणाचा लवलेश दिसत नव्हता. तिच्याबरोबरचा तो पोरगेलासा तरूणही अशक्त आणि रापलेला!  किंचित मळलेला पायजमा  त्यावर पांढरा सदरा आणि डोक्यावर गांधी टोपी.त्यांच्याबरोबर त्यांचं आजारी मुल असे ओपीडी मध्ये आले. ते खेड्यातून आल्यासारखे दिसत होते.दोघांचे वय अतिशय लहान त्यामुळे  ते पहिलेच बाळ असावे हा अंदाज आला.  दोघेही आले होते  विजापूर जवळच्या एका खेड्यातून. पत्नीला मराठी अजिबातच कळत नव्हतं. थोड थोड मराठी त्याला कळत होत. बाळाला बघितलं. साधारण सात महिन्याचे बाळ, उलटी जुलाबांनी अंगातला पाणी कमी झालेलं, कुपोषित, अंगावर अनेक ठिकाणी कातडी जंतुसंसर्ग. शक्यतो अंगावर पिणारे मूल  हे इतके कुपोषित असण्याची शक्यता कमी. तसेच त्याला इतक्या प्रमाणात जुलाब होण्याची शक्यताही कमी असते आणि त्यामुळे बाळ बहुधा  वरच्या दुधावर वाढतंय हा माझा अंदाज बरोबर आला. अत्यंत कळकट झालेली बाटली. बाटलीच्या निपल वर  झाकण नाही आणि त्यामध्ये अतिशय पातळ दूध. सर्व  स्वच्छतेचे निकष धाब्यावर बसविलेले. बाळाच्या आजाराचे उगमस्थान तर कळलं. बाळाला तात्काळ ट्रिटमेन्ट देण्याची गरज होती त्यामुळे त्याला ॲडमिट करून घेतलं.बाळाच्या गंभीर तब्येतीबद्दल  वडीलांना पूर्ण कल्पना देऊन सही घेतली. प्रतिजैविक, सलाईन आणि आहार बाळाला सुरू केला.कानडी येणा-या आमच्या आशाबाई बाळाच्या आईला स्वच्छतेचे, आहाराचे धडे देऊ लागली. सतत  दुर्मुखलेला चेहरा करून बसलेल्या आईच्या तीव्र इच्छेला जणू बाळाने प्रतिसाद दिला .अंगावरचे स्किन इन्फेक्शनही कमी होऊन बाळाचे जुलाबही आटोक्यात येऊ लागले.  उलटी जुलाबाचे पेशंट हे अंगातील क्षार आणि पाणी भरून निघतात टवटवीत होतात जणू पाणी घालताच टवटवणारे रोपच..बाळाचे  असेच झाले. आल्या आल्या डोळे फिरवलेल्या बाळाने तीन दिवसांनंतर , बघून हसायला सुरुवात केली होती. सात दिवसात बाळाच्या वजनातही वाढ दिसायला लागली. जेंव्हा  जेव्हा बाळाला मी तपासत असे , दर वेळेला त्या आईचा अशक्तपणा मला बेचैन करायचा. तरणीताठी सतरा  वर्षाची ही बाई पूर्णतः शुष्क जणू वठलेले झाडच.   तीच्या हालचालीही अतिशय संथ! 

           दहा दिवस झाले.  बाळाला आता घरी पाठवण्याची वेळ आली. बिल भरण्याची तजवीज करण्यासाठी बाळाचा बाबा गावाकडे गेला होता. आता हॉस्पिटलमध्ये इतर पेशंट बरोबर फक्त आई आणि बाळ होते. बाळाच्या बाबाचा गावाकडून फोनही आला होता. पैशाची तजवीज झालीये मी उद्या सकाळी येतो उद्या सकाळी डिस्चार्ज द्या.

         त्या रात्रीची गोष्ट. रात्रीचा राऊंड घेऊन वर घरी गेले होते साधारण दोन वाजता कर्कश्य पणे हॉस्पिटल मधून घरात वाजणारी बेल  किरss कीsssर वाजू लागली.  मला हाॅस्पिटल मधे बोलवताना घंटा फक्त एकदाच वाजवा मी येत जाईन असे मी सांगितले असतानाही इतक्या वेळा सतत बेल वाजवल्यामुळे जराशी मी वैतागलेले. वर घरात येताना तर सगळे पेशंट चांगले होते. कशाकरता बेल वाजवत आहेत हेच कळेना तरी धावत खाली गेले.  काहीतरी भयंकर घडलेआहे हे नक्कीच. आणि पाहते तो काय त्या बाळाची आई शेवटचे आचके देत होती. ती तरणीताठी पण अशक्त बाई आचके देत होती. ऑक्सीजन सुरू केला प्राथमिक उपचार करण्यासाठी सलाईन लावायला नस शोधू लागले त्याच वेळेला त्या बाईने शेवटचा आचका  दिला आणि तिने डोळे मिटले. नवी-नवी प्रॅक्टिस. बालरोग विभागात बालमृत्यू बघायची जरी सवय असली तरी बाळाचे नातेवाईकाचा अशा पद्धतीने मृत्यू  हेच अनपेक्षित होतं. तिला कार्डीयाक मसाज दिला. अॅडरिनलीनचे इंजेक्शनही दिले. उपयोग शून्य. 

             एका  जेष्ठ सर्जनला एवढ्या रात्री फोन केला. त्यांनी धीर दिला. पोलिसांना फोन केला होता . कारण अर्थात  अचानक मृत्यू! बाकीच्या पेशंटचे  नातेवाईक अतिशय घाबरले होते. दिलासा देणार तरी काय? पोलिस तेथे चौकशीसाठी आले.   स्पेशल रूम रिकामी होती त्यामध्ये बाकी पेशंट आणि नातेवाईकांना हलविले. त्या रात्री बाळाची आई झाले मी आणि आमच्या आशाबाई.त्याला बेबी फुड देणे, दुध देणे  आम्ही करत होतो.

      मृत झालेल्या बाईचे शवविच्छेदन करणे आवश्यक असल्याने दुसऱ्या दिवशी तिचा नवरा आल्यावरच ते करायचे ठरले. तो काळ मोबाईल फोनचा काळ नव्हता. रात्री त्याला गावात फोनही लागेना.  बाळाच्या वडिलांशी संपर्कही साधता येत नव्हता.रात्रभर सर्वच जागे. सकाळ झाली रोजची कामं सुरू झाली. वाॅर्डातच तिचे प्रेत एका पलंगावर झाकून ठेवले होते. 

         मग साधारण अकराच्या सुमाराला बाळाचा बाबा आला.पूर्णतः अनभिज्ञ! अतिशय आनंदाने, समाधानाने आणि कृतज्ञतेने त्याने मला नमस्कार केला. त्याला अखेर ती दुःखद  बातमी सांगण्याचे महाअवघड काम करावेच लागले.  त्याच्या चेहऱ्यावरचे भाव आजतागायत मी विसरू शकले नाही. आश्चर्य , दुःख, वेदना. तो धावतच वाॅर्डकडे गेला. पद्मा पद्मा तो  आक्रोशत होता , पण त्याला जाताना हसून निरोप देणारी त्याची पत्नी आता निपचित पडली होती.  अखेर शववाहिकेतून सिव्हील हॉस्पिटला प्रेत हलविले.कालपर्यंत पद्मा नावाच्या जीवंत व्यक्तीची , बाळाच्या आईच्या देहाची आजची ओळख होती 'प्रेत'.

           पोस्टमार्टम झालं .त्यात फुफ्फुसात क्षयरोग 

 आणि अतिशय कमी रक्तांनी तिचा घात झाला होता. हा प्रसंग प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर तीन ते चार महिन्यात घडला. खूप काही शिकवून गेला. हे काय झाले  या प्रश्नाने तेव्हा माझं डोकं पूर्ण पिंजून गेलं होतं .

  मग  मनात सुरू झाले जर आणि तर.  जर तिला मी बाळाबरोबर  तिच्या  तब्येतीच्या अनुषंगाने प्रश्न विचारले असते तर? फक्त बाळावर लक्ष एकवटताना जरी ती माझी पेशंट नव्हती तरी माझ्या पेशंटची आई तर होती न ! अशा अनेक शक्यता मनाला त्रास देत होत्या.

       मनाला अतिशय थकवा आला होता आणि मग लक्षात आलं की जर-तर  फक्त रेशमी साडीला शोभून दिसते. जर कुठल्याही घटनेबाबत इथे  आपण जास्त विचार करत बसलो तर त्यातून आपलीच अपराधी भावना वाढत राहते. कित्येकदा ती अनाठाई असते. त्यामुळे जर-तरच्या शक्यतेच्या मागे न जाता आहे ती गोष्ट स्वीकारणे महत्त्वाचे. त्यातून बोध घेणे सर्वात महत्वाचं.  








       

शुक्रवार, ४ जून, २०२१

कापूसकोंड्याची गोष्ट------©️

 कापूस कोंड्याची गोष्ट--  ©️


दोन तीन बिट्टी पोर आणि जराशी मोठी पण महा खट्याळ  त्यांची ताई, पत्ते खेळत बसली आहेत. पत्त्यांचा डाव आहे भिकारसावकार अगदी रंगात आलाय. जो पर्यंत  ताई सावकार होते आहे तोवर सगळाच आनंदी आनंद! अचानक एखाद नाक सुससुरणार धाकल, त्याची  डाव जिंकायला  सुरवात होते. नाक फराफर वर ओढत आणि मधनच बाहीला पुसत तो खुदखूदायला लागतो. ताईचे साठलेले पत्त्यांचे हात आता रोडाऊ लागतात मग ताईची थोडी चिडचिड ! ती मोठी अन् मुळातच चलाख.मग ती हुडकून काढते नवी  शक्कल. गोष्ट सांगायची.पत्ते बंद गोष्ट सुरू! आणि मग सुरू होते  गोष्ट! ! मोठ्या मोठठ्या ताणलेल्या उत्सुक  डोळ्यातून कुतूहल सांडू लागत.हळूच ताईला चिकटून सारे बसतात. ताईची खट्याळ नजर सगळ्या चिल्लर पार्टी वरून फिरते. ताई सुरवात करते " ए तुला कापूस कोंड्याची गोष्ट सांगू?" मग एक कोवळा आवाज येतो " होsss सांग न!" ताईच्या चेह-यावर हास्य,  गंमत , फजिती केल्याचा आनंद स्पष्ट दिसतो. लगेच ती म्हणते " होssसांग ना काय म्हणतोस? कापूस कोंड्याची गोष्ट सांगू? धाकटा चिरडीला येतो.तो रागावून काही बोलला की तेच वाक्य आणि कापूस कोंड्याची गोष्ट सांगू हे पालूपद जळवेसारखा त्याला चिकटून बसते. सर्वच धाकटे आता वैतागलेले आणि  बैचेन! हा राग ही बैचेनी डोळ्यातून टपटप गळू लागते. 

          जवळजवळ सर्वच या कापूसकोंड्याच्या तावडीत एकदा सापडले की पूर्ण डोक पिंजून काढेपर्यंत हा कापूसकोंड्या सोडत नसे. राजा विक्रमादित्याच्या मानगुटिवर बसलेला वेताळ एकवेळ परवडला. त्या वेताळाच्या प्रश्नाचे उत्तर दिल्यावर ते विकट का कसले हास्य करीत शिर्षासन करायला ,झाडावर उलटे लोंबकाळत झोके घ्यायला तो मोकळा.उत्तर माहीत असून विक्रमादित्याने दिलेच नाही उत्तर तर  हा वेताळ ,राजाच्या  डोक्याचे  तुकडे तुकडे, सॉरी, साॅरी शकले आणि तीही हजारो करायला तत्पर! दर्यावर्दी  सिंदबादच्या मानेवरचा म्हाताराही असाच बसतो पण चतूर सिंदबाद त्यापासून बरोब्बर सुटका करून घेतो. पण कापूसकोंड्या पासून सूटका? छे छे शक्यच नाही.एकदा चिकटला की चिकटला.

             लहानपणी वाटायच हा कापूसकोंड्या नक्कीच फिकुटल्या बदामी रंगाचा खरबरत्या अंगाचा,पांढ-याधोप लांबचलांब कापूस केसाचा दुष्ट आजोबा असणार. मला याबद्दल खात्रीच असायची.मुलांना छळणे हाच एकमेव उद्योग असणार त्याचा. त्याची गोष्ट म्हणजे आपल्याच सावलीने ताडकन उठून आपल्यावर वार करणेच जणू ! अगदी आपल्या जवळच्या आवडत्या लोकांना  फितवायचा तो. मोठ्या बहीणीने कापूस कोंड्याची गोष्ट सुरू केली की मी शांतपणे आईच्या पदरात स्वतःला गुरफटुन घेई.कामात गुंतलेली आई धपाटा घालत असे पण कापूसकोंड्या पुढे तो धपाटा म्हणजे एखादे बक्षीस वाटे ! लहानपणी वाटायच भेटू दे हा कापूसकोंड्या एकदा, त्याला शाप देऊन त्याचा दगडच करून टाकिन. अर्थात  त्या त्या वयात वाचलेल्या परीकथांप्रमाणे त्याला मी मनातल्या मनात शिक्षा द्यायची.

          वय वाढले. मी डाॅक्टर झाले तरी अधूनमधून कापूसकोंड्या भेटतच होता आता नवनवीन वेषांतरात. पण मुळ दुष्टावा तसाच. आपल्या उत्तरालाच प्रश्न  बनवून हा आपली पाठ सोडायला काही तयार नाही.

        हळू हळू लक्षात यायला लागले अगदी अनंत काळापासून हा खवट कापूसकोंडा महाराज छळतोच आहे. अफ्रिके मधली आपली आदी स्त्री आपली पूर्वज माता आणि पृथ्वीतलवार फक्त उरलेले दहा हजार होमोसॅपिअन्स ! अतीशय अवघड अवस्था! अफ्रिका खंड ओलांडून  लाल समुद्र ओलांडून पलीकडे जायचं. तेही प्रतिकूल परिस्थितीत . समोर शंकेखोर कापूसकोंड्या कुत्सित हसत उभा आहे, पण त्यावर मात केली त्या आदीमानवाच्या चिकाटीने, आत्मविश्वासांने ! नंतर माणसाने शिकार सोडून शेतीचे काम सुरू केले परत कापूसकोंड्याने खो घातलाच.तरीही मानव रूजलाच शेतीत ! नंतरची यांत्रिक  क्रांती तेव्हा तर असंख्य वेडे वाकडे प्रश्न या कापूसकोंड्याने मानेला झटका देत फेकले .माणूस या सर्वांवर मात करून पुढे जातच राहिला. कापसकोंड्याने मायावी रूप घेतले महायुद्ध केली.अणू बाॅम्ब टाकले. क्षणभर वाटले जिंकला कापूसकोंड्या .त्याने  माणसाला नामोहरम करण्याचा डाव मांडला. तो जिंकलोय असे वाटे पर्यंत माणसाने बाजी उलटवली.

        दोन हजार विसावे साल नेहमीप्रमाणेच आले. आता सरणा-या वर्षांबरोबर आपल्या पृथ्वीवरील  मुक्कामातले एक वर्ष  कमी झाले ही जाणीवच जास्त होते. असो. दूर चीनमध्ये एका प्रांतात विषाणूची साथ  पसरल्याच्या बातम्या येत होत्या पण ते खूssप दूs र चीनमधे होत. त्याचवेळी ठरलेली आमची दुबई ची ट्रिप पण मस्त झाली.तेथे इटली आणि फ्रान्स मधले त्या विषाणूंचे  तांडव  टिव्ही वर बघताना मात्र घशात काहीतरी अडकल्यासारखे होऊ लागले. या दोन्ही देशांत  आमचा मित्र परिवार  विखुरलेला. वर्षांपूर्वीच फ्रान्समधिल थाॅमस घरी राहून गेलेला.त्या सर्वांचीच काळजी वाटू लागली. तरीही अजून दिल्ली बहोत दूर है याच थाटात आम्ही. थोडी धाकधूक, थोडी भीती या मनस्थितीत परत   मायदेशी आलो.

     कापूसकोंड्या इथे दबा धरून बसलाच होता. यावेळी तो अधिकच वृध्द आणि हेकट  झालेला, कमरेत वाकलेला, तो पांढरा फेक कापूसकोंड्या! त्याने वेष बदलला होताच पण नवीन  नावही होत एन् कोव्हिड 19. मग सुरू झाला धुमाकूळ! मग हत्ती आणि चार आंधळ्याच्या गोष्टीसारखच होऊ लागल माणसांच. अनभिज्ञ शत्रू ! कसा आहे ? त्याची कमजोरी काय? काहीच मुळी कळत नव्हत. मानव हरणार?  हत्तीचा पाय चाचपडणा-या आंधळ्यासारखच एखाद्या औषधाला उत्तर म्हणून   या कापूसकोंड्या कडे पाठविले की हा कापूसकोंड्या फिदीफिदी हसायचा'महाभारतातील भीष्म अर्जुन युध्दात जसा शिखंडी मधेच उभा राहून रडीचा डाव खेळत होता तस्साच !हा 'करोना '  माणसाच्या उत्तरापेक्षा  डबल वेगाने आपलेच उत्तर मोडून तोडून आपल्या अंगावर भिरकवू लागला. त्यासाठी वापरलेले प्रत्येक औषध निष्प्रभ होऊन माघारी येऊ लागले.हा कापूसकोंड्या इतका जब-या की लहानपणासारखा आईचा पदरही लपायला मिळेना. शेवटी कापूसकोड्याच जरा कंटाळला. भसाभस येणारे त्याचे ते भेदक प्रश्न कमी होऊ लागले. व्वा आनंदी आनंद. कधी नव्हे तो कापूसकोंड्या  आपणहून गेला. पण कापूसकोंड्याच तो! तो कशाला हार मानेल ?तो कशाला जाईल? विश्रांती  घेऊन, नवीन अधिकच अवघड धारदार   जीवघेण्या प्रश्नासोबत कापूसकोंड्या परत हजर! यावेळचा मूडही वेगळाच.जणू प्रत्येक प्रश्नाला एक तरी माणसाचा बळी हवाच.मुले, तरूण, प्रौढ , म्हातारे सारेच या रणगाड्याखाली चिरडले जाऊ लागले. सारे एकदम त्रस्त.आता कधी एकदाचा  तो जाईल? का  थोडी विश्रांती घेईल आणि परत अनेक पटीने  प्रश्नसमृध्द होऊन येईल छळायला? जणू सा-या मानवजातीला भक्षण करायचा मूड आहे त्याचा.

        अशावेळी  आठवतो महा प्रलयात ही धरा पूर्ण नष्ट होत असताना त्या जीवघेण्या तुफानात उसळत्या अक्राळविक्राळ लाटेंवर स्वार एका पिंपळपानावर पहुडलेला  तोच तो सावळा. बाल कृष्ण!    आपल्या डाव्या पायाचा अंगठा चोखत निवांतपणे त्या लाटांवर हेलकावे खाणारा , गालात  खुदखुदणारा.आपला तारणकर्ता.तेथूनच नवी सुरवात.नवे विश्व , नव्या कल्पना!

     कलियुगात हाच कृष्ण आलाय वेगळ्याच वैज्ञानिक रूपात.कापूसकोंड्या हार मानायला तयार नाही तर कृष्ण आपली शस्त्रे अधिकच पारजतोय.बघू या आपण या  प्रलयातील एक लव्हाळे बनून आपले पाय जमिनीत घट्ट रूतवून! कृष्णाचा जय निश्चित आहे, पण कापूसकोंड्याला लेचापेचा समजायची चूक आता पुन्हा होणे नाही. कापूसकोंड्याच्या गोष्टीला लवकरच विज्ञान बाळकृष्णाच्या मदतीने आपण समाप्त करूया. इती कापूसकोंड्या पुराणं समाप्तम्!

             




बुधवार, १२ मे, २०२१

धावपटू पक्वान्नं ©️

                     धावपटू पक्वान्नं©️


खर तर माझा जन्म खाऊन पिऊन सुखी असलेल्या घरातला.त्या काळातील सर्वच मध्यमवर्गीय कुटुंबाप्रमाणे अवांतर पैसा घरात कधीच  नसायचा पण एकच वेळचे जेवण मिळेल अशीही अवस्था  नसायची.दोन्ही वेळेला व्यवस्थित  जेवण आणि सणासुदीला  गोडधोड म्हणजेच खाऊन पिऊन सुखी. आर्थिक विवंचना कितीही असल्या तरी भरलेले ताट समोर यायचे. शिक्षणही चालू होते.

       तेव्हा पक्वान्न व्हायची ती सणासुदीला. सणांचा दिवस. नव्या कपड्यांचा, सुट्टीचा, प्रचंड आनंद ,त्यातच गोडाधोडाचे जेवण. मग हळू हळू लक्षात यायला लागले या पक्वानांची चव हेच मुख्य नाही तर ही सर्वच पक्वान्न उत्कृष्ट धावपटूही  आहेत.म्हणजे अस बघा पोटात गेल्यावर या पक्वान्नांनी गुपचूप अतड्यातून प्रवास करावा ना? पण हे धावपटू बाया आणि गडी पक्वान्न निघते पोटातून डोळ्याकडे आणि काही काही वेळा थेट मेंदूत.डोळ्यात शिरून डोळे गपगार मिटले की ही पक्वान्न जिंकलीच.

                लहानपणी   आजी घरी असली म्हणजे चैन असायची. आकाशीच्या चांदव्याशी बरोबरी करणारी, पिवळ्या मऊ पुराणाने तट्ट भरलेली तांबूस पिवळी खरपूस भाजलेली पण रेशीम मऊ, तुपात स्नान करून साजिरी दिसणारी पुरणपोळी  ताटात यायची. केशर जायफळाचा गोडसर वास उदबत्तीच्या वासात मिसळून थेट मेंदूला गुदगुल्या करायचा. मेंदू टवटवीत होऊन झिम्मा घालू लागायचा.अर्जुनाच्या लक्षवेधी पोपटासारखीच डोळाभर उतरायची ती फक्त पुरणपोळी. तुप नहाल्या पुरणपोळीसह वाटीत नारळाचे वेलचीच्या स्वादाचे दुध.अहाsssहा. स्वर्गस्थ देवांनी हेवा करावा असा बेत असे . पुरणपोळीच्या जेवणाची कथा इथेच संपत नसे. जेवणानंतर जरा हात धूऊन बसतोय न बसतो तोच पोटातल्या पुरणपोळीची धावाधाव सुरू व्हायची. चक्क पोटातून डोळ्यात जाऊन बसायची बया! मग काय डोळे गपगपा मिटू लागायचे.डोळ्यातून मेंदू पर्यंत जाऊन पुरणपोळी  आपल्या जादूई संमोहनाचे प्रयोग मेंदूवर सुरू! मग मात्र काळ ,वेळ, जागा, दबदबीत उन आणि नकोशी थंडी या कश्शाकशाचे भान उरायचे नाही. दोन तीन तास मेंदू आणि डोळ्यांवर एखाद्या सम्राज्ञी सारखा अंमल गाजवून पुरणपोळी पोटात परत यायची. डोळे किलकिले करताकरता बाहेरचा गुलबट राखाडी अंधार बघितल्यावर बराच वेळ लागायचा तो स्थळ काळाचे भान यायला. ही पहाट की तिन्हीसांजा या गुंत्यात अडकलेला मेंदू जाणीवेच्य राज्यात शिरे. मेंदूला एकदम धक्काच बसे , बापरे चार तास झोपले होते मी??? अशी ती पुरणपोळी,पोटातून मेंदू आणि डोळयात पि.टी.उषाच्या चपळाईने जाऊन तिथे साम्राज्य गाजवणारी. हे पक्वान्न धावपटूच.  

        कधीमधी बासुंदी पुरीचा बेत असायचा. हे पक्वान्नही मस्त धावपटू पण बासुंदीला कधीच पुरणपोळीला हरवणे शक्य नसायचे त्यामुळे बिचारी दुस-या तिस-या नंबरावरच समाधान मानायची. आटीव दाट बासुंदी दिसायची देखणी.रसरशीत गौरवर्णी तरूणीसारखी तांबूस गौर. वर चुकारपणे रेंगाळणा-या चारोळ्या आणि बदामाचे पातळ तुकडे.जवळच टमटमीत पुरी वाफा सोडत बसलेली. बासुंदीत पडलेल्या जायफळाच्या मात्रेवर बासुंदीचा डोळ्यापर्यंत प्रवास किती वेगाने हे ठरते नाहीतर तशी ती संथच. 

            आई स्वतः नोकरी करणारी त्यामुळे  बहुतेक सणाला ठरलेले पक्वान्न म्हणजे श्रीखंड! घरात चक्का बांधून आम्हा बहिणींना तो फेसायला बसवायची आई!. घट्टमुट्ट चक्का, साखर मटकावत मऊ मऊ व्हायचा मग तो निगुतीने स्टीलच्या पातेल्यात विराजमान झाला की आई त्याचा ताबा घ्यायची. आधी चिरून ठेवलेली फळे ती त्यात मिळायची आणि थेंबभर व्हॅनिला इसेन्स किंवा आईस्क्रीम इसेन्स.आईचे श्रीखंड नेहमी हटके असायचे. लुसलुस गोड श्रीखंड, त्यात घासागणिक दाताखाली येणारे सुगंधी स्वादमय फळे आणि पुसटसा येणारा इसेन्सचा वास.ब्रम्हानंदी टाळी लागायची.श्रीखंडाचे जेवण त्यातील फळांमुळे अती जड कधीच व्हायचे नाही.पोट ते डोळे हा श्रीखंडाचा प्रवास दमदार!. पुरणपोळीसारखा वेगवान नाहीच.

श्रीखंड सावकाश डोळ्यांना गोंजारी. मग छानशी झापड येई डोळ्यावर साधारण तास, अर्ध्या तासाची!.पोटातून डोळ्यात सावकाश स्थिरावणा-या श्रीखंडाचे आईने नामकरण केले होते तुरुतुरू श्रीखंड!

          खिर, मोदक, लाडू,चिरोटे अगदी गेला बाजार जिलेबी सुद्धा ही खरतर धावपटू नव्हेच. पोटातून वाकडी वाट काढत ते कधीच डोळ्यात घुसखोरी करत नाहीत तर शहाण्यासारखे शांतपणे पोटात थोडी विश्रांती घेऊन आपल्या मार्गाने जातात.त्यामुळे तसे ते निरुपद्रवी. डोळ्याकडे पळण्यापेक्षा ओठातून पोटांत एवढंच ते आनंदाने करतात. गुलाबजाम त्यातला जरा द्वाड! तळतमळत तूप पिऊन छानपैकी साखरेत डुंबून हा पठ्ठ्या अगदी 'नायकीचे 'बूट घालून पळायला तय्यार! पण जास्त दिखाऊपणाच. डोळ्याकडे तो सरकतोय पण हे आपल काम नोहे म्हणून लगेच  गुपचूप परत.

       बंगाली मिठायाही एकदम रसदार. चवदार पण डोळ्याकडे जायचा रस्ता त्या विचारत सुध्दा  नाहीत. कारण त्या मुळातच 'भद्र मिठाया' आहेत .एकदम सभ्य! त्यांचा गोड मिट्ट गोडवा जीभेतून सर्वांगात भिनवतात पण अगोचरपणा करून डोळ्याकडे पळायचे नाव काढत नाही हो!

          आता पुरणपोळीला सब्बल  प्रतिस्पर्धी म्हणून काम करतो आपला आमरस.वर्षातून फक्त तीन महिने मिळणा-या राजाधिराज आंब्याचा रस. रूपही असे राजस! केशरी, सुगंधी दाट. मग तो पुरी , पोळी किंवा नुसता कसाही खा अप्रतिमच लागणार. किती वाट्या आपण रिचवतो त्या प्रमाणात याचा डोळ्याकडे जायचा वेग ठरणार. एक वाटी म्हणजे अर्धा तास झोप निश्चित.  नंतर प्रत्येक वाटीबरोबर चक्रवाढ व्याजाप्रमाणात झोप वाढत जाते.

         परदेशी हिंडतानाही पुरणपोळीला  तुल्यबल रथी महारथी स्पर्धक मी सतत शोधत होते. टर्कीतील बखलाव आणि अनेक गोड पाकात मुरलेले पदार्थ. मन तृप्त करून सोडतात पण नंतर ती गुंगी, धुंदी अजिबात नाही. इटली देशातील तिरामसू माझा अती लाडका पण पुरणपोळी समोर तो बिगरीतच. जपानचे तर साखरेशी किंवा गोडाशीच साता जन्माचे  शत्रुत्व! त्यामुळे तिथे पुरणपोळी  स्पर्धेत  पुढे चाल (बाय) मिळाल्यासारखा विजयी वाटते.

          जगन्नाथ पुरीच्या त्या जग्गन रक्षकाला  बहात्तर गोड व्यंजनांचा  नैवेद्य  दाखवतात असे ऐकले आहे. अर्थात  या नंतर बाप्पा नक्कीच छानशी वामकुक्षी घेत असणार हे नक्कीच.   

        सुखाची माझी व्याख्या  सोप्पी आहे. फोन बंद असावा, सुट्टीचा  दिवस असावा. ताटात तुपात लडबडलेली गोड मिट्ट  पुरणपोळी  असावी. डायेटींगला अंगठे धरून फाटकाबाहेर उभे करून त्याचा विचारही न करता मी त्या पुरणपोळ्या रिचवाव्या.पुढचे काम पुरणपोळी आपणहून करते. डोळ्याकडे वेगाने धावत जाते आणि.      --- -    --------घsssर  घूssर 

अहाहा चार तासांची निश्चिंती!  

शुक्रवार, २ एप्रिल, २०२१

चहापान ©️

                           चहापान©️


काही काही छोट्या छोट्या गोष्टी  कधी लार्जर दॅन लाईफ  होतात हेच मुळी कळत नाही.देवाभोवती असलेल्या वलयासारखेच खास तेजोवलय लाभत अशा गोष्टींना !फक्त योग्य माणूस योग्यवेळी तिथे असायचाच अवकाश की एकदम साईsssssसुट्ट्यो. 

    आता साधा चहापानाचा कार्यक्रमच पहा न! पूर्वी तर असे चहापानाचे कार्यक्रम बख्खळ असायचे.एखाद्या व्यक्तीला घरी बोलवायचे असेल आणि जेवणासाठी  वेळ काढणे दोन्ही पार्टींना शक्य नसेल अशावेळी त्या संकटातून अलगद सुटका व्हायची ती घरधन्याकडून. आत बघत ते जोरात बोलायचे ,"काय हो, जेवण नको म्हणतात पाहुणे मग रविवारी  बोलवायच का चहाला? आतन  तात्काळ पदराला हात पुसत गृहलक्ष्मी  दारात यायची."सगळ्यांनी यायच हं भावोजी.कोणी पाहुणे  असतील तर त्यांना पण घेऊन या हो." साधारण चार वाजता आलात तरी चालेल बर." खर तर चहापान तसा इटूकला, जेवणांच्या मानाने धाकला कार्यक्रम पण आता जेवणांना मागे सारून तो पुढे सरसावतो आणि अभिमानाने  एखाद्या स्वतःला बैल समजणा-या बेडकीसारखा फुगु लागतो.त्याबरोबर घरही अंगात आलेल्या देवर्षी सारखे   घुमू लागते. येणारे पाहुणे कोण आहेत त्यावरून चहापानाला पदार्थ काय करायचा हे ठरविले जाते.

       सकाळ पासूनच घर आवरण्याचा कार्यक्रम सुरू! दिवाणावरची चादर बदलणे आणि आता कोणी त्यावर घुधडले तर माझ्याशी गाठ आहे ही धमकी अधिक आज्ञा, पाठोपाठ  यायचीच. नवीन जाजम घातले जायचे .नवे पडदे झुळझुळायचे. खोलीतील जळमटे, धूळ स्वच्छ केली जायची.उशांवर छानपैकी भरतकाम केलेले अभ्रे  सजायचे. चुकून  दुस-याच घरात आपण आलोय असे ती चकाचक बैठकीची खोली बघून वाटायचे. फुलदाणी पण रंगित सुगंधी फुले डोक्यात घालून टेचात उभी असे. दारात मारलेल्या सड्याने मृगाचे शिंतोडे पडल्यासारखा मृद्गंध दरवळायचा.  

          पदार्थ कुठले करायचे हे ऋतूमानाप्रमाणे चाणाक्ष  गृहस्वामिनीने ठरविले असे. त्याची जय्यत तयारी झाली असे. घडाळ्याकडे बघत ती पुटपुटायची आल्यावर एकदम गरमगरम करून देईन हो. ठेवणील्या निगुतीने वापरायच्या कपबशा आणि प्लेट्स कपाटातली त्यांची जागा सोडायच्या. काचेच्या  मोठ्ठ्या जग् मधले   थंडगार पाणी  वाळ्याने अधिकच  रूचकर आणि सुवासिक  व्हायचे. टेबलावर छान पैकी लेसचा टेबलक्लाॅथ वातावरण अधिकच साजरे करायचा. दिवाळीच्या आसपास चहापानाला कुणाला बोलवले तर दिवाळीचे पदार्थही आटोपशीर बाऊलमध्ये टेबलावर आदबशीर हजेरी लावत. या बरोबरच घरातल्या बच्चेकंपनीला शहाण्यासारखं वागण्याबाबत वारंवार तंबी दिली जायची. 

          त्यातून तो ताईचा 'दाखविण्याचा ' कार्यक्रम  असला तर विचारायलाच नको. हवेतील सणसणून वाढलेला ताण , पाळण्यातल्या बाळालाही जाणवायचाच. घर तर इतके लखलखीत केले जायचे की पुढील छप्पन वर्ष  कोळ्याला छतावर जाळे विणायची भीतीच  वाटली पाहिजे आणि पालीला भिंती वर फिरायची !

       अखेर पाहुण्यांचे आगमन व्हायचे. त्यात तर इतक्या त-हा असायच्या की बोलायची सोय नाही.चारची वेळ देऊनही साडेपाच सहा पर्यंत यजमानांना तंगवत ठेवणारे. ब-याचदा त्यातील  काही शिष्ठ मंडळी आम्ही नाही बाई असल खात असली वाक्य टाकायला लागल्यावर गृहलक्ष्मीच्या नाकाचा शेंडा लालेलाल झाला नाही तरच नवल! काही मात्र एकदम शहाण्यासारखे वेळेवर यायचे.बच्चेकंपनीसाठी खाऊ आणणारच.  प्रत्येक गोष्टीला म्हणजे अगदी भरतकाम केलेले अभ्रे  ते फुले आणि काचेचे बाऊल ते पदार्थ  यांचे मनसोक्त कौतुक करतील, पदार्थांना योग्य तो न्यायही  देतील. मोकळेपणाने  गप्पा मारतील.भरपूर हसवतील.बरोबर आलेल्या स्त्रीवर्ग हळूच पदार्थाची पाककृती घरच्या लक्ष्मीला विचारून कृतकृत्य करतील. खर तर अशा मंडळीनी जाऊच नये असे वाटते. तोवर संध्याकाळ झाली तर दही भात खायचा आग्रहही होतो. गृहलक्ष्मी कौतुकात न्हाऊन निघते .जाताना पाहुण्यांना आवडलेला पदार्थ डब्यातून आठवणीने देते.

       चहा  खरतर ब्रिटिशांनी आपल्याकडे आणलेलं हे पेय, कानामागून येऊन आपल्या आयुष्याची जणू  लांबलचक सावली बनलेला.सावली एकवेळ  चकमा देईल पण चहाची लत लग गयी मात्र सोडणे अवघडच. उठल्यावर चहा, राती जागायला चहा , तरतरीत वाटण्यासाठी चहा, पाऊसात भिजल्यावर परत आल्याचा चहाच!मित्र मैत्रिणी बरोबर घोटघोट चहा. दमून आल्यावर चहा. कधी एकट्याने प्यायचा चहा तर कधी मोठ्ठा सोहळा बनणार चहाच! होस्टेलवरचा मैत्रीणींनी केलेला पातेल भर चहा त्यातला माझा खास डचकाभर वेगळा काढलेला ! दुसरा लक्षात राहिलेला चहा म्हणजे रेल्वेतला.पूर्वी रेल्वे  वेटींगरूममधे स्पेशल चहा मागविला की खास चहा यायचा. जाड पांढ-याधोप काचेचे उभे कप, गुबगुबीत टीकोझी खाली लपवलेली तशीच  पांढरी बसकी गोलमटोल  किटली, अल्लाउद्दीनच्या दिव्यासारख्या आकाराच्या पांढ-या काचेच्या भांड्यात दुध आणि सर्वात  जास्त  आकर्षण वाटायचे ते साखरेच्या क्यूबचे. त्या दिवशी राज्ञीपद मिळाल्यासारखा आनंद मिळायचा. नंतर रेल्वेत पेपरकपमधून, कुल्हडमधून मातीच्या गंधाचा , मस्स्sssला चाय इत्यादी  अनेक चहा रिचवले पण तो वेटींग रूममधला चहा विसरणे अशक्यच.या सगळ्या मर्मबंधातल्या ठेवी आहेत.

         गंमत म्हणजे मदीरे पाठोपाठ सर्वात जास्त या चहावर काव्यही रचली आहेत. चहाची तल्लफ आल्यावर माफक साखरेचा दाट दुधाचा आणि पुसटत्या आल्याच्या वासाचा चहा यावा आणि नेमकं  त्याच वेळी भणाणणा-या माशीने  त्या प्याल्यात हाराकारी करावी मग त्यावर सुंदर काव्य व्हावं हे भाग्य मदिरेचा खालोखाल मिळते ते फक्त चहालाच.

           सकाळचा चहा जरा गडबडीचा पण ताज्या दुधाचा. उकळतानाच ते मिश्रण सारे स्वयंपाकघर सुगंधी करते. वेळेबरोबर जर रस्सीखेच नसली तर चहा आणि हातातल्या पेपरमधल्या बातम्या अगदी ब्रम्हानंदी टाळी लागलीच पाहिजे. किंवा गच्चीत वा गॅलरीत बसून घोट घोट चहा घेताना ती ऊब मुरवत पुरवत , पक्षांचे आवाज ऐकत आणि एकही मनुष्यप्राणी  निर्मित आवाज नाही अशा पहाटेच्या वेळी अशी भन्नाट तंद्री लागते की बस! येणारी वा-याची झुळूक  आणि सूर्यादेवाचा पहिला किरणही चहा पिण्यासाठी घाईघाईने आल्यासारखा जाणवतो.

कधी कधी कामाच्या ठिकाणी एखादा कप चहा होतो पण त्या पुळचटआणि पाणचट दोन घोटात तळ गाठणा-या काळसर पाण्याला चहा म्हणणे जीवावर येते. घरी आल्यावर जर तुमचे ग्रह उच्चकोटीचे असतील तर चला चहा तयार आहेचा हाकारा 

होतो आणि गरमागरम चहाचा कप हातात येतो. दुपारचा चहा म्हणजे त्याबरोबर चटकमटक हवेच.कोण कोणाची रंगत वाढवते ते सांगणं अवघडच.

          जपान मधील  चहापानाची नजाकत एकदम शाही. आधी तीन तीन वेळा कमरेत वाकवाकून अभिवादन आणि नंतर खास चहासाठी  राखीव खोलीत बैठ्या  टेबलवर नजाकतीने दिलेला चहा तो पण अतिशय देखण्या कान नसलेल्या कपांतून. त्यात हे बाऊल जितके जुने तितके तुम्ही अधिक महत्वाचे. एखाद्या रागदारीसारखा चार पाच तास रंगत जाणारा सोहळा आहे तो.चहा मात्र ग्रीन टी!

         ब्रिटिशही त्यांच्या त्या खास व्हिक्टोरीयन गुलाबी फुलांची नाजूक नक्षी असलेल्या चमकदार तलम कपातून चहाचा सोहळा  साजरा करतील पण बरोबर केक कुकीज सारखे पदार्थ  अनिवार्य.  टर्कीश मंडळी  आपल्यासारखीच चहाबाज.  अग्निहोत्र चालू असल्यासारखे सतत चहाच्या  किटलीत पाणी उकळत असत त्यामुळे लागेल तेव्हा हा चाय  दिमतीला हजर! त्याचे कपही खास  पारदर्शक काचेचे,कमनीय बांध्याचे  ! त्यात ते सोनेरी काळसर अमृत. हव तर साखर घाला वा तसेच घोट घोट प्या. क्षणात तरतरीत!

           लहानपणी घरी दुधशुभ्र पातळ काचेचे , सोनेरी कडांचे पसरट आकाराचे छानसे कप होते. आईचे भारी आवडते. कुणी चहापानाला यायचे तेव्हाच आई ते कप काढायची. स्वतः धुवायची पुसायची . एकदा आलेल्या पाहुण्यांना त्या कपात चहा ओतून माझ्या हातात तिने ट्रे दिला. ती मला सावकाश  जा असे सांगतेय तोच-------हाय रे दैया मी अडखळले आणि----- पुढचे रामायण सांगायलाच हवे कां? चार पैकी दोन कप बशा पूर्णतः धारातिर्थी पडल्या होत्या. सहाकपांचा तो सेट आता आपसुक  चार वर आला होता. तो चहापानाचा कार्यक्रम विसरणे अशक्यच.

         हल्ली व्यवसायानिमित्त दुपारी मोकळा वेळच नसतो . डिनरची आमंत्रणे असतात पण पूर्वीसारखे "चहाला या नं" हे आमंत्रण कित्येक वर्षात मिळालेले नाही.मुले घरी नसल्याने घर आवरणे हा कार्यक्रम पण आवर्जून करावा लागत नाही.त्यामुळे  ते चहापानाचे आमंत्रण, ते घर आवरणे, त्यापाहुण्यांबरोबर रंगलेल्या गप्पा. आईने केलेले चविष्ट पदार्थ आणि मृत्यूमुखी पडलेले कप सारेच खूप मिस करतेय.पण जेवणही तेवढ्याच श्रध्देनी आणि आवडीने एनजाॅय करते हेही तितकेच खरे!.

         



 माझे इतर लेख वाचायचे असल्यास खालील लिंक वापरावी. 

      https://drkiranshrikant.pasaara.com 

         

मंगळवार, २३ मार्च, २०२१

टेकडी,डोंगर, पर्वत

 

टेकडी, डोंगर ,पर्वत

मुलांना वाढवताना खर तर मीच नवनवीन गोष्टी  शिकत होते.कित्येक संदर्भाचे खरोखरचे अर्थ लक्षात येत होते.बालकथेतील वाक्यांमधे दडलेले अर्थ मुलांकडून निरागसपणे आले की क्षणभर मला साक्षात्कार  झाल्यासारखं वाटायच. आणि हेच ते युरेका म्हणण्या योग्य आहे असे वाटून जायचे.एकदा माझ्या थोरल्याने जेवणाच्या टेबलावर पाणी सांडले. मी आरडाओरडा करणार इतक्यात त्या पसरट थेंबाकडे बघत तो म्हणाला "आई हा बघ मुंग्यांचा समुद्र" . पाण्याचा तो थेंब मुंगीचा समुद्रच! परत तोच महान साक्षात्कार!परत युरेका युरेका युरेका झाल

  मुलाला नुकतेच थेंब, डबकं, डोह, तळे , सरोवर आणि समुद्र यातील फरक  समजावला होता.त्यानंतर  मुलाला टेकाड ,टेकडी  डोंगर, पर्वत यातील फरक सांगितला आणि ते ओळखणे हा मग आमचा खेळच झाला होता. पण यातून गम्मत  अशी झाली प्रत्येक डोंगर , पर्वत आमचा दोस्त बनून गेला.

      तशी डोंगरांशी नाळ जुळली कोल्हापूरच्या घरात. शाळेत असताना.शेतात असलेलं घर, घरामागे ॠतुंप्रमाणे नटणारा सजणारा नटवा माळ-रान त्या पल्याड पट्टीने आलेल्या रेषेसारखी   हिरवी पोपटी  शेताची रेष त्याही पलीकडे ते दोन डोंगर .खंबीरपणे उभे. नुसते खंबीरराव नाही तर त्याबरोबरच महा नटवे. काय त्यांचा तो नव्या सद-याचा सोस बाई ग बाई! पण कपड्यांच्या रंगाची आवड झकास! अगदी मोरपिसाची जातकुळी सांगणारी. हिरवे, कधी काळे, तर कधी निळसर जांभळे दिसणारे. एका डोंगराचे डोके गायब .कारण त्याच्या रूंद खांद्यावर काहीच नाही एकदम सपाटी . वरचा मजला रिकामा जणू कोणी वर डोक घडवलेच नव्हते.शेजारचा डोंगर मात्र एकदम तगडा आणि मस्तपैकी निमुळती टोकदार टोपी घालून बसलेला.या दोन डोंगराच्या मधून वर येणारे सूर्यबिंब. तेही बिच्चार झोप मोडली म्हणून रागाऊन लाले लाल झालेले.काळपटलेल्या त्या डोंगरांनाही आपल्या संतापात सामील  करून घेत त्यांनाही काही काळ लाल पिवळ्या रंगात बुडवत ते सूर्य बिंब वर चढत असे. दक्षिणायन आणि उत्तरायणात सूर्याची जागा बदलायच्या पण सूर्याचा संताप तोच आणि उकळत्या लाव्हामधे न्हालेले डोंगर तसेच.अनेक वर्षांनी परत कोल्हापूरला गेल्यावर ते दोन डोंगर पहाणे माझ्यासाठी आनंदोत्सव  होता.त्या डोंगरांना पहाताच आजोळी आल्यासारखं मोकळं वाटल.गंमत म्हणजे चिर तारूण्याचा आशिर्वाद मिळाल्यासारखे डोंगर आपले तसेच टवटवीत आणि नटवेपणाही तोच! मी आपली प्रौढत्वाच्या वरच्या पायरीवर उभी आणि हा माझा दोस्त एकदम टकाटक!

  मनात घुसलेला अजून एक सुळका म्हणजे कारवार गावातील सुस्तावलेला डोंगर.भर गावात, हिरवाकंच गुबगुबीत कोट घालून बसलेला ,भरगच्च जेवणानंतर पाय पसरून डुलक्या काढत बसलेल्या पाहुण्यासारखा , मासळी भाताच जेवण तब्येतीन झाल्यासारखा! .आता थोड कलंडायला जागा बघतोय असाच वाटतो तो!. त्याला बघितल्या बघितल्या "झोपा आता थोडावेळ "असे आपसूक ओठावर येते.

               डोंगर निरखता निरखता सहजतेने मनातल्या मनात त्याचं  बारसे होतेच.उतरणीवर भरघोस दाढीसारखी झाडी कुरवाळणारा होतो 'खान चाचा'तर डोक्यावर मस्तपैकी तुळतुळीत चांदोबा मिरवणारा होतो चंद्रवदन!निस्संग झाडीहीन, वस्त्रहीन अर्थातच नागा! 

       चंबळच्या खो-याला तर काय नाव द्याव हेच कळत नाही. अफाट घड्या घालून बसलेले विन्ध्य आरवली.त्या बेलाग, आव्हान देणा-या   घळ्या.या घळ्या कश्या तर एकेका घळीत लपलेल्या हत्तींचाही पलीकडच्या घळीत पत्ताच नाही.डाकूंना या घळ्या का प्रिय हे सहज लक्षात येते.या घळीच्या मोहात आणि जाळ्यात संमोहनाची जादू ठासून भरली आहे.त्याना बघितलं  की चेटूक झालच म्हणून समजा!त्या भुलभलैयामधे तुम्ही गुंतलाच. अक्षरशः वेड करून सोडतात त्या घळ्या अन् ते खोर! पांढरट पिवळ्या धुळकटलेल्या कुठल्याशा क्षीण पोक्त झाडाला कशातरी धरून ठेवलेल्या त्या वळ्या. टपोरे पाऊस थेंब झेलत त्या चेटूकातून फिरावे त्या चिखलात मनसोक्त हुंदडावे अस वाटायला लावणारे ते चंबळच खोर!

         हिमालयाची निळी भूल अशीच! सर्व विचारशक्ती,अहंकार आपसूक त्याच्या पायाशी गळून पडतो. हिमालय एकदम धिरोदात्त बहिरूपी.कधी देवभूमीची निळी शाल पांघरून खळाळत्या नदीतून वेदमंत्र म्हणणारा तर कधी पांढ-या वस्त्रात महा सात्त्विक दिसणारा. सुर्यकिरणात नहाताना सभ्यपणे सोनेरी शाल ओढून घेणारा. कधी कधी तर पूर्ण नित्संग! एकदम सर्व परीत्याग केलेला. उघडा , वस्त्राची चिंधीही नाही पण तरीही डोळे दिपवणारा.ब-याचदा डोक्यावर भली मोठी बर्फाची शिळा ठेऊन  आकाशात घूसुन ढगांबरोबर खेळ मांडलेल्या देवदार वृक्षांना अंगावर मिरवणारा हिमालय. हे गिरीराज , किती वर्णावे तुम्हा? त्याला म्हणावं वाटतं  हे पर्वतराज तुमचे कनेक्शन  एकदम स्वर्गातल्या बाप्पाशी. त्यामुळेच पर्वतराज तुम्ही वाटता दूरस्थ,अप्राप्य पण खूप खूप आदरणीय!

          सातपूडा फार उंच धिप्पाड नाही पण साग, मोह ,बांबू, लिंब यांनी नटलेला. हिवाळ्यात पानगळीनंतर नुसते झाडाचे खराटे घेऊन उभारलेले डोंगर रांगा बघवत नाही पण त्याच वसंत ॠतूमधे बालपल्लवीने शृंगारलेल्या  झाडांवरून नजर हटता हटत नाही.त्यातला साग म्हणजे हत्तीच्या कानासारख्या भल्यामोठ्या पण खरबरीत पानांनी सजलेले. पाढ-या नाजूक फुलांनी डवरणारे तर मोहाचा पुष्प सुगंध भल्या मजल्यांना नादावणारा.उगाच नही ते धिप्पाड गज त्या वासाने धुंद होतात.

        सह्याद्री मात्र लहानपणापासूनच सवंगडी.महा अवखळ पण प्रसंगी धिरोदात्त. वृक्षसंपदा डोंगरभर!त्यात प्रचंड वैविध्य.एक झाड दुस-यासारखे असेल तर शप्पथ! काळ्याभोर कातळाचे सरळसोट कडे थेट ता-यांशी सलगी करणारे.कधी  ढगांचा मफलर मस्तपैकी गुंडाळून बसलेले सुळके. अंबोली सारख्या ठिकाणी डोंगरावर रहाताना  तर धटींगण ढग आपल्या आसपास फिरत हळूच ढुशा मारत पळून जातात. चावट मेले. काही तर दाराच्या खिडकीच्या फटीतून आत शिरून पांघरूण सर्दावतात वर खुदखुदतात.काही डोंगरावरची जंगल पानगळीची तर काही डोंगर सतत हिरव्या पोपटी गर्भ रेशमी कुंचीत लपेटून टाकलेले. सह्याद्रि  म्हणजे अलीबाबाची गुहाच . प्रत्येक डोंगर आगळा वेगळा. डोंगरावरची काही पठार तर मोठ्ठे जादूगारच! उन्हाळ्यात महा आळसटलेले पठार ना त्याला कपड्यांची शुध्द ना बोडकेपणाची.हेच पठार एकदोन पावसात पूर्णतः बदलते.अप्रतिम रंगित फुलांचे कपडे त्यांनी चढवले की एकदम नवरदेवाचे तेज येते पठ्याला. 

        दक्षिणेचा निलगिरीही आगळाच.तेथे सतत हवेत दरवळणारा निलगिरीच्या पानांचा सूक्ष्म  वास  म्हणजे तिथले डोंगर कायम सर्दी  झाल्यासारखे वाटतात.कुठलातरी पर्वत आsss क् छू म्हणून भलीss मोठ्ठी शिंक देईल अस सतत वाटत रहाते. 

        डोंगर दूरूनच साजरे नाही तर जवळ गेल्यावरती गप्पा मारायला उत्सुक असतात. फक्त आपले डोळे आणि कान सजग हवे. हे पर्वत इतिहासाचे साक्षीदार असतात. ते आपले वयोवृद्ध मित्रही होतात.भूतानमधे प्रत्येक हाॅटेलची खासियत म्हणजे खिडकी उघडली की काही फुटांवर हिमालयाची  एक शाखा हजर. अगदी हिमालयाच्या कुशित विसावले पणाचा आनंद! या पर्वत राशींच्या लाडक्या लेकी नद्या बाळलेणी हळूच उतरवून परकरातल्या पोरी होतात. तोच तो अनवट अवखळपणा! नुसत्या पळत असतात वेड्या! त्यांचा तो अफाट जोश बघूनच थकायला होते. तो पर्वत राजही ह्या लेकींना टोकेरी दगड टोचू नये म्हणून अक्षरशः मऊ वाळू आणि गुळगुळीत गोटे या कन्यकांच्या मार्गावर पसरतो. बापाचेच ह्रदय ते!

      जपानचा फुजी तसा ओझरता पाहिला तुफान हिम वर्षाव झालेला त्यामुळे दूरूनच त्याला केला टाटा. परत यायचा वायदा करून . करणार काय? , युरोपमधिल आल्प्स पर्वतांच्या रांगा पण तितक्याच मोहक. सुंदर पाचूची कुरणे त्यातच हिरकणी सारखा लकाकता हिम.अंगाला गोंजरता गोंजरता मधेच बोचकरणारी थंडी आणि ते सौदर्य पान करताना तल्लीन झालेले आपण. हिमालयाचा गंभीरपणा नाही आल्प्सकडे पण विलक्षण टवटवीत, तारूण्याने मुसमुसणारा आहे तो. अझरबैझानच्या आग ओक्या डोंगराची गम्मत वेगळीच. जमीनीखाली अजस्र खनिज तेलाचे साठे त्यामुळे मस्तवाल होऊन तो सतत आगिचे फुत्कार सोडत धगधगतोय. एखाद्या दैत्यासारखा. सतत पेटलेला हा डोंगर खरोखरच एखाद्या पुराणकथेतील दैत्य वाटतो.या उलट अर्मेनायातील अगारटस खर तर सतत आग ओक्या जिवंत ज्वालामुखी.  पण बर्फात लपेटलेला तो आपलासा वाटतो. त्याच दर्शनही प्रसन्न आणि रमणीय.

       असे अनेक पर्वत मनात रूतून बसलेत. तो आपला एतद्देशीय असो वा दूस-या देशीचा! तो आपलाच वाटतो. उगाचच वाटते हा आपलाच तर आहे तो कशाला आपल्याला त्रास देईल?यातील बालीशपणा हास्यास्पद आहे अगदी कबूल पण ------ आपली काळजी त्याला देखिल आहेच की हिच खात्री! तुर्कस्तान देशात आंताकीयात आम्ही उतरलेलो गावाला चिकटून डोंगर !त्यापलीकडून आयसिसने फेकलेले तोफ गोळे, त्यांचा धडामधूड आवाज. सिरीयातून येणा-या बेघरांचे लोंढे. आमच्या घरचे सर्व आम्ही तेथे गेल्याबद्दल वेड्यात काढत होते पण मला मनोमन खात्री होती हा मधे पसरलेलाआडमाप डोंगर आपल्या केसालाही धक्का लावू देणार नाही.आपला दोस्त आहे न तो ! तो दगा देणारेच नाही मुळी. तसेच झाले.आम्ही सुखरूप परत !

            असे टेकाड टेकडी, डोंगर पर्वत मनात रूतलेत अगदी त्यांना चिकटलेल्या घोरपडी सारखेच.या धरेची आन बान शान असलेल्या प्रत्येक पर्वतास त्रिवार वंदन.


.

 

 माझे इतर लेख वाचायचे असल्यास खालील लिंक वापरावी. 

      https://drkiranshrikant.pasaara.com 

         

           

      

         

शुक्रवार, १ जानेवारी, २०२१

कपाट ©️

 कपाट ©️


       अचानक कपाट आवरायची हुक्की आली की मग मी आधी अंदाज घेते,कपाट आवरताना मला आवरता आवरता किती वेळा उठायला लागेल याचा! समस्त स्त्रीवर्गा  सारखच माझेही मत  आहे की अस छानस एकाग्र होऊन मस्त सुर लागलेल्या गवयाच्या तल्लीनतेने कपाट आवरायला मिळणे म्हणजे साता जन्माची पुण्ये फळफळून आलीत असे समजावे. नेहमी कपाट उघडून बसलंकी अशी झकास समाधी लागते न!तोच कानावर हाक येतेच "इथे ठेवलेलं पुस्तक कुठे आहे ग?"आमच्या घराचे खास वैशिष्ट्य  आहे समोर हत्ती उभा असला तरी कुठे आहे हत्ती म्हणत सगळीकडे सैरावैरा शोधत बसतील. असो. तोच मुलाची आरोळी येईलच "आई रॅकेट कुठेय?" थोडक्यात शांतपणे कपाट आवरणे हे गुलबकावलीच फूल मिळवण्या सारखच आहे. 

     पण जर कधी हा चान्स मिळाला तर चपळाईने  मी तो पकडतेच. माझ्या कपाटातील एक कप्पा आहे 'दिवाने खास'. 'फक्त माझाच! .लोकशाही जशी लोकांची , लोकांसाठी लोकांनी निर्मिलेली तसाच हा कप्पा फक्त माझा, माझा आणि माझाच. माझा दिवाने खास!फक्त मलाच तो उचकायची परवानगी. बाकी कपाटात करू दे कोणीही कितीही उचकपाचक.पण याला हात लावायचा तो फक्त मीच!  या कप्प्यात असतात मस्त वाळ्याच्या सुगंधाच्या हळव्या तरल  मखमली, मुलायम आठवणी. अरेच्चा हा खास आईने आठवणीने दिलेला शालू.तिच्या शेवटच्या आजारात दिला तो मला. थोडा विरला आहे पण तो जन्मसिद्ध  अधिकाराने या कप्यात ऐसपैस बसला असतो. अगदी माझ्या मुलाच्या मुंजीतही हाच शालू नेसली होती आई. आणि तेच ते तिचे वाळ्याचे आवडते अत्तर. बराच वेळ त्या साडीवरून तंद्रीत  हात फिरायला लागतो.त्या साडीवर मागे ठेवलेला  पत्र्याचा चपटा चाॅकलेटचा एक डबा ! तो मी हळूच उघडते. माझे लग्न ठरल्या नंतर सहा महिन्यांनी झाले.त्या काळात एकमेकांना  लिहिलेली पत्रे.कधी काळी आपण एवढे भावूक, हळवे होतो हेच खरे वाटत नाही. त्या शेजारी असलेली जुन्या फोटोंची पिशवी. त्यातले ते माझं काजळ माखलं वेडविंद्र ध्यान मुलांनी एकदा पाहिले आणि आठवडाभर मेली खुदखुदत होती. 

           असेच एके दिवशी मी घरात कोणी नाही हे बघून कपाट आवरायला काढलं. उजवीकडे, डावीकडे-, वर खाली, मागे, पुढे सर्व दिशा पारखल्या.  हुश्शssss !!!कोणीच नाही . मस्तपैकी जुने फोटो काढले.तोच फिदी फिदी हसायचे आवाज आलेच. दोन्हीही चिरंजीव कधी आले होते हे समाधीस्त मला कळलेच नव्हते. मुलाच्या हातात होता झेंड्यासारखा उंच धरलेला पण तडफडणारा आमचा जत्रेतला फोटो.खरतर मेडिकल काॅलेजमधे असताना पहिल्यांदा जत्रेत आम्ही मैत्रीणी गेलो होतो. तेव्हाचे ते गाडीच्या कटआऊट मधले फोटो आज पाहिले तर अफाट आणि बेफाट विनोदी दिसतात हे मात्र सत्य.ओपन टपाचे ते कार्डबोर्डचे इंपालाशी थोडेसे साम्य दाखविणारे कटआऊट !त्यात ते खोटेच पुठ्ठ्याचे चालकांचे चक्र आणि ते हातात धरून मैत्रीणींबरोबर काढलेला फोटो. बापरे बाप! भरीस भर म्हणून सगळ्याजणी कोणाला तरी टाटा करतानाची पोझ.

      या सगळ्या गोंधळात व्यवस्थित रहायचा मक्ता घेतलाय तो फक्त या एका 'दिवाने खास' कप्प्यांनी! बाकी माझे कपाट माझ्या व्यक्तिमत्वाला साजेसं! अस्ताव्यस्त !

     तसे प्रत्येक कपाटाचे स्वतःचे व्यक्तिमत्व असते. खास कंपनीची लोखंडी भली भक्कम कपाट जराशी शिष्ठ वाटतात. आम्ही खास ब्रँडेड आहो असा उर्मट भाव चेह-यावर स्पष्ट  दिसतो त्यांच्या!.आव्हान देत जणू म्हणतात 'हात लावायचा नाद करायचा नाय'.कधी कधी तर वाटत डोळे वटारून कपाट ओरडेल" खामोष बघतोयस काय मुजरा कर".पण हीच कपाट सरकारी कार्यालयात बापूडवाणी वाटतात.    सागवानी किंवा शिसवी कपाट एकदम खानदानी.हळूच उघडतानाही दडपण येईल अस.' मोडणारही नाही  हलणार पण  नाही' हे ब्रीदवाक्य पुटपुटणारे.एका जागी बसले तर तिथून हलवणे महा कठीण.  अगदी दहा बारा जणांची फौज असली तरी!  काही भली मोठी सागवानी कपाट मात्र एकदम गुढ दिसतात. कुठलं तरी रहस्य जीवापाड संभाळत असल्यासारखी. तर काही काही थेट नारायण धारपांच्या गुढ कथेतून उचलून आणल्यासारखी.उघडल्यावर काही तरी धडपडत,लडखडत  बाहेर येईल असे. मात्र आजकालची नवी प्लायवूडची कपाट जरा नटवी.  दिसायला देखणी पण भक्कमपणा इल्ले!

        माझ्या माहेरी आम्हा सर्वांसाठी वापरायला एकच कपाट. तेही महा भलेभक्कम शिसवी! काळकरंद ,जरास कळकटलेल, एका दारावर दार भरून आरसा. तोही थोडा पारा उडालेला. आत मधे मोठे कप्पे , चोरकप्पे आणि काय काय. पिवळ्या पितळी कड्या. आई त्या कड्या मात्र एकदम चकचकीत ठेवत असे. कपाट एवढे मोठे की पाच सहा मुले आरामात लपू शकतील. कपाटात  बसायला मात्र आम्हाला पूर्ण बंदी! या बाबतीत आखलेली लक्ष्मणरेषा एकदम पाॅवरबाज.

           पिढीजात आलेले ते कपाट भरायचे कशाने हा खरतर सर्वात मोठा प्रश्न असे.आई नोकरी करणारी त्यामुळे  त्या कपाटात मनसोक्त पसारा मी करत असे आणि ते गच्चीम भरून टाकत असे. त्यासाठी बोलणीही खात असे.कोणी घरी येणार म्हणजे धुतलेले ,पलंगावर निद्रिस्त अवस्थेत लोळणारे कपडे आमचे कपाट लगेच स्वाहा करत असे . हाय काय अन् नाय काय. पण एकदा गंमत झाली असेच अचानक पाहूणे आले. मी तत्परतेने दोरीवरचे आणि इतस्थतः पसरललेले कपडे केले गोळा आणि कपाटाच्या वासलेल्या तोंडात भरवला हा घास. पण त्या दिवशी नेमके कपडे जास्त अन् कपाटात जागा कमी मग काय जोर लगाके  हैशा! कोंबले सगळे कपडे. कपाटाच्या दारांनी बंद व्हायला जाम नकार दिला मग परत पाठीने जोर लगाके  -------. नंतर आई शाळेतून आली.आलेल्या पाहुण्यांची ओटी भरायची म्हणून खण काढायला तिने कपाटाचे दार उघडले. हाय रे दैयाsss. कपड्यांचा धबधबा अचानक अंगावर कोसळला, कपड्यांच्या पुराने अचानक हाहाकार माजला, मुंग्यांनी मेरूपर्वत गिळला अशी भयानक अवस्था  झालेली. आईची अवस्था  " ये क्या हो रहा है अशी" मला खरतर हसायला येत होत पण कपड्यांच्या टेकडीमधे लपलेल्या आईचा चेहरा न बघताच भावी संकटाची चाहूल माझ्यासारख्या चाणाक्ष  मुलीला लागली आणि मी तिथून काढता पाय घेतला.

      माझ्या लहानपणी एकदा आम्ही गावाला गेलो होतो तेव्हा चोरांने घर फोडले. कपाटाला तर कुलूप नव्हतेच त्यामुळे चोरांने ते उघडले असणारच पण मुलांच्या खेळण्यापासून ते धुवट कपड्यापर्यंत आणि भरपेट पुस्तकाने संपृक्त आणि संतुष्ट दिसणारे कपाट म्हणजे चोराच्या दृष्टीने अती अनाकर्षक वस्तू!  असले कपाट बघितल्यावर चोराला"कहा फस गयो" असे नक्कीच वाटले असेल.बहुधा कपाटाला लावलेल्या आरशात बघत रागाने स्वतःचे केस उपसत तो पळाला असणार. अर्थात  कपाटावरच्या जरा फिकटलेल्या जरा काळे डाग पडलेला आरसा म्हणजे आमच्या प्रसाधनाचे एकमेव साधन! आमच्याच नाही तर घरभर चिवचिवाट करत बागडणा-या  चिमण्याही नटायला मुरडायला याच आरशापाशी यायच्या. बर गुपचूप नटतील मुरडतील तर  -- पण नाही आरशावर चोचीने भरपूर टोचा  मारत बसायच्या.वर व्याज दिल्यासारखे आमच्या मेंदीला रंगायला लागणारे आपले पोटही तिथेच रिकाम करायच्या.

       लग्नानंतर पहिले झूट सूताराकडून मी बनवून घेतले छानसे लाकडी कपाट. त्यात कपडे ठेवायला ड्रावर्स.कपडे टांगायला मोठा कप्पा आणि हॅगर्स. अगदी वर माझा दिवाने खास!

ड्राॅवर केले खरे मात्र कोंबा करायची सवय लहानपणापासून हातवळणी पडलेली त्यामुळे  थोडे जरी जास्त भरले तर ड्रावर्स पूर्णपणे असहकार पुकारतात. अडेलतट्टू पणे उघडेच्या उघडे.  त्यात कोंबलेले कपडे काढेपर्यंत  तस्साच आ करून बसणार. ड्राॅवर अडकून बसला तर सुतारदादाशिवाय पर्यायच नाही.

        आमच्या घरातील मनीमाऊलाही या कपाटाचे विलक्षण आकर्षण! कपाट उघडले की चोरपावलांनी आत जाऊन बसणार म्हणजे बसणारच. एकदा गावाला जायच्या गडबडीत माऊ आत जाऊन बसलीय हे लक्षातच आले नाही.मी रेल्वेत बसले खरी पण जाताना मनी न दिसल्यामुळे बैचेनी होतीच.घरी बाईला दोनदा फोन केला पण मनीचा पत्ता कुठेच नाही. नंतर फोन आला बारीक आवाजात मनीचे ओरडणे ऐकू येतय पण दिसत नाही.क्षणात लक्षात आले बाईसाहेब नक्कीच कपाटात अडकल्यात. माझी खोली कुलूपबंद.  आतल्या कपाटालाही कुलूप लावलेले. पण शेवटी सुताराकडंन सगळी कुलुपे तोडल्यावर या चित्तथरारक नाट्याचा  शेवट झाला आणि मनीची रोमहर्षक सुटका.

      कपाटं म्हणजे नव्या जुन्याचा मस्त कुंभमेळा आहे .अनेक रहस्यांचे आणि पिढीजात मानबिंदूचे रहायचे हक्काचे ठिकाण आहे. कपाटाबरोबरच गृहलक्ष्मी  हे सर्व अटीतटीने संभाळत असते. कपाटाचे तोंड बंद करून स्वतः चावी एखाद्या तळघरातील भूजंगासारखी रक्षत  असते.                                                                 माझे कपाट खास माझ्यासारखच, माझ्या व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब!  सर्ववस्त्रे थोड्या  दाटीवाटीने इथे जमली आहेत.साड्यामधे पण खूप चांगल्या, जरा चांगल्या आणि ब-या सांड्या या क्रमाने त्या त्यांच्या वर्णव्यवस्थेत बसल्या आहेत. दोन तीन ड्राॅवर मधे वेगवेगळे ड्रेसेस चिकटून हाश हुश्श करत बसले आहेत. आता आम्हालाही सूर्यप्रकाश बघू दे असा पूकारा करत आहेत. सगळ्यात मस्त चैन करतोय 'दिवाने खास'. कपाटात सगळ्यांच्या डोईवर बसून तो मजा बघत असतो.आता लक्ष्मीबाई  पण चोरकप्प्यात निवांत असतात. सुफळ समाधानी आजी सारखेच आता माझे कपाट दिसते.एवढ्या साड्या एवढे ड्रेसेस बघून आता पाच वर्षे तरी स्वतःसाठी कपड्यांची खरेदी नाही नाही नाही मी  ठरविते.

     कपाट आवरताना मनोमन या सा-या वस्त्रांना मी डोळाभर बघते. प्रत्येकाची कथा वेगळी. आठवणी वेगळ्या.अनेक क्षण ते आठवत मी तल्लीन होते.मग दिवाने खासमधेही थोडी खुडबुड  करते .त्या आठवणींच्या रेशीम गुंत्यात पुरेशी अडकते .छान तंद्री लागते. मोगॅम्बो खूष हुवा!

    आता कपाट आवरताना पुरेसे आठवणींचे आलाप घेऊन झालेले असतात आता भैरवी सुरू होते.गच्च ओथंबलेले कपाट डोळाभर बघत असतानाच  अचानक मैत्रिणीच्या मुलीच्या लग्नाला जायचंय हे आठवते आणि खरोखर पोटात खड्डा पडतो. माझ्याकडे साड्याच नाहीत हा साक्षात्कार परत होतो.कोणीच न बघितलेली साडी नाहीच  की माझ्याकडे! उद्याच्या उद्या नवी साडी घ्यायलाच हवी मग कस एकदम शांत शांत वाटू लागते.मी समेवर येते.  कपाटही जरा स्वतःला हलवून जरा डोलून नव्या वस्त्रासाठी जागा तयार करण्याच्या मागे लागते. आनंदी आनंद गडे .ओम शांती शांती शांती!


माझे इतर ब्लॉग्स वाचायचे असल्यास खालील लिंक वापरावी

https://drkiranshrikant.pasaara.com