शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०

जुळ्या बहिणी ©️

  


लहानपणी आई आम्हाला खूप गोष्टी सांगायची. रंगवून रंगवून गोष्ट सांगण हा आईचा हातखंडा!  कित्येक वेळा तोंडात घास तसाच आणि "तू  पुढे सांग ना गोष्टीत काय झालं ते ?"असे म्हणत आम्ही जेवत असू. तिच्या त्या गोष्टी म्हणजे माझ्या आठवणींच्या पसाऱ्यातील अतिशय मौल्यवान ठेवा. आई पण तिच्या आठवणींचा पसाराच  आमच्या समोर  नेटकेपणाने आवरायची. तिच्या लहानपणीच्या गोष्टी सांगायची. म्हणजे आठवणींचा पसारा आवरणे ही" मेरी  खानदानी बिमारी है" आईची  एक आवडती गोष्ट होती जुळ्या बहिणींची! त्यातील एक बहिण सुंदर,आनंदी तर दुसरी कुरूप, दुःखी. आता मी आजी झाले.नातवंडांना गोष्ट सांगायची वेळ आली आहे, आईच्या गोष्टीतील ह्या   जुळ्या बहिणीं  सतत आठवतात. एकीचं नाव होतं 'पहाट' तर दुसरीचे 'सांज'!


                        जुळ्या बहिणी ©️


खरं तर तिची अनेक नावं आहेत. कोणी तिला उषा म्हणतात कोणी प्रफुल्लता म्हणतात कोणी प्रातःकाल म्हणतात .  ती येते ती वेळ म्हणजे उत्तर रात्री आणि सकाळ  यांच्या मधे असलेली सुगंधी कालकुपी .सूर्योदयाच्या आधीची वेळ .येते तिच मुठभर अंधारात अन् चिमुटभर उजेडात.पारिजातकाच्या सड्यावरून, फुलांच्या सुगंधावर स्वार होऊन, पक्षांच्या तुता-यांच्या तालावर! अशी ती 'पहाट'! सर्वांना आनंदित करण्याचं काम कित्येक  लाखो  वर्ष इमानेइतबारे करते आहे. अगदी आदिमानवाच्या काळापासून. आंधळ्या अंधारात पूर्वेकडे दिसणारा तो लालसर ,केशरी रंग ,किंचित  फिकुटलेले आकाश.  नवीन आयुष्याची, नवीन दिवसाची  सुरुवात. काळोख जाणार,  नव प्रकाश आता येणार हाच त्या आदिमानवाचा आनंद! अजून पर्यंत पहाटेचे महत्वाचे स्थान तसेच कायम राहिलेय. ती प्रसन्नवदना. आदिमानवच नाही तर अनेक प्राण्यांना, झाडाझुडपांना  ती संजीवन देते. तिचा हा प्रवास अजूनही तसाच चालू आहे कित्येक वर्षे, प्रत्येक ऋतुत.

         जेव्हा उन्हाळा सणाणून रागावला असतो.कारण एकच पृथ्वी सूर्याच्या प्रेमात आकंठ बुडालेली असते. त्यामुळे सहाजिकच तिचा आस  सूर्याकडे झुकलेला, अगदी कशाचीही पर्वा न करता! पृथ्वीचा उत्तर गोलार्ध उन्हाच्या तल्लखीने कासाविस!अशा अवघड वेळी दिवसाचा सर्वात सुंदर,रमणीय काळ असतो पहाटेचा. रात्र गरमागरम, या कुशीवरून त्या कुशीवर वळायला  लावणारी.कासाविस  करणारी. मग नजाकतीने  पहाट येते. क्षणात दूरवरून कोकीळेची आर्त पंचमातील आवर्तने  सुरू होतात. एक सुखद झुळूक घामेजलेल्या शरीरावर फुंकर मारते.बाहेर दाटलेला अंधार थोडासा सैलावल्यासारखा आणि कोमट होतो. तुम्ही नशीबवान  असाल तर येणारी प्रत्येक झुळूक वाळ्याच्या आणि मोग-याच्या सुवासात डुबकी मारून येते.रात्रभरच्या जागरणाने तळावलेले डोळे निद्रेला सपशेल शरण जातात. जागलेल्या संपूर्ण रात्रीनंतर पहाटे मिळालेली ओंजळभर  सुखद झोप!व्वा sss.

        याउलट थंडीची लांबलचक रात्र.गारठवणारी.पृथ्वीबाईंचा उत्तर गोलार्ध आता सूर्याला टाळून त्यापासून दूर झुकलेला! पृथ्वी आणि सूर्य  या दोघातील दुरावा म्हणजे शीतयुध्दच! थंडीतली पहाट नुसती उबदार दुलईत अनुभवावी .

           पहाटेची लाल केशरी पिवळी वस्त्रे पूर्वेदिशेकडे पडलेली असतात.आपल्या जुळ्या बहिणीला संध्येला ती  कशी द्यावी   या काळजीत पहाट! मग कधी ती धुक्याचा पडदा तयार करून त्या आड ते रंगित वस्त्र लपविते.

             या थंडीच्या वेळी अभ्यासा साठी पहाटे उठणे म्हणजे काळ्यापाण्याच्या शिक्षेहून अवघड शिक्षा.लख्ख  सकाळ  होईपर्यंत उबदार दुलईत ती सुखद उब अंगभर मुरवत, पुरवत पडून रहाणे म्हणजे सप्त स्वर्ग मिळाल्याचा आनंद. अर्थात दिवाळीची पहाट सगळ्या गोष्टींना अपवाद.

      पावसाळ्यात तर पहाट स्वतःचे अस्तित्वच हरवून बसते. एकसुरात टपटपणारा पाऊस आणि काळ्या ढगांचा धुमाकुळ  यात पहाट जाते बावरून आणि पटकन 'सकाळ' मधे विलीन होते. धबाधबा पाऊस पडत असताना अंधार दाटून आल्यावर शेवटी कोणती वेळ आहे हे  कळण्यासाठी घड्याळालाच  शरण जावे लागते. काहीच कळत नाही कुठली पहाट आणि कुठली दुपार ते!

      अशा या पहाटेच्या विविध त-हा. अल्पजीवी पण नितांत सुंदर दवबिंदूंचा खजिना, पक्षांचा किलबिलाट, अंधाराच्या कुपीतून उधळले गेलेले केशरी  पिवळे लाल रंग,दिमाखात प्रवेश करणारा सूर्यदेव हे खास पहाटेचे दागिने. शेवटी जुळ्या बहिणीतली सुंदर,लाडकी, उत्साही बहिण नं ती!!

       अन्  पहाटेची जुळी बहिण? जर गावाबाहेर अथवा शेतात आपण रहात असलो तर आपल्याला पूर्णपणे भेटते 'सांज'. कोणी तिला 'कातरवेळ'  म्हणतात तर कोणी 'दिवे-लागणीची वेळ'.अतिशय  योग्य नावं मिळाली आहेत तिला. ही पहाटेची सहोदर! जुळी बहिण! दुर्मुखलेली, कोमेजलेली! कल्पना करा संध्याकाळ  निघाली आहे रात्री कडे . सूर्यास्त होतोय पण अजून गुडूप रात्र सुरू व्हायच्या आधी तिची वाट अडविते 'सांज'.धुळीचे वातावरण, मुठी मुठीतून निसटून जाणारा उजेड आणि ओंजळी ओंजळीभर दाटणारा काळोख. एखादी वाट चुकलेली चांदणी आकाशात ! करsकssरकsर रातकिड्यांचा आवाज कानात, मनावर ओराखडे  काढतो आहे, घुबडाचा मधनच घुत्कार, वटवाघळांच्या   सावल्या आता उडताना दिसताहेत, दूरवरून ऐकू येणारी कोल्हेकुई ह्रदयाचे ठोके वाढवतेय. पक्षी कधीचेच घरट्यात परतलेत.कधी कधी दूरवरून कानावर येते फक्त विराणी! . दूर गेलेल्या प्रियजनांच्या आठवणीने आपल्या जिवाची नुसती घालमेल उडाली आहे. देवघरातील निरंजनाकडे क्षणाक्षणाला  नजर वळते आहे. अशुभाच्या आशंकेने डोळे ओलावताहेत. करकरे सांज अशी वेळ ही.

        संध्याकाळ आणि रात्र यांच्या सीमेवर रेंगाळत असते सांज. पण गम्मत म्हणजे तिच्याकडेही रंगीत वस्त्रे  असतातच अगदी संध्याकाळ जवळ असतात एवढी नसली तरी थोडी कमी का असेना  असतातच.   सांज ही आपल्याला काळोखाकडे नेणारी. अनादी अनंतकाळापासून घाबरवणारी. तान्हया बाळांना तळतळून रडविणारी.संध्यासमयीची उदासी हा वैद्यकीय  शास्त्रातील कुतुहलाचा विषय.म्हणूनच  या उदास मनावर उतारा म्हणूनच बहूधा पूर्वी घराघरात कोवळ्या आवाजातील शुभंकरोती समईच्या उजेडात घर  उजळवून टाकत असे. सांज  घनघोर अंधारात विरून जाते. विरता विरता आपली वस्त्रे पूर्वदिशेला आपल्या बहिणीसाठी ठेवून जाते.

         या अशा दोघी जुळ्या.तस पाहिलं तर दोघींच्यात साम्यही खूप. लाल पिवळ्या केशरी रंगाची कमी जास्त आतिशबाजी आकाशात दोघीही करतात.  आपल्या पूर्व किनारपट्टीवर समुद्रकिनारी काढलेला सूर्योदयाचा फोटो आणि गोव्याला काढलेल्या सूर्यास्ताच्या फोटो  यातला फरक कोणीही ओळखून दाखवावा. तसाच समुद्र, तीच माडांची गर्दी, पांढरी सोनेरी वाळू आणि अमर्याद  पसरलेल्या समुद्राच्या क्षितीजावर तो समुद्रातून हळूच डोकावणारा कोरभर सूर्य! यातला सूर्यास्त कुठला आणि सूर्योदय कुठला हे पैजेवार सांगाव.इतकं दोघींच्या मधे  साम्य! किंवा कुठल्याही डोंगरमाथ्यावर सूर्यास्त  किंवा सूर्योदय पहावा. एकदम सेम टू सेम.तिच डोंगरांची महिरप, अंधार-उजेडाचे झकास काॅकटेल,लाल,नारिंगी,पिवळ्या निळ्या रंगांची लयलूट. दोन डोंगरांमधे किंचित दिसणारा सूर्य मस्त लालकेशरी! आता ओळखा बघू पहाट का सांज?

       पहाट कमलिनींना उमलवत असेल पण रात्री उमलणा-या कुमुदीनीवर तिची जादू चालतच नाही . सांज येईपर्यंन्त कुमुदीनी पाकळ्या घट्ट मिटून फुरंगटून बसलेली. सांज येताच लागली खुदखुदायला! निशीगंध, रातराणी,गुलबक्षी घमघमतात, खुलतात फक्त सांजेलाच .प्रातःकाली  नाही. वाघासारखा डौलदार प्राणीही सांजेला टक्क जागा होतो आणि तेव्हा ख-या अर्थाने त्याच्या दिवसाची सुरवात होते.जंगल आळस झटकते.पाणवठ्यावर जमते .आता खरोखरच  जंगल जागे होते.बाकी आपले निशाचर पक्षीही जोरदार धडक मारतात, उंदरांसारख्या उपद्रवी प्राण्यांना उचलायला. तेही सांजेलाच! तेथून अगदी रात्र संपेपर्यंत त्यांचा अनिर्बंध संचार सुरूच. 

           सांजही अशा  कित्येक जीवांना उत्साह देते अगदी' पहाट' 'जीवन देते नं  तसेच . एवढेच नाही तर जसे नवजीवनाची सुरवात पहाटेपासून असते तशीच हवाहवाश्या पुरेशा विश्रांतीचा पाया रचते सांज. 'जरा थांबा'. हा तिचा मंत्र! मग ही सांज वाईट कशी?ही सांज कुरूप कशी? तिला दुर्मुखलेली तरी कसे म्हणायचे? फक्त अंधाराकडे नेते म्हणून? नेते अंधाराकडे पण  सकल जनांना शांत झोप देऊन अधिकच ताजेतवाने करायलाच ना?.

         माझ्या उत्फुल्ल नातीच्या जीवनाचा उषःकाल सुरू आहे .   आणि मी तिची आज्जी सांजेच्या कठड्याला धरुन उभी आहे. 

माझ्या नातीला जेव्हा ' मी'   जुळ्या बहिणींची गोष्ट सांगेन तेव्हा नक्कीच  सांगेन सांज कधीच  दुःखी, दुर्मुखलेली नसते. ती वाईट तर मुळीच नसते, फक्त ती पहाटेपेक्षा  वेगळी असते. पहाट जशी नव चैतन्याने रसरसली असते, तशीच सांज विश्रांतीसाठी आसुसली असते. पहाटेसारखीच सांजही शितल,सुंदर असते. अशा या सुंदर आनंदी पण आगळ्या वेगळ्या जुळ्या बहिणींची ही गोष्ट सुफळ संपूर्ण. 



माझे इतर लेख वाचायचे असल्यास खालील लिंक वापरावी. 

      https://drkiranshrikant.pasaara.com 


            

         




शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२०

शरद-हेमंत©️

                  



कॅनडातील फाॅल सिझनचे  मनसोक्त कौतुक  करताना,अनुभव घेताना आठवत होते ,  त्याच वेळी आपल्याकडील  घराघरात आणि घटाघटात उगवलेले धान्य. ते लाजरे ,नाजुक, उत्सुक पोपटी कोंब, नवरात्रीतील आदीशक्तीची पूजा. मातीची सृजनशीलता. तो तारूण्याचा उत्साह आणि रंगलेला गरबा.कॅनडातील फाॅलचे चटकीले रंग भरूनही वर उरणा-या रंगाच्या त्या फुलपाखरी साड्या ते झगमगते घागरे.मग ठरवलंच,आता लिहायचं त्या आपल्या शरद हेमंताबद्दल.

    

                       शरद -हेमंत©️

 

            खरं तर ॠतुंच्या  चांगल्या भरभक्कम  सहा जणांच्या कुटुंबात एकच गडबड उडाली असते.दबक्या आवाजात सगळे बोलत असतात. कुटुंबप्रमुख  चांगलेच रागावले असतात.ग्रीष्मच तो!सगळ्यांना  सळोकीपळो करत असतो. नद्यांच्या  पात्राची आता वालूकामय मैदान झाली असतात.सर्वत्र असते फक्त मरगळ. धुसफुस. फुफाटा म्हणजे जणू उन्हाळ्याचे संतप्त फुत्कार.

            आता रागावलेल्या घरधन्याला सावरायला, शांत करायला  सरसावते वर्षा राणी. तुता-या घुमू लागतात, रणदुंदूभी वाजू लागतात. ॠतुंच्या घरातील कर्तबगार स्त्री म्हणजे वर्षा ऋतू. खुषीत असली तर लफ्फेदार हिरव्याकंच वस्त्रात मिरवत येते नाहीतर ग्रीष्माच्या हो मधे हो मिसळून सगळ्यांचे धाबे दणाणवते.  ग्रीष्माचा अध्याय पुढे सुरुच. वर्षा ऋतू शिवशक्तीचे रुप! अर्धनारी नटेश्वरासारखे.कधी ममताळू तर कधी शिवरुपातले तांडव आहेच. घरातील कर्ता करविता जरी ग्रीष्म असला तरीही तिजोरीच्या चाव्या संभाळतो तो वर्षा ऋतूच. त्यामुळे सर्व ऋतूंच्या सोहळ्यात भाव खाऊन जाते तीच.

              याऩंतर " आम्ही आलो ssss, पोतडीत खूप गमती घेऊन" असा कुजबुजता डायलॉग मारत प्रवेश करतात लिंबू टिंबू पण समस्त ऋतूचक्राचे लाडके' शरद-हेमंत' ऋतू. बाकी सर्व ऋतूमंडळी आवाssज कोणाचा अशा आरोळ्या ठोकत प्रवेश करते झाले तरीही शरदहेमंताची जोडगोळी येते शांतपणे. दोघेही एकमेकांत बेमालूम मिसळूनही स्वतंत्र. स्वत:चा आब राखून, जणू सयामी जुळेच. शरद ॠतूची उजवीकडची बाजू पावसाने भिजवलेली तर हेमंताची डावीकडची बाजू थंडीने सुखावलेली. कसलीच   फार तकतक यांना मानवत नाही. त्यामुळे 'अती' पूर्णपणे वर्ज. ना कडक उन्हाळा, ना गोठवणारी थंडी, ना धो धो पाऊस.शरद हेमंत असे उंबरठ्यावरचे. मवाळ! पण त्यांच्या जवळ असते आनंदाची उत्साहाची गुरूकिल्ली.येताना त्यांच्या पोतडीत ठासून भरले असतात चंदेरी सोनेरी आनंदाचे दिवस.

           पारिजात, जाई जुईंनी पावसाळ्यानंतर विश्रांती घेतलेली असते. पण आता या ॠतुंच्या स्वागतोत्सुक कार्यकर्त्याचे काम करतो झेंडू.   शरद-हेमंताच्या आगमनासाठी जागोजागी मदमस्त पिवळे केशरी गोबरे झेंडू  आपले ‘ढाई किलोका’ गोलमटोल हात हलवत सज्ज असतात.एका किडमिड्या काडीवर ताठ मानेने उभा असलेला झेंडू. अनेक छोट्या छोट्या मखमली पाकळ्यांची गच्च आवर्तने.सतत हसणारा.रंग तर इतके सुंदर की बस!  महाराष्ट्रात तरी या छोटूल्या शरदहेमंताला सजवायचे काम करतो तो झेंडूच. त्यांना खरे वैभव देतो तो झेंडूच. रसरशीत, सोनकेशरी, वाटोळा, आनंदी ,जणू सुखी माणसाचा पिवळा कोट यालाच ऋतुचक्राने  दिला आहे असा झेंडू. कधीकधी वाटत की इतक्या सुंदर फुलाचे नाव मायमराठीने इतके रुक्ष कां बरे ठेवले असावे? हिन्दीत तो असतो भारदस्त ‘गेंदा’, तर इंग्रजीमधे ‘marigold’ असे सोनेरी झळझळीत नाव. मग मराठीतच असा 'डू' कारान्त का? बहुधा शरद हेमंताचा झेंडा फडकवणारा ‘तो’ लाडीकपणे झेंड्याचा बनला झेंडू. शरद –हेमंतासाठी तो आपले सोनेरी वस्त्र बिनदिक्कत पसरतो, दारावर  तोरणात सजतो, रांगोळीत खुलतो. कधी कधी जोडीला शेवंती, मधूमालतीही फुलून सांगत असते "जरा इधरभी देखिये साहेबा"

         शरद हेमंताला खेळायला निळे स्वच्छ आकाश मोकळे असते. कधी काही  चुकार पांढ-या ढगांची चवड असली तर असते. वर्षा ऋतूने मोठेपणाचा आब राखत आपला काळ्या ढगांचा पसारा आता आवरला असतो.रात्रही अधिकाधिक देखणी होऊ लागलेली. खरेतर तोच चंद्रमा आणि तेच नभ पण वर्षभरातील बाराही पोर्णिमा स्वतंत्र बाण्याच्या. प्रत्येकीचा बाज वेगळा प्रसाधनही वेगळे. पण पोर्णिमा नुसती पहायची नाही तर अनुभवायची म्हणजे ती कोजागिरीचीच. कोजागिरी येते तीच मुळी स्वच्छ, दुधाळ, मधाळ वातावरण घेउन. चंद्रिका आता मुक्त झालेली असते. ना ढगांचा घुंगट ना उगाचच लाजणे. आकाशातील ते झळझळीत पण सोज्वळ रूपडे आपलं गारूड धरेवर पसरविते. त्या चंदेरी झोतात सर्व हिणकस वितळून जाते.उरतो तो शुध्द रुपेरी प्रवाह. मग गरमा गरम दुधाबरोबर गप्पा रंगू लागतात, कुठे गाण्यांच्या लकेरी हवेला सुरेल बनवितात. पत्यांचा डाव रंगात येतो. सारा चराचर जणू उत्कटपणे चंद्राला सांगत असतो “मी जागा आहे” , “मी जागा आहे.”

            या शरद हेमंताच्या कालावधीत तांदळाच्या शेतात जायचा योग आला तर तुमची अनेक जन्मांची पुण्ये फळाला आली आहेत असे समजावे. अहाहाsss पाणी पिऊन तरारलेली ती रोपे,जड झाले ओझे अस पुटपुटत वाकलेल्या त्या सोनेरी लोंब्या, शेताजवळून जाताना हळूच कुरवाळणारी सुगंधी हळवी झुळूक , वाह, कुठे लागावेत ते एअर कंडीशनर? 

     आपल्याकडे  यावेळी सणावारांची मांदीयाळी असते. शरद हेमंत तर त्यांच्यासवे घेऊन येतात नवरात्री. ते सृजनाचे पुजन. त्या आदीशक्तीची आराधना.नवधान्याचे स्वागत.तृप्तपणे वहाणा-या नद्या.नऊ दिवसांनी येणारा हसरा दसरा.

        लहानपणी नवरात्रीत सर्वात जास्त आकर्षण  असायचे भोंडल्याचे. पाटावर हत्ती रेखून त्याला हळदी कुंकू वाहून जोरकस आवाजात गायलेली भोंडल्याची गाणी! .हातात हात गुंफलेले. हसरे चेहरे, लयबद्ध  टाकलेली पावले आणि ओठात भोंडल्याचे गाणी! अस वाटायच झेंडूंच्या गोल गोल गच्च पाकळ्यांसारख्याच आम्ही पाकळ्या आहोत आणि सगळ्या जणी मिळून एक छानसे  फुलच आहोत.नंतर दंगल उसळायची खिरापत  ओळखायची. खिरापतीचा डबा वाजवला जायचा. काही चतुर आणि चाणाक्ष मुली पटकन आवाजावरूनच ओळखायच्या. कधी खिरापत ओळखली नाही की सुरू व्हायच

    " वाटली डाळ"???? -----अंssहं

     चुरमु-याचा चिवडा?------   नाहीsss परत डब्यांचा खsड खssड आवाज.

     "मग नारळाच्या वड्या?" एक चिमुकला आवाज

" नाहीच मुळी"

"ए खिरापतीचा पहिलं अक्षर सांगना" आता सगळ्यांनाच घाई झाली असे. यथावकाश खिरापत ओळखली जायची. सगळ्या गोल करून खाली बसायच्या आणि ती घासभर स्वर्गीय चवीची खिरापत सगळ्यांना मिळे . अगदी मुलांनासुध्दा. काय वेडेपणा आहे असा शिष्ठ  चेहरा करून उभी असलेली मुल खिरापत खायला लगेच यायची.

      नवरात्रीत अष्टमीला कुमारी पुजन असायचे तेव्हा आम्हाला खास  आमंत्रण. मग लफ्फेदार  परकर  घालून  आम्ही जायचो.मोठ्या मोठ्या मावशा , आज्या आमचे पाय थुवायच्या. छान छान वासाचे थंड थंड चंदन लावायच्या. केवढा तरी मस्त खाऊ असायचा. त्या दिवशी आम्ही  असायचो देवीस्वरूप. कसले मस्त वाटायचे.

          कोजागिरीच्या त्या रात्र रात्र रंगलेल्या मैफिली , या सगळ्यांवर कळस चढवायला आलेली लखलख दीपावली! नुसता निखळ उत्साह, आनंद. हवेत एक कुरकुरीतपणा असतो.पहाटे अंगावर उबदार दुलई हवीहवीशी वाटते. खोलवर घेतलेल्या श्वासात शीतल, स्वच्छ हवा सुखावत जाते.त्यात उन्हाळ्याची धग नसते,पावसाळी ओलसरपणा नसतो,असतो तो फक्त गोडसर , स्वच्छ, करकरीतपणा.त्रिपुरारी पोर्णिमा  येते. कु. तुळशी धुमधड्याक्यात सौ.कन्हय्या बनून रुक्मिणी मातेची सावळी सवत होते.आता शरद हेमंत आवराआवरीला सुरवात करतात.

           शरद हेमंताची शाळा संपायची वेळ येते.थोडी पिवळी पाने शांतपणे वृक्षाची साथ सोडत असतात. त्या पानांचे शिंपण  झाडाखाली होत असते. नेमस्तपणे. रोज त्याचा ढीग हळूहळू  वाढतच असतो. घराघरात दुलया आता कपाट सोडून बाहेर आलेल्य असतात. गरमागरम खिचडी आणि आंबट तिखट ‘सार’ यांची आठवण होऊ लागते, मग जाणवते की आता निरोप द्यायची वेळ झाली आहे. पेटत्या शेकोटीच्या साक्षीने शरद हेमंत अलविदा म्हणतात. 

        हवीहवीशी गुलाबी थंडी घेऊन वृद्ध, ‘राजा ययाती’ सारखे उसने तारुण्य मिरवणारा शिशीर ऋतू येतो. बघताबघता गुलाबी म्हणून कौतूक केलेली ही थंडी आपले मायावी रूप सोडून खरेखुरे रूप दाखवू लागते. आपल्या थंडगार कवेत गुदमरेपर्यंत आपल्याला आवळते अन एक दिवस वसंतासमोर सपशेल लोटांगण घालते. वसंत येतो  सुगंधात न्हाऊन आणि कोकीळेच्या आवाजात  शिट्टया मारत. नव्या ऋतूचक्राची परत  सुरवात!!. अव्याहतपणे चालणारे हे ॠतुचक्र! 


माझे इतर ब्लॉग्स वाचण्यासाठी  लिंक  :

https://drkiranshrikant.pasaara.com 

शनिवार, १२ सप्टेंबर, २०२०

बाई©️



माझा हा ' पसारा' आवरताना कधी कधी वाटते' 'मी 'कोण? क्षणात जाणवतं मी  ब्रम्हांडातील एक अतीसूक्ष्म कण. पण या कणाला घडवण्यासाठी  वाढविण्यासाठी  किती जणांनी  कष्ट घेतले  आहेत.या सर्वांना ,त्यांच्या आठवणींना ओलांडून पुढे जाणे अशक्यच .यातील फक्त महत्त्वाच्या स्त्रियांचाच विचार जरी  केला तर आपसूक आठवतात दोन्ही आज्या. आईकडची आणि  वडिलांकडची. या दोन्ही आज्यांचे व्यक्तिमत्व  पूर्णतः वेगळे,लोभसवाणे. पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्या संत महात्माही नव्हत्या ना दुष्ट प्रवृत्तीच्या! त्या होत्या माणसातले गुणावगुण असलेल्या स्त्रीया. या संपूर्णतः' मानवी' असलेल्या एका आजीबद्दलच्या आठवणी आवरायच्यात आज.  ही आजी म्हणजे इंदोरची आज्जी 'बाई'.

                            बाई©️

"हे भय्या जरा उस खोकेको उघडो और सगळ इस पिशवीमें डालो!" राष्ट्रभाषेचे अशी चिरफाड कानावर आली की समजावे इंदोर आजीचं कामगारांशी बोलणं सुरू आहे. ही आमची आजी म्हणजे आईची आई 'बाई' !' ही वयाच्या 14 व्या वर्षापासून इंदोरला  राहूनही राष्ट्रभाषेच्या चिंध्या केल्याशिवाय बोलायचीच नाही. हिंदीतल्या मान्यवर साहित्यिकांने जर ते ऐकलं असतं तर ते हाय खाऊन नक्कीच बेहोश   झाले असते.
     ही आमची इंदोरची 'बाई' चकचकित गोरी, केसांचा छोटासा अंबाडा, शिडशिडीत,मध्यम उंची, महा भेदक भु-या डोळ्यांची, नेटकी नऊवारी साडी नेसलेलीआणि झपझप चालणारी अजूनही डोळ्यासमोर आहे.कामाचा उरक अन्  सळसळता उत्साह, अचंबित करणारं! इंदोरला आम्ही जाताच दारात आपल्या लेकीवरून आणि नातींवरून  भाकर तुकडा ओवाळून टाकायला उभी. तिला बघूनच प्रवासाचा  शीण पूर्णपणे उडन छू व्हायचा.
              इंदोरचे ते घर म्हणजे आमच्या दृष्टीने एक राजवाडाच! घराभोवती भरपूर मोठी बाग आणि जवळजवळ  पंचवीस मोठ्यामोठ्या खोल्यांचा दुमजली  प्रासाद. प्रत्येक खोली खास अँटीक सामानाने सजलेली. आणि या घराची सम्राज्ञी माझी 'बाई'! मूळ कोकणातली .वयाच्या 14 व्या वर्षी आपल्या वकील नवऱ्याबरोबर नशीब आजमावायला  इंदोर सारखे अति अनोळखी ,संपूर्ण वेगळी भौगोलिक, भाषीय पार्श्वभूमी असलेले शहर त्यांनी निवडले .आणि वकिलीत आजोबांनी  आपले साम्राज्य उभारले.पण 'बाई'  मनाने अजूनही कोकणातल्या परसात, सड्यावर, वाडीत, पुळणीवर होती.  कोकणी म्हणी आणि कोकणी शिव्या सहजतेने वापरणारी. वाणी तर अशी अस्खलित की बस! पांडवप्रताप किंवा रामायण वाचायला बसली आणि त्यात वनवासातील हाल सुरू झाले की हमखास ऐकायला बसलेल्या चार-पाच बाया आणि दोन चार बीट्टी पोरं रडायला लागायची अगदी हमसून हमसून! इतक खुलवून खुलवून सांगायची ती.
           'बाईच्या' हाताला चवही असली भन्नाट होती. आम्ही तिकडे गेल्यावर खास तिचे पदार्थ करण्यासाठी स्वयंपाकाचा ताबा ती स्वतःकडे घेई. पण कुठलाच पदार्थ  मोजून मापून केल्याचं मला आठवत नाही.(आज कुठलाही खाद्यपदार्थ  करताना ग्रॅम आणि मिलीग्रॅम मोजून घटक घातले तरी पदार्थ  यथातथाच) स्वयंपाक घरात फोडणीला पदार्थ टाकून दुसऱ्या खोलीत काही कामाला ती जाई. आम्हाला चिंता या पदार्थाचे आता होणार तरी काय? पण परत येऊन अंदाजे हाताने तिखट मीठ टाकले की निघाली परत काहीतरी काम करायला! सगळाच स्वयंपाक  असा फिरत फिरतआणि अंदाजपंचे. पण खरंच सांगते पदार्थ झाल्यावर असा भन्नाट व्हायचा  की साक्षात देवी अन्नपूर्णाने तो केला आहे असा. अक्षरश ऊंगलीया चाटते रह जाओगे! हा गुण तिच्या आज्जीपणाचा होता की हाताचा हे देवच जाणे ! इंदोरमधल्या खाद्य पदार्थांच्या स्पर्धेत कायम पहिला नंबर तिचाच! संस्थानिकांकडे  आजीला  हळदीकुंकवाला बोलवणे आलं की काळी नऊवारी चंद्रकळा नेसून   दागिने घातलेली  आज्जी साक्षात लक्ष्मीच वाटायची.          
        घराचा चौक खूप मोठा असल्यामुळे  त्या भागातला  गणपती  आजी-आजोबांच्या घरीच बसायचा. मुलांचे भरपूर सांस्कृतिक कार्यक्रम होत असत.अर्थात  त्यावर देखरेख 'बाईचीच'  
       वर्षानुवर्ष माळव्यात राहूनही कोकणी तिरकसपणा जीभेवर कायम मुक्कामाला. कधीकधी अतिशहाणपणा करून कुठल्यातरी पुस्तकातले तत्त्वज्ञांन कोणी नातवंड सांगायला लागले की 'अहो'सखाराम गटणे' म्हणून ती हाक मारायची कारण पु.लं आणि चि. वि. जोशी तिचे आवडते लेखक. आणि वर म्हणायची कुठून शिकला पोपटपंची!
          बाईची बाकी नातवंड जवळपासच्या शहरातच, त्यामुळे तिला नियमित भेटत. तिला त्यामुळे वर्षा  दोन वर्षांनी  भेटणा-या आमची अपूर्वाई  अधिक.आईच्या आणि तिच्या जिव्हाळ्याच्या गप्पाही खूप वेळ चालत. मात्र आम्ही तिथे रेंगाळायला लागलो की लगेच आम्हाला हरकटायची. आम्ही गावात नातेवाईकांच्या कडे गेलो आणि परत यायला वेळ लावला तरी ती आईवर रुसायची.
         आजही जेव्हा जातीपाती वरुन खूनखराब्याच्या बातम्या ऐकते तेव्हा परत प्रकर्षाने  बाई आणि आजोबा आठवतात.ही गोष्ट आहे सत्तर वर्षापूर्वी त्यावेळी ऋग्वेद्याने यजुर्वेद्याशी  लग्न  जामविले तरी हाs हाकार होणारा काळ. त्या काळामध्ये आजी आणि आजोबांनी आपल्या मोठ्या डाॅक्टर मुलीसाठी निवडला हुषार , कर्तबगार डाॅक्टर मुलगा .आझाद हिन्द सेनेत कार्यरत पण पंजाबी.
              एकदा नववीत असताना मी सुट्टीत इंदोरला गेले होते तेव्हा बाईच्या हातात अगाथा ख्रिस्तीचे इंग्रजी पुस्तक. मी हादरले "अग बाई इंग्रजी शिकलीस तरी कधी?"ती म्हणाली "अगं काय सारखं ते पांडवप्रताप वाचायचं? परतपरत वाचल्यावर का पांडवांचा वनवास चुकणार आहे? का पुराणकथांमध्ये काही बदल होणार आहे? यांच्याकडूनच इंग्रजीचे धडे घेतले.तेवढच नवीन काहीतरी" त्याकाळात माझे स्वतः चे पाठ्यपुस्तक सोडून  इंग्रजीचं अवांतर वाचन शून्य. त्यामुळे'बाई' एवढी भारी  वाटली ना मला. आणि नंतर परत वर्षाने  मी गेले  तर इंग्रजीवर तिने खरोखर प्रभुत्व मिळवले होते. खरोखर आता विचार केला तर जाणवतं केवढी  प्रचंड हुशारी! तसे पाहिले तर फक्त तिसरीपर्यंत शिकलेली होती ती!
          पण एवढे असूनही हिन्दी भाषेत मात्र सुधारणा शुन्य.तेव्हा सारा चलाखपणा, हुषारी गायब! हिशेबातही अती चोख!पण हिन्दी जीभेपासून चार अंगूळे दूरच ठेवलेली. कोकण हा तिच्या मनातला खास हळवा कोपरा आणि कोकणीशिवाय कुठल्याच भाषेला  खास स्थान नव्हते तिच्या मनात. दुसरा हळवा कोपरा तिच्या मनात होता तो म्हणजे एका काचेच्या कपाटात ठेवलेली मातीची भांडी , काही मातीच्या बाहुल्या. भातुकलीतील बाहुलीच्या लग्नात स्वतःचे खरे दागिने सुद्धा आम्हाला देणारी आमची 'बाई' त्या साध्या खेळण्यांना मात्र आम्हाला कधीच हात लावू देत नसे. सगळं घर आम्हां साठी मुक्त असताना ते कपाट मात्र बंद ठेवत असे .शेवटपर्यंत हा कुठला हळवा कोपरा तिच्या मनात होता कोण जाणे.
            आमचे परत जायचे दिवस जसजसे जवळ यायचे तस-तशी बाई अधिकाधिक बेचैन होत असे. आम्हाला फ्रॉक घेणे, आईला साडी, खाऊ आणि सगळ्यात खास असे तिने आमच्यासाठी म्हणून लपवून ठेवलेली लिंबाच्या लोणच्याची बरणी. अजूनही कुठल्याही लोणच्याला त्याची सर आलेली नाही. अख्खे  लिंबू आणि त्यांचं लाल भडक लोणचं आत्ता सुद्धा विचारानेच माझ्या तोंडाला पाणी सुटते आहे.
             बाईच्या घरी नेहमी कोण कोण मंडळी मुक्कामाला असत.अगदी सहा-सात महिने सुद्धा आपल्या पूर्ण कुटुंबकबिला घेऊन नोकरी नाही या कारणाने काही कुटुंब राहात. नात्यातलीही कोणी कोणी असेच.या सर्व मुलांना दूध मिळावे म्हणून घरी म्हैसही पाळली होती. तेथे कोणताच आपपरभाव नसे.
        एवढी प्रेमळ बाई, पण आपल्या सूनांपासून फटकूनच असे.  अर्थात आम्ही जात असू तेव्हा तिच्या सुनाही सुट्टीसाठी आलेल्या. आमची बाई जशी आम्हाला आवडायची तशाच या सर्व माम्याही खूप खूप आवडायच्या.कसली मस्त मज्जा यायची त्यांच्या गप्पा ऐकताना! बाई आणि तिच्या सुना भांडल्या कधीच नाही पण तणाव आम्हालाही जाणवायचाच.  त्यांचं सासुसुनेच नाते कुठे किरकिरत होते कोणास ठाऊक.?
     परत माझी इंटर्नशिप संपल्यावर  आईला घेऊन इंदोरला गेले. आजोबा नुकतेच  स्वर्गवासी झाले होते. घर भकास वाटत होतं. पण बाई एवढ्या मोठ्या घरात एकटी राहत होती. मावशीने,मामांनी  दहा वेळा बाईला त्यांच्या घरी रहायला  बोलवले पण या अभिमानी बाईंनी आपले घर सोडले नाही. आजोबा गेले तेव्हा आजोबांनी एक अतिशय सुंदर मृत्युपत्र बाईच्या नावांनी लिहीलेलं होतं. आजोबांनी त्यात लिहिलं होतं "सरस्वती तू नुसती मूर्तिमंत सरस्वती नाहीस, तर तू अन्नपूर्णाही आहेस, लक्ष्मी आहेस. आज मी जो आहे तो केवळ तुझ्यामुळे .यातील प्रत्येक पैशावर फक्त तुझा हक्क आहे .हे घर केवळ तुझ्यामुळे घर म्हणून उभे राहिले." त्या मृत्युपत्राचे वाचन झालं तेव्हा सगळ्यांच्या डोळ्याला अश्रुधारा लागल्या होत्या. त्या काळात एकमेकांबद्दल असं प्रेम उघडपणे व्यक्त करणं हेसुद्धा मला वाटत   जरासे धक्कादायकच होते. बायकोनी आयुष्यभराची साथ केली ती ओळखून तिला सर्वोसर्व अधिकार आणि महत्त्व देणारे आजोबाही श्रेष्ठ!
      बाईने आता घरी जेवणाचा डबा लावला होता. आयुष्यभर आपल्या हातचं सुग्रास खाणं सगळ्यांना देणारी बाई,आज मात्र आम्ही आणि ती  त्या डब्यातले अन्न खात होतो. स्टोव्ह सुध्दा ठेवला नव्हता. घरातील सर्व वस्तू देऊन ती निःसंग झाली होती.
हळूहळू मिटत चालली होती. डोळे मात्र तसेच भेदक! जेवण म्हणजे कसेबसे दोन घास.नियमितपणे डाॅक्टर येऊन तपासून जात पण मनाने ती केव्हाच आजोंबांजवळ पोहचली होती.मला जाणवल  होतं, की साधारण सहा महिन्याचा कालावधी तिच्याकडे   आहे .कुठलंही साधन घरात नव्हतं पण आईने धडपड करून करून सगळे जमवून निघायच्या आदल्या दिवशी निगुतीने जेवण करून बाईला खाऊ घातले.बाईने लेकीचे मन राखून जेवण केले. दर वेळेस आजोळ सोडताना माझ्या गळ्यात, डोळ्यात काही तरी चुरचुरल्यासारखे व्हायचेच  पण या वेळी मनावर पूर्ण  मळभ पसरले होते आणि  डोळ्यातून ते मुक्त पणे वाहत होते. त्यानंतर दोन महिन्यांनीच बाई गेली. एक अतिशय स्वाभिमानी, हुशार, सुगरण, प्रेमळ आणि सडेतोड व्यक्तिमत्त्व, मनाने काळाच्या खूप पुढे असलेली माझी बाई, सारे कायमच संपलं.
             बाई गेल्यावर मामांनी काही काळाने  ते घर विकलं. नंतर खूप वर्षांनी पुन्हा एकदा इंदोरला  जायचा योग आला. त्यावेळी मुद्दाम माझ्या मुलांना घेऊन मी तिथे गेले. पण माझ्या आठवणीतला प्रासाद आता एका मोठ्या अनेक मजली टॉवरमध्ये बदलला होता. झाडे गेली होती.कुठलंही ओळखीचे चिन्ह तिथे दिसत नव्हते. 
        आज एवढच समाधान मला वाटतय की  वयाच्या साठाव्या वर्षी आंग्ल भाषेवर प्रभूत्व मिळवणारी 'बाई'  आणि   वयाच्या ऐंशीव्या वर्षात सुरेख इंग्रजी कविता करणारी तिची गणितज्ञ मुलगी म्हणजे माझी आई  यांची एक छान  साखळी आहे   .           
          आता विचार करताना वाटते बाहेरच्या अनेक कुटुंबांना बाईने आधार दिला .ना त्याचा कुठे  गाजावाजा ना स्वतःभोवती कौतुकाचे दिवे लावणे. ते कोणी बाहेरचे वाटलेच नाही तिला.सारे आपलेच.ती पिढीच आजच्यापेक्षा वेगळीच.एकमेकांना मदत करणे श्वास घेण्याइतके सहज होते. ती धार्मिक नव्हती. परंपरेचे जोखड,कर्मकांड सहजतेने तिने काढून टाकले. 'लोक काय म्हणतील?' ह्या वाक्याला तिने कधीच तिलांजली दिली होती. आज पिढी बदलली तरी माहेरची ओढ , जिव्हाळा  तोच आहे पण त्यातील सर्वसमावेशक वृत्ती लोप पावली आहे का?आज स्वतः आज्जी झाल्यावर बाईच्या कित्येक गोष्टींचा अर्थ  कळतो आहे. तिचा आनंद, व्यथा आज मी अनुभवते आहे.
           https://drkiranshrikant.pasaara.com 

शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२०

मामी©️

 काही काही नाती,ओळखी मनात खोलवर रुतुन बसतात.कधी कधी तुमचे रक्ताचे नातं नसतच मुळी. ना तुम्ही रोज भेटता. कधीतरीच तुमची भेट होते आणि जणू मध्ये मोठाच्या मोठा  काळ गेलाच नाही असेच वाटते. मागच्या पानावरून पुढे तश्याच तुमच्या गप्पा सुरू!  बोलणं, सुखदुःखाची देवाण-घेवाण आरामात चालू राहते. बहुतेक वेळा माणसांचे एकमेकातील संबंध  वयाच्या प्रत्येक  टप्प्यावर  बदलतात. पण मामींबरोबरचे माझे नाते तसेच राहिले.  अगदी तीस वर्षे. त्या नात्याला कुठल्याही नावाचे लेबल नव्हते.   जगापासून चार हात लांब राहणाऱ्या मामींनी मला आपलं समजलं, माझ्या बालिश हट्टांचा त्यांनी मान राखला. त्यांच्या आठवणी आज या आठवणींच्या पसा-यातून आवरणार आहे.



                             मामी©️


माझं लग्न नुकतच झालेल. सर्वच नाती नवीन कोरी करकरीत. कालपर्यंत कुमारी असलेली मी आज ऐटीत सौभाग्यवती होऊन वेगळेच नाव लावत होते.  कालपर्यंत मी होते फक्त बहीण मुलगी! आता या भूमिकेतून एकदम मला अपग्रेड केलं होतं. सून ,वहिनी, बायको अशा अनेक नवीन नात्यांमध्ये! अजूनही त्या नवीन ओळखी लक्षात ठेवत होते जोखत होते. आणि एक दिवस घरी सासूबाईंनी सांगितलं आज तुम्ही दोघं मामा मामींना भेटून या.

            मामा मामी म्हणजे माझ्या सासऱ्यांचे सख्खे मामा आणि मामी. वयाने मामी माझ्या सास-यांएवढ्याच. मी निघण्या पूर्वी सासूबाईंनी जाताना हळूच सूचना केली" हे बघ मामी काही बोलल्याच नाही तर  मनाला फार लावून घेऊ नकोस." खरंतर प्रत्येक माणसाला कोऱ्या मनाने  भेटायला मला फार आवडतं. म्हणजे आपण आपले धुळाक्षर गिरवायचे. कधी गरज पडली तर पुसून टाकायचे. परत नवीन अक्षरे लिहायची. त्या  माणसाची  नवीन  पाटी तयार करायची.  आयुष्याच्या  प्रत्येक टप्यावर आपणही बदललेले असतो आणि माणूसही त्यामुळे दर वेळेस नवी अक्षरे !

              शहराच्या मध्यभागी मामींचे घर.घराला नावही मामींचेच! घराचं फाटक उघडलं आणि कोकणाच्या वाडीत आपण शिरत आहोत असंच वाटलं. मध्ये लालट मातीची वाट. दोन्ही कडेला लाल विटांचा एक फुटाचा  बांध.  बांधा पलीकडे झाडांची तुंबळ गर्दी.  त्यात काय नव्हत? डाळिंब आपल्या लाल केशरी फुलांनी डवरले होत. जांभळाचे उंचच उंच झाड कुतूहलाने वाकून बघत होते, लिंब जरासा शिष्ठ  चेहरा करून उभा होता,पांढ-या फुलांनी लगडलेली तगर मस्त हसत होती. एक दोन फुटकळ माड आकाशाकडे बघत ध्यान लावून बसले होते. अजून पुढे गेल्यावर तुळशी वृंदावन. झोकात लाल रंगात रंगवलेलं. समोर सारवलेल्या जमिनीवर  अतिशय देखणी रांगोळी. राधाकृष्ण  लिहिलेले. अक्षर अतिशय सुरेख वळणदार.  कडेला एक हौद.  घर जोत्यावरचे.समोर लाकडी झोपाळा. झोपाळ्याच्या  आधाराच्या दांडीवर सोडलेला जाईचा वेल तोही छानपणे झोपाळ्यावर फुले टपटपवतोय. त्याच्यामागेच कौलारू घर. या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एवढी मोठी जागा आणि एवढं छानसं घर खरंच वाटत नव्हतं.

         घराचे दार जवळजवळ आठ पायऱ्या चढल्यावर  आणि तिथंच मामी उभ्या.  लाल पांढऱ्या रंगाची कॉटनची साडी, मध्यम उंची शेलाटा बांधा  लखलखीत गोरेपण , अगदी एकारान्त कोकणस्थी आडनावाला साजेसे घारोळे डोळे एकदम मनीम्याऊ, काळाभोर  केसांचा अंबाडा. लालबुंद कुंकू गो-यापान कपाळावर अशा सुस्वरुप मामी सगळ्यात वरच्या पायरीवरून मला पारखत ,आजमावत होत्या. या म्हणून त्यांनी आमचं स्वागत केलं. 

          मामींनी मला काही प्रश्न विचारायच्या आधीच त्यांच्या बागेबद्दल मी बोलायला सुरुवात केली थोड्या अगोचरपणेच. कारण खरोखरच झाडे पाने, फुलं हा माझा खास वीक पॉईंट. आणि एवढ्या निगुतीने लावलेल्या बागेच्या मालकीणी बरोबर बोलणे म्हणजे पर्वणीच की!आणि मग जी काही आमची दोस्ती  झाली की बस! पहिल्या भेटीतच मामींनी झाडापासून केलेल्या अनेक कलावस्तू  मला दाखवल्या.  झाडाच्या वळणदार खोडाची नर्तकी , एवढेच नाही तर घोसाळ्याच्या जुन्या जाळीदार फळापासून  तयार केलेले घरटे आणि त्यात छोटीशी अंडी त्यांची कलात्मक वृत्तीच दाखवत होती.मामींना भेटून नमस्कार करून लगेच परत यायचं हा पाच मिनिटांचा कार्यक्रम  दीड दोन तास कधी लांबला हे मला कळलंच नाही.जाताना मामींनी जाईची फांदी दिली आणि गोल करून कशी लावायची हे समजावून  सांगितले.

        अतिशय गरीब घरात जन्मलेल्या या सुस्वरूप आणि हुशार मुलीचे लग्न मामांशी झाले. मामा अतिशय सधन घरातील स्वतःची इस्टेट राखून असलेले .शेतीवाडी भरपूर.  दृष्ट लागावा असच हे जोडपं. लवकरच एकत्र कुटुंबातून बाहेर पडून त्यांनी  या बंगल्यामध्ये स्वतःचा संसार सुरु केला आणि त्याच वेळेला मामांना मानसिक आजार जडला.बायपोलार डिसऑर्डर .काही काळ अतिशय चांगले प्रेमळ, बुद्धिबळ खेळणारे  मामा वर्षातले काही महीने उगाच बडबड करणारे, वेडावाकडा खर्च करणारे, कुठल्याही घरी जाऊन काहीही मागणारे .कधी कधी मामा व्हायचे गायब. मग मात्र मामींचा धीर सुटायचा. आमच्याकडे तातडीने निरोप पाठविला जाई.मामा परत येत. बहुतेक वेळा पूर्ण  लुटले गेलेले. कोणी तरी चांगूलपणाने पोहचवलेले.

               या अशा पतीची मग आई व्हायच्या मामी. स्वतःला  नसलेल्या संततीची जागा आजारी मामा भरून काढत. मामा औषध उपचारांनी बरे होत .मामींबद्दल त्यांना आकाशभर कृतज्ञता वाटायची. मामी परत त्यांच्या झाडाझुडपांचे कोडकौतुक करण्यात मग्न व्हायच्या.नवनव्या कलाकुसरीच्या वस्तू जन्म घेत. मामींनी त्यांचे विश्व मामा आणि त्यांची बाग एवढ्यापुरतेच सीमित ठेवले होते. कदाचित मामांच्या आजारामुळे असे झाले असावे.

                माझ्या घरातील सर्व कार्यक्रमांत  मामींचा सहभाग असावा असे मला फार फार वाटे. आधी कोणाकडेही न जाणा-या  मामी  माझ्या बोलवण्याने थोडा वेळ तरी येतच असत. कदाचित आमच्या समान आवडीने त्या माझ्यात कोणीतरी जवळचे या दृष्टीने पहात होत्या.कधी कधी कौतुकाने एखादा खाण्याचा पदार्थही आमच्याकडे येऊ लागला.सणासुदीला आमच्या घरातूनही जाऊ लागला.

           आम्ही यथावकाश  दोघांचे तीन झालो. मुलाला त्या झोपाळ्याचे आणि हौदाचे भारी वेड. इतर कोणत्याही  मुलांना आसपास फिरकूही न देणा-या मामी चक्क त्यासाठी   त्याचे कौतुक करीत. आवर्जून त्याची आवडती मारी बिस्किटे बरणीत भरून ठेवत.मलाच कानकोंडे वाटायचे. माझ्या घरी बाग बघायला येणं  हा एकच विरंगुळा  होता त्यांचा.खूप गप्पा होत त्यावेळी. त्यात फलटणच्या त्यांच्या बालपणीच्या गप्पाही असत. मामी अकरावी झालेल्या.  ते पण त्या काळात.हे मला या गप्पातूनच कळल.पण कधीच त्यांनी नशीबाला दोष दिला नाही.

           अखेर  मानसिक असंतूलन झालेल्या मामांचे देहावसान झाले.मामा पक्के नास्तिक. मामींचा देवावर गाढ विश्वास. पण मामांच्या इच्छेप्रमाणे  कोणतेही क्रियाकर्म  न करता माझ्या पतींने अग्नी दिला.आता त्या घरांत मामी एकट्याच.घरात मदतीला नोकरचाकर ठेवलेले. 

         मधे बरेच दिवस गेले. मुलांच्या शाळा, प्रॅक्टीस या कारणांनी मामींकडे फेरी झालीच नव्हती.एक दिवस मी भेटायला गेले तर मामी बाहेर पायरीवर बसलेल्या. पूर्वीच्या काळ्याभोर केसात आता उन सावल्या मुक्कामाला आल्या होत्या.चेहरा उतरलेला. मला हळूच सांगू लागल्या. अग घरात भानामती होतेय.माझी चांदीची भांडी नाहीशी होत आहेत. घरात भरपूर कर्मचारी, त्यांची विश्वासार्हताही पारखलेली नाही. हे मामींना सांगायचा खूप प्रयत्न  केला पण कर्मचा-यांवर अविश्वास  दाखवून काढून टाकण्यापेक्षा  भानामतीवर विश्वास ठेवणे त्यांना सोईचे वाटत होते.जाम ऐकल नाही त्यांनी.

              मामी आता थकू लागल्या.घरातले चाकर मंडळीही

पुरेशी लूट करून उडनछू झाले. ते निसर्गात रमलेले घरही थकल्यासारख वाटू लागले. संध्याकाळी  तर दिव्याच्या पिवळ्या उजेडात तेथे थांबणेही नको वाटायचे. तुळशी वृंदावन मात्र तसेच टकाटक! रांगोळीही तशीच!इकडची रेघ तिकडे नाही.मामींना माझ्या घरी येऊन राहण्यासाठी खूप विनविले.  पण इतरवेळी माझे ऐकणा-या मामींचा नकार दृढ होता.

          माझ्या मुलाच्या लग्नाला मामींनी यावे या साठी मी गाडी पाठवली. कधीच कुठल्याही  लग्नाला न जाणा-या मामींनी माझी ही इच्छाही पूर्ण केली. त्यांनी मला सांगून दोन सुती साड्या आहेर म्हणून आणवल्या आणि स्वीकारल्या. लग्नात अर्धा तास थांबून मामी घरी गेल्या.परत त्या उदास पिवळसर प्रकाशाच्या घरात. मीच मनात खंतावलेली.

        मामींकडे जाणं माझ्या व्यापाने थोड कमी झाल होत.मामींना मोबाईल  फोन किंवा लँड लाईन घेण्याचे सांगूनही ऐकायला तयार नव्हत्या.बरे नसले तर मागील आऊट हाऊस मधल्या भाडेकरूंबरोबर निरोप येई. तेही भाडेकरूंच्या  इच्छेवर अवलंबून. तसे मामींचे कुठल्याच भाडेकरूशी सख्यही नव्हते.त्या तशा सर्वांपासून अंतर राखून रहात.

          ब-याच दिवसात मामींकडे जाणे झाले नव्हते. मध्यंतरी त्यांचा कोणी एक नातेवाईक त्यांच्या जवळ घरी रहायला आल्याने आम्हीपण मनात निर्धास्त  होतो.

मग एक दिवस अचानक मामी गेल्याचे कळले. तिथे आम्ही पोहोचण्याआधीच क्रियाकर्म उरकले होते. मामी नाहीत त्या घरात एक सेकंद थांबणेही  असह्य झाले.

              गेली बेचाळीस वर्षे माझ्या अंगणात  मामींनी मला पहिल्या  भेटीत दिलेली जाई फुलते आहे. दर पावसाळ्यात भरभरून फुले देते आहे. अगदी मामींनी माझ्यावर केलेल्या स्नेहाच्या वर्षावासारखीच. इतरांसाठी  खडूस, तुसड्या ठरलेल्या मामींचे त्याच्यासारखेच देखणे  आणि सुगंधी  मन मला अनुभवायला मिळाले हेही नसे थोडके. आजही तेथून जाताना मामींची रांगोळी  काढणारी सुबक लांब बोटे  आठवतात. क्षणभर चष्म्यातून अंधुक दिसू लागते. मग मात्र मी निग्रहाने तेथून निघते. 

********                ****         ********        ********

          माझे इतर लेख वाचायचे असल्यास खालील लिंक  बघावी.


https://drkiranshrikant.pasaara.com   





शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२०

लग्नाला जाते मी. भटकभवानी भाग4©️

     विवाह हा आपल्याकडील सोळा संस्कारातील महत्वाचा संस्कार. पूर्वीची नेमस्त आणि आजची झगझगती लग्न म्हणजे पत्रावळ ते पंचतारांकित  प्रवास केलेली.आपली लग्न म्हणजे दागिने, साड्या, रंगलेले गाॅसिप,गर्दी,नाच गाणी थोडंफार रुसणे फुगणे.कधी कधी दुस-या संस्कृतीतील विवाह आठवणींच्या पसा-यातून डोके वर काढतात.आता ते एवढ सांगताहेत तर ही आठवणही पसा-यातून आवरायलाच हवी नं?




 लग्नाला जाते मी. भटकभवानी भाग 4 ©️


 माझ्या पुतण्याची अवस्था ' ले गई दिल गुडिया जापानकी' अशी झाली . अर्थात आता आमचा जपानचा प्रवास होणारच हे सांगायला जोतिष्याची गरज नव्हती.   अखेर जपानमध्ये  शिंटो पद्धतीचं लग्न होणार हे ठरले.आणि भारतात आपल्या पद्धतीने!  आपल्या आवडत्या माणसाशी परत परत वेगवेगळ्या प्रकारे लग्न करणे मला तरी फार फार रोमँटिक वाटते. जपानमध्ये तिच्याशी जन्मभर सुख दुःखात साथ द्यायच वचन द्यायचं आणि भारतातही तशाच आणाभाका घ्यायच्या एकदमच भारी! माझी होणारी सून जपान मधील शिंटो संप्रदायाची. जपान मधले जगप्रसिद्ध लढवय्ये सामुराई हे या शिंटो संप्रदायाचे. त्यामुळे जपान मधले लग्न बघण्याची खूपच उत्सुकता लागली. पूर्वी जपानमध्ये लग्न मुख्यत्वे अशीच  शिंटो पद्धतीने होत.आपल्याकडे दक्षिणेत जशी देवळात लग्न लावण्याची पद्धत आहे, तशीच तिथेही.आता मुले किंवा मुली लग्नबंधना पेक्षा स्वतंत्र रहायचे पसंत करतात त्यामुळे  हे प्रमाण खूपच कमी झाले आहे. जपानी युवतींनाही लग्नात नटणे मुरडणे अन् लग्नविधींचा आनंद अनुभवासा वाटतो, मग त्या चक्क नवरदेवविरहित लग्न सोहळा साजरा करतात! हौसेला मोल नाही म्हणतात, पण ही त्याच्या पुढची पायरी!

          आमचे अगदी जवळचे कुटुंबीयच जगभर पसरलेले. त्यामुळे अमेरिका, कॅनडा, दुबई, भारत आणि मलेशियातून आम्ही  जमणार  होतो. ब-याच दिवसांनी मलाही माझा मोठा मुलगा, सून, दीर ,पुतणी जावई हे सगळे भेटणार होते त्यामुळे मन टवटवीत  झालं होतं.

          जपानी व्याह्यांनी  ड्रेस कोड सांगितला होता. स्त्रियांसाठी किमोनो आणि पुरुषांसाठी सूट. अर्थात आमच्या मापाप्रमाणे किमोनाचीही सोय केली जाणार होती. अगदी आमच्या बुटांची मापे सुद्धा जपानला रवाना झाली.इथून साड्या न्यायचा प्रश्न निकालात निघाला. सामान कमी झाले आणि कुटुंबातील समस्त नरपुंगवांनी आनंदाने झुलू नृत्य केले.

        एक एक करत  आम्ही व-हाडी जमलो टोकियोच्या मध्यवर्ती ठिकाणी. आमच्या हॉटेलचे बुकिंग झाले होते. मुख्यत्वे टोकीओला होती जागेची चणचण. त्यामुळे हॉटेलच्या खोल्या लहान. बघूनच हबकलो आम्ही. आमच्या भरभक्कम बॅग्ज आणि आम्ही या खोलीत बसणार कसे हा कूट प्रश्न  सर्वांनाच पडला पण खोल्यातही सर्व सुखसोई  इतक्या व्यवस्थित बसवल्या होत्या की ' देखतेही रह जाओगे'.तेथे खाली एका हाॅलमधे वाय फाय फुकट असल्याने अनेक देशांचे युवक युवती ,आणि जपानी सुध्दा, लॅपटॉप घेऊन तेथे बसलेले असत. तरुणाईला आवडेल असं संगीत अन् सजावट! तेथे बसल्या बसल्या आमच्याही  वयातील काही वर्षे गळून जायची.

           अखेर विवाहाचा खास दिवस आला बाहेर रेशमी पाऊस झिमझिमत होता. मध्येच सूर्य किरणे झाडांना, तिथल्या घराघरांना  सोन्या चांदीचा वर्ख फासून जात होते. हवेत सुखद गारवा होता. आणि आणि आमचं वऱ्हाड निघालं लग्नमंडपात. खूपशी उत्सुकता आणि आतुरता त्याचं झकास मिश्रण प्रत्येकाच्या मनात झालं होतं

             टोकिया सारख्या भल्यामोठ्या पसरलेल्या शहरात मध्यवर्ती जागा होती ती! छोट्याशा टेकडीवर गाडीने एक वळण घेतलं आणि एक लोखंडी फाटक उघडलं. क्षणभर असे वाटले की आतापर्यंत त्याबद्दल  ऐकले त्या स्वर्गाच्या छोटेखानी प्रतिकृतीस जिवंतपणी भेटतो आहोत.  अतीशय शांत जागा होती ती. त्याच्या आजूबाजूनला पसरलेले टोकीयोचा, तिथल्या आवाजाचा कुठेही मागमूस नव्हता.लालसर लाकडाचे एक अतिशय देखणं देऊळ, वर हिरवट पॅगोडा सारखं छप्पर ,त्याला साजेशीच छोटेखानी बसकी  लाकडी इमारत मागच्या बाजूला आणि समोर पटांगण त्यापुढे अत्यंत मनमोहक उद्यान. खूप छान, रेखीव  तरीही नैसर्गिक अवस्थेत सर्व झाडे वाढलीत असे वाटावे.  झाडांची रंगसंगती, झुडपांची फुलं कुणी न लावता सहजतेने आली आहे असं वाटावं इतके छान!  त्या पॅगोडाच्या भोवती अतिशय सुंदर व्हरंडा आणि त्याला व्यवस्थित पॉलिश केलेला लाकडी कठडा.इतक्या पवित्र ठिकाणी सहचाराची शपथ घेणे अहोभाग्यम.

           मुलाकडच्या आणि मुलीकडच्या व-हाडासाठी मागच्या इमारतीत टुमदार खोल्या होत्या. सर्व  स्त्रियांना सर्वप्रथम पाय धुऊन नवीन चप्पल घालून एका खोलीत अतिशय अदबीने नेले.दरवेळी कमरेत झुकून आदर दाखवणे म्हणजे मस्त  व्यायाम.तरीच जपानी ललना इतक्या शिडशिडीत!  खोली छोटीशी.एक खुर्ची एक कपाट आणि एक भिंत  आरशाची. आणि तेथे पूर्णत: स्त्री राज्य. जपानी भाषेत मुलीकडच्या स्त्रियांचे हास्यविनोद  चालू होते. त्यात आम्हीही सहभागी झालो.तेव्हा परत जाणवलं की कित्येक वेळा न कळणा-या भाषेतील संवादही सुखावून जातो. आम्ही जाताच आमचा ताबा किमोनो नेसवणाऱ्या दोन मुलींनी घेतला. प्रौढ स्त्रियांना काळा, त्याच्यावर फुलाचे डिझाईन असलेला किमोनो तर लेकी सुनांना  फिकट रंगाचे.  यामध्ये बदामी ,पिस्ता, फिकट पिवळसर अशा रंगाचे फुलाचे डिझाईन असलेले किमोनो वापरायची पद्धत आहे. 

          तसं पाहिलं तर किमोनो थोड अवघड प्रकरण आहे. लहानपणी जस साडी नेसायची असली की हात वर करून आई समोर उभे रहायचो तस्सच आता वाटत होते.आता आई ऐवजी त्या दोन युवती आम्हाला किमोनो नेसवत होत्या. इथं गाठ, तिथ नी-या, इथं खोचून ,अखेर आम्ही किमोनोत शिरलो. म्हणजे किमोनो तसा किचकटच आहे. अर्थात साडी नेसणा-यांना या खोचाखोचीचे विषेश काही वाटत नाही हे वेगळे. पायात कापडी सुबक बुट सरकावले गेले. केसांचा  छानदार जुडा  आणि  त्याला  मोत्यांची  मोठी  पीन.  जपानमध्ये  दागिने  कोणीच घालत नाही. पण या पीनला  फार महत्त्व असतं.  कधी ती  मोत्यांचे द्राक्षाच्या घोसा  सारखी असते तर कधी    फुलांचं डिझाईन असलेली. आमच्या हातात छानशी पर्स दिली तर दुस-या हातात प्रसिद्ध जपानी पंखा! गंमत अशी की जपानी स्त्रिया छोटी छोटी पावले टाकत पटपट पटपट वेगाने का चालतात  हे तो सर्वांगाला घट्ट आवळून टाकणारा किमोनो घातल्यावर लक्षात आले.

     सर्वप्रथम एका मोठ्या हॉलमध्ये दोन्ही व-हाडांची एकमेकांसमोर बसून जुजबी ओळख झाली. बहुतेकांना इंग्रजीच्या गंध नव्हता. त्यामुळे सतत दुभाषाची गरज लागत होती एक अतिशय हसरी जपानी मुलगी होती ती हे काम उत्साहाने करत होती. मुलीकडे व-हाडी होते नऊजण आणि आम्ही बाराजण.म्हणजे आमचं व-हाड  जपानच्या व-हाड्यांच्या तुलनेत भलमोठ्ठ! भारतीय लग्नात उपस्थितांची संख्या चारशे पासून पुढे कितीही असते हे कळल्यावर आमच्या व्याह्यांनी जो आ वासला की किती तरी वेळ तसाच होता.

           नंतर निघाली आमची वरात व्हरांड्यातून देवळाच्या मुख्य दारापर्यंत. ती वरात विसरणे अशक्य! तो एक अद्भूत अनुभव होता. सर्वप्रथम डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीर एका विशिष्ट पोशाखांनी झाकलेला महंत किंवा पुजारी बासरी सदृश्य एक वाद्य वाजवू लागला त्याच्यामागे मुलाचे आई-वडील आणि त्यानंतर इतर नातेवाईकांनी एक एकेरी रांग केली. बासरीचे सूर घुमू लागले. धीरगंभीर आवाजाने जणू कृष्णनीळी जादू केली. आधीच पावसाने ओलसर, स्वच्छ, हसरी झाडं,आणि ओला झाल्याने अधिकच गूढ वाटणाऱा तो पॅगोडा! बॅग पायपर च्या गोष्टी सारखा वाद्य वाजवत जाणारा तो महंत .आणि त्याच्या मागे आम्हा बारा जणांची रांग.त्यामागे मुलीकडचे व-हाडी. तिथं फोटो काढायला परवानगी नव्हती. आणि बोलायलाही नाही. आळी मिळी गुपचिळी करत त्या वातावरणाचा आनंद उपभोगत आम्ही त्या पॅगोडाच्या बाहेरच्या खोलीत म्हणजेच सभागृहात शिरलो. जपानी लोक बारीक चणीचे त्यामुळे तेथिल बैठकही बसकी आणि छोटी म्हणजे तमाम भारतीयांचे दुःस्वप्नच! सर्कशीत स्टूलावर बसणा-या हत्तीचे दु:ख आम्हाला समजले.

           इतक्यात नखशिकान्त अंग झाकलेल्या मोग-यासारख्या  पाढ-याशुभ्र किमोनोत सूनबाई आली.शुभ्र रंग म्हणजे नव्या जीवनाची सुरवात. पतीचा रंग घेऊन त्यात एकरूप होणारा रंग. उंचशा गोलाकार टोपीने डोके झाकण्याची आख्यायिका तर फारच रोचक.सासूबद्दल जी असूया आहे ती शिंगाच्या रूपात डोक्यावर असते ती झाकण्यासाठी ही टोपी!.म्हणजे सासू सून प्रकरण इथेही आहेच का?  सामुराईच्या धवल कपड्यात नवरदेव. इतके राजस दिसत होते नं ते दोघेही., नजर ना लगे.

       वधू -वर गर्भागृहात गेले. सर्वत्र पांढ-या चिठ्या आणि पताका लावलेल्या आणि त्यावर ती जपानी चित्रलिपी. एक मादक सुवास सर्वत्र भरलेला.स्त्री महंत, जिला मिको म्हणतात, आणि दुस-या महंताने मंत्रपठण सुरू केले.प्रथम वंदन शिंटोंचा देव कामि.अगदी आपल्या गणेश वंदने सारखच.वधू वरांच्या अंगावरून दुष्ट प्रेतात्म्यांची छाया काढून टाकली. शिंटो  समुदायात निसर्ग पुजेला अतिशय  महत्व.वृक्ष,भूमाता,जल ,तेज ,वायू यांचे स्मरण सतत करतात आणि कृतज्ञता व्यक्त करतात. दोघांनी पंचमहाभूतांची मनोभावे पूजा केली आणि नतमस्तक झाले.पूर्वजांना वंदन केले.एवढा प्रगत देश पण सर्व  कर्मकांडे  आहेतच.

      नंतरचा महत्वाचा कार्यक्रम म्हणजे नव-या मुलीने उष्टावलेली साके आणि मुलाने उष्टावलेली साके परस्परांनी नऊ वेळा प्यायची. ते ग्लासही गोल्डी लाॅक्सच्या अस्वलाच्या भांड्यासारखे मोठे मोठे होणारे. नंतर मुलाकडील सर्वांनी घोट घोट साकी तीन वेळा पिणे ती  असते मुलीने उष्टावलेली . साके ही तांदळापासून बनवलेली वारूणी. मुलीकडच्या व-हाडाने त्याच वेळी मुलाने उष्टावलेली वारूणी तीन घोट प्राशन केली.शांत लयबद्ध मंत्रोच्चारात आणि पावसाच्या टपटप या पार्श्वसंगितात हा सोहळा संपला. जपानी लोकांच्यात मद्याचे प्रमाण कमीच.त्यांचे एकच व्यसन जाणवले ते होते काम, अधिक काम ,परफेक्ट काम. पण नव-या मुलाची उष्टी साके त्याला त्यांच्यात सामावून घेतल्याची खूण म्हणून आवर्जून  घेतात.

        त्यानंतर एका पंचतारांकित हाॅटेलमधे पन्नासाव्या मजल्यावरून टोकीओदर्शन करत आणि भेटवस्तूंचे आदानप्रदान  करत हा आटोपशीर देखणा सोहळा संपन्न झाला..

      यथावकाश इथेही भारतीय मराठी पध्दतीने विवाह संपन्न झाला. व्याही, विहीणबाई,मेहुणी  असे आटोपशीर व-हाड पण इथल्या सर्व  कार्यक्रमांत अगदी वराती समोर नाचण्यातही त्यांनी मनापासून भाग घेतला.  लेकीने अंतर्पाट बाजूला झाल्यावर जेव्हा वरमाला नवरदेवाच्या गळ्यात घातली, तेव्हा कुणाही भारतीय माउलीप्रमाणे आमच्या जपानी विहीणबाईही  ढसढसा रडल्या, तर व्याहीबुवांनीही हळूच डोळे टिपले. काही भावना या वैश्विक असतात हेच खरे.मग तो भारत असो वा  जपान. 


माझे इतर ब्लॉग्स वाचायचे असल्यास खालील  लिंक वापरावी


https://drkiranshrikant.pasaara.com