सोमवार, ११ जुलै, २०२२

माझे आजोबा काका©️

 माझे आजोबा 'काका'


    अरेबियन नाईट्सच्या भूलभुलैया मधे एकदा का मी अडकले की अगदी मधात अडकलेल्या माशीगत अवस्था व्हायची. ते लाल रंगाचे बाईंडिंग केलेले गबदुल पुस्तक,एक पान उलटल्यावर उर्दूतील अक्षरांसारखे लिहीलेले अरेबियन नाईटस त्या अक्षरांच्या मागे असलेल्या चित्रातला हातातील चषकातून सुरईतील पेय पिणारा सुलतान तेही छान पैकी तक्याला रेलून ! शेजारी खालमानेन सुरईतील पेय चषकात ओतणारी चुणचुणीत दिसणारी शहेजादी. मग पानापासून पाने उलटताना तुम्ही सिंदबादच्या जहाजात बसता वादळीवा-यात सापडता. बोट बुडता बुडता नाकातोंडात गेलेले खारेपाणी तुम्हाला जाणवते, पण आपला चतूर आणि चाणाक्ष मित्र सिंदबाद या सर्वातून आपल्याला सहीसलामत बाहेर काढतो. अरेबियन नाईट्स मधिल मला सर्वात हवा हवासा वाटणारा होता अल्लाउद्दीनचा उडता गालीचा. लहानपणी कल्पनेत या उडत्या गालीचावर बसून गणिताच्या पेपरला सूssबाल्या केला आहे. गल्लीतले कुत्रे मागे लागल्यावर गालीचा वरून धूsम ठोकली आहे.  

           या उडत्या गालीचाचा जुळा भाऊ देखिल मी अनुभवला आहे.गालीचाचा हा भावड्या  होता मस्त पलंगाच्या रूपात. काळ्याभोर तुकतुकत्या कांतीचा, चमचमत्या पितळी कड्यांचे आणि मण्यांनी पायाकडे आणि डोक्याकडच्या बाजूला झकास नक्षी केलेली.पलंगावर स्वच्छ बिछायत त्यावर आम्ही आठ दहा नातवंडे बसलोय आणि मस्त पाढ-याधोप उशा पाठीला आधारासाठी घेऊन बसलेले आजोबा. त्यांनी गोष्ट सुरू केली की मग तो पलंग हळू हळू रूप बदलू लागे. आजोबा शिकारीची गोष्ट सांगत तेव्हा तो अजस्त्र पलंग व्हायचा झाडावरचे मचाण. रानाचा ओला  वास,आजूबाजूला भरून राही.मचाणाखाली बांधलेली बकरी सतत तारस्वरात ओरडते आहे हे  जाणवायच. आवाज करू नकारे! खुणेनेच आजोबा सांगायचे. बिचुकली भावंडे डोळे घट्ट मिटून घेत.आम्ही जरा मोठी भावंडे एकमेकांचे हात घट्ट धरत असू. वाघाची डरकाळी, खsसफsस . कडामकडाम असे सगळे आवाज  येत. त्या मचाणावर बसल्याबसल्या घशाला कोरड पडलेली असे इतक्यात आज्जीचा चिरपरिचित आवाज खोलीत घुमे.मचाण परत पलंग रूपात जाई. मग तो पलंग सभ्य तुकतुकीत चेह-याने हळूच घाम पुसे."झाल्या का तुमच्या गोष्टी सांगणे सुरु?" अहो या मुलांची जेवायची वेळ झालीय. काय बै नादिष्ट पणा! जरा सुट्टीला आजोळी आली नै पोर, तोच पकडलत त्यांना?" आता कुठलेच अपिल नसे. आमची जेवण झाली आणि घरातल्या समस्त बाया जेवायला बसल्या की खात्री असायची आता एक तास निश्चितपणे आपलाच. माहेरवाशीण, सासुरवाशीण या सर्वांचा तो गोतावळा आपापली सुख दुःख जेवणातील पदार्थांबरोबर एकमेकांना वाटत ही जेवण करत. आम्हा मुलांना मात्र तेथे थारा नसे. जरा आम्ही रेंगाळतेय अस वाटताच आज्जी ओरडायची, " झाली न जेवण आता इथ फिरकायच नाही" मग आमचा मोर्चा परत आजोबांच्या भल्या मोठ्या पलंगावर गोष्ट ऐकायला जाई.

      आजोळच्या आठवणीतले असे अनेक सुखद क्षण! आजोबा त्यांना आम्ही म्हणत असू काका! इंदोरमधील प्रसिद्ध वकील! राजवाडा वाटावा असा प्रशस्त महाल. मोठ्या खोल्या. बैठकीच्या खोलीत तर चारी भिंतीवर लावलेले बिलोरी आरसे आणि त्यात दिसणारी आमची असंख्य प्रतिबिंब! सारेच अद्भुत.  काकांची खोली तर अलिबाबाची गुहाच वाटायची. मोठा पलंग त्यावर दुधपांढरी चादर, तक्के लोड.कडेला दोन मोठ्ठीच्या मोठ्ठी आरसा दारावर मिरवणारी कुट्ट काळी कपाटे.ती उघडली की जणू बालकृष्णाने आssकरून दिलेल्या विश्वरूप दर्शनाहून वेगळे नसायचेच.अनेक बंदुका आणि तलवारी दाराच्या आतल्या बाजूला अडकवल्या असत. काकांना शिकारीची आवड होती. आपली पाच सहा मुले आणि घरात असलेल्या पाहुण्यांची मुले अस भलतच मोठ्ठ लटांबर घेऊन आजोबा शिकारीला जात. माझी आई त्या कथा वर्णन करून सांगायची. कसली शिकार अन कसले काय! खरतर सर्व बच्चे कंपनीची ती पिकनिक असायची. झाडावर चढण, नदीत पोहणे, खेळ या सगळ्याला पूर्ण मुभा असायची.बरोबर नेलेल्या शिध्याचे झकास जेवण बनायचे आणि शिकार न करताच जंगलातील वातावरणाची चुणूक मुलांना दाखवून आजोबा परत येत. हात हलवत आलेल्या आजोबाना बघून आज्जी कसबस हसू आवरत असे.काकांच्या खोलीत त्यांच्या कारकूनास बसण्यासाठी एक बसके मेज असे. ते ठेवल असे जमीनीवर हंथरलेल्या सतरंजी समोर.जवळच पक्षकारांना बसायला खुर्च्या.त्याही चकचकीत लाकडी. पक्षकार या शब्दाच  आम्हा पोरांना भारी अप्रूप वाटायच. खोलीला महिरपीने  सजलेल्या खिडक्या आणि कोप-यात रेडिओ. 

     सावळे, थोड टक्कल पडलेले मध्यम उंचीचे आणि मध्यम चणीचे काका! डोळ्यावरचा चष्मा पुसत हस-या डोळ्यांनी आमच्याकडे बघत.त्यांच्या किंचित तपकीरी बुबूळांना पडलेले नीळसर रिंगण स्पष्ट दिसे. त्यावेळेस ते आजोबा वाटायचेच नाही. वाटायचे पक्के दोस्त आहेत आपले.काळ्या फ्रेमचा चष्मा लावल्यावर मात्र ते एकदम आजोबा रुपात जात. कट्टी केलेल्या मित्रासारखे वाटत,मग समोर सतरंजीवर बसलेल्या दिवाणजींना अगम्य भाषेत काहीतरी सांगू लागत मग माझी चुळबूळ सुरू होई .ते कोणीतरी वेगळेच वाटू लागायचे. परत चष्मा काढून आजोबा आमच्याकडे बघत आहेत असे आम्हाला  वाटे पण त्यांचे आमच्याकडे लक्षच नसे. आमच्यातून आरपार ते कुठेतरी दूरवर बघत दिवाणजींना पुढील सुचना देत. इतर वेळी त्यांच्या पलंगावर धुडगूस घालणारी आमची पिलावळ मात्र एखाद्या खेळण्याची दिलेली चावी संपल्यावर जशी अवस्था होते तसे शांतपणे बसून त्यांच्याकडे बघत बसलेले असू.

         सकाळी काका कधी उठत कोण जाणे? पण झोपलेली नातवंडे बघून ते बेचैन होत आणि त्यांच्या फे-या सुरू होत.त्यानंतर ते म्हणत " लब्बाडांनो उठा.  तो बुलबुल सुध्दा झाडावर आला. तो सूर्य देवही खिडकीतून डोकावतो आहे .चला उठा बर लब्बाडांनो" ही सगळी वाक्य आजीने ऐकू नाही म्हणून पुरेपूर काळजी त्यांनी घेतलेली असे.

         आजोबांनाही मित्र असतात हे सहा सात वर्षाच्या मला कळले आणि काका अधिकच आवडू लागले.कारण हे सर्व घरी येणारे मित्रआजोबा एकदमच भारी असत. दंगा काय करायचे जोरजोरात हसायचे काय.आज वाटते हा प्रत्येक मित्र शोधनिबंधाचा स्वतंत्र विषय सहज होईल.काळा कोट घालणारे शिर्के आजोबा, विचित्र शिंका देणारे फडणीस आजोबा. आणि अजून कितीतरी. साध्या भुईमुगाच्या ओल्या शेंगा उकडल्या तरी ह्या सर्व मित्रांना काका बोलवत. सर्वांचे बंगले आसपासच ! सारे लगेच हजर.! कोंडाळ करून सारे बसले की आतवर मिठ मुरलेल्या छान पैकी उकडलेल्या शेंगा परातीत भरभरून येत. कधी कधी बाहेर पडणारा पाऊसही या कोंडाळ्यात सामिल होण्यासाठी हजेरी लावी. खोखो हसणे आणि गप्पा रंगत असतानाच कडेच्या कागदावर टरफलांचा ढिग हिमालयाशी स्पर्धा करण्या इतका उंच होई. शिर्के काका मग उठत आणि त्या  टरफलांवर शब्दशः नाचत.  आणि हे नाचकाम कशासाठी तर एखादी शेंग चुकून टरफलात गेली आहे का ते बघायला. त्या मधे अनवधानाने गेलेली शेंग मिळाली की गुलबकावलीचे फुल मिळाल्यासारखे ते खुश होत. ती शेंग फडकवत ओरडत. "वकीला मिळाली रे शेंग."मग परत हास्याचे मजले वर वर चढायचे. खरतर हावरटपणा आमची आखत्यारी पण यांच्यापुढे आम्ही एकदम बिगरीतच. खाऊ घालणे हा काकांचा आवडता छंद. साक्षात अन्नपूर्णा असलेली आज्जी हा उपाताप आवडीने करी. काकांचे मित्र आले तरी आम्हाला कोणताही मज्जाव नसे.नकळत छोट्या गोष्टीतही केवढा आनंद असतो हे आम्ही शिकत होतो.

      आयुष्यात   एकदाच आजीला न विचारता पहिल्यांदाच आणि शेवटची मोठी खरेदी काकांनी केली ती म्हणजे सेकंड हॅन्ड कार त्यांनी घेतली.त्याकाळी इंदोरमधे एका हाताच्या बोटांवर मोजण्या इतक्याही मोटरी नव्हत्या. आपली आठ मुले आणि घरी असलेल्या पाहुण्यांची मुले या गाडीत कसे बसवायचे ते काकाच जाणे. ती गाडी वारंवार बंद पडू लागली मग सर्व टुल्लर गाडीतून उतरून  ती गाडी ढकलत बसायची.शेवटी ती गाडी विकली तेव्हा कुठे आजीच खुदूखुदू हसण थांबल.

        आजोबा काळा कोट घालून कोर्टात जात. जाता जाता स्वयंपाकघराच्या दिशेने हात जोडत हा नमस्कार अगदी मनोमन असे. तो त्यांच्या गृहलक्ष्मीसाठी असे की देवघरातील देवांना हे कोड कधीच उलगडले नाही. कारण इतर वेळी आजोबांना देवाधर्माचे स्तोम माजवताना कधीच कोणी बघितले नाही. पण कोणालाही मदत करायला आजोबा कायम पुढे. नोकरी नसलेले, कामाच्या शोधात आलेल्या कित्येकांनी सहासहा महीने आजोबांचा पाहूणचार घेतला आहे. कदाचित महादारीद्र्यातून स्वकर्तृत्वावर मिळवलेल्या लक्ष्मीने त्यांचे पाय जमीनीवर ठेवले.कुणीही गरजू, नोकरीच्या शोधात आलेला महीनेन महीने आपल्या कुटुंबकबिल्या सहीत रहात असे. उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही इंदोरला गेल्यावर एखाद तरी असे कुटूंब आजोबांच्या घरी असेच.त्यांची मुले आजोबांना म्हणत काका! मग काय आमचेही ते काकाच झाले. कोण कुठल्या ना नात्याच्या ना गोत्याच्या  मुलांशी आमची एवढी गट्टी होई की आम्ही परत सुट्टी संपल्यावर आमच्या घरी निघालो की आमच्या बरोबर तेही रडू लागत.

     आज्जीच्या हुशारीचे आजोबांना भारी कौतूक. तिसरी पास आज्जीला त्यांनी इंग्रजी शिकवले आणि आजीने ते आत्मसातही केले. आज्जी इंग्रजी कादंब-याही वाचू लागली. आज्जीच्या हुशारी इतकीच अर्थात काकांची चिकाटी आणि ईच्छाशक्ती दांडगी होती. 

       उत्कृष्ट वकील म्हणून त्यांचा झालेला सत्कारही मला अजून आठवतोय. त्यांची सर्व  मुले, सुना, मुली जावई जातीनं सा-यांची देखभाल करत होते.जणू सर्व समभावाचा काकांनी घालून दिलेला धडा ते तंतोतंत गिरवत होते.

      काका विचारांनीही काळाच्या पन्नासवर्षे तरी पुढे होते.म्हणूनच त्या स्वातंत्र्यपूर्व काळात त्यानी मावशीला वैद्यकीय शिक्षणासाठी दिल्लीला पाठवले आणि आपल्या या मुलीसाठी परजातीतील हुशार पंजाबी वर शोधला.सर्व मुले उच्चशिक्षित झाली.

    आजोबांच्या तब्येतीच्या कुरबुरी सुरू झाल्या . त्याच वेळी   घरटे सोडून एकेक जण हळूहळू दूर जाऊ लागले. एकामागे एक मित्रही पैलतीरी जाऊ लागले. त्यांच ते घरभर घुमणारे हास्य विनोद आता भूतकाळात गेले.वकीली बंद केल्याने पक्षकाराची वर्दळ मंदावली. त्या प्रचंड मोठ्या घरात आता उरले फक्त आजी आजोबा. सुट्टीत सर्व मुले जमायची तेवढीच जाग त्या घरात असे. इतरवेळी घरात मिणमिण करणारा पिवळा दिवा त्या घरालाही अधिकच वार्धक्य  प्रदान करी.रसरसलेली ती जीवंत  वास्तुही आजारी थकली भागलेली वाटू लागली. इंदोरला रहाणारी डाॅक्टर मावशी आणि मावसोबा मात्र सतत काळजी घेत.

       आमच्या शाळा,अभ्यास,या सर्वात आजोळी जाणे दर वर्षाच्या ऐवजी दोन वर्षांनी होऊ लागले.दोन वर्षांनी आम्ही गेलो तेव्हा हार्ट अ‍ॅटॅक येऊन गेल्यामुळे काका जीना उतरून खाली आलेच नाहीत. तो भला थोरला जादूई पलंग तसाच होता पण आकसल्या सारखा वाटला. त्याच्यातील सर्व जादू कुणी दुष्ट जादूगाराने जणू शोषून घेतली होती. पांढरी शुभ्र चादर आता पिवळ्या रंगाकडे झुकली होती पूर्वी सफई असलेली चादर आता  काकांच्या चेह-यावरील सुरकुत्यांशी स्पर्धा करत होती.माझे हुश्शार  काका आता खरोखरच थकले होते पण अशा अवस्थेत ते आम्रपालीच्या जीवनावर कादंबरी लिहीत  होते. हौसेने आमच्यासाठी खास इंदोरी मिठाया मागवत होते.एवढी खाण्याची आवड पण कसाबसा एखादा फुलका ते खात होते .त्यांचा लाडका भात वर्ज! हातावर , पोटावर आता मऊमऊ साईची कातडी होती. शिकारीच्या गोष्टी मात्र तितक्याच उत्साहाने सांगत होते . यावेळी आजी काहीच बोलत नव्हती उलट ती देखिल ऐकत बसत होती.

       इंदोरहून निघताना पाऊल उचलत नव्हते. मनावर जणू कुट्ट काळी सावली पडली होती.खाली फाटका पर्यंत जाऊन मागे वळून  पाहिले खिडकीच्या महिरपी मधे काका उभे होते.एकटक आमच्याकडे पहात! अशक्त, पांढ-या केसांचे.खरच सांगते त्यावेळी असे वाटले नको ती शाळा बिळा. काकांना सोडून कुठेच जाऊ नये.वहात्या डोळ्यांना काका अधिकच अंधूक दिसत होते. इंदोर ते सांगली हा सर्व प्रवास मी रडतच केला.एवढ रडू का येतय हेच कळत नव्हते. दोन महिन्यांत काका गेले. घरी आलेली तार आणि त्यानंतर आईचे हमसाहमशी रडणे कायम मनावर उमटले आहे.

       काका गेले ते आजीला छानसे मृत्यूपत्र लिहूनच. त्यात आजीबद्दल नुसती आत्मियता नव्हती तर ओथंबलेली कृतद्यता होती.

       काका गेले असे कसे म्हणू? त्यांनी दिलेला सर्व समभावाचा प्राणवायू आमच्या धमन्यांतून वहात आहे त्यामुळेच बहुधा धर्म,  जात यापलीकडे माणूस बघायला आम्ही शिकत आहोत.ही प्रक्रिया चालूच आहे आणि आमच योग्य वागण म्हणजेच काकांचे इथे राहणे.त्यामुळे ते नुसते आजोबा नाही तर पथदर्शक गुरू आहेत.

      डाॅ. किरण पाटणकर

    


गुरुवार, ५ मे, २०२२

आला पावसाळा©️

 वर्षा ऋतु©️


सहा ऋतूंच कुटुंब म्हणजे आजच्या हम दो हमारा एक या जमान्यात भलतच मोठ्ठच्या मोठ्ठ! या अघळपघळ कुटूंबातील कुटुंबप्रमुख अर्थातच उन्हाळा. हडकुळा लांबलचक पायाचा. फिकुटल्या पांढ-या भगभगीत रंगाचा, लाल घारोळ्यां डोळ्यांचा,लांब वाढलेल्या नखांचा!जेथे त्याची नजर तेथे वणवा.त्याची धास्तीच अशी की तो आला की नदी तलाव स्वतःला मिटवून टाकतात. जाडसर दोरखंडा सारखी नदी होते एका बारीकशा सुताएवढी.अखेरची घरघर लागल्यासारखी!यातून पळवाट काढायची म्हणून ती खालच्या वाळूत स्वतःला गाडून घेते.नदीची अशी अवस्था तर ओहोळ,ओढे,डबकी यांवर असलेल्या उन्हाळ्याच्या दहशतीचा विचारच करायला नको. नुसती  धुळ ,घाम, तगमग, काहिली!  आपल्या लाडक्या 'वसंताला' पूर्णपणे संपवूनच उन्हाळ्याने आपला साम्राज्य विस्तार केला असतो.जणू वसंताचे सर्वांनी केलेले कौतूक त्याला सहनच होत नाही.    आता अशा कुटूंबप्रमुखाला चुचकारायचे,त्याची समजूत काढायची हे काम गृहलक्ष्मी वाचून कोण करणार? 

  आणि हे काम घाईगडबडीत केल तर कस चालेल? गृहलक्ष्मी 'वर्षां' अचानक एक दिवशी आपली काळ्या ढगांची फौज पाठवते. मदतीला वारा असतोच. उन्हाळ्याच्या नाकावर टिच्चून अचानकच ही फौज आकाशात धुमाकुळ घालू लागते.मधनच वीज ढगातून आपले लखलखत  रूपड दाखवून पार्श्व संगीत आणि योग्य प्रकाशयोजना करते.पुरेशी वातावरण निर्मिती तर झाली असते.खाली जमीनीवर झाडे बिनदिक्कत डोलायला लागतात. कमरेपर्यंत वाकून आपला कुर्निसात वर्षा राणीला करतात.मोडतात, तुटतात पण डोलणे सोडतात? छेss!उलट ते म्हणताहेत, मोडेन पण वर्षादेवीच्या स्वागतासाठी डोलेन डोलेन! माती आपले लपवून ठेवलेल्या अत्तराचे बुधले उघडायच्या तयारीला लागते.मृद्गंधाचे ते अनमोल अत्तर वर्षभर जपून ठेवलेले असते मातीने! अगदी निगुतीने!रागावलेला उन्हाळा मात्र सर्वत्र शब्दशः धूळफेक करतच असतो. आकाशातून पहिला टपोरा थेंब सणसणत येतो. येतो तोच मुळी मातीसाठी परवलीचा शब्द घेऊन! खडाखड अत्तराचे मातीत लपलेले बुधले  उघडतात.मातीतून मृद्गंध फवारे उडू लागतात ते थेट वर त्या कृष्णवर्णीय सजल मेघांपर्यंत.मनोमनीची खूण पटते आणि अधिकच वेगाने थेंब मातीकडे झेपावू लागतात.एका थेंबाचा हात दुसरा थेंब धरतो. दुसरा तिस-या थेंबाला आधार देतो आता त्यांना स्वतःचे वेगळे अस्तित्व  नसतेच मुळी! एकमेकांत मिसळून ते होतात धारा! धवल कांतीच्या,वेगवान,हवाहवासा थंडावा प्रत्येक थेंबात आतपर्यंत मुरलेला! या धारा पहले झूट मातीशी हितगूज करतात. उन्हाळ्याने रागारागाने वर उडवलेल्या धुळीला कधी चुचकारून तर कधी रागावून मातीकडे परत पाठवतात.  काय करणार गृहलक्ष्मीच्याच सख्या आहे न त्या! वर्षादेवी आता या धारांना लावते कामाला.पाहिले कां ती बिच्चारी झाड किती मलीन झालीत  ते. पदर कमरेला खोचून मग धारा सर्व झाडांना खसखसून आईच्या मायेने बुडूश्याss करू लागतात.धुळ माखल्या पानांवर इतके दिवस अधिराज्य होत पांढरट पिवळ्या उन्हाचे. तापलेल्या,चटके देणा-या करपवून टकण्या-या उन्हाचे! धारांचा तो वेगवान पण शीतल स्पर्श अंगागात पाने मुरवून घेतात. जून पानेही न्हाऊ माखून आलेल्या तान्ह्या सारखी दिसतात.सजल,स्वच्छ, उत्फुल्ल, देखणी.! पाण्याचे थेंब ऐटीत पानावरून घसरत खुदखुदतात. पानाच्या टोकावर आल्यावर पाण्याचा मोती सुळूकन खालच्या पानावर घसरगुंडी खेळायला सज्ज!अनेक टप्पोरी मोतीबाळे  पानापानातून माला गुंफतात. काही इटुकले तर काही टप्पोरे थेंब तारेवरील झुकझुक गाडी खेळू लागतात. मधनच एखादा टपटपीत थेंब तारेवरून खाली उडी मारतो अन मग सगळेच थेंब एकामागून एक उड्या मारालला सज्ज!

. तापलेली जमीन अजून पूर्ण शांत झाली नसतेच कारण उन्हाळ्याने दिलेले घाव खोलवर गेले असतात.ती  दीर्घ उसासे सोडते.गरम धगधगीत उसासे.शिवबाच्या मावळ्यांसारखे गनिमी काव्यानेआलेल्या काळ्या ढगांची पांगापांग होते.आता फक्त भुरभुर तलम रेशमी धारा. सूर्य परत टेचात येतो पण आता उसमे वो बात नही.  हवेत एक सुखद सुगंधी गारवा पसरला असतो. धावतपळत येणारा एखादा चुकार पांढरा फेक सूर्यकिरण पावसाच्या टपो-या थेंबात ऐटीत शिरतो आणि दुस-या बाजूने बाहेर पडतो ते आपल्यात दडलेले सप्तरंगाचे भांडार उलगडतच. अहमहमिकेने मग ढगातून घुसखरी करून किरणं या सरीतून आरपार जातात आणि आभाळात पडलेल्या आपल्या कमानदार सप्तरंगी रुपावर भाळून जातात. जमिनीखाली मातीत अर्ध मृतावस्थेत पडलेल्या गवताच्या बीया आता गोंधळतात,बावरतात. आता भूमीवर जाऊन डोकावून बघायचाय की नाही यावर त्यांची सूक्ष्म खलबत सुरू होतात.एखाद उन्हाळ्यातही  तगलेल मोठ्ठ काटेरी झुडूप या गवतांच्या बीजाला हळूच दटावत म्हणतो "अरे हा नुसता वळवाचा पाऊस होता अजून वर्षाराणी यायची आहे.उगाच गडबड करू नका.उन्हाळा अजून संपला नाही.थोडी कळ काढाल की नाही?

        उन्हाळा अजून संपला नसला तरी उन्हाळ्याची गुर्मी कापरासारखी उडायला लागते. बाजारात असलेल्या कलिंगडाच्या ढिगाकडेही  आता नजर वळत नाही. उलट नकोनकोस वाटत ते पाणीदार फळ! हापूसची जागा आता तोतापुरी, आणि  दशहरा, लंगडा,सफेदा घ्यायला लागतात. बहावा, गुलमोहर आपल्या फुलांचे गालीचे वर्षांॠतूच्या स्वागतासाठी पसरतात.शिरीष,  बहावा गुलमोहर आपल्या कोवळ्या शेंगा झुंबरा  सारख्यां सर्वांगावर मिरवायला लागतात. हवेत एक ताण जाणवतो. तापमान उतरलय पण तरीही ही कसली असह्य तगमग? रोहिणी तीन चार वेळा पावसाचा शिडकावा करून जातात आणि वर्षादेवीच्या नऊ रत्नावली तील पहिले नक्षत्र हळूच पुढे सरकते. पांढुरक्या ढगांनी भरलेल्या निळ्या आभाळात दृष्ट लागू नये म्हणून लावलेल्या तीट्टीमिट्टी सारखा एकुलता एक काळा एकोळा ढग अंग चोरून उभा असतो. त्या जांभुळ काळ्या ढगाला सोबती म्हणून आलेले काजळकाळे ढग दूर क्षितिजावर उभे असतात.दुंदुभीच्या आवाजात विजेच्या प्रकाशात  छोट्या काळ्या ढगाला वेढलेल्या पांढ-या पिल्लावळीला ते पळवून लावतात. वेदमंत्राइतक्याच अतीपवित्र धीरगंभीर आवाजात ते मातीशी, झाडांशी, नदीशी संवाद साधू लागतात. मातीचे उष्ण उसासे,पेंगुळलेल्या मलूल झाडांचे निश्वास ढगांपर्यंत पोहचतात . परत त्याच त्या सृजनशील जीवनधारा जमीनीवर झेपावतात.आला मृग! आता बिनदिक्कत गवताचे बीज अंकुरू लागते. नांगरलेल्या शिवारातील ढेकळांना आता ओढ लागते चिंब चिंब भिजायची आणि परत लोणी मऊ बनून हळूवारपणे मातीत मिसळण्याची.  वर्षांऋतूच्या या मदमस्त विभ्रमांना भुललेला उन्हाळा आता पाणी पाणी होऊ लागतो. मत्त, ओलसर हवा. वा-याची शीतल, लडीवाळ पळापळ, आकाशातील सावळ्याचे गारूड,डोळ्यांना निववीणा-या  हिरव्याच्या अनेक छटा.आणि मग वर्षाराणी एकाहून एक मान्यवर  नक्षत्र पाठविते. आर्द्रा, मघा, पुष्य अशी देखणी नक्षत्र एकामागून एक हजेरी लावू लागतात.या नक्षत्रांची ऐटी भारीच! कोणाच वाहन उंदीर तर कोणाच बेडूक. कोणी कोल्ह्याला निवडते तर कुणाला मेंढा प्रिय! सरीवर सरी येत रहातात.कधी वीजगर्जनेसह तर कधी बाळाच्या जावळासारख्या मुलायम! कधी प्रपातासारख्या वेगवान तर कधी कर्णार्जुन युध्दातील बाणाच्या वर्षावा इतक्या तीक्ष्ण! घरधन्याची समजूत घालता घालता आपला रागीट  पती केव्हाच निघून गेलाय हे सुध्दा भान वर्षांऋतूला उरत नाही.आपल्या दो हातांनी ती उधळतच रहाते.पृथ्वीही हे दान घेताघेता थकून जाते. सृजनाचे हुंकार पृथ्वीच्या अंगागावर खुलून दिसतात.पोपटी ते गडद हिरवा या छटा सर्वत्र पसरलेल्या.जेथे माती तेथे गवतापासून ते रानभाज्या पर्यत कोणीही हजेरी लावते. सार कस तृप्त तृप्त! नद्यांनी आपली मर्यादा सोडलेली असते.जणू उन्हाळा वाळूखाली लपूनछपून काढल्याने आता आजूबाजूचा परिसर पाण्याखाली घालायची त्यांची ईच्छा त्या पूर्ण करत असतात. कधी बेभान होऊन तर कधी शांतपणे मर्यादेत राहून! बेडूक पर्जन्यसुक्त आळवू लागतात. साधी कौलारू पडीक घरेही कौलावर मदमस्त हिरवट पोपटी शेवाळाची मखमल अंथरतात.ती पडीक उदास घरेही नवचैतन्याने रसरसलेली  दिसतात. पावसाला सुरवात होऊन दोन मास झाले असतात. वर्षाराणीही थोडी उसंत घेऊ म्हणते. मग होतो श्रावणातला कनकपिवळ्या उन्हाचा आणि भुरभुरणारा सरींचा लपंडाव! यादोन्हीतील अधिक देखणे कोण हे ठेवणेही अवघड इतके सर्व हवेहवेसे! पूर्वा, उत्तरा, हस्त अशी दिग्गज मंडळी हजेरी लावून जातात. हस्त महालहरी.कोसळला तर हत्तीच्या सोंडेचा पाऊस नाहीतर निघाले रावसाहेब पाठ फिरवून! वर्षाराणीला ओढ लागते आता परत आपल्या कुटुंबात जायची.चार महीने  झाले बाई कामाची सुरवात करून.जाई जुई बरोबर आता फुलणारा पिवळाकेशरी झेंडू बघताच वर्षांऋतूला येणा-या शरद ऋतूची चाहूल लागते .अरेच्चा आता आभाळभर पसरलेला ढगांचा पसारा आवरायला हवा. पण अजून राहील आहे एक काम. मोती नको का घडवायला? स्वाती नक्षत्रावर पडणारा परतीचा पाऊस वर्षाराणीची ही ईच्छा पूर्ण करतो. आकाश आता कृष्ण कांती सारखे चमकदार  नीळे दिसू लागते.वर्षांऋतू  त्या तृप्त नद्या, ती कणसावर  आलेली पिके, अंगोपांगी रसरसलेली झाडे, शिंपल्यातील मोती सार सार बघते आणि शरद ऋतूला आभाळाच  पटांगण मोकळे करून देते.आदीशक्तीचा, सृजनाचा उत्सव ह्याच शरद ॠतूतील!

वर्षादेवी अशी सुतासारखी , शहाण्या गृहस्वामिनीच्या रूपात येते तेव्हा महिलाही या सृजनाने तितक्याच प्रफुल्ल होतात.मग सणांची झिम्मड उडते ती जेष्ठ पौर्णिमेपासून. लफ्फेदार साड्या, मोजके ठसठशीत दागिने, प्रसाधन करून जेव्हा ललना वटपूजनास निघतात तेव्हा पावसाच्या कोवळ्या सरी देखील ब-याचदा हजेरी लावतात. श्रावण महीना तर सत्यनारायणाच्या शि-यासारखा साजूक तुपातला सोनेरी आणि घमघमता! सोनटक्का ते पारिजात यात भर घालतच असतात. नागपंचमी,काय ते खिदळत घेतलेले झोके, मंगळागौर पुजन काय, जीवतीची पुजा काय सत्यनारायण काय काही विचारू नका. भोलेबाबाचा खास सोमवारही श्रावणी सोमवार बनताच झळाळून उठतो. श्रावणांतली अष्टमी तर गूढ सावळी. त्या मनमोहनाच्या वेणूनादाइतकीच गारूड घालणारी. त्या शामल बाळाचा जन्मदिन कृष्णजन्माष्टमी, आणि मग दहीहंडीची धांदल उडते ,गोविंदा-गोपाळाच्या आरोळ्या कोसळणा-या सरींना अधिकच खेळकर बनवतात. श्रावणी पोर्णिमा वेगळ्याच रुबाबात येते. साधा रेशमी धागा पण प्रेमाचे प्रतिक म्हणून बहिणबाई आपल्या भावाला बांधते.भारताचा स्वतंत्रदिनही श्रावणातलाच. भाद्रपद येतो तोच गणपती बाप्पा मोर्या अशा आरोळ्या ठोकत. हरतालका पुजनाने सुरू होणारा हा उत्सव दिवसागणिक अधिकाधिक मंगलमय होतो. गौरी पुजा आणि गौरींचे जेवण हा त्यातील मानबिंदु. भरल्या डोळ्यांनी बाप्पाला त्याच्या घरी पाठवले जाते. सणांना थोडीशी उसंत मिळते

 कधी कधी ही सर्वजनांची लाडकी वर्षाराणी बसते रुसुन. आपल्या संतप्त पतीची समजूत काढण सोडाच  पण त्याच्या हो मधे आपला हो मिसळते तेव्हा समस्त पृथ्वी वासियांना पळताभुई थोडी होते. नुसता हाहाकार! तर कधीकधी आपल्या स्त्री स्वभावाला अनुसरून वर्षा ऋतू लहरीपणाची कमाल आणि धमाल करते.अनेक वृक्ष,घरे क्षणात उध्वस्त करत जाते. वर्षांऋतूची ही अशी रूपे.जशी आदी शक्ती,' दुर्गा ते काली' अशा  विविध रूपात येते तशीच आपली वर्षाराणी! अव्याहत फिरणा-या ऋतूचक्राचा एक भाग!

डाॅ.किरण पाटणकर

फोन 9850550188

मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०२१

रंग©️

                      निसर्ग  नुसताच चितारी नाही तर  बेलाग जादूगारच आहे. क्षणाक्षणाला त्याचे हे जादूई प्रयोग सुरूच असतात. सतत आपले आश्चर्याचे धक्के देणं चालूच असत बेट्याच !  स्वच्छ , दुधी, चमकदार प्रकाशकिरण एका रेषेत पळत ऐटीत पाण्याच्या थेंबात शिरतो काय अन् दुस-या बाजूने वाकडा होऊन बाहेर पडतो  तेव्हा त्यात लपवलेले सप्त रंगाचे भांडार पसरलय याचं वेड्याला भान कुठे असते? आपण मात्र हा सप्तरंगी पिसारा बघून विभोर होतो. रंग म्हणजे निसर्गाचे रत्न भांडारचं! या सात रंगातील ते तीन मुख्य रंग! एकमेकांत मिसळले की नवा रंग तय्यारच. प्रमाण थोड कमी जास्त केल्यावर द्रौपदीला मधूसुधनाने पुरवलेल्या अनेकरंगी वस्त्रांसारखेच रंग तय्यार.

       लालचुटूक रंग तसा रूधिराचा रंग त्यामुळे हे लालसाहेब थोडे उग्र चिडलेले . कायम युध्द ,बळी असल्या मंडळींशी यांची जवळीक.भडकपणा यांचा स्थाईभाव.कधी कधी हा रंग रक्तस्राव रूपात समोर येतो तेव्हा भल्याभल्यांचे होश उडतात.या रंगाच्या गडद छटेवर डाॅक्टर मात्र खूष! गो-या, काळ्या,पिवळ्या तपकिरी या कुठल्याही रंगाची कातडी असो त्या खाली वहाणारे रंक्त लाल.आपल्या नीलरक्ताचे कौतूक करणारेही याला अपवाद नाहीत.

       गजाननाच्या लंबोदरावर बसलेला लालेलाल जास्वंद मात्र त्या गौरीपुत्राच्या देहावर बसून आपला भडकपणा सोडून एकदम मवाळ  होतो. देखण्या गणरायाचे सर्व अनिष्टांना उदरात नष्ट केल्याने झालेले गरगरीत उदर आणि त्यावर विराजमान टचटचीत लालभडक जास्वंद.अहाsssइतके राजस दिसतात नं बाप्पा!

       या रंगाच्या उग्र स्वभावाला न शोभणारी कोवळी, सुखद छटा आहेच. रमणीच्या मृदू , कमानदार ओठांवर ,गालावर जेव्हा स्वारी विराजमान होते तेव्हा भल्याभल्यांचा विश्वामित्र होतो. अशा सुंदरीला फुल द्यायच ते पण लाल भडक कळीदार गुलाबाचेच. 

   खर तर प्रेमाचा रंग आहे गुलाबी पण प्रेमभेटीला दिलेला लालबुंद रंगाचा गुलाब भाव खाऊन जातो. आपल्याला मिळणा-या प्रत्येक लाल गुलाबाबरोबर ती रमणी मात्र आपल्या कटाक्षाने सर्वांची ह्रदय रक्तबंबाळ करत असते. लाल रंगाला आपण कितीही भडक म्हणून दूर्लक्षले तरी बालकांचा तो सर्वात लाडका रंग आहे. अनेक रंगाची खेळणी पलटण म्हणून समोर उभी केली तरी बिटबीट डोळ्यानी त्याकडे बघत बाळ निवडतो फक्त लाल खेळण.तस पाहिले   तर हा लालेलाल लालबाबा तांबारलेल्या रंगेल आणि तापट डोळ्यात मुक्काम करून खूष असतो म्हणा..

  कलींगडासारख्या फळाच्या ताबा या लालसाहेबांनी घेतल्याखेरीज त्यात गोडी कुठली यायला? असा शौर्य,  क्रौर्य, रंगेल पणा , लज्जा, संताप आणि गोडी दर्शविणारा लाल रंग. याचे सारेच विरोधाभास.

  लाल रंगात किंचित पिवळा मिसळत नेला की तय्यार  केशरी रंग. कुणी याला नारिंगीही म्हणतात.स्वाभिमानाने , शौर्याने तळपत आत्मसमर्पण करणारे 'केसरीया' आणि आगीच्या उफाळणा-या लाल केशरी ज्वाळेत जोहार करणा-या कुलवंत याच रंगाला लपेटतात .यांत कोण कोणाचा मानमरातब वाढवतो हे ठरविणे अवघडच. जरीपटक्याचा भगवा आपल्या इतिहासाचा मानबिंदू. आकाशाच्या निलिम्यावर लखलख भगवा जरी पटका क्या बात है! मनामनात शिवरायांच्या शौर्यगाथेची आनंददायी उजळणी होते.अभिमान रोमरोमातुन ऊतू जातो.

           रसदार संत्री याच नारिंगी रंगाची.रंगापासून चवीपर्यत मोहकच मोहक पण हिरव्यागार मध्यम उंचीच्या झाडावर जेव्हा ही केशरी वाटोळी संत्री बहरतात तेव्हा ते झाड या मर्त्य जगतातील न रहाता एकदम स्वर्गीय झाड होते. नारिंगी रंगातील देखणी झाड आणि मधनच चमकणारी हिरवी पाने.मैनू तो मर जावा!

                    पिवळा मैत्रीचा रंग. सुखद , लख्ख,उबदार, आश्वासक!उगवतीची आणि मावळतीची सोनकिरणे. कुबेराचे भांडार लुटून पृथ्वीवर पसरलेला सोनसडा.केवड्याचा पिवळा धम्म. सोन्याने त्याच्या लखलखत्या पिवळेपणाचे घातलेले गारूड  मिटताच मिटत नाही. मनावर चेटूक करणारी रसरशीत पिवळी धामण. ती सळसळायला लागली की नजरबंदी झालीच म्हणून समजा. कांचनमृगही अस्साच सोनसळी  असावा . निश्कांचन अवस्थेत वनवासाला गेलेल्या सितामय्यालाही या पिवळ्या मोहापासून सुटका नव्हती.नाहीतर सीतामय्याला त्या कांचनमृगाचा मोह  कां पडावा? लग्नात तर हळदीने अधिकच लखलखणारी नववधू मामा ने दिलेली अष्टपुत्री नेसून अंतरपाटा पलीकडे उभी रहाते तेव्हातर तिच्याभोवती समई सारखाच इवलासा पिवळा प्रकाश पसरला आहे असे वाटू लागते.

         नीळा आणि पिवळा रंग झिम्मा फुगडी खेळून  गळ्यात गळे घालून बसले की दिमाखदार प्रवेश होतो हिरव्या रंगाचा. कधी पिवळा शिरजोर तर कधी निळा! मग काय हिरव्याच्या छटाच छटा तय्यार. इतक्या छटा असलेल्या या सम हाच !हिरव्याच्या छटा तरी किती! पश्चिम घाटातील एका झाडाचा रंग दुस-यासारखा असेल तर शपथ.! किंवा वसंतात कुतूहलाने डोकावणारे बालपालवीच्या छटा बघाव्यात.सगळ्याच भिन्न आणि भन्नाट. पाचूचा  रंग हिरवा. सर्वव्यापक हिरवा.शांत. डोळ्यांनाच नव्हे तर तनामनाला सुखावणारा. थंड करणारा.कुठल्याही रंगाची किंवा वास्तुची शोभा वाढवायची असेल तर हिरव्या या समृद्ध रंगाला तिथे स्थान द्यायचे.ती वास्तू कितीही साधी असो त्या हिरव्या रंगाची जादू होताच प्रासादतुल्य होते.ह्या हिरव्याची आस ही वेगळीच  त्या भल्या थोरल्या वाळवंटाला विचारा हिरवी तहान काय असते ते! कधी कधी मात्र पिकल्या पानाचा हिरवा देठ त्याची आणि इतरांचीही फजिती करतो.

        या उलट देवतांची प्रचिती देणारा रंग आहे निळा. चमचमता अफाट दर्या असो नाहीतर निळ्या अभाळाचा घुमट , त्या रंगाकडे नजरेत न मावणा-या व्याप्तीकडे बघताना विश्वरूप दर्शनच होते. मंत्रोच्चारासारखी खर्जातली, निळ्या समुद्राची गाज देवत्वाची प्रचिती देते. निळ्या रंगाला देवत्व देतात ते अंगभर त्या रंगात रंगलेले आपले देव. हसरा खोडकर  घननीळ बाळकृष्ण, एकवचनी नीलवर्णी पुरुषोत्तम श्रीराम, नीळकंठ शंकर आणि गळ्यात धवल पार्वतीचा कोमल हात, निळा सावळा विठूराया,निळ्या रंगातील सर्वसंहारक कालीमाता या निळ्याचे प्रतिनिधीच जणू.कधी कधी हा नीलबावरा डोळ्यात स्वार होतो.तर कधी फुले पक्षी फुलपाखरांतून परत शिव सुंदरतेची प्रचिती देतो. 

        निळा आणि लाल यांनी संधान साधले की पारवा आणि जांभळा आलेच. निळ्याला आणि लाल रंगाला थोडी कसरत करावी लागतेच म्हणा नाहीतर एकदम गडद जांभळा हजर. छान तोल साधला तर पारवा रंग आहेच. दोन्ही रंग सुखद. त्यातून पारवा रंग हा मला कायम कुठल्यातरी शापित राजकन्येचा रंग वाटतो. अती देखणा पण दुर्लक्षित.जांभूळ आणि रसरशीत भरताची वांगी यात चमकदार जांभळा रंग खुदखुदतो.कधी कधी गो-यापान देहावर कद म्हणूनही तो साजिरे दिसते.

                   .

           असे अनेक रंग !अगदी तानापिहीनीपाजा पर्यंत. परत त्यांची सरमिसळ आणि तयार होणारा नवाच रंग. आनंददायी उत्फुल्ल मनावर चेटूक करणारे पण----- सर्वात सुंदर म्हणजे यांचा निर्माता सर्व समावेशक श्वेत   रंग. शांत,विचारी, प्रत्येकाला खास व्यक्तिमत्व बहाल करणारा पांढरा! सात्विक, वैरागी! मात्र केसात हे पांढरेराव पहिल्यांदा मुक्कामाला आले की  भल्याभल्यांची भंबेरी उडते. वाराणशीला मात्र तेथिल कृष्णभक्त परित्यक्ता  त्या सफेद वेषात बघून मनावर जे मळभ आले ते अजूनही ओसरले नाही. तसेच रोहिणी नक्षत्रापासून जर आकाश पांढूरक्या ढगांनी भरू लागले की बळीराजाचा चेहरा पांढरा फटक पडतो.

       काळा रंग म्हणजे सगळ्या रंगाची गिचमिड.नुसते तीन प्राथमीक रंग गप्पा मारायला एकत्र आले की  गुढतेच भल मोठ्ठा वलय असलेला काळा रंग तयारच!. या रंगाची जादू  बदनाम आणि भयकारी !  काळी जादू नकोशी, अंगावर सरसरून काटा आणणारी.!!   विचारही कासाविशी  वाढवणारा.पण मग आठवते विष्णूदास नामांची रचना ' रात्र काळी , घागर काळी' हे काळ्यातील सौदर्य दर्शविणारे . रमणीच्या गौर मुखावरील काळा तीळ भल्या भल्याभल्यांची झोप उडवतो. बाळाला दृष्ट लागू नये म्हणून काळीच तिट्टी मिट्टी हवी नं? काळी शांत रात्र म्हणजे विश्रांतीची नांदी आणि नक्षत्रांची झुंबर  अधिकच लखलखतात अवसेच्या काळ्या रातीच !  काळे ओथंबलेला ढग म्हणजे अमृतकुंभच.

      अजंठ्यामधे एक फार सुंदर भीत्ती चित्र आहे. लवाजम्यासह राणी निघाली आहे.सा-या गो-या सेविका आणि त्यात उठून दिसणारी काळी अप्रतिम सुंदर राणी! अगदी द्रौपदीची आठवण यावी अशीच! काळ्या रंगाबद्दल आपल्या मनात असलेला दुजाभाव केवळ त्या दिडशे वर्षाच्या गुलामगिरीचे प्रतिक तर नाही ना?

     रंगाची खरच फार मोठी गंमत म्हणजे शुभ्र पांढ-याच्या पोटात सात रंग दाटीवाटीनी बसले असतात पण हेच सात रंग स्वतंत्रपणे एकत्र येतात तेव्हा ते धवल नसतात तर तयार होतो कुळकुळीत काळा रंग..पांढरा आणि काळा एकाच नाण्याच्या दोन बाजू. दोन्हीही समतोल  राखणारे एक दिवसासारखा उत्साही तर दुजा रात्रीसारखा गुढ!

    एक मात्र खरे. रंग जगाला सौदर्य बहाल करत असले तरी वास्तवदर्शी आहेत काळा आणि पांढरा रंगच,आणि त्यामधे पसरलेल्या कब-या छटा अगदी मानवी स्वभावासारख्या. जर पांढरा ते काळा हा प्रवास या राखाडी प्रदेशातून केला की आयुष्य ख-या अर्थाने जगलोय. काळा पांढरा आणि त्यांनी निर्माण केलेल्या अनेक राखाडी कब-या छटा आपले पाय जमिनीवरच ठेवतात एवढे मात्र खरे आता. आता इथे इतर रंगांचे महत्व संपते


सोमवार, ८ नोव्हेंबर, २०२१

जर तर©️

           एखाद्या  निखा-याने सर्रकन झटका बसावा आणि अंगावर कायमचा डाग पडावा तशा काही काही आठवणी असतात. विसरावे म्हटलं तरी शक्य नाही,नकळत लक्ष जातेच त्या डागाकडे.  अखेर सरकणारे दिवस,महिने,वर्षे त्यातील वेदना कमी करतात.  असं  जरी  वाटतं  असल तरी पुन्हा मनात सुरू होतो जर -तरचा गोफ! जर असं केलं असतं तर------ पण नंतर लक्षात येतं या जर तरला खरंच काही अर्थ नाही .झालेली गोष्ट होऊन जाते आणि आपला ठसा सोडून जाते .आज अशीच एकआठवण .

               

                         जर- - तर

©️

          जवळ जवळ चाळीस वर्षांपूर्वीची गोष्ट.मी नुकतीच बालरोगतज्ञ झालेली होते आणि छोटेसे हाॅस्पिटलही सुरू केले होते.  सुदैवाने प्रॅक्टीस  बाळस घेऊ लागली होती. प्रॅक्टिस करत होते ते गावही नेमस्त.  पुण्या-मुंबईच्या मानाने ब-याचदा अत्याधुनिक  सोई कमीच! पण पेशंटला पुरेसा वेळ देणे, त्याच्या आजाराचा सविस्तर इतिहास घेणे, त्याची व्यवस्थित तपासणी करूनच निर्णयाप्रत जाणे  त्यामुळे अंतिम निकाल बहुतेक वेळा चांगलाच येत असे. त्यावेळचे पेशंट  मुख्यत्वे पोलिओ, उलटी जुलाब, टायफाईड आणि क्षयरोग या प्रकाराचे असायचे.

      असाच एक दिवस! दुपारची वेळ. एक पोरसवदा स्त्री, जणू कालपरवा पर्यंत परकरात वावरणारी .जास्तीत जास्त सोळा सतरा वयाची. चेंबटलेली, फिकुटलेली ,अशक्त.त्या वयातील रसरशीत पणाचा लवलेश दिसत नव्हता. तिच्याबरोबरचा तो पोरगेलासा तरूणही अशक्त आणि रापलेला!  किंचित मळलेला पायजमा  त्यावर पांढरा सदरा आणि डोक्यावर गांधी टोपी.त्यांच्याबरोबर त्यांचं आजारी मुल असे ओपीडी मध्ये आले. ते खेड्यातून आल्यासारखे दिसत होते.दोघांचे वय अतिशय लहान त्यामुळे  ते पहिलेच बाळ असावे हा अंदाज आला.  दोघेही आले होते  विजापूर जवळच्या एका खेड्यातून. पत्नीला मराठी अजिबातच कळत नव्हतं. थोड थोड मराठी त्याला कळत होत. बाळाला बघितलं. साधारण सात महिन्याचे बाळ, उलटी जुलाबांनी अंगातला पाणी कमी झालेलं, कुपोषित, अंगावर अनेक ठिकाणी कातडी जंतुसंसर्ग. शक्यतो अंगावर पिणारे मूल  हे इतके कुपोषित असण्याची शक्यता कमी. तसेच त्याला इतक्या प्रमाणात जुलाब होण्याची शक्यताही कमी असते आणि त्यामुळे बाळ बहुधा  वरच्या दुधावर वाढतंय हा माझा अंदाज बरोबर आला. अत्यंत कळकट झालेली बाटली. बाटलीच्या निपल वर  झाकण नाही आणि त्यामध्ये अतिशय पातळ दूध. सर्व  स्वच्छतेचे निकष धाब्यावर बसविलेले. बाळाच्या आजाराचे उगमस्थान तर कळलं. बाळाला तात्काळ ट्रिटमेन्ट देण्याची गरज होती त्यामुळे त्याला ॲडमिट करून घेतलं.बाळाच्या गंभीर तब्येतीबद्दल  वडीलांना पूर्ण कल्पना देऊन सही घेतली. प्रतिजैविक, सलाईन आणि आहार बाळाला सुरू केला.कानडी येणा-या आमच्या आशाबाई बाळाच्या आईला स्वच्छतेचे, आहाराचे धडे देऊ लागली. सतत  दुर्मुखलेला चेहरा करून बसलेल्या आईच्या तीव्र इच्छेला जणू बाळाने प्रतिसाद दिला .अंगावरचे स्किन इन्फेक्शनही कमी होऊन बाळाचे जुलाबही आटोक्यात येऊ लागले.  उलटी जुलाबाचे पेशंट हे अंगातील क्षार आणि पाणी भरून निघतात टवटवीत होतात जणू पाणी घालताच टवटवणारे रोपच..बाळाचे  असेच झाले. आल्या आल्या डोळे फिरवलेल्या बाळाने तीन दिवसांनंतर , बघून हसायला सुरुवात केली होती. सात दिवसात बाळाच्या वजनातही वाढ दिसायला लागली. जेंव्हा  जेव्हा बाळाला मी तपासत असे , दर वेळेला त्या आईचा अशक्तपणा मला बेचैन करायचा. तरणीताठी सतरा  वर्षाची ही बाई पूर्णतः शुष्क जणू वठलेले झाडच.   तीच्या हालचालीही अतिशय संथ! 

           दहा दिवस झाले.  बाळाला आता घरी पाठवण्याची वेळ आली. बिल भरण्याची तजवीज करण्यासाठी बाळाचा बाबा गावाकडे गेला होता. आता हॉस्पिटलमध्ये इतर पेशंट बरोबर फक्त आई आणि बाळ होते. बाळाच्या बाबाचा गावाकडून फोनही आला होता. पैशाची तजवीज झालीये मी उद्या सकाळी येतो उद्या सकाळी डिस्चार्ज द्या.

         त्या रात्रीची गोष्ट. रात्रीचा राऊंड घेऊन वर घरी गेले होते साधारण दोन वाजता कर्कश्य पणे हॉस्पिटल मधून घरात वाजणारी बेल  किरss कीsssर वाजू लागली.  मला हाॅस्पिटल मधे बोलवताना घंटा फक्त एकदाच वाजवा मी येत जाईन असे मी सांगितले असतानाही इतक्या वेळा सतत बेल वाजवल्यामुळे जराशी मी वैतागलेले. वर घरात येताना तर सगळे पेशंट चांगले होते. कशाकरता बेल वाजवत आहेत हेच कळेना तरी धावत खाली गेले.  काहीतरी भयंकर घडलेआहे हे नक्कीच. आणि पाहते तो काय त्या बाळाची आई शेवटचे आचके देत होती. ती तरणीताठी पण अशक्त बाई आचके देत होती. ऑक्सीजन सुरू केला प्राथमिक उपचार करण्यासाठी सलाईन लावायला नस शोधू लागले त्याच वेळेला त्या बाईने शेवटचा आचका  दिला आणि तिने डोळे मिटले. नवी-नवी प्रॅक्टिस. बालरोग विभागात बालमृत्यू बघायची जरी सवय असली तरी बाळाचे नातेवाईकाचा अशा पद्धतीने मृत्यू  हेच अनपेक्षित होतं. तिला कार्डीयाक मसाज दिला. अॅडरिनलीनचे इंजेक्शनही दिले. उपयोग शून्य. 

             एका  जेष्ठ सर्जनला एवढ्या रात्री फोन केला. त्यांनी धीर दिला. पोलिसांना फोन केला होता . कारण अर्थात  अचानक मृत्यू! बाकीच्या पेशंटचे  नातेवाईक अतिशय घाबरले होते. दिलासा देणार तरी काय? पोलिस तेथे चौकशीसाठी आले.   स्पेशल रूम रिकामी होती त्यामध्ये बाकी पेशंट आणि नातेवाईकांना हलविले. त्या रात्री बाळाची आई झाले मी आणि आमच्या आशाबाई.त्याला बेबी फुड देणे, दुध देणे  आम्ही करत होतो.

      मृत झालेल्या बाईचे शवविच्छेदन करणे आवश्यक असल्याने दुसऱ्या दिवशी तिचा नवरा आल्यावरच ते करायचे ठरले. तो काळ मोबाईल फोनचा काळ नव्हता. रात्री त्याला गावात फोनही लागेना.  बाळाच्या वडिलांशी संपर्कही साधता येत नव्हता.रात्रभर सर्वच जागे. सकाळ झाली रोजची कामं सुरू झाली. वाॅर्डातच तिचे प्रेत एका पलंगावर झाकून ठेवले होते. 

         मग साधारण अकराच्या सुमाराला बाळाचा बाबा आला.पूर्णतः अनभिज्ञ! अतिशय आनंदाने, समाधानाने आणि कृतज्ञतेने त्याने मला नमस्कार केला. त्याला अखेर ती दुःखद  बातमी सांगण्याचे महाअवघड काम करावेच लागले.  त्याच्या चेहऱ्यावरचे भाव आजतागायत मी विसरू शकले नाही. आश्चर्य , दुःख, वेदना. तो धावतच वाॅर्डकडे गेला. पद्मा पद्मा तो  आक्रोशत होता , पण त्याला जाताना हसून निरोप देणारी त्याची पत्नी आता निपचित पडली होती.  अखेर शववाहिकेतून सिव्हील हॉस्पिटला प्रेत हलविले.कालपर्यंत पद्मा नावाच्या जीवंत व्यक्तीची , बाळाच्या आईच्या देहाची आजची ओळख होती 'प्रेत'.

           पोस्टमार्टम झालं .त्यात फुफ्फुसात क्षयरोग 

 आणि अतिशय कमी रक्तांनी तिचा घात झाला होता. हा प्रसंग प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर तीन ते चार महिन्यात घडला. खूप काही शिकवून गेला. हे काय झाले  या प्रश्नाने तेव्हा माझं डोकं पूर्ण पिंजून गेलं होतं .

  मग  मनात सुरू झाले जर आणि तर.  जर तिला मी बाळाबरोबर  तिच्या  तब्येतीच्या अनुषंगाने प्रश्न विचारले असते तर? फक्त बाळावर लक्ष एकवटताना जरी ती माझी पेशंट नव्हती तरी माझ्या पेशंटची आई तर होती न ! अशा अनेक शक्यता मनाला त्रास देत होत्या.

       मनाला अतिशय थकवा आला होता आणि मग लक्षात आलं की जर-तर  फक्त रेशमी साडीला शोभून दिसते. जर कुठल्याही घटनेबाबत इथे  आपण जास्त विचार करत बसलो तर त्यातून आपलीच अपराधी भावना वाढत राहते. कित्येकदा ती अनाठाई असते. त्यामुळे जर-तरच्या शक्यतेच्या मागे न जाता आहे ती गोष्ट स्वीकारणे महत्त्वाचे. त्यातून बोध घेणे सर्वात महत्वाचं.  








       

शुक्रवार, ४ जून, २०२१

कापूसकोंड्याची गोष्ट------©️

 कापूस कोंड्याची गोष्ट--  ©️


दोन तीन बिट्टी पोर आणि जराशी मोठी पण महा खट्याळ  त्यांची ताई, पत्ते खेळत बसली आहेत. पत्त्यांचा डाव आहे भिकारसावकार अगदी रंगात आलाय. जो पर्यंत  ताई सावकार होते आहे तोवर सगळाच आनंदी आनंद! अचानक एखाद नाक सुससुरणार धाकल, त्याची  डाव जिंकायला  सुरवात होते. नाक फराफर वर ओढत आणि मधनच बाहीला पुसत तो खुदखूदायला लागतो. ताईचे साठलेले पत्त्यांचे हात आता रोडाऊ लागतात मग ताईची थोडी चिडचिड ! ती मोठी अन् मुळातच चलाख.मग ती हुडकून काढते नवी  शक्कल. गोष्ट सांगायची.पत्ते बंद गोष्ट सुरू! आणि मग सुरू होते  गोष्ट! ! मोठ्या मोठठ्या ताणलेल्या उत्सुक  डोळ्यातून कुतूहल सांडू लागत.हळूच ताईला चिकटून सारे बसतात. ताईची खट्याळ नजर सगळ्या चिल्लर पार्टी वरून फिरते. ताई सुरवात करते " ए तुला कापूस कोंड्याची गोष्ट सांगू?" मग एक कोवळा आवाज येतो " होsss सांग न!" ताईच्या चेह-यावर हास्य,  गंमत , फजिती केल्याचा आनंद स्पष्ट दिसतो. लगेच ती म्हणते " होssसांग ना काय म्हणतोस? कापूस कोंड्याची गोष्ट सांगू? धाकटा चिरडीला येतो.तो रागावून काही बोलला की तेच वाक्य आणि कापूस कोंड्याची गोष्ट सांगू हे पालूपद जळवेसारखा त्याला चिकटून बसते. सर्वच धाकटे आता वैतागलेले आणि  बैचेन! हा राग ही बैचेनी डोळ्यातून टपटप गळू लागते. 

          जवळजवळ सर्वच या कापूसकोंड्याच्या तावडीत एकदा सापडले की पूर्ण डोक पिंजून काढेपर्यंत हा कापूसकोंड्या सोडत नसे. राजा विक्रमादित्याच्या मानगुटिवर बसलेला वेताळ एकवेळ परवडला. त्या वेताळाच्या प्रश्नाचे उत्तर दिल्यावर ते विकट का कसले हास्य करीत शिर्षासन करायला ,झाडावर उलटे लोंबकाळत झोके घ्यायला तो मोकळा.उत्तर माहीत असून विक्रमादित्याने दिलेच नाही उत्तर तर  हा वेताळ ,राजाच्या  डोक्याचे  तुकडे तुकडे, सॉरी, साॅरी शकले आणि तीही हजारो करायला तत्पर! दर्यावर्दी  सिंदबादच्या मानेवरचा म्हाताराही असाच बसतो पण चतूर सिंदबाद त्यापासून बरोब्बर सुटका करून घेतो. पण कापूसकोंड्या पासून सूटका? छे छे शक्यच नाही.एकदा चिकटला की चिकटला.

             लहानपणी वाटायच हा कापूसकोंड्या नक्कीच फिकुटल्या बदामी रंगाचा खरबरत्या अंगाचा,पांढ-याधोप लांबचलांब कापूस केसाचा दुष्ट आजोबा असणार. मला याबद्दल खात्रीच असायची.मुलांना छळणे हाच एकमेव उद्योग असणार त्याचा. त्याची गोष्ट म्हणजे आपल्याच सावलीने ताडकन उठून आपल्यावर वार करणेच जणू ! अगदी आपल्या जवळच्या आवडत्या लोकांना  फितवायचा तो. मोठ्या बहीणीने कापूस कोंड्याची गोष्ट सुरू केली की मी शांतपणे आईच्या पदरात स्वतःला गुरफटुन घेई.कामात गुंतलेली आई धपाटा घालत असे पण कापूसकोंड्या पुढे तो धपाटा म्हणजे एखादे बक्षीस वाटे ! लहानपणी वाटायच भेटू दे हा कापूसकोंड्या एकदा, त्याला शाप देऊन त्याचा दगडच करून टाकिन. अर्थात  त्या त्या वयात वाचलेल्या परीकथांप्रमाणे त्याला मी मनातल्या मनात शिक्षा द्यायची.

          वय वाढले. मी डाॅक्टर झाले तरी अधूनमधून कापूसकोंड्या भेटतच होता आता नवनवीन वेषांतरात. पण मुळ दुष्टावा तसाच. आपल्या उत्तरालाच प्रश्न  बनवून हा आपली पाठ सोडायला काही तयार नाही.

        हळू हळू लक्षात यायला लागले अगदी अनंत काळापासून हा खवट कापूसकोंडा महाराज छळतोच आहे. अफ्रिके मधली आपली आदी स्त्री आपली पूर्वज माता आणि पृथ्वीतलवार फक्त उरलेले दहा हजार होमोसॅपिअन्स ! अतीशय अवघड अवस्था! अफ्रिका खंड ओलांडून  लाल समुद्र ओलांडून पलीकडे जायचं. तेही प्रतिकूल परिस्थितीत . समोर शंकेखोर कापूसकोंड्या कुत्सित हसत उभा आहे, पण त्यावर मात केली त्या आदीमानवाच्या चिकाटीने, आत्मविश्वासांने ! नंतर माणसाने शिकार सोडून शेतीचे काम सुरू केले परत कापूसकोंड्याने खो घातलाच.तरीही मानव रूजलाच शेतीत ! नंतरची यांत्रिक  क्रांती तेव्हा तर असंख्य वेडे वाकडे प्रश्न या कापूसकोंड्याने मानेला झटका देत फेकले .माणूस या सर्वांवर मात करून पुढे जातच राहिला. कापसकोंड्याने मायावी रूप घेतले महायुद्ध केली.अणू बाॅम्ब टाकले. क्षणभर वाटले जिंकला कापूसकोंड्या .त्याने  माणसाला नामोहरम करण्याचा डाव मांडला. तो जिंकलोय असे वाटे पर्यंत माणसाने बाजी उलटवली.

        दोन हजार विसावे साल नेहमीप्रमाणेच आले. आता सरणा-या वर्षांबरोबर आपल्या पृथ्वीवरील  मुक्कामातले एक वर्ष  कमी झाले ही जाणीवच जास्त होते. असो. दूर चीनमध्ये एका प्रांतात विषाणूची साथ  पसरल्याच्या बातम्या येत होत्या पण ते खूssप दूs र चीनमधे होत. त्याचवेळी ठरलेली आमची दुबई ची ट्रिप पण मस्त झाली.तेथे इटली आणि फ्रान्स मधले त्या विषाणूंचे  तांडव  टिव्ही वर बघताना मात्र घशात काहीतरी अडकल्यासारखे होऊ लागले. या दोन्ही देशांत  आमचा मित्र परिवार  विखुरलेला. वर्षांपूर्वीच फ्रान्समधिल थाॅमस घरी राहून गेलेला.त्या सर्वांचीच काळजी वाटू लागली. तरीही अजून दिल्ली बहोत दूर है याच थाटात आम्ही. थोडी धाकधूक, थोडी भीती या मनस्थितीत परत   मायदेशी आलो.

     कापूसकोंड्या इथे दबा धरून बसलाच होता. यावेळी तो अधिकच वृध्द आणि हेकट  झालेला, कमरेत वाकलेला, तो पांढरा फेक कापूसकोंड्या! त्याने वेष बदलला होताच पण नवीन  नावही होत एन् कोव्हिड 19. मग सुरू झाला धुमाकूळ! मग हत्ती आणि चार आंधळ्याच्या गोष्टीसारखच होऊ लागल माणसांच. अनभिज्ञ शत्रू ! कसा आहे ? त्याची कमजोरी काय? काहीच मुळी कळत नव्हत. मानव हरणार?  हत्तीचा पाय चाचपडणा-या आंधळ्यासारखच एखाद्या औषधाला उत्तर म्हणून   या कापूसकोंड्या कडे पाठविले की हा कापूसकोंड्या फिदीफिदी हसायचा'महाभारतातील भीष्म अर्जुन युध्दात जसा शिखंडी मधेच उभा राहून रडीचा डाव खेळत होता तस्साच !हा 'करोना '  माणसाच्या उत्तरापेक्षा  डबल वेगाने आपलेच उत्तर मोडून तोडून आपल्या अंगावर भिरकवू लागला. त्यासाठी वापरलेले प्रत्येक औषध निष्प्रभ होऊन माघारी येऊ लागले.हा कापूसकोंड्या इतका जब-या की लहानपणासारखा आईचा पदरही लपायला मिळेना. शेवटी कापूसकोड्याच जरा कंटाळला. भसाभस येणारे त्याचे ते भेदक प्रश्न कमी होऊ लागले. व्वा आनंदी आनंद. कधी नव्हे तो कापूसकोंड्या  आपणहून गेला. पण कापूसकोंड्याच तो! तो कशाला हार मानेल ?तो कशाला जाईल? विश्रांती  घेऊन, नवीन अधिकच अवघड धारदार   जीवघेण्या प्रश्नासोबत कापूसकोंड्या परत हजर! यावेळचा मूडही वेगळाच.जणू प्रत्येक प्रश्नाला एक तरी माणसाचा बळी हवाच.मुले, तरूण, प्रौढ , म्हातारे सारेच या रणगाड्याखाली चिरडले जाऊ लागले. सारे एकदम त्रस्त.आता कधी एकदाचा  तो जाईल? का  थोडी विश्रांती घेईल आणि परत अनेक पटीने  प्रश्नसमृध्द होऊन येईल छळायला? जणू सा-या मानवजातीला भक्षण करायचा मूड आहे त्याचा.

        अशावेळी  आठवतो महा प्रलयात ही धरा पूर्ण नष्ट होत असताना त्या जीवघेण्या तुफानात उसळत्या अक्राळविक्राळ लाटेंवर स्वार एका पिंपळपानावर पहुडलेला  तोच तो सावळा. बाल कृष्ण!    आपल्या डाव्या पायाचा अंगठा चोखत निवांतपणे त्या लाटांवर हेलकावे खाणारा , गालात  खुदखुदणारा.आपला तारणकर्ता.तेथूनच नवी सुरवात.नवे विश्व , नव्या कल्पना!

     कलियुगात हाच कृष्ण आलाय वेगळ्याच वैज्ञानिक रूपात.कापूसकोंड्या हार मानायला तयार नाही तर कृष्ण आपली शस्त्रे अधिकच पारजतोय.बघू या आपण या  प्रलयातील एक लव्हाळे बनून आपले पाय जमिनीत घट्ट रूतवून! कृष्णाचा जय निश्चित आहे, पण कापूसकोंड्याला लेचापेचा समजायची चूक आता पुन्हा होणे नाही. कापूसकोंड्याच्या गोष्टीला लवकरच विज्ञान बाळकृष्णाच्या मदतीने आपण समाप्त करूया. इती कापूसकोंड्या पुराणं समाप्तम्!

             




बुधवार, १२ मे, २०२१

धावपटू पक्वान्नं ©️

                     धावपटू पक्वान्नं©️


खर तर माझा जन्म खाऊन पिऊन सुखी असलेल्या घरातला.त्या काळातील सर्वच मध्यमवर्गीय कुटुंबाप्रमाणे अवांतर पैसा घरात कधीच  नसायचा पण एकच वेळचे जेवण मिळेल अशीही अवस्था  नसायची.दोन्ही वेळेला व्यवस्थित  जेवण आणि सणासुदीला  गोडधोड म्हणजेच खाऊन पिऊन सुखी. आर्थिक विवंचना कितीही असल्या तरी भरलेले ताट समोर यायचे. शिक्षणही चालू होते.

       तेव्हा पक्वान्न व्हायची ती सणासुदीला. सणांचा दिवस. नव्या कपड्यांचा, सुट्टीचा, प्रचंड आनंद ,त्यातच गोडाधोडाचे जेवण. मग हळू हळू लक्षात यायला लागले या पक्वानांची चव हेच मुख्य नाही तर ही सर्वच पक्वान्न उत्कृष्ट धावपटूही  आहेत.म्हणजे अस बघा पोटात गेल्यावर या पक्वान्नांनी गुपचूप अतड्यातून प्रवास करावा ना? पण हे धावपटू बाया आणि गडी पक्वान्न निघते पोटातून डोळ्याकडे आणि काही काही वेळा थेट मेंदूत.डोळ्यात शिरून डोळे गपगार मिटले की ही पक्वान्न जिंकलीच.

                लहानपणी   आजी घरी असली म्हणजे चैन असायची. आकाशीच्या चांदव्याशी बरोबरी करणारी, पिवळ्या मऊ पुराणाने तट्ट भरलेली तांबूस पिवळी खरपूस भाजलेली पण रेशीम मऊ, तुपात स्नान करून साजिरी दिसणारी पुरणपोळी  ताटात यायची. केशर जायफळाचा गोडसर वास उदबत्तीच्या वासात मिसळून थेट मेंदूला गुदगुल्या करायचा. मेंदू टवटवीत होऊन झिम्मा घालू लागायचा.अर्जुनाच्या लक्षवेधी पोपटासारखीच डोळाभर उतरायची ती फक्त पुरणपोळी. तुप नहाल्या पुरणपोळीसह वाटीत नारळाचे वेलचीच्या स्वादाचे दुध.अहाsssहा. स्वर्गस्थ देवांनी हेवा करावा असा बेत असे . पुरणपोळीच्या जेवणाची कथा इथेच संपत नसे. जेवणानंतर जरा हात धूऊन बसतोय न बसतो तोच पोटातल्या पुरणपोळीची धावाधाव सुरू व्हायची. चक्क पोटातून डोळ्यात जाऊन बसायची बया! मग काय डोळे गपगपा मिटू लागायचे.डोळ्यातून मेंदू पर्यंत जाऊन पुरणपोळी  आपल्या जादूई संमोहनाचे प्रयोग मेंदूवर सुरू! मग मात्र काळ ,वेळ, जागा, दबदबीत उन आणि नकोशी थंडी या कश्शाकशाचे भान उरायचे नाही. दोन तीन तास मेंदू आणि डोळ्यांवर एखाद्या सम्राज्ञी सारखा अंमल गाजवून पुरणपोळी पोटात परत यायची. डोळे किलकिले करताकरता बाहेरचा गुलबट राखाडी अंधार बघितल्यावर बराच वेळ लागायचा तो स्थळ काळाचे भान यायला. ही पहाट की तिन्हीसांजा या गुंत्यात अडकलेला मेंदू जाणीवेच्य राज्यात शिरे. मेंदूला एकदम धक्काच बसे , बापरे चार तास झोपले होते मी??? अशी ती पुरणपोळी,पोटातून मेंदू आणि डोळयात पि.टी.उषाच्या चपळाईने जाऊन तिथे साम्राज्य गाजवणारी. हे पक्वान्न धावपटूच.  

        कधीमधी बासुंदी पुरीचा बेत असायचा. हे पक्वान्नही मस्त धावपटू पण बासुंदीला कधीच पुरणपोळीला हरवणे शक्य नसायचे त्यामुळे बिचारी दुस-या तिस-या नंबरावरच समाधान मानायची. आटीव दाट बासुंदी दिसायची देखणी.रसरशीत गौरवर्णी तरूणीसारखी तांबूस गौर. वर चुकारपणे रेंगाळणा-या चारोळ्या आणि बदामाचे पातळ तुकडे.जवळच टमटमीत पुरी वाफा सोडत बसलेली. बासुंदीत पडलेल्या जायफळाच्या मात्रेवर बासुंदीचा डोळ्यापर्यंत प्रवास किती वेगाने हे ठरते नाहीतर तशी ती संथच. 

            आई स्वतः नोकरी करणारी त्यामुळे  बहुतेक सणाला ठरलेले पक्वान्न म्हणजे श्रीखंड! घरात चक्का बांधून आम्हा बहिणींना तो फेसायला बसवायची आई!. घट्टमुट्ट चक्का, साखर मटकावत मऊ मऊ व्हायचा मग तो निगुतीने स्टीलच्या पातेल्यात विराजमान झाला की आई त्याचा ताबा घ्यायची. आधी चिरून ठेवलेली फळे ती त्यात मिळायची आणि थेंबभर व्हॅनिला इसेन्स किंवा आईस्क्रीम इसेन्स.आईचे श्रीखंड नेहमी हटके असायचे. लुसलुस गोड श्रीखंड, त्यात घासागणिक दाताखाली येणारे सुगंधी स्वादमय फळे आणि पुसटसा येणारा इसेन्सचा वास.ब्रम्हानंदी टाळी लागायची.श्रीखंडाचे जेवण त्यातील फळांमुळे अती जड कधीच व्हायचे नाही.पोट ते डोळे हा श्रीखंडाचा प्रवास दमदार!. पुरणपोळीसारखा वेगवान नाहीच.

श्रीखंड सावकाश डोळ्यांना गोंजारी. मग छानशी झापड येई डोळ्यावर साधारण तास, अर्ध्या तासाची!.पोटातून डोळ्यात सावकाश स्थिरावणा-या श्रीखंडाचे आईने नामकरण केले होते तुरुतुरू श्रीखंड!

          खिर, मोदक, लाडू,चिरोटे अगदी गेला बाजार जिलेबी सुद्धा ही खरतर धावपटू नव्हेच. पोटातून वाकडी वाट काढत ते कधीच डोळ्यात घुसखोरी करत नाहीत तर शहाण्यासारखे शांतपणे पोटात थोडी विश्रांती घेऊन आपल्या मार्गाने जातात.त्यामुळे तसे ते निरुपद्रवी. डोळ्याकडे पळण्यापेक्षा ओठातून पोटांत एवढंच ते आनंदाने करतात. गुलाबजाम त्यातला जरा द्वाड! तळतमळत तूप पिऊन छानपैकी साखरेत डुंबून हा पठ्ठ्या अगदी 'नायकीचे 'बूट घालून पळायला तय्यार! पण जास्त दिखाऊपणाच. डोळ्याकडे तो सरकतोय पण हे आपल काम नोहे म्हणून लगेच  गुपचूप परत.

       बंगाली मिठायाही एकदम रसदार. चवदार पण डोळ्याकडे जायचा रस्ता त्या विचारत सुध्दा  नाहीत. कारण त्या मुळातच 'भद्र मिठाया' आहेत .एकदम सभ्य! त्यांचा गोड मिट्ट गोडवा जीभेतून सर्वांगात भिनवतात पण अगोचरपणा करून डोळ्याकडे पळायचे नाव काढत नाही हो!

          आता पुरणपोळीला सब्बल  प्रतिस्पर्धी म्हणून काम करतो आपला आमरस.वर्षातून फक्त तीन महिने मिळणा-या राजाधिराज आंब्याचा रस. रूपही असे राजस! केशरी, सुगंधी दाट. मग तो पुरी , पोळी किंवा नुसता कसाही खा अप्रतिमच लागणार. किती वाट्या आपण रिचवतो त्या प्रमाणात याचा डोळ्याकडे जायचा वेग ठरणार. एक वाटी म्हणजे अर्धा तास झोप निश्चित.  नंतर प्रत्येक वाटीबरोबर चक्रवाढ व्याजाप्रमाणात झोप वाढत जाते.

         परदेशी हिंडतानाही पुरणपोळीला  तुल्यबल रथी महारथी स्पर्धक मी सतत शोधत होते. टर्कीतील बखलाव आणि अनेक गोड पाकात मुरलेले पदार्थ. मन तृप्त करून सोडतात पण नंतर ती गुंगी, धुंदी अजिबात नाही. इटली देशातील तिरामसू माझा अती लाडका पण पुरणपोळी समोर तो बिगरीतच. जपानचे तर साखरेशी किंवा गोडाशीच साता जन्माचे  शत्रुत्व! त्यामुळे तिथे पुरणपोळी  स्पर्धेत  पुढे चाल (बाय) मिळाल्यासारखा विजयी वाटते.

          जगन्नाथ पुरीच्या त्या जग्गन रक्षकाला  बहात्तर गोड व्यंजनांचा  नैवेद्य  दाखवतात असे ऐकले आहे. अर्थात  या नंतर बाप्पा नक्कीच छानशी वामकुक्षी घेत असणार हे नक्कीच.   

        सुखाची माझी व्याख्या  सोप्पी आहे. फोन बंद असावा, सुट्टीचा  दिवस असावा. ताटात तुपात लडबडलेली गोड मिट्ट  पुरणपोळी  असावी. डायेटींगला अंगठे धरून फाटकाबाहेर उभे करून त्याचा विचारही न करता मी त्या पुरणपोळ्या रिचवाव्या.पुढचे काम पुरणपोळी आपणहून करते. डोळ्याकडे वेगाने धावत जाते आणि.      --- -    --------घsssर  घूssर 

अहाहा चार तासांची निश्चिंती!  

शुक्रवार, २ एप्रिल, २०२१

चहापान ©️

                           चहापान©️


काही काही छोट्या छोट्या गोष्टी  कधी लार्जर दॅन लाईफ  होतात हेच मुळी कळत नाही.देवाभोवती असलेल्या वलयासारखेच खास तेजोवलय लाभत अशा गोष्टींना !फक्त योग्य माणूस योग्यवेळी तिथे असायचाच अवकाश की एकदम साईsssssसुट्ट्यो. 

    आता साधा चहापानाचा कार्यक्रमच पहा न! पूर्वी तर असे चहापानाचे कार्यक्रम बख्खळ असायचे.एखाद्या व्यक्तीला घरी बोलवायचे असेल आणि जेवणासाठी  वेळ काढणे दोन्ही पार्टींना शक्य नसेल अशावेळी त्या संकटातून अलगद सुटका व्हायची ती घरधन्याकडून. आत बघत ते जोरात बोलायचे ,"काय हो, जेवण नको म्हणतात पाहुणे मग रविवारी  बोलवायच का चहाला? आतन  तात्काळ पदराला हात पुसत गृहलक्ष्मी  दारात यायची."सगळ्यांनी यायच हं भावोजी.कोणी पाहुणे  असतील तर त्यांना पण घेऊन या हो." साधारण चार वाजता आलात तरी चालेल बर." खर तर चहापान तसा इटूकला, जेवणांच्या मानाने धाकला कार्यक्रम पण आता जेवणांना मागे सारून तो पुढे सरसावतो आणि अभिमानाने  एखाद्या स्वतःला बैल समजणा-या बेडकीसारखा फुगु लागतो.त्याबरोबर घरही अंगात आलेल्या देवर्षी सारखे   घुमू लागते. येणारे पाहुणे कोण आहेत त्यावरून चहापानाला पदार्थ काय करायचा हे ठरविले जाते.

       सकाळ पासूनच घर आवरण्याचा कार्यक्रम सुरू! दिवाणावरची चादर बदलणे आणि आता कोणी त्यावर घुधडले तर माझ्याशी गाठ आहे ही धमकी अधिक आज्ञा, पाठोपाठ  यायचीच. नवीन जाजम घातले जायचे .नवे पडदे झुळझुळायचे. खोलीतील जळमटे, धूळ स्वच्छ केली जायची.उशांवर छानपैकी भरतकाम केलेले अभ्रे  सजायचे. चुकून  दुस-याच घरात आपण आलोय असे ती चकाचक बैठकीची खोली बघून वाटायचे. फुलदाणी पण रंगित सुगंधी फुले डोक्यात घालून टेचात उभी असे. दारात मारलेल्या सड्याने मृगाचे शिंतोडे पडल्यासारखा मृद्गंध दरवळायचा.  

          पदार्थ कुठले करायचे हे ऋतूमानाप्रमाणे चाणाक्ष  गृहस्वामिनीने ठरविले असे. त्याची जय्यत तयारी झाली असे. घडाळ्याकडे बघत ती पुटपुटायची आल्यावर एकदम गरमगरम करून देईन हो. ठेवणील्या निगुतीने वापरायच्या कपबशा आणि प्लेट्स कपाटातली त्यांची जागा सोडायच्या. काचेच्या  मोठ्ठ्या जग् मधले   थंडगार पाणी  वाळ्याने अधिकच  रूचकर आणि सुवासिक  व्हायचे. टेबलावर छान पैकी लेसचा टेबलक्लाॅथ वातावरण अधिकच साजरे करायचा. दिवाळीच्या आसपास चहापानाला कुणाला बोलवले तर दिवाळीचे पदार्थही आटोपशीर बाऊलमध्ये टेबलावर आदबशीर हजेरी लावत. या बरोबरच घरातल्या बच्चेकंपनीला शहाण्यासारखं वागण्याबाबत वारंवार तंबी दिली जायची. 

          त्यातून तो ताईचा 'दाखविण्याचा ' कार्यक्रम  असला तर विचारायलाच नको. हवेतील सणसणून वाढलेला ताण , पाळण्यातल्या बाळालाही जाणवायचाच. घर तर इतके लखलखीत केले जायचे की पुढील छप्पन वर्ष  कोळ्याला छतावर जाळे विणायची भीतीच  वाटली पाहिजे आणि पालीला भिंती वर फिरायची !

       अखेर पाहुण्यांचे आगमन व्हायचे. त्यात तर इतक्या त-हा असायच्या की बोलायची सोय नाही.चारची वेळ देऊनही साडेपाच सहा पर्यंत यजमानांना तंगवत ठेवणारे. ब-याचदा त्यातील  काही शिष्ठ मंडळी आम्ही नाही बाई असल खात असली वाक्य टाकायला लागल्यावर गृहलक्ष्मीच्या नाकाचा शेंडा लालेलाल झाला नाही तरच नवल! काही मात्र एकदम शहाण्यासारखे वेळेवर यायचे.बच्चेकंपनीसाठी खाऊ आणणारच.  प्रत्येक गोष्टीला म्हणजे अगदी भरतकाम केलेले अभ्रे  ते फुले आणि काचेचे बाऊल ते पदार्थ  यांचे मनसोक्त कौतुक करतील, पदार्थांना योग्य तो न्यायही  देतील. मोकळेपणाने  गप्पा मारतील.भरपूर हसवतील.बरोबर आलेल्या स्त्रीवर्ग हळूच पदार्थाची पाककृती घरच्या लक्ष्मीला विचारून कृतकृत्य करतील. खर तर अशा मंडळीनी जाऊच नये असे वाटते. तोवर संध्याकाळ झाली तर दही भात खायचा आग्रहही होतो. गृहलक्ष्मी कौतुकात न्हाऊन निघते .जाताना पाहुण्यांना आवडलेला पदार्थ डब्यातून आठवणीने देते.

       चहा  खरतर ब्रिटिशांनी आपल्याकडे आणलेलं हे पेय, कानामागून येऊन आपल्या आयुष्याची जणू  लांबलचक सावली बनलेला.सावली एकवेळ  चकमा देईल पण चहाची लत लग गयी मात्र सोडणे अवघडच. उठल्यावर चहा, राती जागायला चहा , तरतरीत वाटण्यासाठी चहा, पाऊसात भिजल्यावर परत आल्याचा चहाच!मित्र मैत्रिणी बरोबर घोटघोट चहा. दमून आल्यावर चहा. कधी एकट्याने प्यायचा चहा तर कधी मोठ्ठा सोहळा बनणार चहाच! होस्टेलवरचा मैत्रीणींनी केलेला पातेल भर चहा त्यातला माझा खास डचकाभर वेगळा काढलेला ! दुसरा लक्षात राहिलेला चहा म्हणजे रेल्वेतला.पूर्वी रेल्वे  वेटींगरूममधे स्पेशल चहा मागविला की खास चहा यायचा. जाड पांढ-याधोप काचेचे उभे कप, गुबगुबीत टीकोझी खाली लपवलेली तशीच  पांढरी बसकी गोलमटोल  किटली, अल्लाउद्दीनच्या दिव्यासारख्या आकाराच्या पांढ-या काचेच्या भांड्यात दुध आणि सर्वात  जास्त  आकर्षण वाटायचे ते साखरेच्या क्यूबचे. त्या दिवशी राज्ञीपद मिळाल्यासारखा आनंद मिळायचा. नंतर रेल्वेत पेपरकपमधून, कुल्हडमधून मातीच्या गंधाचा , मस्स्sssला चाय इत्यादी  अनेक चहा रिचवले पण तो वेटींग रूममधला चहा विसरणे अशक्यच.या सगळ्या मर्मबंधातल्या ठेवी आहेत.

         गंमत म्हणजे मदीरे पाठोपाठ सर्वात जास्त या चहावर काव्यही रचली आहेत. चहाची तल्लफ आल्यावर माफक साखरेचा दाट दुधाचा आणि पुसटत्या आल्याच्या वासाचा चहा यावा आणि नेमकं  त्याच वेळी भणाणणा-या माशीने  त्या प्याल्यात हाराकारी करावी मग त्यावर सुंदर काव्य व्हावं हे भाग्य मदिरेचा खालोखाल मिळते ते फक्त चहालाच.

           सकाळचा चहा जरा गडबडीचा पण ताज्या दुधाचा. उकळतानाच ते मिश्रण सारे स्वयंपाकघर सुगंधी करते. वेळेबरोबर जर रस्सीखेच नसली तर चहा आणि हातातल्या पेपरमधल्या बातम्या अगदी ब्रम्हानंदी टाळी लागलीच पाहिजे. किंवा गच्चीत वा गॅलरीत बसून घोट घोट चहा घेताना ती ऊब मुरवत पुरवत , पक्षांचे आवाज ऐकत आणि एकही मनुष्यप्राणी  निर्मित आवाज नाही अशा पहाटेच्या वेळी अशी भन्नाट तंद्री लागते की बस! येणारी वा-याची झुळूक  आणि सूर्यादेवाचा पहिला किरणही चहा पिण्यासाठी घाईघाईने आल्यासारखा जाणवतो.

कधी कधी कामाच्या ठिकाणी एखादा कप चहा होतो पण त्या पुळचटआणि पाणचट दोन घोटात तळ गाठणा-या काळसर पाण्याला चहा म्हणणे जीवावर येते. घरी आल्यावर जर तुमचे ग्रह उच्चकोटीचे असतील तर चला चहा तयार आहेचा हाकारा 

होतो आणि गरमागरम चहाचा कप हातात येतो. दुपारचा चहा म्हणजे त्याबरोबर चटकमटक हवेच.कोण कोणाची रंगत वाढवते ते सांगणं अवघडच.

          जपान मधील  चहापानाची नजाकत एकदम शाही. आधी तीन तीन वेळा कमरेत वाकवाकून अभिवादन आणि नंतर खास चहासाठी  राखीव खोलीत बैठ्या  टेबलवर नजाकतीने दिलेला चहा तो पण अतिशय देखण्या कान नसलेल्या कपांतून. त्यात हे बाऊल जितके जुने तितके तुम्ही अधिक महत्वाचे. एखाद्या रागदारीसारखा चार पाच तास रंगत जाणारा सोहळा आहे तो.चहा मात्र ग्रीन टी!

         ब्रिटिशही त्यांच्या त्या खास व्हिक्टोरीयन गुलाबी फुलांची नाजूक नक्षी असलेल्या चमकदार तलम कपातून चहाचा सोहळा  साजरा करतील पण बरोबर केक कुकीज सारखे पदार्थ  अनिवार्य.  टर्कीश मंडळी  आपल्यासारखीच चहाबाज.  अग्निहोत्र चालू असल्यासारखे सतत चहाच्या  किटलीत पाणी उकळत असत त्यामुळे लागेल तेव्हा हा चाय  दिमतीला हजर! त्याचे कपही खास  पारदर्शक काचेचे,कमनीय बांध्याचे  ! त्यात ते सोनेरी काळसर अमृत. हव तर साखर घाला वा तसेच घोट घोट प्या. क्षणात तरतरीत!

           लहानपणी घरी दुधशुभ्र पातळ काचेचे , सोनेरी कडांचे पसरट आकाराचे छानसे कप होते. आईचे भारी आवडते. कुणी चहापानाला यायचे तेव्हाच आई ते कप काढायची. स्वतः धुवायची पुसायची . एकदा आलेल्या पाहुण्यांना त्या कपात चहा ओतून माझ्या हातात तिने ट्रे दिला. ती मला सावकाश  जा असे सांगतेय तोच-------हाय रे दैया मी अडखळले आणि----- पुढचे रामायण सांगायलाच हवे कां? चार पैकी दोन कप बशा पूर्णतः धारातिर्थी पडल्या होत्या. सहाकपांचा तो सेट आता आपसुक  चार वर आला होता. तो चहापानाचा कार्यक्रम विसरणे अशक्यच.

         हल्ली व्यवसायानिमित्त दुपारी मोकळा वेळच नसतो . डिनरची आमंत्रणे असतात पण पूर्वीसारखे "चहाला या नं" हे आमंत्रण कित्येक वर्षात मिळालेले नाही.मुले घरी नसल्याने घर आवरणे हा कार्यक्रम पण आवर्जून करावा लागत नाही.त्यामुळे  ते चहापानाचे आमंत्रण, ते घर आवरणे, त्यापाहुण्यांबरोबर रंगलेल्या गप्पा. आईने केलेले चविष्ट पदार्थ आणि मृत्यूमुखी पडलेले कप सारेच खूप मिस करतेय.पण जेवणही तेवढ्याच श्रध्देनी आणि आवडीने एनजाॅय करते हेही तितकेच खरे!.

         



 माझे इतर लेख वाचायचे असल्यास खालील लिंक वापरावी. 

      https://drkiranshrikant.pasaara.com