शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २०२०

डाकिया डाक लाया-----©️

 


माझ्या पिढीतील सर्वांनाच 'पोष्टमन' या नावाभोवती असलेलं खास वलय अगदी छान माहीत  आहे. आपल्याभोवती अनेक सुखदुःखाचे प्रसंग गुंफण्यात तो निमित्त मात्र! स्वतः मात्र कमलपत्रा सारखा अलिप्त!  दिवाळीला एक दिवस दिवाळीचा फराळ आणि खुशी घेतल्यावर कळायचं की पोष्टमन काका  हसतो सुध्दा. त्या दीपावलीच्या  दिवशी आवर्जून  सर्वांची चौकशी ते करायचे .त्या दिवशी नेहमी एखाद्या  यंत्रमानवासारखे वाटणारे काका एकदम आपले जवळचे कोणीतरी वाटत.माझ्या लहानपणापासून त्यांना 'काका' ही उपाधी मिळाली आहे ती अजूनही तशीच!

        आज इतर अनेक सोयींमुळे पोस्टमन काकांना घरातल्या अडगळीतल्या वस्तूंची कळा आली असली तरी पोष्टमनचा सुवर्ण काळ ज्यांनी अनुभवला आहे,ज्या पोष्टमनची वाट प्रिय व्यक्तीपेक्षा कांकणभर जास्तच बघितली गेली, त्या पोष्टमन काकांच्या अनेक आठवणी अनेकजणांना  नक्कीच  असतील.काहींनी त्यांना नुसतं गृहीत धरले असेल आणि कालौघात त्यांच्या उरल्या सुरल्या आठवणी पुसून टाकल्या असतील.

  आजचा पसारा पोष्टमनच्या नावे आवरणार आहे.त्या आठवणी आवरता आवरता परत ताज्या करू या.


         डाकिया डाक लाया---------- ©️



          एखाद्या नोकरीत सर्वात जास्त बहूरूप्याच काम जर कोणी केल असेल तर त्यात बराच वरचा नंबर द्यावा लागेल  निरोप्याला, म्हणजे आधुनिक युगातील पोष्टमनला . अगदी अथर्ववेदांतही त्यांचा उल्लेख आहेच.निरोप देणारे मग कितीही दूर जाऊन तो देणे असो त्याला गौरविले आहे कित्येक वर्षांपूर्वीच्या अथर्व वेदांत!

    रामायणात तर पोष्टमन  असतो बलदंड ,रामभक्त हनुमानाच्या रूपात, म्हणजे आजच्या पोष्टमनचे शांत स्थितप्रज्ञ रूप मात्र या निरोप्याने मोडीत  काढले होते आणि लंकादहनाने रावणाला स्वसामर्थ्याची चुणूक दाखवली  होती.अर्थात  देवांना आपले मानवांचे नियम कुठे लावतात? 

           कधी पोष्टमनने पक्षीरूपातही निरोपाची देवाणघेवाण  केली आहे. डौलदार आणि वळणदार मानेचा राजहंस आपला मानसरोवरातील कमलांचा परागचारा  सोडून  दमयंतीकडे जाऊन नलराजाचा निरोप देत असेल तेव्हा इतका कमनीय आणि नितांत सुंदर  तो  राजहंसाच्या रूपातील आदि पोष्टमन  बघून दमयंती म्हणत असेल "हा निरोप्या इतका सुंदर तर याचा स्वामी किती सुंदर असेल?! नल-दमयंतीसाठी राजहंस ठीक आहेत हो पण इतर राजे, जमिनदार निरोप्या म्हणून कबुतरांचा भरपूर उपयोग करून घ्यायची. गुट् ssर गू करत या रूपातही या पोष्टमनचे काम चोख! मग ते प्रेमपत्र असो वा युध्दाची गोपनीय माहिती!

     चाणक्याने सुध्दा चाणक्यनीतीत त्यावेळच्या पोष्टमनकाकाची खास दखल घेतली आहे. पण नंतर मात्र अनेक राजांनी ज्याचे रनिंग सर्वात भारी त्याला पोष्टमनकाकाची नोकरी पक्की केली. हातात घुंघुरांची काठी, त्याला गाठोड्यात बांधलेल्या चिठ्ठ्या, खलिता, वस्तू आणि असला तर  दवंडी साठी दणदणीत आवाजाचे वाद्यं  घेतलेला सहकारी. मग निघाले हे पोष्टमनकाका पळत! उन्हाळा पावसाळा थंडी कशाचीही पर्वा  न करता. रोज शंभर मैलाचा पल्ला तोही घनदाट जंगलातून ! बापरे बाप!!! काही काळाने पोष्टमन काकांना मिळाली पदोन्नति आणि दोन पायांऐवजी मिळाला मस्तपैकी घोडा. पण परत टांगती तलवार आहेच. कुठल्याही राजाला खलिता दिला आणि त्याला मजकूर नाही आवडला तर काय होईल ते सांगणं अवघडच.मग कधी कैदेत सडावे लागायचे तर कधी एकदम शिरच्छेदाची भीती. राजा शहाणा असला तर हा बिच्चारा फक्त निरोप्या आहे म्हणून   सोडून द्यायचा. तेव्हा भारतातून निरोपे जायचे थेट पर्शियापर्यत!

     पोष्टमन काकांचे  अशा अनेक कष्टांच्या पाय-या चढणे चालूच होते. मोगलांनी, इंग्रजांनी आपापल्या परीनं याला थोडे सुकर बनवायचा यत्न केला. पण अनेक शतकं इतक्या कष्टाचे काम प्रामाणिकपणे केल्यामुळेच पोष्टमन काकांच्या स्वभावात एक स्थितप्रज्ञता, अलिप्तता आली असावी. एकाच निर्विकार वृत्तीने पुत्रप्राप्तीचे पत्र आणि म्हातारीच्या मृत्यूचे पत्र, दोन्हीचे वाटप ते करू शकतात.

         खाकी कपड्यातील पोष्टमन अगदी ठराविक  वेळेला सायकलवर आमच्या गल्लीच्या  टोकावर येत असे.कानावर अडकवलेले पेन. डोळ्यावर गोल चष्मा ,बारीक लाल कडा असलेली खाकी टोपी आणि तसाच खाकी ड्रेस. एखाद्या माणसाचे दर्शनही किती आनंददायी  असते हे गल्लीतल्या रहिवाशांच्या  हालचालीवरून लक्षात यायचे. शेजारी शिक्षणासाठी रहाणारे विद्यार्थी घरच्या पत्तुराची वाट बघतच असायचे, तर काही  येणा-या पैशांची !. नाना आपल्या सैन्यातील मुलाच्या खुशालीची, पलीकडच्या काकी गावाला गेलेल्या काकांच्या पत्राची.कुणी कुठे नोकरीचा अर्ज केलाय त्याच्या उत्तराची आतुरतेने वाट पहात असत. आमच्या घरी तर बहिणीचे नुकतेच लग्न ठरलेले त्यामुळे पोष्टमन यायच्या सुमारास तिच्या सारख्या दारापर्यंत फे-या आणि आमचं खुदुखुदू हसणे सुरू असे. पोष्टमनच्या हातात ते निळसर पाकिट पाहिल की आनंद, उत्सुकता , किंचित लाजणं याचं एक झकास मिश्रण तिच्या चेह-यावर व्हायचे. मग काय आमचं चिडवणे सुरूच!  

              पोष्टाची 'तार' या प्रकाराबद्दल मात्र सार्वत्रिक  भीतिच असायची. तार म्हणजे वाईट बातमी. तार आली एवढी बातमी आली की घरभर अक्षरशः सन्नाटाच  पसरे. लहानपणी माझ्या घरीही सहा महिन्याच्या अंतरांनी आलेल्या दोन्ही 'तारा ' अतिप्रिय व्यक्तींच्या  मृत्यूच्या होत्या.त्यानंतर घरात उसळलेला कल्लोळ म्हणजेच तार असे समीकरण माझ्याही डोक्यात फिक्स झालेले. 

          अगदी ठरवून   मुद्दाम पोस्ट  ऑफिसमध्ये  जाऊन तार कशी पाठवतात ते पाहिले आणि ते कडाsssड कट् कड करणारे छोटेसे मशिन  म्हणजे बशालकृष्ण मुखातील ब्रम्हांडासारखे वाटले. अनेक निरोप एकवटले होते त्या कssड् sकट्ट मधे. तार जितकी गंभीर त्याहून जब-या आहे तिचा विनोदी स्वभाव हे तेव्हाच लक्षात आले!  प्रत्येक मजकूरासाठी एक कोड नंबर होता पण कधी कधी  तारयंत्र वापरणा-या पोष्टमन कडून भलताच नंबर टाकला जायचा.त्यामुळे व्हायचं काय वधूवर लग्नमंडपात असताना आणि भटजी तार स्वरात शुभमंगल सावधान म्हणून सावध करत असताना लग्नाला येऊ न शकलेल्या काकांची तार यायची रमेश यास पुत्रप्राप्ती झाली. अभिनंदन. बिचारा रमेश मनात म्हणे मी अजून वधूच्या गळ्यात माळही घातली नाही तोच मी पिता कसा झालो ?अचंबित!

       कधी कधी तार येताच न वाचताच रडण्याचा धुमाकूळ  उठायचा, मग पोष्टमन हळूच तार वाचून दाखवायचा त्यात दुसरीच आनंददायी बातमी असे.अशा गमती पण घडत. 

       पोष्टमन काका खेड्यात पत्र देखिल वाचून दाखवतात.स्वतः न गुंतता सुखदुःख वाटत जायचं म्हणजे खरच कष्टाचे काम! कोणाचे अश्रू पुसायला न थांबता किंवा आनंदात सामील न होता हा महाभाग पत्र वाचले की पुढच्या गल्लीत सटकतो. श्रीमद्भगवदगीतेतील " कर्मण्येवाधिकारस्ते------ ह्या वर्णनात  तंतोतंत बसतात पोष्टमन. ऊन वारा पाऊस, पूर ,आग दुष्काळ  हे सारे इतर जनांसाठी पण हे अस्तित्वातच नाही अशा आसोशीन काम चालते पोष्टमनकाकांच. त्यात बारीक गल्लीबोळात जिथे एकाच आडनावांचे अनेक आडनावबंधू एकवटले आहे तिथे कोणी ठराविक नारायण कुलकर्णी  शोधून त्याचे पत्र त्याला देणारा  हा माणूस खरतर धनंजय कथांमधील डिटेक्टीव्ह पेक्षा ही चतुर आणि चाणाक्ष!

       पोष्टमनचे पोष्टखाते हा एक वेगळाच महाविषय आहे. इंग्रजांच्या काळात नेटकेपणी तिकीट  आकारणी करून सर्वसामान्यांसाठी सुरू झालेली डाक सेवा अजूनही आपले स्वप्न वाटण्याचे काम नियमित  करते आहे. आता तर स्त्रीयांनीही ही निरोप्याची भूमिका स्विकारली आहे 

        तार सेवेने मात्र काही वर्षांपूर्वी आपले कड्कट्ट थांबवले आहे. आता इतर अनेक साधने उपलब्ध  आहेतच म्हणा. ज्या आपल्या परदेशस्थ प्रियाला पत्र पोहोचायला महिनेन महिने लागत तेथे शब्दशः क्षणात निरोप जाण्याची किमया सुरू झाली आहे. पण तरीही प्रियजनांना पाठवलेली पत्रे, ती लिहीताना मनात उठलेले तरंग, पत्र टाकल्यावर अरेच्चा असे उगाच लिहीले म्हणून हळहळणे हे सर्वच भूतकाळात जादूई यक्ष बनून थांबले आहेत. म्हणून जुने पत्र आज वाचताना खूप छान आनंदाची पखरण करते.

           आज जरी पोष्टमन काकां बरोबर पत्रांची देवाणघेवाण नसली तरी अजूनही पोष्टमनला पहाताच तीच उत्सुकता, तीच प्रियजनांचे पत्र मिळण्याची हुरहूर नेहमीच वाटते. आज हाडामासांच्या जीवंत माणसाची बरोबरी किंवा वरचढपणा नवीन तंत्रज्ञान  करते आहे. ते जलद आहे, सोईचे आहे कबूल. पण अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत  आयुष्याचा न जाणवणारा पण महत्वाचा भाग होता पोष्टमनकाका! नवयुगाच्या रेट्यात ज्या वेगाने तो  बाहेर फेकला आहे तो वेग बघूनच खरच भीती वाटते. आज जात्यात पोष्टमन काका आहेत पण उद्या? कदाचित उद्या आपणही सुपातून जात्यात जाऊ. कालाय तस्मै नमः!

        

 माझे इतर ब्लॉग्स वाचण्यासाठी खालील लिंक वापरावी. 

https://drkiranshrikant.pasaara.com 

शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०२०

आकाशवाणी ©️

 




             आठवणींचा पसारा आवरताना आठवतो रेडिओ. एखाद्या मित्रासारखी त्याची साथ होती. 'होती 'अस भूतकाळात कसं बोलू? बोलायलाच नको कारण हा मित्र अजूनही आवडता आहेच.पण वेगळ्या रुपात तो भेटतो .आता त्याच्याबरोबर टि.व्ही सारखे नवे मित्रही मिळाले आहेत.पण नवे मित्र मिळाले तरी हा जुना मित्र तेवढाच प्रिय आहे.

.              काही  दशकांपूर्वी घराघरात मोक्याची जागा अडवून बसलेला हा पाहुणा ,पाहुणा न रहाता आपल्या घरातील लाडका सदस्य सहजतेने झाला . अगदी आजी ते बाळापर्यंत सर्वांचाच 'नारायण' आणि नारायणकाका झाला. माझ्या पिढीतील आणि आधीच्या पिढ्यांच्या मर्मबंधातला रेडिओ. आज त्याच्या आठवणींचा पसारा आवरणार आहे.


                           आकाशवाणी. ©️


                           शाळेत असताना आणि आधी सक्काळी सक्काळी  जाग यायची ते रेडिओच्या टीडीडीs sssडीडीडी---- या खास आकाशवाणीच्या सिग्नेचर सुरावटींने.  आता उबदार पांघरूणाशी फारकत होणार याचा अंदाज आलेला असायचा. भल्या सक्काळचे सहा वाजायला काटे धावत असताना रेडिओ जणू बजावायचा ,'उठा आता'. पाठोपाठ भक्तीगीत सुरू व्हायची.रामाला, कृष्णाला उठवताना कौसल्या माऊली आणि यशोदा मैया कसल्या प्रेमाने ओथंबलेल्या स्वरात आर्जवी गीत आळवायची. कौसल्या  माऊली तर ' उभी घेऊनी कलश   दुधाचा" अशी प्रेमाने उभी! पण आमच्या मातोश्री मात्र कमरेवर हात ठेवून उभ्या. आधी प्रेमाने उठाss व्हायचं, नंतर धमक्या सुरू व्हायच्या. "आता उठता की पाणी टाकू"? भक्तिगीत संपत आल्यावर अखेर अंथरुणाला अलविदा करून आम्ही उठायचो.आन्हिक आटपेपर्यंत उदबत्तीचा वास घरभर दरवळत असायचा.  पुराने फिल्मी गीत सुरू झाले असायचे. आई बाबांचे सर्वात आवडतं गाणं म्हणजे कुंदनलाल सैगल. बरोबर आठ वाजता.त्या वयात त्या स्वरांची जादू फार कळायची नाही.कारण आम्ही गुंतलो असायचो "चाहे कोई मुझे जंगली कहे" या गाण्यात.

          आकाशवाणी  हे नावच असल भारी वाटायचे नं! कृष्ण जन्मानंतर कंसाने ऐकलेली आकाशवाणी किवा कोणा पृथ्वीतलावरील मानवाला चांगली -वाईट बातमी द्यायला आकाशातून दिलेली घनगंभीर सूचना म्हणजे आकाशवाणी. त्या तेहतीस कोटी देवांपैकी ही सूचना देण्याच काम कोण करत असेल कुणास ठाऊक.? त्या देवाचा आवाज  एवठा मोठ्ठा आहे का तो जादूचा माईक वापरतो हे प्रश्न  लहानपणी नेहमीच सतावायचे.

          मग रेडिओ म्हणजे लहानपणी जादूचा पेटारा वाटे आणि या जादूच्या पेटा-याची ऐट पण भारी असायची. त्याला आत बसायला मस्त पैकी कव्हर तेही भरभक्कम  लाकडाचे.त्याची फळी बंद केली की आत रेडिओ झोपायला मोकळा.रेडिओचा काळा तपकिरी  रंग आणि त्याची ती मोठ्ठी काळी बटणे. एक बटण फिरवताना आतली लालबुंद उभी रेषाही पळू लागायची आणि बातम्या सांगता सांगता आधी खर्रss खर्रssss करत एकदमच भलत्याच भाषेत गाणे सुरू व्हायचे, मग आम्ही हसून हसून लोळपोळ.!मग तोच खेळ सारखा.शेवटी कोणाकडून तरी हरकाटून घेतले की चिडीचूप! कित्येक वर्ष, शेजारच्या काकांनी सांगितलेले ,रेडिओच्या पोटातील दडलेले रहस्य खरेच वाटायच.ते म्हणायचे "रेडिओच्या पोटात दडली आहेत छोटी छोटी माणसं! ती माणसं गाणी म्हणतात, बातम्या सांगतात , आजी साठी कीर्तन करतात , तुमच्या सारख्या मुलांसाठी 'छान छान छान मनीमाऊच बाळ कस' हे बालगीत म्हणतात.ती माणस आतमधेच जेवण सुध्दा बनवतात." हे सगळ ऐकल की असलं मस्त वाटायचे नं! ती माणस बघण्यासाठी जीव पाखडायची मी!. एकदा काकांच्या रेडिओ दुरूस्तीच्या दुकानात मागची पाठ काढलेले रेडिओ  बघितले.आत लिलिपुटीयन ऐवजी नुसते वायरचे भेंडोळं बघून मला रडायलाच आले.

             रेडिओ  माजघर ते दिवाणखाना आणि आजी ते नातू या सगळ्यांना आवडीचे कार्यक्रम ऐकवायचा. आई साठी वनिता मंडळ, आपली आवड, आणि श्रुतिका किंवा नभोनाट्ये. दिदीसाठी विविध भारती  , बाबांसाठी बातम्या, नाट्यगीते, आजी भक्तीगीत आणि किर्तनावर  खूष! मी बालोद्यान साठी रविवारची वाट बघायची. स्वच्छ आणि स्पष्ट  उच्चार, बोलण्यातील लय माधुर्य  असलेली निवेदने त्या वयातही खूप आवडायची. रात्री नभोनाट्य ऐकताना त्यात काही वर्णनं आली की आमची कल्पनाशक्ती  सुसाट फिरायची. म्हणजे निवेदक वर्णन करायचा कोकणातील घराचं. मग आम्ही मनातल्या मनांत वाडीत फिरायला मोकळे. ती नारळी पोफळीची झाडे.मधुनच फुललेली नाजुक केशरी अबोली.  जांभ्या दगडाचे तुळशीवृंदावन ,ते सुरंगीचे वळेसर.मातीचा ओलसर वास आणि सुरंगीचा मंद वासही जाणवायचा.तिथला शितू , बापू डोळ्यासमोर उभारायचा. टि. व्ही ने मात्र सगळ्या गोष्टी रेडीमेडच दाखविल्यामुळे कल्पनाशक्तीला भरपूर आराम मिळतो. सगळ दिसतच आहे की समोर.कल्पनाशक्ती  कशाला वापरा?

          बुधवार संध्याकाळी तर अभ्यास,जेवणे लवकर उरकून सर्वजण रेडिओ भोवती जमत. रेडिओ सिलोनवर 'बिनाका' गीतमालेचा  बिगुल वाजला की जणू सर्व इंद्रिये व्हायची कान! मग ते खणखणीत नाण्यासारखे शब्द यायचे:भाईयो और बहेनो किंवा आवाजकी दुनिया के दोस्तो. त्या दाणेदार, लाटांची लयबध्दता असलेल्या अमिन सयानींच्या आवाजात होता दिलासा. त्यात उपदेशाचे डोस नव्हते. पण होता वडिलकीचा प्रेमळ अधिकार.पाठीवर आश्वासक स्पर्श  व्हावा असा तो आवाज!. अगदी कानातून ह्रदयापर्यंत  झिरपायचा. या कार्यक्रमात 'और आखरी पादानपर है..' म्हणून परत एकदा बिगुल वाजत असे आणि सरताज गाण लावलं जात असे. त्यावेळी आम्ही सर्व उत्सुकता, निराशा, आनंद अशा संमिश्र  भावनांनी ते ऐकत असू. हॅss हे गाण सरताज होण्याच्या लायकीचे नाही म्हणून ज्ञान पाजळत असू .वाद सुध्दा  व्हायचे. परत पुढच्या वेळेस कुठले गाणे येणार हे पैजेवार सांगितलं जायचे. 

         रेडिओची एक गंमत होती. महावितरणची वीज गुल झाली की रेडिओ  पडायचा धारातिर्थी! आमच्या शाळेचा रेडिओवर कार्यक्रम  होता.माझ्या वर्गातील एक मुलगी 'जीवलगा  राहिले रे दूर घर माझे' हे गाणे फारच छान म्हणायची. तिचे रेडिओवर गाणे होते. आजूबाजूला सगळ्यांना मी ऐकण्यासाठी सांगितले होते. कार्यक्रमाची सुरवात होताच वीज गेली आणि कार्यक्रम  संपल्याक्षणी आली.एवढ वाईट वाटल नं तेव्हा! ब-याचदा या छोट्या मोठ्या सुखदुःखाच्या गोष्टी रेडिओच्या आसपासच घडायच्या.नंतर नंतर तर नाट्यगीतांनी एवढ पछाडलं होत नं मला! नऊपर्यंत चालणारी नाट्यगीते ऐकल्याखेरीज मी शाळेची तयारी करायची नाही आणि रोज या नादिष्टपणाचा उद्धार ठरलेला.

         चीन भारत युध्दाच्या थोड्या आठवणी म्हणजे रेडिओवर प्रसारित होणारी देशभक्तीपर गीते. भारत पाक युध्दावेळीसुध्दा कान सतत चिकटले असत रेडिओला.शत्रूचे विमान पडले की जणू आम्हीच लढून ते पाडले आहे असा जल्लोष व्हायचा. 

                क्रिकेट मॅचही नुसती धमाल करायची. समालोचन इंग्लिश मधे असले तर सगळच कळायच नाही मग आई किंवा बाबांना भंडाऊन  सोडायच काय सांगितलं म्हणून! मग त्यावर पैजा!

रेडिओवर आपली आवड ऐकताना अनपेक्षितपणे आवडत गाण जे खूप दिवस मनात रुंजी घालतय ते ऐकायला मिळाल की दस्तुरखुद्द लता मंगेशकर भेटल्याचाआनंद व्हायचा .आज हवे ते गाणे सहजतेने ऐकायला मिळते त्यामुळे अचानक झालेला तो आनंद आताच्या पिढीला कळणे अवघडच!  

आमचं वय पुढे सरकत होते आणि रेडिओच्या लोकप्रियतेला ओहोटी लागून मध्यमवर्गीय घरातून तो गायब होऊ लागला होता. त्याची जागा कानामागून येऊन तिखटजाळ झालेल्या ट्रान्झिस्टरने घ्यायला सुरवात केली होती. बत्ती गुल झाली किंवा बाहेर बागेत कार्यक्रम ऐकायचा असला की ट्रान्झिस्टर चार बॅटरींच्या खुराकावर तय्यार. उचला हातात धरा आणि कुठेही जाऊन गाण्याचा रतीब घाला इतकं काम सोप्प. पण माझ्यासारखीला ज्याने रेडीओचे मखर पाहिले आहे ,ज्याने आजी ते नातवाला घरातल्या घरात आवडीचे कार्यक्रम ऐकताना बघितले आहे, घरात एखाद्या  माननीय सदस्यांचा दर्जा  मिरवला आहे त्या रेडिओला भंगारमधे जाताना बघून अक्षरशः अंतकरणात वेदना होत.

            आपल्याला मनापासून  आवडणारे कार्यक्रम आता ट्रान्झीस्टर ते कारॅवान पर्यंत सारेच ऐकवतात पण ते ऐकणे ब-याचदा एकट्याचेच काम. रेडीओसमोर भाजी निवडत बसलेली आई, वाती वळणारी आजी  त्यांच्या आजूबाजूला काहीतरी चॅवमॅव खात बसलेल्या आम्ही दोघी , दूरवर पुस्तक  डोळ्यासमोर घेऊन कान रेडिओकडे ठेवलेले वडिल या दृष्याला मात्र मी मिस करतेय हे नक्की!.

  पण एक खरे बदल हाच निसर्गाचा  स्थायीभाव आहे आणि तोच नियम,निसर्गाचाच एक अंश असलेल्या मानवाला आणि त्याने निर्मित यंत्रालाही आहे. तसे नसते तर आज टेचात असलेलं यंत्र  नवीन ,अधिक कार्यशील यंत्र येताच सहजतेने मोडीत निघाले नसते.त्यामुळे  रेडिओच्या  जाण्याबद्दल दुःख करण्यापेक्षा नव्याचेच मनःपूर्वक स्वागत करूया!

         

माझे इतर ब्लॉग्स वाचण्यासाठी खालील लिंक वापरावी 

https://drkiranshrikant.pasaara.com 



               

शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०२०

लालपरी----भटकभवानी भाग5©️

 


          

          


           लहानपणीच्या जडणघडणीच्या वयात सर्वात जास्त प्रवास केला तो रेल्वे आणि यष्टीने! होय माझ्या लहानपणची यष्टी अजून कोणी लालपरी वगैरे झाली नव्हती. ती होती सर्वसामान्यांची यष्टी किंवा जरा शहरी मंडळींची एस.टी. - स्टेट ट्रान्स्पोर्ट. माझ्या प्रवासाच्या अनुभवांच्या  पसा-यात या लाल डब्ब्याचे  स्थान मोठे आहे. मोठ्या मोठ्या तत्वज्ञानाचे डोस मी प्यायले आहे याच बसमधे. समोरचा पॅसेंजर खिडकीतून डोके काढून ऑssssक करायला लागला तर त्या धारेत चिंब व्हायचे चपळाईने कसे टाळायचे हे शिकवले आहे याच यष्टीने! कुठलाही मोठ्ठा आव न आणता माणुसकी,चांगुलपणा ,स्थितप्रज्ञता शिकवली आहे या बसने.आणि शेजारचा पॅसेंजर जर डुलक्या काढताना आपला खांदा ही त्याची उशी आहे असे समजू लागला तर भिडस्तपणा न करता या त्याच्या ठाम समजूतीला मोडून काढणे केवळ  यष्टीमुळेच मला जमले.  .

             आज ठरवले पसारा आवरायचे तो एस.टी च्या आठवणींचा.काॅलेज ते घर असे अनेक प्रवास  तिच्याच पोटातून तर झाले आहेत. तिने मला वेळोवेळी इप्सित ठिकाणी पोहोचवले आणि म्हणूनच जिचे कौतुक हल्ली 'लालपरी म्हणून केले  जाते त्या आमच्या वेळच्या  एस टी.बस  बद्दल लिहीत आहे.



                      लालपरी-----भटकभवानी भाग 5©️


       बसच्या बाबतीत बोलायचे झाले तर वयाच्या आठव्या वर्षी एस. टी.बस मधन पहिल्यांदाच  प्रवास केल्यावर माझी काही  ठाम मते तयार झाली होती. ती म्हणजे महाराष्ट्र परिवहनचे चौकोनी मोठे वाहन, जिचा रंग लाल असतो आणि मधेच त्यावर पिवळा पट्टा असतो त्याला एस टी बस असे नाव आहे. या वाहनामधे तिच्या क्षमतेपेक्षा खूपच अधिक माणसे कोंबून बसवलेली  असतात. तिळमात्र जागा जरी रिकामी राहिली तर ड्रायव्हरकाका आणि कंडक्टरकाकांना रौरव नरकाची शिक्षा बहुधा असावी किंवा पापणीने डब्यात मिठ भरायला लावत असावेत. त्या भितीखातरच ते जितके जास्त प्रवासी शक्य आहेत तितके कोंबत असावेत. वरील सर्व विचार वयाच्या आठव्या वर्षी  बस मधे बसल्यावरचे आहेत(.शब्द आजचे)

    बसशी  माझी पहिली वहिली भेट तरीही  फारच छान होती. अगदी लक्षात राहण्यासारखी.आमची बदली झाली होती पुण्याहून कोल्हापूरला.मी साधारण सात आठ वर्षांची. मग एका सुट्टीत नुसतं कोल्हापूर  बघायला जायचं ठरलं. तोवर आजोळी जाताना रेल्वे प्रवास बराच झाला होता पण लालपरीबरोबर किंवा,लालपरीतून नव्हता. बस स्टॅन्डवर आम्ही पोहचलो.अबब केव्हड्या तरी  पिवळा कमरपट्टा लावलेल्या लाल बस! काही एकदम चकाचक नटलेल्या तर काही बस मला आजीसारख्या थकल्याभागलेल्या वाटल्या. थोडा रंग उडालेला. चेह-यावर गंभीरपणा.सगळ्या बसच  समोरून तोंड सपाट.चप्पट. काचेचे भव्य कपाळ आणि ब-याच खाली गोलमगोल काचेचे डोळे.पावसात त्या मोठ्या काचेच्या कपाळावरचे जलबिंदू गरागरा निपटणारे दोन हात! हंsssss त्याला' 'वायपर' म्हणतात तर. त्या आठ वर्षाच्या वयात कळलेला नवा शब्द. ज्ञानात नवी भर!त्यानंतर 'वायपरच्या' त्या लयबद्ध  हालचालींचे वेडच लागले. सुटूकन पाणी साफ करून परत नवीन येणा-या  पाण्याच्या थेंबांना हटविणारे वायपर. बस मधनच आsss च्छू करून दणदणीत शिंक द्यायची.त्याची वाट बघत मी बसायची खूप गंमत वाटायची. त्या पहिल्या प्रवासात काही सुखद आठवणी आहेत.वाटेत आंब्याने लदलेली झाडे. म्हणजे कै-याच होत्या त्या .त्याखाली मुद्दाम  लालपरी थांबली. मग टपावर चढून कै-या काढल्या. असा पहिला प्रवास तरी महाराष्ट्र राज्य परिवहनच्या बसमधून मस्त झाला.त्या वयात गर्दी, गैरसोय हे मुद्दे  माझ्या दृष्टीने नगण्य होते.  त्यामुळे त्यांचा त्रास झालाच नाही उलट सगळी मज्जाच वाटत होती.

         त्यानंतर या बस बरोबर झाली गट्टी. पण ते नुसते प्रेम नव्हते  ती होती 'लव्ह हेट रिलेशनशीप'! चुकून माकून ही लालगाडी अंघोळबिंघोळ करून वेळेवर आली आणि मधेच हट्टी म्हशी सारखी पंक्चरच्या नावाने बसकण न मारता वेळेवर पोहोचली की समजावे आकाशस्थ ग्रह उच्चकोटीचे आहेत.मग मात्र तिच्याबद्दलच्या प्रेमाला उधाण यायचे नाहीतर मनातली खदखद तिच्यावर काढली जायची.

           मेडिकलला शिकत असताना मात्र लालगाडीला पर्यायच नव्हता.सोलापूरला मेडिकलला अॅडमिशन घ्यायला लाल डब्ब्यातून निघालेले. बरोबर आई. बहात्तरचा तो मोठा दुष्काळ आणि वैराण शेतात पडलेली जनावरांची कलेवर! विसरणे अशक्यच! आधीच घरापासून दूर जायचे म्हणून मनावर दाटलेले मळभ त्यात हे दृश्य.

त्या वेळी  होत्या ठरावीक गाड्या. काही मस्तपैकी फिरत फिरत जाणा-या तर काही जरा  सरळमार्गी! .फिरत लांबचे वळण घेऊन जाणा-या गाड्यांचा आवडता स्टाॅप म्हणजे कवठे महांकाळ! एक तासाचा चुराडा ठरलेला. या गाडीचा कोल्हापूर  ते सोलापूर प्रवास तब्बल साडेसात ते आठ तास खायचा. गंमत म्हणजे काॅलेज युवकयुवती एकत्र प्रवास करत असले तर अंतिम स्थानी पोहोचेपर्यंत प्रेमात पडून त्यांच्या लग्नाच्या आणाभाकासुध्दा व्हायच्या! त्यामुळे  लांबून जाणा-या गाड्या वेड्या बेंद्र्या असल्या तरी त्या एकदम रोमॅन्टीक!

       या प्रवासात पावसाळ्याच्या दिवसांत दोन ठिकाणी बसला आडव यायचं पाणी! एकीकडे हातीदचा ओढा  आणि पुढे चंद्रभागा नदी. हातिदच्या  ओढ्याला पाणी आले की लाल डबा थांबायची एका तीरावर आणि दुसरी बस येत असे दुस-या तीरावर. ती येईपर्यंन्त जीव टांगणीला. मग ते एखादे तरी जडशीळ मेडिकलचे   पुस्तक असलेली बॅग ( घरी ते पुस्तक नेऊन थोड भापायला बर वाटायचे) घेऊन बैलगाडीत बसायचं आणि सावकाश ओढा ओलांडायचा.एकदा तर पाण्याची पातळी अचानक वाढली आणि बैल लागले पोहायला. बापरे!  पण असल्या प्रसंगात सहप्रवाशांची खूपच मदत व्हायची.

      पंढरपूरला चंद्रभागाबाईंनी बस अडवली की मदतीला यायची नाव !.छोटी वल्हवायची होडी.निसरड्या उतारावरून बॅग संभाळत त्या नावेत बसायचे. पैलतीरावर कसरत अधिकच! कारण आता निसरडा चढ चढायचा असे.मग परत दुस-या बसची वाट बघणे आलेच. अर्थात इथेही सहकाराचे महत्व कळायचे.

         एकदा मी सांगलीला बसमधे चढले आणि मिरजेला मैत्रीण. गप्पांच्या नादात तिकीट राहिले काढायचं आणि बस पुढे गेली तेव्हा तासाभराने लक्षात आले.कंडक्टरला तिकीट फाडायला सांगितले. बिचारा दोन तिकीटांचा हिशेब न लागल्याने आधीच कातावला होता. त्याने बस थांबवली आणि आम्हा दोघींना उतरायला सांगितले. आडरान आणि तटून बसलेला कंडक्टर! आधी समजुतीने सांगितले "हे चुकले असले तरी मुद्दाम केलेले नाही." पण तो काही हट्ट सोडेना. मग मात्र काली रूप घ्यावे लागले.गंमत म्हणजे पंढरपूरला विठ्ठलाने काय जादू केली कोणास ठाऊक? " ताई मला क्षमा करा म्हणत  नंतर त्या कंडक्टरने माफी मागितली.

आमच्या लग्नात मात्र लालपरी आमच्यावर रुसलीच होती. सोलापूरहून व-हाड येणार होत सायंकाळी पाच वाजता.घड्याळाचे काटे पळत दहावर गेले  तरी नव-या मुलाकडच्या मंडळींचा पत्ता नाही. माझे आई वडील हवालदील झालेले.अखेर एकदाची लालपरी आली रात्री अकरा वाजता. जुनोनी आणि नागजच्या मधे रूसल्या होत्या बाई. मग दुरुस्तीने खाल्ले तीन तास. जवळ कुठेही फोनची सोय नाही. रागच आला मला तिचा.    

  पुढे एकदा थोरल्याला घेऊन सांगलीहून येताना असाच प्रसंग आला. थोरला होता दोन वर्षांचा. मोहोळच्या पुढे बस पडली बंद.सर्व  प्रवासी पटापट बॅगा घेऊन चालू लागले. बॅग आणि झोपलेला थोरला यांना घेऊन जाणे अशक्यच.अंधार पडायला लागलेला. हा काळ पस्तीस वर्षापूर्वीचा.फोन ही नव्हते. सोलापूरला कळवताही येईना. मागून येणारी बसही भरभरून आलेली .अखेर सहप्रवाशच्या मदतीने एका मिनी ट्रकमधे बसून सोलापूरला आले.अशा त-हेने बसने मला धाडशीही बनवले.

         अशा अनेक आठवणी! भल्या आठवणी खूप जास्त. पण लालपरीची जेव्हा रातराणी व्हायची तेव्हा सहप्रवाशाच्या  वागणुकीत  झालेला असभ्य बदलही लक्षात यायचा.  हे  थोडे नकोसे अनुभव .

     माझ्या प्रवासात सहप्रवाशी असायचे मुख्यत्वे विठूरायाच्या दर्शनाला जाणारे. ,काही वाटेतल्या दुष्काळी गावातले सदाचिंतित शेतकरी , टवटवीत माहेर वाशिणी  , आणि थोडे फुटकळ माझ्या सारखे विद्यार्थी. असे अनेक प्रकारचे सहप्रवाशी भेटायचे.अंग चोरून बसलेले खेडूत, उगाचच ऐसपैस बसणारे शहरी. दोन खेडूत बायकांच्या डोईवरला पदर सावरत चाललेल्या सुखदुःखाच्या गप्पा,  त्यांची ती गठुडी. लेकुरवाळीची तारांबळ. रडणा-या बाळाला आजीबाईच्या बटव्यातील औषध सांगणारी कोणी आत्तीबाय,अशीअनेक माणसे बघायला मिळत.पीक पाण्याच्या गप्पा डोईच मुंडास काढत आणि पान लावत रंगायच्या. खडखडणा-या बसमधे पुस्तक वाचन जमत नसलं तरी विविध माणसं वाचायला मिळायची.

          आता या लालडब्याला एकदम परीकथेतील  परी बनविले आहे. तिचे बाह्य रूपही अधिकच रंगतदार केलय.    आज कित्येक वर्षे  मी या लाल परीच्या सहवासाला मुकले आहे. तो स्टँड वरचा कोलाहल. ती धावपळ करणारी मंडळी.तो सर्वत्र भरलेला विचित्र वास आणि किन-या आवाजात कंडक्टरचे ओरडणे ,त्याला भेदून येणारा तो न कळणा-या सूचनांचा आवाज. जेव्हा आता सांगलीला कारने तीन साडे तीन तासात पोहचते तेव्हा बस मधे काढलेले सहा आठ तास आठवतात. या लालपरीचा आत्मा तसाच निर्मळ आणि भोळाभाबडा आहे का तेही माहित नाही. पण इतक्या वर्षांनी तसा असण्याची शक्यता कमीच!

         कित्येकदा आयुष्यात ठरलेले ठिकाण गाठण्यासाठी  लागतो कोणी वाहक. तो कुठल्याही रूपात येतो  आपल्याला आपल्या ध्येयापाशी पोहचवतो. तसेच मला शब्दशः या लालपरीने काॅलेज आणि घरी सुखरूप नेले.

    असे अनेक प्रवास.  काही अचानक केलेले तर काही पूर्णपणे आखीव रेखीव .पण तो आयुष्याच्या अखेरचा प्रवास मात्र त्या खूप खूप ओळखीच्या पण तरी पूर्ण अनभिज्ञा  बरोबर.   आपला हा शेवटचा प्रवास मात्र अगदी सुटसुटीत.कुठलेच ओझे नाही. ना बॅगेचे ओझे ना आईने दिलेला खाऊ. फक्त एका श्वासांचे अंतर मग ओलांडून जायचे नव्या अज्ञात प्रदेशात. पूर्णतः अनोळखी!काळोखात कां उजेडात तेही माहीत  नाही.

        

माझे  इतर ब्लॉग्स वाचण्यासाठी खालील लिंक वापरावी 

https://drkiranshrikant.pasaara.com