शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०२०

त्या दोघी©️

 


           


               मध्यंतरी टर्की देशात तेथिल एका कुटुंबा बरोबर राहण्याचा योग आला. पती पत्नी आणि त्यांची दोन मुले. एक मुलगा आणि एक मुलगी. चौकोनी आदर्श कुटुंब!. पती पत्नी साधारण तीशीचे! उंचेपुरे. देखणे.दोन्ही मुलेही अती लाघवी आणि हुशार .आता एवढे सगळे  छान छान अगदी तोंडाला मिठ्ठी  बसण्यासारखे गोड गोड तरी पण ------  हा 'पण' फार वाईट! ह्या कुटुंबातील मुख्य  स्त्रीला सासूबद्दल प्रचंड राग!   टर्कीशमधे सासू म्हणजे 'खाईनाना'. तर या 'खाईनाना' प्रकाराबद्दल अत्यंत कडवटपणे ती बोलत होती. बर स्वतः सासूजवळ रहात होती असेही नाही. उलट अडचणीला किंवा मुलांना संभाळायला सासूलाच बोलवत होती. पण नवरा आपल्या "ममाज बाॅय" असल्यासारखा वागतो या बद्दल  असूया! कमी जास्त प्रमाणात हीच भावना परदेशातही अनेक ठिकाणी  दिसली. कातडीचा रंग भलेही गोरा, काळा, तपकीरी, पिवळा असो सासूसुन या नात्याचा पीळ तस्साच!  अर्थात या नियमांना अपवाद असणारच! आज या अपवादाचा पसाराच आवरणार आहे.



                त्या दोघी©️



       साधारण पंधरा  वीस वर्षांपूर्वी  वृत्तपत्र उघडले की  'सुनेला राॅकेल ओतून जाळले. नणंद आणि सासूला अटक' अशी एक तरी बातमी असायची. आता सुदैवाने  या बातम्या कमी झाल्या आहेत आणि दुर्दैवाने सुनेने वृध्द सासूला घराबाहेर  काढले अशा बातम्या वाढल्या आहेत. चक्र आता एकशे ऐंशी अंश कोनातून फिरले आहे. असो. जेव्हा जेव्हा सासू सुनेच्या संघर्षाच्या बातम्या ऐकते तेव्हा तेव्हा नजरेसमोर उभ्या रहातात 'त्या दोघी'. दोघींचे स्वभाव पूर्णतः भिन्न! विचारसरणी वेगळी, पार्श्वभूमी वेगळी पण तरीही  दोघीजणींना एकमेकींबद्दल विलक्षण आत्मीयता!  यातील एक होती माझी आई आणि दुसरी वडिलांकडची माझी आजी म्हणजे दोघी नात्याने सासू सुना. होय तेच ते कायम बदनाम असलेलं नातं. फक्त आपल्या भारतातच नाही तर जगभर तिरस्कारलेल! मग तो भारत असो वा परदेश! अर्थात या नियमांना  सुदैवाने तसे अपवादही खूप आहेत पण तरीही  ते अपवादच!

          असाच एक अपवाद  माझ्या लहानपणापासून डोळ्यासमोर होता पण त्याचे महत्व कळण्याएवढी प्रगल्भता माझ्याकडे नव्हती पाचपोचही नव्हता.  आज मात्र त्या नात्याचा रेशमीपोत आणि त्यातील उब जाणवते आहे.

         माझ्या वडिलांची आई म्हणजे तिला आम्ही काकी म्हणत असू, आमच्याकडे रहायला आली ते आजोबांच्या मृत्यूनंतर!.काही काळ काकाजवळ रहायचे तर काही आमच्याजवळ असच ठरवून आली होती ती. त्याआधीही ती येत असे आणि ती परत जायची तेव्हा माझी अफाट रडारडी व्हायची.ती कधीच जाऊच नये असे वाटायचे. ती होतीच प्रचंड प्रेमळ!

           सावळी, छोटीशी,तोंडाचे मस्त बोळक, डोळ्यावर गोल चष्मा आणि त्या चष्माच्या जाड काचेमागे मोठ्ठे दिसणारे डोळे , हातात सतत जपाची माळ!  आणि ओठात खडीसाखरेसारखे विठ्ठलाचे नाव.आजोबा गेल्यावर गुलाबी, हिरवे असे रंग तिने वर्ज  केले होते त्यामुळे तपकिरी किंवा राखाडी नऊवारी साडी!. थोडक्यात आजी या नावात जे जे मटेरीयल आपण म्हणजे माझ्या पिढीतील  कल्पतात ते ते तिच्यात ठासून भरले होते. 

          आल्या आल्या आजीने जाहिर केले आजपासून जर घरात कुठलाही वाद झाला तर तिचा पाठींबा फक्त सुनेला असणार आहे कारण सून गृहलक्ष्मी आहे. झालं ! पहिली लढाई तर आजीच्या पारड्यात पडली !.

काकी बोलयची कमी. सतत हातात जपमाळ. आणि मुखात नामस्मरण! काही काळाने लाडालाडात भोचकपणे मी आजीला विचारले "आजी सारखी कां ग विठोबाचे नाव घेतेस? आजीचे उत्तर फारच छान होते "अग माझ्या मुलाच्या आणि सुनेच्या संसारात लुडबुड करण्यापेक्षा हे नामस्मरणच बरे "

बर हे तिने मनापासून स्विकारले होते. पण हीच आजी,माझी आई बी.एड करताना पूर्ण घराची जबाबदारी सहज पेलत होती.वडील नोकरीनिमित्त फिरतीवर आणि आई काॅलेजमधे आणि आम्ही दोघी लहान. अशावेळी जेवण करण्यापासून ते आमचे डबे भरण्यापर्यंत कामे आजी आनंदाने करत असे आणि नंतर तिच्याजवळच्या गोष्टींच्या समुद्रात आम्ही मनसोक्त पोहत असू.

          आजीच्या लहानपणीच्या, आणि माझ्या आजोंबासोबत तिने अनेक प्रांतात केलेल्या प्रवासाचे अनुभव अरेबियन नाईट्सपेक्षा सुरस आणि चमत्कारिक होते. आजोबा इंजीनियर! त्या काळात क्वेट्याला(आज जे पाकिस्तानात आहे)झालेल्या भूकंपानंतर सिव्हील इंजिनिअर म्हणून बराच काळ दोघांचे वास्तव्य तेथे होते. तिथे कडाक्याच्या थंडीत नळ चालू केल्यावर पडणारी पाण्याची धार लगेच बर्फ बनायची आणि आजी जेवताना ताट स्टोव्ह वर ठेऊन कशी जेवायची या आमच्या आवडत्या गोष्टी. त्यात आजी कोकणातील ! भुतांच्या गोष्टी ऐकाव्यात तर तिच्याकडून.त्यात तिच्या वडिलांच्या कथा सांगताना तिचा आवाज अधिकच कापरा व्हायचा.

         हे झाल आजी म्हणून! पण तिच्या दोन्ही सुनांचा आजीला विलक्षण अभिमान.माझी आई कुठल्याही धार्मिक कर्मकांडाच्या विरोधातली. शिकलेली आणि पुरोगामी विचारांची. धाडसी, उत्कृष्ट बॅडमिंटन खेळणारी. या सर्व गुणांना काकीचा भरगच्च पाठींबा. काही काळ तर नोकरी करताना आईला शाळेत रहावे लागले कारण शाळा होती गुरुकुल धर्तीवर आधारलेली. शाळेतील नोकरी स्विकारताना आईलाच नको नको होत होते कारण घराची जबाबदारी पडणार होती काकींवर ! काकींनी ती जबाबदारी स्विकारली आणि वर्षभर पारही पाडली.त्या काळात ती माझ्या काकाकडे पण गेली नाही.

         आईला   काकीच्या या सर्व कष्टांची जाणीव होती त्यामुळे आई घरी असताना तिने कधीच त्यांना कुठलेच काम करू दिले नाही.त्यांच्याशिवाय ती एक घासही खात नसे. कधीं कधीं  काकीचे नामस्मरणच इतके लांबायचे पण आई तशीच थांबे आणि त्यांच्या आवडीप्रमाणे गरम जेवण त्यांच्या पानात वाढे मगच दोघी जेवत .असे म्हणातात दोन स्त्रिया एकत्र आल्या की भांड्याला भांडे वाजणारच, पण ही दोन भांडी कुठल्या मटेरीयलची होती त्याच जाणे. बहुधा दवभिजल्या गुलाबपाकळ्यांना लोण्यात चुरून एकमेकींचा एकमेकांसाठी तो खास कोपरा बनला होता.  पण  हीच आई आमच्यासाठी कधिकधी  महारणचंडी असे .

         काकीला वाचनाचे वेड ! पण मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यावर वाचन अवघड होऊ लागले . काकीला   जेव्हा डोळ्याच्या अगदी जवळ पुस्तक धरुन वाचताना आईने पाहिले तेव्हा तिने आम्हा दोघी बहिणींना कामाला लावले.काकीला रोज आळीपाळीने पुस्तक वाचून दाखवायचे.मग लहानपणीच ह.ना. आपटे, ना.ह.आपटे ,विरधवल, कालीकामूर्ती इत्यादी पुस्तके आम्ही वाळवीसारखी फस्त केली. आम्ही खूष आणि काकी डब्बल खूष.

       खरतर आई आणि मुलींचेही मतभेद होतात. कधीं कधीं पराकोटीला जातात पण सासूसुनेचे नात असूनही या दोघींच्या  आवाजाची पट्टी कधीच चढली  नाही. काकी अत्यंत धार्मिक पण आपली कर्मकांडे तिने 'घरच्या परंपरा' या गोंडस नावाने आईवर लादण्याचा प्रयत्नही केला नाही. काकीला कथाकिर्तनाला नेण्याची जबाबदारी आईने आमच्यावर सोपवली होती. हयगयीला क्षमा नव्हती. मला आठवते काकीसाठी म्हणून आईने सत्यनारायणाची पूजा देखिल केली होती. एकत्र राहूनही एकमेकांना  पुरेशी 'स्पेस'  त्या देत होत्या.

     एखाद्याला वाटेल हे कसलं सगळ गोड गोड. या नात्याचा आत्मा म्हणजे त्यातील 'तू तू मै मै 'चा खमंगपणा. तोच या नात्यात नाही.पण ब-याचदा या खमंगपणात  तोंड होरपळून निघते.मग फक्त पश्चात्ताप!

         माझ्या   त्या वयात त्या नात्याची खोली, महत्व मला कळलेच नाही. हे असच असत,पुढेही असणार आहे असेच वाटायच.'पण लक्षात कोण घेतो?'वाचताना सासूरवासाच्या कथा तेव्हा दूस-या ग्रहावरच्या वाटायच्या. पण आता लक्षात येतंय एकमेकींबद्दल आदर, त्यांच्या विचार स्वातंत्र्याची आस्था, एकमेकींच्या कष्टांची जाणीव या पायावर त्यांचे नाजूक नाते कणखर उभे होते. अर्थात हे माझ्या अल्पमतीला दिसलेले! पण या पलिकडे या नाजूक नातेसंबंधात रेशीमधाग्यांचा गुंताडा न करण्याची जबाबदारी दोघींनी पुरेपूर  निभावली.नुसती निभावली नाही तर पुढच्या पिढ्यांना हा वारसा त्यांच्या नकळत सोपवला.

आज दुर्गेचा नवरात्रीचा , नवरुपांचा , स्त्रीशक्तीचा उद् घोष  चालला आहे. घरात शांती आणि समाधान नांदण्यासाठी झटणा-या या दोघी मला दुर्गेचीच विविध रूपे वाटतात.



        माझ्या इतर लेखांची लिंक 

https://drkiranshrikant.pasaara.com 



९ टिप्पण्या:

  1. किरण, तुझ्या ओघवती भाषेचं कौतुक करावे तेवढे थोडे आहे! सुंदर लेख!!💐💐

    उत्तर द्याहटवा
  2. अतिशय सुंदर लिखाण व विषय पण नेहमीचाच पण विवरण सुंदर व सोप्पे.

    उत्तर द्याहटवा
  3. तुझी आजी म्हणजे अष्टभुजा देवीच वाटली. मुलांंच्याही संसारात मधे मधे न करता सर्व काही यथोचितपणे पार पाडत, घरभर अपरंपार प्रेमाची पेरणी करत व उगवलेले प्रेम घरभर सर्वांना वाटत त्यांनी आयुष्याची वाटचाल केली. तीच परंपरा तुझे आई वडील व तुम्ही सर्वांनी चालू ठेवली व उत्तम वारसा जपला. छान लिहिले आहेस.

    उत्तर द्याहटवा