शुक्रवार, ११ डिसेंबर, २०२०

निरोप©️

 




2020 ,अगदी तप्त लोखंडाचा डाग -डागल्यासारखा हे वर्ष!. कित्येकांचे आधारवड कोसळले ते याच वर्षात.मृत्यु सर्वसमभाव या भावनेने प्रेरित होऊन त्याची दांडगट आणि दणकट पावले टाकत येतो.त्या खाली कोण चिरडतय याचे सोयर सुतक न ठेवता! सर्वात जास्त वाईट वाटत ते कित्येंकांना आपल्या जिवलगांचा निरोपही घेता आला नाही.आयुष्यभरासाठी सहजीवनाचे दिलेले वचन हवेतच विरून गेले. अंतीम संस्कारही किंवा दर्शनही त्यांच्या नशिबी  नव्हते.विचार केला तरी मनावर मळभ येते.खोलवर ओरखडे उठतात.


             निरोप


वडिलांची बदलीची नोकरी त्यामुळे जरा कुठे रूजून फुलतोय तोच तिथून हलावे लागायचे. अगदी लहानपणी म्हणजे अगदी प्राथमीक शाळेपर्यंत त्याचे विशेष वाटत नसे कारण आई बाबा जिथं आहेत तिथेच आनंदाचा ठेवा असायचा. पुढे शाळा , मैत्रीणींना सोडून जायचं म्हणजे नकोस वाटू लागल.मग परत परत शाळेतल्या आवडत्या जागी जाऊन बसणे तो परिसर नजरेत साठवणे असले त्या वयाला साजेसे प्रकार केले जायचे.पण एक मात्र खरे मैत्रिणीचा हात घट्ट पकडून अश्रू पात झाला की निरोप घेणं झाल. शब्दांची गरजच नसायची. तरीही  हा निरोप घेणं पुढच्या मुक्कामापर्यत छानपैकी पुरायचा.

    शालेय अंतीम वर्षातही निरोप देणे घेणे म्हणजे मोठ्ठा सोहळाच. माझ्यावेळी अकरावी होती. सेंड ऑफच्या दिवशी आईची साडी तिचाच ब्लाऊज टाचून  चढवला,मनगटावर आईचे किंवा मोठ्या बहिणीचे घड्याळ लावले  की मग एकदम मोठ्ठं झाल्याची जाणीव व्हायची. पोटात घट्टघट्ट आवळल्यासारख काहीतरी व्हायचं. मग शाळेत सर आणि बाई छानस भाषण करीत. आशिर्वाद देत मग रडायलाच यायचं तेव्हा पण काॅलेजमधे जाईपर्यंत  शाळेचे उबदार वातावरण भोवती आहे असेच वाटायच ते केवळ असा छानसा निरोप घेतल्यामुळे.  

         लग्नात व्याकुळलेल्या आईबाबांनी   जेव्हा पाठीवर हात ठेऊन निरोप घेतला तेव्हा झपकन् जाणीव झाली एका मोठ्या स्थित्यंतराची. पण तो डोळ्यांनी घेतलेला निरोप , डोक्यावरून हात फिरवून घेतलेला निरोप सासरी रूळेपर्यंत छानपैकी आजूबाजूला होता.

       माझा थोरला शाळेत जायला तेव्हा लागला तेव्हा मजाच झाली . त्याचा निरोप घ्यायचा राहीला आणि स्वारीचे रडण थांबेना. लक्षात येताच त्याला सांगितल की तू वर्गातून बाहेर येशील तेव्हा या झाडाखाली मी नक्की असेन गंमत म्हणजे रडू गायब!

       रोज तो आदित्यनारायणही आपला निरोप घेतो. डौलदारपणे केसरीया खेळत दूर क्षितीजावर नीळ्यासागरात किंवा डोंगराच्या मागे हळूच जातो.जाताना सांगतो सकाळी भेटू या .नक्की! शब्दांचा एकदम पक्का बर!पहाटेच स्वारी हजर!

       शिशिर ॠतुंच्या थंड वा-यांच्या भडीमाराने चाफ्याचे एक एक पान गा-या गा-या भिंगो-या खेळत मातीला मिळते पण झाडाचा हळूवार निरोप घेऊनच !. झाड बिचारे एकदम भुंडे भुंडे दिसत असतानाच वसंतॠतूची तजेलदार , उबदार झुळूक येते आणि निरोप घेऊन पडलेली पाने चमकदार पांढ-या पिवळ्या काळ्यांच्या रूपाने चाफ्याचे रूप खुलवतात.

       प्रिय प्रिय रसिकजनहो आज मी निरोपाचे आख्यान लावलंय त्यामुळे  तुम्ही ओळखले असेलच हा पसारा आवरायचा शेवटचा शुक्रवार! गेले नऊ महिने हा आठवणींचा पसारा आवरते आहे.तुमच्या कडून कौतुकाची थाप घेतल्यावर नेहमीच जीव कसा पाणीदार मोती बनायचा मग तो आठवणीच्या मखमली पेटीत बंद व्हायचा.. तुमच्या मुळे असे अनेक सुंदर मोती जमा झालेत माझ्याकडे. ती एक झिंग होती. आठवणी ज्या इतस्थतः पसरल्या आहेत त्या अधिक विस्कटू न देता आवरायच्या, तुमच्यासह परत अनुभवायच्या. दुःखद आठवणी तुम्हाबरोबर चिमणीच्या दाताने तोडलेल्या घासासारख्या वाटून घेताना झाल्या गोड गोड खाऊ!   आणि सुखद आठवणीं तुमच्यासमवेत आवरताना तर मनमोर मचाये शोर अशी अवस्था झाली.पण आता थांबवते पसारा आवरणे.आपल्यासारख्या रसिकांना परत एक छानसा नमस्कार. 

      जर कधी जाताना 'मी जाते' अस म्हंटले तर आज्जी खूप रागवायची. जाताना 'येते' म्हणावं ही तिची शिकवण! येते म्हण म्हणजे आपोआप वास्तू बोलवून घेते ही तिची पक्की समजूत.त्यामुळे आज तुमचा निरोप घेताना मीही 'येते' असेच म्हणणार आहे.

       या आठवणींच्या पसा-यात  अजून थोड्या आठवणी मिसळून पुस्तक रुपाने आपल्याला भेटायला येईनच तोवर नमस्कार, धन्यवाद, फिर मिलेंगे!

.



       माझे इतर ब्लॉग्स वाचण्यासाठी खालील लिंक वापरावी

https://drkiranshrikant.pasaara.com

५ टिप्पण्या:

  1. नेहमीप्रमाणे सुंदर लिहलं आहेस!!

    उत्तर द्याहटवा
  2. फार सुंदर लिहिलंत , पण निरोप कशासाठी ? लेखणीला आताच कुठे बहर येऊ लागलाय ..
    नीतिन वैद्य .

    उत्तर द्याहटवा
  3. पुन्हा एकदा पुन्हा पुन्हा भेटीच्या प्रतिक्षेत

    उत्तर द्याहटवा
  4. Ma'am....
    So beautiful and simple language...
    Poetic hearted, indeed, you are...!!
    Surely, would like to read more & more coming from your pen...

    उत्तर द्याहटवा
  5. किरण तुझे सगळे लेख वाचलेत मी...पुस्तक नक्कीच होणार पण निरोप घेतलास तरी आम्ही द्यायला पाहिजे ना? तेव्हा नवीन वर्षात परत नवीन पसारा आवरायला काढ!😘

    उत्तर द्याहटवा